Tuesday, 13 March 2018

किंग फोर्ट, किंग ग्रुप,किंग ट्रेक....


गडांचा राजा हरिश्चंद्रगड
हरिश्चंद्र गड आणि तारामती शिखर ट्रेक
उंची - ४८५० फूट
प्रकार - गिरिदुर्ग
चढाईश्रेणी - मध्यम
ठिकाण- नगर जिल्हा
डोंगररांग - हरिश्चंद्राची डोगररांग

हरिश्चंद्रगड माहिती-महाराष्ट्रात नगर जिल्ह्यामध्ये अकोले तालुक्यात पाचनई गावाजवळ हरिश्चंद्र हा गड आहे खरे तर इथे पोहोचण्यास चार-पाच वाटा आहेत. खिरेश्वरकडील वाट -टोलार खिंड, सावर्णे-बेलपाडा-साधले असा घाटमार्ग नळीची वाट, आणि पाचनई गावाजवळून जाणारी वाट. हरिश्चंद्रगड-तारामती शिखर समुद्रसपाटीपासून सुमारे ४८५० फूट उंचीवर आहे. खिरेश्वर आणि पाचनई ही पायथ्याची गावे आहेत.हरिश्चंद्रगड म्हणजे नगर जिल्ह्याचे महाबळेश्वर आहे. ठाणे, पुणे आणि नगर यांच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असणारा पर्वताप्रमाणे दिसणारा प्रशस्थ डोंगर म्हणजे हरिश्चंद्रगड, हाराष्ट्रात सर्वात उंच शिखर म्हणजे कळसूबाई आहे त्यानंतर हरिश्चंद्रगड हे उंचीनुसार दोन नंबरच्या स्थानावर येते. एखाद्या स्थळाचा अथवा गडाचा किती विविध प्रकारे अभ्यास करता येतो याचा सुरेख नमुना म्हणजे हरिश्चंद्रगड होय. हा गड पूर्व-पश्चिम असा पसरला आहे. पूर्वेला तारामती शिखर तर पश्चिमेला कोकणकडा असा हा एक अद्वितीय निसर्गाविष्कार आहे. हरिश्चंद्रगडाचा माथा अतिशय विस्तीर्ण असल्यामुळे तो खालून एकदम भव्य दिसतो
इतिहास-साडेतीन हजार वर्षांहूनही प्राचीन असलेल्या चहुबाजूंनी नटलेल्या रौद्रभीषण कडेकपारींनी नैसर्गिक संरक्षण लाभलेल्या या हरिश्चंद्राचा उल्लेख प्राचीन अग्नीपुराणात व मत्स्यपुराणात आढळतो..... महाराष्ट्रातील इतर पारंपरिक किल्ल्यांपासून हा किल्ला वेगळा आहे. इतर किल्ल्यांमध्ये आढळणारी तटबंदी येथे दिसत नाही. या किल्ल्यावर प्राचीन लेणी आहेत, तसेच सुमारे १२व्या शतकापेक्षा जुने शालिवाहन काळातील शिवमंदिर आहे. सह्याद्रीतील अंत्यंत दुर्गम किल्ला म्हणून याची ओळख आहे. येथील मंदिर आदिवासी कोळी महादेव जमातीचे कुलक असून महादेवाच्या नावावरूनच जमातीची ओळख आहे. संपूर्ण सह्याद्री पट्ट्यातील सर्व महादेव मंदीरही या जमातीचे प्रतीक आहेत. १७४७-४८ मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली. असा हा गडाचा थोडक्यात इतिहास सांगता येईल.
ठिकाणे :
हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर :  मंदिराच्या प्रांगणात  भिंत आहे. या  भिंतीसमोरच एक दगडी पूल आहे. या पुलाच्या खालून एक ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो यालाच ‘मंगळगंगेचा उगम’ असेही म्हणतात. पुढे ही नदी पायथ्याच्या पाचनई गावातून वाहत जाते. मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहेत. काही गुहा रहाण्यासाठी योग्य आहेत तर काही गुहांमध्ये पाणी आहे. या गुहांमधील पाणी थंडगार व अमृततुल्य आहे.
केदारेश्वराची गुहा : मंगळगंगेच्या प्रवाहाच्या दिशेने गेल्यावर डाव्या हातास एक गुहा लागते. याला केदारेश्वराची गुहा असे म्हणतात. या गुहेत १ मीटर उंच आणि २ मीटर लांब असे शिवलिंग आहे. यात कमरभर पाणी आहे. ही गुहा खरंतर चार खांबावर तोलली होती परंतु सध्या एकच खांब शाबूत आहे. याच गुहेत एक खोलीही आहे. या शिवलिंगाला प्रदक्षिणा घालावयाची असल्यास थंडगार पाण्यातून जावे लागते.
हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या दारात एक पुष्करणी आहे. त्यामधील कोनाड्यांमध्ये पूर्वी मूर्ती होत्या. मंदिराच्या समोर नंदी आहे. साधारण दहाव्या अकराव्या शतकात झांज राजाने बांधलेल्या १२ मंदिरांमधील हे मंदिर आहे असे म्हणतात 
कोकणकडा : कोकणकडा म्हणजे हरिश्चंद्रगडावरील सर्वात मोठे आकर्षण. कोकणकडा म्हणजे गिर्यारोहकांना आकर्षणाचे स्थान. अर्ध्या किलोमीटर परिघाचा,वाटीसारखा अर्धगोल आकाराचा काळा भिन्न रौद्रभीषण कोकणकडा हा एकमेव अद्वितीय असावा. संध्याकाळच्या वेळी सूर्यास्ताचा नयनरम्य सोहळा या कड्यावरून पहाण्यात जो आनंद आहे तो अवर्णनीयच आहे.

तारामती शिखर : तारामती शिखर गडावरील सर्वात उंच शिखर आहे. साधारणतः उंची ४८५० फूट. शिखराच्या पोटात एकूण सात लेणी आहेत. आजुबाजुला अनेक गुहा आहेत. यातही राहण्याची सोय होते. गुहेच्यासमोर उभे राहिल्यावर डावीकडे जाऊन पुढे वर जाणारी वाट आपल्याला अर्ध्या तासाच्या चढाईनंतर तारामती शिखरावर घेऊन जाते. या शिखरावरून समोरच दिसणारे जंगल,घाटावरचा आणि कोकणातील प्रदेश न्याहाळता येतात.
दिनांक १०-११ मार्च २०१८ या तारखेला माऊंटन एज ऍडव्हेंचर पुणे ग्रुपचा ८१ वा हरिश्चंद्रगड ट्रेक म्हणजे आमच्यासही पर्वणीच असते. कारण फेब्रुवारीपासूनच उन्हाळा सुरु होतो. आणि अशा कडक उन्हात कॅम्पिंग असले की जरा हायसे वाटते.तेथील सूर्योदय सूर्यास्त शांतपणे अनुभवता येतात. खरे तर आमच्या फोना ग्रुपचे नामकरण झाले आहे नवीन नाव माऊंटन एज ऍडव्हेंचर पुणे असे ठेवण्यात आले आहे. या नवीन नावाच्या ब्यानरसहित हा पहिला ट्रेक होता आणि तोही गडांचा राजा हरिश्चंद्रगड  येथे होता त्यामुळे सर्वच ट्रेकर्स खुश होते. पुण्यापासून सुमारे १६५ किमी अंतरावर हरिश्चंद्रगड आहे. १० मार्च शनिवारी सकाळी १०:३० च्या सुमारास आमची माऊंटन एज ऍडव्हेंचर पुणे ग्रुपची बस ट्रेकर्सना घेत-घेत निगडी-तळेगांव-चाकण-राजगुरूनगर,बोटा-ब्राह्मण वाडा- कोतुळ मार्गे पाचनई गावात म्हणजे गडाच्या पायथ्याशी पोहोचली. मध्ये आमचे अन्ताक्षरीचे पुढारी, उत्साही शेवाळकर सर यांच्या  घरी भर उन्हात सरबताची उत्तम पर्वणी मिळाली.
एका ट्रेकरला काही कारणाने मधेच उतरून परत जावे लागले. तासाभराच्या अंतराने बस जरा गरम झाल्याने अर्धातास थांबल्याने काही ट्रेकर्सने लहानपणीचा पारंब्याचा खेळ अनुभवला तर काहींनी रास्ता रोको फोटोग्राफीचा आनंद घेतला. एकूणच काय तर मिळालेला वेळ सत्कारणी लावला. असा हा मध्ये थोडा वेळ गेल्याने पुणे ते पाचनई गावापर्यंत पोहोचायला ५ तासाऐवजी ६ तास लागले इतकेच. मला मनोमन सूर्यास्ताची ओढ लागली होती.सूर्यास्त गडावर मिळेल की नाही मिळेल याची मनात शंका आली होती म्हणून मी बसमधून सूर्याला मोबाईल कॅमेऱ्यात कैद करीत होते.
संध्याकाळी ५:४५ च्या सुमारास आम्ही पायथ्याशी पोहोचल्यावर पटापट आमच्या ट्रेक सॅक पाठीवर बांधल्या आणि लगेच ट्रेकला सुरुवात केली. खरंतर त्या शांत रम्य संध्याकाळी फक्कड  चहाची तप आली होती परंतु तिथे तो फक्कड चहा पित बसलो असतो तर गडावर पोहोचण्यास जास्त उशीर आणि अंधार झाला असता. त्यामुळे आम्ही लगेचच गड चढाई सुरु केली. गडाच्या पायथ्यापासून तो गडाचा  प्रशस्त पसारा पाहून अंदाज येत होता की नवीन ट्रेकर्सना थोडी धास्ती वाटत होती की ते ट्रेक करू शकतील की नाही. पण ग्रुप लीडर्सची नवीन ट्रेकर्सना दिलासा देण्याची रीत खूप छान असते ते सगळ्यांचा उत्साह वाढवत असतात.

सूर्य जणू खुणावत होता,”चला या रे लवकर नाहीतर माझी घरी परतायची वेळ झाली आहे. आमच्यासोबत अजून एक-दोन ट्रेकग्रुप होते. माझ्यासोबत सुप्रिया होती मला माझ्यापेक्षा जास्त क्षमता असलेले, जास्त कुवत असलेले जास्त वेग असलेले आणि मजा मस्ती फोटोग्राफी करीत जाणारे ट्रेकर्स आवडतात. त्यामुळे सुप्रियाची माझी गट्टी जमली होती. तिची बहिण पहिल्यांदाच ट्रेकला आल्याने आणि मागे राहिल्याने तिला खूप काळजी वाटत होती.परंतु आमचे लीडर्स एक पुढे एक दुसरा मध्ये आणि एक दोन मागे असे सर्वांना सोबत घेऊन येण्यासाठी थांबलेले असतात.ट्रेकर्स हो, एक लक्षात ठेवा,आपल्याला मदत करण्यास कोणी नाही आपल्याला एकट्यालाच आपली सॅक घेऊन फोटोग्राफी करीत मजा मस्ती करीत परंतु तरीही शिस्तीत गड चढायचा आहे  याची  एकदा मनाशी गाठ बांधली की आपला आत्मविश्वास वाढतो. आपल्यासोबत कोणीतरी आपल्या मदतीला आहे असे मनात आणले की आपला आत्मविश्वास कमी होतो.

संध्याकाळी ६ च्या सुमारास सुरु केलेला ट्रेक आम्ही ५-६ ट्रेकर्सनी ७-१५ पर्यंत पूर्ण केला. खरेतर सुमारे २ तास तरी लागतात हि वाट चढण्यास आम्ही सूर्यास्ताच्या ओढीने गड जरा लवकर सर केला परंतु  सूर्य आमची वाट पाहून निघून गेला होता. आता मात्र अंधार पडल्याने आम्ही आमच्या इतर ट्रेकर्ससाठी थांबलो. लगेच पाठोपाठ अर्ध्या तासामध्ये सगळे ट्रेकर्स आलेच. नवीन ट्रेकर्स मधील सुरुवातीला आम्ही हा ट्रेक पूर्ण करू शकणार नाही असे म्हणाऱ्या  परवीन, पल्लवी, सायली यांना येताना पाहून आम्ही एकाच जल्लोष केला.गडावर जेवणाची सोय होते परंतु मोठा ट्रेक ग्रुप असेल तर तिथे त्यांना फोन करून तसे कळवावे लागते. याठिकाणी पोहोचल्यावर काहींनी तिथे चहा आणि काहींनी सरबताचा आस्वाद घेतला.  आम्ही  आता  हरिश्चंद्रेश्वर मंदिराजवळ पोहोचलो होतो आम्हाला अजून कोकणकडा गाठायचा होता. अंधार पडल्याने आम्ही आमच्याजवळील बॅटऱ्या काढल्या आणि एका रांगेत लीडर्सच्या आदेशाचे पालन करत शिस्तीत चालत राहिलो. अंधार खूप झाल्याने काहीही दिसत नव्हते. आमच्या ग्रुपची शिस्त आणि एकी, लीडर्सचा समजूतदारपणा  पाहून  चुकू नये म्हणून इतर ६ मुलांचा ग्रुप आला होता तोदेखील आमच्या लीडर्सच्या परवानगीने आमच्यासोबत कोकणकड्यापर्यंत आला. त्या अंधाऱ्या जंगलात एक जरी वळण चुकले तर दिशाभूल होऊ शकते. आणि मग ढुंढते रहो परिस्थती होऊ शकते त्यामुळे माहिती नसणार्यांनी तेथील गाईड किंवा वाटाड्या घ्यावा. त्या रात्रीच्या  अंधारात आमच्या बॅटरीच्या उजेडात ट्रेकर्सची रांग अप्रतिम दिसत होती. २८ जणांचा मोठा ग्रुप असल्याने कसलेही भय वाटत नव्हते.हजारो ट्रेकर्सच्या जाण्याने वाट तुडवून तुडवून जमीन धसून झाडांची मुळे वर आलेली आहेत त्यामुळे रात्रीच्या ट्रेकला काही ठिकाणी काळजी घ्यावी.
रात्री साडेआठच्या सुमारास आम्ही कोकणकड्यावर पोहोचलो. तिथे आमच्या लीडर्सने भास्कर नावाच्या व्यक्तीला आधीच सांगून ठेवल्याने आमचे साधे जेवण तयारच होते शिवाय काही तंबू लावून ठेवले होते. सगळ्यांना हायसे वाटले. आम्ही लगेच तंबूकडे रवाना होऊन आमच्या वजन सॅक तिथे ठेवून तोंडावर पाणी मारून जेवणासाठी भास्करच्या कारवीच्या घराजवळ गेलो. भात, भाजी, कढी तयार होते गरम भाकरी बनवणे चालू होते. झोपडी लहान असल्याने आम्ही २-३ पंक्ती करून जेवलो. इतक्या उंच कड्यावर त्या कारवीच्या घरात गरम गरम जेवणाची मजा काही औरच. गेल्यावर्षी गडावर प्लास्टिकचा कचरा थर्माकॉल कचरा तसेच सहली नेणारे दारू पिऊन दारूच्या बाटल्यांचा खच पाडत असत. गडाच्या स्वच्छतेची वाट लागली होती. त्यामुळे वनविभागाने सगळ्यांनाच कॅम्पिंग करण्यास बंदी आणली होती. त्यामुळे गडावर आता बिसलेरी पाणी मिळत नाही.  पाणी फक्त हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिराजवळ मिळते तेव्हढेच. कोकणकडा इथून अर्ध्या पाऊण तासाच्या अंतरावर आहे त्यामुळे आपल्या जेवणाची सोय करणाऱ्या लोकांना स्वयंपाकाला आणि प्यायला पाणी आणावयास इतक्या दूर जावे लागते ते देखील छोट्या पायवाटेने डोंगर ओलांडून डोक्यावर हंड्याने पाणी आणावे लागते. त्यामुळे आपण माणुसकी म्हणून त्या जेवणाला नावे न ठेवता उलट त्या जेवण बनवणाऱ्या मावशी-काकांना सलाम करायला हवा. आपण जरी पैसे दिले तरी त्या कार्यामागे किती कष्ट घ्यावे लागतात याचा अंदाज आणि जाणीव गड चढून गेलेल्या ट्रेकरलाच येतो.त्यामुळे पाणी सुद्धा जपून वापरले. निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर आपण अशा अनेक गोष्टी शिकून येतो. 
जेवण झाल्यावर आम्ही तंबू मध्ये सॅक ठेवून कॅम्पफायर केले. उंच ठिकाण असल्यावर तिथे थंडी होतीच.  कॅम्प फायरच्या ठिकाणी सर्व ट्रेकर्सची ओळख करून घेतली. कोणी उखाणा, कोणी गाणे, कोणी चारोळी, थोडक्यात कला सादर केली. माऊंटन एज ऍडव्हेंचर ग्रुप विषयी सगळ्यांना माहिती दिली आणि दोन-दोनच्या तिन-तीनच्या   ग्रुपने आपापल्या टेन्ट मध्ये झोपण्यास गेलो. रात्री १२ च्या सुमारास आमच्याच टेन्ट मध्ये कोणीतरी लाईट आणि २-३ वेळा फटके मारल्यासारखे वाटले. मी लीडर्सना सांगितल्यावर निकाळजे आणि अनिल यांनी पाहणी केली परंतु कोणीही आढळले नाही. परंतु मनात भय घर करून बसल्याने झोप मात्र लागली नाही. माझे टेन्टमेट अपूर्वा आणि शोभा आम्ही नंतर मात्र उगाच  भीतीला सोबत घेऊन  रात्र काढली. रात्री वाऱ्याचा वेग वाढल्याने टेन्ट नुसता फडफड करीत होता. पहाटे गजर व्हायच्या आतच आम्ही ५ला उठून पटापट यावरून तयार झालो आणि चहा घेऊन कोकणकड्याकडे निघालो.
कोकणकड्याचे सौंदर्य पाहून कोणीही त्याच्या प्रेमात पडेल असाच तो आहे. एखाद्या प्रेयसींप्रमाणे वेड लावणारा मोहात पाडणारा असा तो आहे.इथे कसलेही रेलिंग लावलेले नाही . आपण जेव्हा त्याच्या कवेत जाऊन बसतो तेव्हा जणू तो   त्याच्या हाताच्या मिठीने घट्ट पकडून ठेवतो कोणालाही खाली पडू देत नाही .तरीही आपण आपली सावधगिरी बाळगलेली बरी.  कोकणकड्यावरून समोर नाणेघाट आणि माळशेज घाटाची रांग नागिणीसारखी वळणाची दिसत होती.   वातावरण जरासे धूसर असल्याने पूर्ण स्पष्ट दिसत नव्हते. परंतु हळूहळू सूर्य वर येऊ लागला तसे सह्याद्रीचे कडे स्पष्ट दिसू लागले. पावसात सुमारे तीन हजार फूट खाली कोकणात कोसळणारा हा कडा मध्यभागी जवळजवळ ७५ फूट अंतर्वक्र आहे.असे ऐकले आहे.  कड्याच्या माथ्यावर झोपूनच (आणि जपूनच) याचे विराट रूप पहावे लागते. स्वच्छ हवा असली तर येथून कल्याणपर्यंतचा प्रदेश दिसतो. ज्यांनी चारी वाटांनी ट्रेकिंग केले आहे अंडी गडाचा सखोल अभ्यास केला आहे त्यांच्या लेखात वाचले आहे की, हा कडा रोमन लिपीतील यू 'U' या अक्षराच्या आकाराचा आहे. हा इतर कड्यांसारखा ९० अंशात नसून अंतर्गोल आकाराचा आहे. समोरून बघितला तर नागाच्या फण्यासारखा दिसतो. आजूबाजूची शिखरे फोटोमध्ये आपण आपला फोटो येण्यासाठी जसे आपली मान उंचावतो त्याप्रमाणे हे शिखरे मान उंचावत असल्यासारखे वाटत होते. कोकणकड्यावरून उठावेसेच वाटत नव्हते. यावेळी कोकणकड्याचा  तो अर्धगोलाकार वक्र पाहण्यासाठी कोकणकड्याच्या पश्चिमेला आम्हा ट्रेकर्सना नेऊन लीडर्सने खूप माहिती दिली.इथे आम्ही  फलकन  आणि इतर पक्षांना विहार करताना वरून पाहत होतो. 
 
चला दिवाळी आली आता मोती स्नानाची वेळ झाली तसेच सूर्यकिरणे वर आली आता बॅनर फोटो काढायची वेळ झाली. यावेळी मुलींची संख्या चांगली होती आणि सगळे ट्रेकर्स सगळ्यासाठी हौशी होते. जे हौशी नव्हते ते आमचे फोटोग्राफीचे वेड पाहून फोटोग्राफीचे वेडे झाले. हाच तर निसर्गाचा चमत्कार आहे. आपण निसर्गापुढे फिके पडतो आणि निसर्गावर प्रेम करायला शिकतो. आम्ही मुली कड्यावर फोटोग्राफी करीत असतानाच लीडर्सने माऊंटन एज ऍडव्हेंचर पुणे ट्रेक ग्रुप  चा बॅनर आमच्या हातात दिला आमचा आनंद गगनात मावेना झाला. घरात एखादी नवी वस्तू आल्यावर घरच्या लक्ष्मीच्या हस्ते तिचे उदघाटन होते तिची पूजा होते आणि मग त्या वस्तूची भरभराट होते तसे झाले.  तसेच नवा बॅनर आम्हा मुलींच्या हाती लीडर्सने देऊन आमचा मान वाढवला आमची आणि बॅनरची शान वाढवली.  मंदार सर, राणे सर मनापासून धन्यवाद
त्यानंतर पूर्ण ट्रेकर्सचा बॅनर फोटो घेऊन आम्ही कोकणकड्याचा जड अंतःकरणाने निरोप घेतला. एखादा मनोरा रचावा  त्याप्रमाणे बॅनर फोटोसाठी सगळे बसले होते. सगळे कसे शिस्तीत पार पडत होते. गड खूप स्वच्छ आढळला. तिथून आल्यावर भास्करच्या घरात आम्ही पोह्याचा नास्ता केला आणि चहा घेऊन त्या मावशींना धन्यवाद देऊन टेन्ट मधून आमचे सामान घेऊन हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिराकडे निघालो.
रात्रीच्या वेळी जी वाट पार केली ती आता दिवसा दूर वाटत होती. १० च्या सुमारास मंदिराजवळ पोहोचलो मारुतीच्या तात्पुरत्या घरात आम्ही आमच्या सॅक ठेवल्या आणि १०:३० च्या सुमारास तारामतीशिखरावर चढाई सुरु केली. आमच्यातील २-३ ट्रेकर्स तिथेच थांबले बाकीचे सगळे ट्रेकर्स तारामती शिखरावर निघालो. सुरुवातील घनदाट झाडी होती अश्या वेळी चापड्या नावाचा विषारी साप फांद्यांवर पानांवर बसून असतो त्याबद्दलच्या सूचना दिल्या गेल्या आणि सावधगिरीने आम्ही शिखर सर करू लागलो.

चढाव तसा खूप होता परंतु चापड्याच्या भीतीने आम्ही पटापट चढत होतो. एका ठिकाणी डाव्या हाताला पिंपळगाव जोगा धरणाचा प्रशस्त जलाशय पाहून डोळ्यांचे पारणे फिटले. आजूबाजूला असंख्य सह्यकडे आणि हा जलाशय पाहून मन भारावून आणि सुखावून गेले.
थोडे वर गेल्यावर थोडासा कठीण रॉकपॅच आला तिथे जरा सांभाळून चढत होतो एका बाजूला दरी आणि दुसऱ्या बाजूला देखील शिखराची दरीच होती. २-३ शिक्षक शाळेच्या २० एक  विद्यार्थ्यांना घेऊन  त्या उंच शिखरावरून उतरताना पाहून नवल वाटले. आम्ही शिखरावर पोहोचलो आजूबाजूचा परिसर न्याहाळला. यावेळी नीट दिसले नाही परंतु असे वाचले आहे की तारामती शिखरावरून  शिवनेरी, हडसर, चावंड, निमगिरी, सिंदोळा, जीवधन, गोरखगड, मच्छिंद्र, सिद्धगड, माहुली,कलाडगड, भैरवगड, (मोरोशी), तसेच भैरवगड (शिरपुंजे), कुंजरगड असे किल्ले दिसतात.कुठेही रेलिंग लावलेले नाही. वर छोटे पठार आहे २-३ शिवलिंगे पाहावयास मिळाली.
१२ वाजले होते आणि वर एकही झाड नव्हते त्यामुळे आम्ही भगव्यासोबत बॅनर फोटो काढून शिखर उतराईस सुरुवात केली.


एका बाजूने चढलो तर दुसऱ्या बाजूने उतरलो. उतरताना जास्त तोल जातो परंतु जरा सांभाळून उतरले तर मजा पण तेवढीच येते. साडेबाराच्या आत आम्ही शिखर उतरलो हरिश्चन्द्रेश्वराच्या मंदिरात जाताना तिथे आम्हाला श्री जयवंत नारायण  कठाळे हे गृहस्थ भेटले त्यांनी त्यांचा अनुभव आम्हाला सांगितला . पौर्णिमेला शंकराच्या पिंडीवर आपोआप दीपप्रज्वलन झालेले त्यांनी पहिले. या परिसरात  १२ शिवमंदिरे आहेत. या ठिकाणी आल्याने इतकी शक्ती मिळते की वर्षभर ही शक्ती टिकते.येथील मंदिरांमध्ये प्राकृत मराठी भाषेत शिलालेख लिहिले आहेत ते आपण वाचू शकतो.  गडांचा राजा हरिश्चंद्रगड हे त्यांचे पुस्तक  लवकरच लिहून पूर्ण होऊन प्रकाशित होईल. त्यात आपल्याला गडाविषयी, मंदिरांविषयी इत्यंभूत माहिती मिळेल असे त्यांनी म्हंटले.

त्यांच्याशी बोलून आम्ही मंदिरात गेलो मंदिरावर सुंदर नक्षीकाम केलेले आढळले. आम्ही गाभाऱ्यात जाऊन थोडावेळ ओंकारचा जप केला तेव्हा त्या ओंकारच्या कंपनाने अप्रतिम असा अनुभव आला. पिण्याचे गार आणि स्वच्छ पाणी  इथे एकाच ठिकाणी मिळते. साधारण दहाव्या अकराव्या शतकात झांज राजाने बांधलेल्या १२ मंदिरांमधील हे मंदिर आहे असे वाचले आहे. 
मंदिराच्या उत्तरेकडे पाण्याच्या प्रवाहाने झालेली घळ आहे. या ळीमध्ये केदारेश्वराची लेणी आहे. यामध्ये भलीमोठी पिंड आहे. पिंडीच्या बाजूला पाणी भरलेले असते.प्रदक्षिणा मारता येते. हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या दारात एक पुष्करणी आहे. त्यामधील कोनाड्यांमध्ये पूर्वी मूर्ती होत्या.

आम्ही थोडा वेळ तेथील पाण्यात पाय टाकून बसलो माशांनी पायांना मस्त मसाज केला. इथे आंघोळ करण्यास आणि पोहण्यास सक्त मनाई आहे कारण एकतर ही नैसर्गिक संपत्ती आहे दुसरे म्हणजे इथे पोहणाऱ्यांचा पाण्यात असलेल्या वेलींमुळे खडकांमुळे जीव देखील गेला आहे.
आता मात्र भुकेने पोटात कावळे ओरडू लागले होते. मारुतीच्या घरातील पडवीमध्ये आम्ही सर्वांनी १ च्या सुमारास  मस्त गरम गरम जेवण केले आणि थोडी विश्रान्ती घेऊन गडाचा निरोप घेऊन लगेच २:३० च्या सुमारास गड उतरण्यास सुरुवात केली.
फोनची बॅटरी आता संपल्याने फोन बंद करून सपासप पावले टाकून आता पायाला भिंगरी लावल्यासारखे उतरत होतो.ट्रेक संपत आला की पाठीवरची सॅक आपोआप जड वाट्याला लागते पाय जड होतात तसे आमचे झाले होते. गडाच्या शेवटी एका ठिकाणी सरबत बनवून ठेवले होते परंतु तिथे कोणीही नसल्याने आम्ही आमचे सरबत गाळून प्यायलो आणि पैसे काढून ठेवणार तितक्यात सरबतवाले दादा आले त्यांना पैसे दिले. त्यांनी आमचे आमच्या ट्रेकर्सजवळ खूप कौतुक केले असे समजले. साडेतीनच्या सुमारास आम्ही पायथ्याशी पोहोचलो आमच्या आधी फक्त ४५ मिनिटांमध्ये पाटील पोहोचले होते. एकामागून एक ट्रेकर्स आले आणि आम्ही लगेच साडेचार वाजता पाचनई गावाचा निरोप घेऊन पुणेकडे रवाना झालो. यावेळी सगळ्याच्या सगळ्या ट्रेकर्सने अन्ताक्षरीमध्ये सहभाग घेतला आणि खूप रंगत आणली हे खूपच कौतुकास्पद होते. एकापेक्षा एक सरस, चढाओढ आणि धमाल आली.  सर्वच ट्रेकर्स अप्रतिम जुगलबंदी होती. सर्वांनी एक लक्षात ठेवा कितीही थकलो तरी अन्ताक्षरीने खूप थकवा जातो. ट्रेक लीडर रोहित आणि नेहमीचे ट्रेकर्स हो किंग फोर्टचा किंग ग्रुपचा किंग ट्रेक मिस केलात तुम्ही.  माऊंटन एज ऍडव्हेंचर पुणे ग्रुप चा ८१ वा ट्रेक सर्व ट्रेकर्सच्या उत्तम सहकार्यामुळे आणि लीडर्सच्या उत्तम नियोजनामुळे यशस्वीरीत्या पार पडला. ग्रुप लीडर्सना धन्यवाद. जियो माऊंटन एज ऍडव्हेंचर पुणे.

Sunday, 25 February 2018

"ट्रेकर्सची चंदेरी दुनिया.."

दिनांक २५ फेब्रुवारी २०१८....

फोना ट्रेकींग ग्रुपचा Blog मुंबईच्या दैनिक महासागर या बातमीपत्रात छापून आला. ⛳⛳⛳

Wednesday, 21 February 2018

सोनेरी क्षणांचा सोबती "चंदेरी".



ट्रेक - चंदेरी किल्ला
उंची- २३००फूट
प्रकार - गिरिदुर्ग
ठिकाण- ठाणे जिल्हा
डोंगररांग- माथेरान
दिनांक- १८ फेब्रुवारी २०१८


'चंदेरी किल्ला"-माहिती- चंदेरी किल्ला हा ठाणे जिल्ह्यातील माथेरानच्या डोंगररांगेत आहे. किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे २३०० फूट इतकी आहे.पुण्यापासून सुमारे १२० कि. मी. अंतरावर चंदेरी हा किल्ला आहे. मे १६५६ मध्ये शिवरायांनी कल्याण भिवंडी-रायरी पर्यंतचा सारा मुलूख ताब्यात घेतला तेव्हा त्यात हा गडही मराठ्यांच्या ताब्यात आला असावा असा अंदाज बांधता येतो. ७ ऑक्टोबर १९५७ रोजी चंदेरी किल्ल्याच्या सुळक्यावर संघटित प्रस्तरारोहणाचा प्रारंभ झाला असे म्हटले जाते. अतिशय अवघड वाट आणि किल्ल्याच्या माथ्यावर गुहेच्या अगोदर पडक्या अवस्थेत तटबंधी दिसते हे पाहून ह्या किल्ल्याचा इतर किल्ल्यावर आजूबाजूच्या परिसरावर देखरेखीसाठी वापर होत असावा.

चंदेरीहा म्हसमाळ नवरी बोयी या डोंगररांगेतील एक आहे तसेच  पनवेलचे जवळील  कर्नाळा, प्रबळगड, इर्शाळगड , माणिकगड, पेब, माथेरान आणि अशा कितीतरी गडांपैकी एक देखणा गड म्हणजे चंदेरी होय. चंदेरीच्या पायथ्याशी असलेली घनदाट वृक्षराजी, गवताळ घसरडी वाटआणि मुरबाड निसरडा कातळमाथा म्हणजे सह्याद्रीमधील  एक आव्हानच आहे. तामसई गावाच्या हद्दीत असणारा असा हा दुर्ग म्हणजे ट्रेकिंगची आवड असणाऱ्या ट्रेकर्सचे खास आकर्षण आहे.
फेब्रुवारी महिना म्हणजे माझ्यासाठी "सोनेरी क्षणांचा सोबती" असतो कारण याच महिन्यात व्हॅलेंटाईन्स डे चा एक आठवडा साजरा करता येतो शिवाय माझ्या पार्टनरचा वाढदिवस असतो त्यात आमच्या लग्नाचा वाढदिवस असतो. यावेळी त्यात भर म्हणून चंदेरी किल्याची ट्रेकची सोनेरी संधी मला मिळाली होती.
रविवार दिनांक १८ फेब्रुवारी २०१८ या दिवशी फोना टीमचा ८० वा ट्रेक आयोजित केला होता. १८ फेब्रुवारीला सकाळी ६ वाजता आमची बस निगडीहुन निघून  तळेगाव-लोणावळा- खोपोली -नेरळ-चारफाटा-मार्गे-  उमरोली- चिंचवली येथे ९ च्या सुमारास पोहोचली.अर्थात मध्ये प्रवास चांगला होण्यासाठी नारळ फोडून आणि चारफाटा कर्जत येथे ठाकरे हॉटेल जवळ थोडा वेळ थांबून नास्ता करून आणि चहा घेऊनच. 😊घाटामधून जाताना ड्युक्स नोज नेहमीच स्मित हास्य करतो. कर्जत फाटा सोडले की एन.डी स्टुडिओ जवळ पाठीमागे मोरबे धरणाचे प्रशस्थ दरवाजे दिसतात.👌

चिंचवली येथे पोहोचल्यावर तिथे एक लग्न असल्याने स्पीकरवर गावाकडच्या लग्नाच्या गाण्याचा आवाज कानाला सुखावून गेला. आमची बस बघून गावातील मंडळी जरा पुढे आली जणू वर्हाड आलं असं समजून😊😊. बस अजून थोडी पुढे नेऊन लगेचच ट्रेकला सुरुवात केली. गावातील गणेश नावाचा वाट दाखवणारा आम्ही सोबत घेतला कारण चंदेरी किल्ला तसा  चढाईस कठीण असल्याने आणि सध्या उन्हाचे दिवस असल्याने इकडे कमी ट्रेकर्स फिरकतात.

बसमधून जाताना माथेरानची डोंगर रांग अप्रतिम दिसत होती. दुरून चंदेरी कोणता हे ओळखू येत नव्हते परंतु जसजसे जवळ जात होतो तसतसा चंदेरी चमकू लागला होता👌. आमच्या ट्रेक लीडर्सने(मंदार सर आणि राणे सर, रोहित) बरोबर सांगितले होते. मोठा सुळका आणि जवळच एक छोटा सुळका दिसतो (नवरा-नवरी) तो चंदेरी आहे.  ट्रेकसाठी बरेचसे नवीन चेहरे होते परंतु पुणे ते चंदेरी प्रवासात ते आपलेसे आणि जुने झाले होते. 
शिवगर्जनेने ट्रेकला सुरुवात झाली आमच्यातील एका ट्रेकरने २ ओळी ऐकवल्या,
"ओळखलंत का मॅडम मला? फोनामध्ये आला कोणी,
कपडे होते सुपरमॅनचे आणि डोक्यावरती टोपी निळी
संधन व्हॅली रॅपलिंग ट्रेक नंतर भेटलात तुम्ही  
ताज्या झाल्या ट्रेकच्या आठवणी" 
वळून पहिले तर "ओळखले मी त्या क्षणी, अरे हे तर अविनाश आणि दिनेश
संधन व्हॅलीच्या ट्रेकदरम्यान इनोवेटिव्ह फोटोग्राफी करणारे फोटोग्राफर खास" 
हास्यकल्लोळ करून जल्लोषात ट्रेक सुरूच राहिला. चंदेरी किल्ला आणि शेजारचा म्हसमाळ सुळका हे दोन्ही सुळके इंग्रजी व्ही अक्षराने जोडले गेलेत. एक डोंगर पार करताना अर्धातासभर चांगलाच चढाव असल्याने सगळ्यांनाच जरा दम लागत होता. यावेळी माझ्यासाठी खास व्यक्ती माझ्यासोबत होती माझा पार्टनर डीपी. 😊😊त्यामुळे मी मनोमन जास्त खुश आणि बिनधास्त होते.
आमचा वाट दाखवणारा मार्गदर्शक आम्हाला अचूक वाट दाखवीत होता. कारण घनदाट जंगल असल्याने एकट्याला वाट सापडणे तसे कठीण वाटत होते. चंदेरी आणि म्हसमाळच्या मध्ये जिथून पावसाळ्यात मोठा धबधबा कोसळतो आणि नदीला जाऊन मिळतो त्या दगडी घळीतून आम्हाला वाट काढत जायचे होते. हळूहळू ऊन वाढायला लागले होते. वाटेत डोंगराला वणवे लावून जंगल जाळून लाकूडतोड केलेली दिसली. लाकडाच्या मोळ्या बांधून ठेवल्या होत्या. मधेच एक मोठे मध काढलेले मधाचे पोळे आम्हाला दिसले.

११ वाजून गेल्यावर ती दगडी घळ चढताना चांगलीच दमछाक होऊन आम्ही थोडे थोडे थांबून थांबून चढत होतो. आमच्यातील ४-५ ट्रेकर(दिनेश,प्रतीक,दिगू,अविनाश, बनसोडे) थोडे पुढे गेले. मी माझ्या पार्टनरसोबत आणि इतर ट्रेकर सोबत थांबून थांबून चढाई करीत होते.


१२ वाजल्यानंतर मात्र उन्हाचे चटके जाणवू लागले आणि अतिशय घसरडा मुरबाड चढ आम्हाला कठीण जात होता.फासफूस करीत आणि पोहोचायचंच आहे असा निर्धार करून घळीच्या डाव्या बाजूने झाडांच्या मुळांना धरीत घसरड्या मातीशी सामना करीत चढत जाऊन त्या व्ही आकाराच्या जोडाजवळ पोहोचल्यानंतर डाव्या बाजूला चंदेरी तर उजव्या बाजूला म्हसमाळ फोटोला पोज दिल्यासारखा दिमाखात उभा दिसतो.
चंदेरीचा सुळका अतिशय देखणा दिसत होता. परंतु तरीही तो अजून खूप दूर होता. आणि त्या घसरड्या छोट्या निमुळत्या वाटेवर कुठेही रेलिंग वगैरे काहीही लावलेले नाही. फार फार तर दगडाला धरून चढाई करीत होतो. भूक लागल्याने आणि दुपारी १२चे फेब्रुवारीतील कडक ऊन असह्य झाल्याने ४ पावले टाकली की अक्षरशः बसावे लागत होते. तरीदेखील त्या तशा दमलेल्या अवस्थेत देखील माझी फोटोग्राफ़ी सुरु होती. त्यामुळे मला एनर्जी मिळते.
चंदेरी सुळक्याजवळ चढाई करत असताना पलीकडे दूर मोरबे धरणाचा जलाशय नजरेस पडला. तिथूनच पुढे कलावंतींण आणि प्रबळगड पुसटसे दिसत होते. त्यांच्या आकारावरून मला ते ओळखता आले. या ठीकाणी आजूबाजूला कसलाही आधार नसल्याने शांतपणे चढाई केलेली बरी नाहीतर जरा जरी घाई केली तर दरी आपल्याला कुशीत घ्यायला तयारच असते.

पुढे जाणारा प्रत्येक जण सतत थांबताना दिसत होता.पुढच्याला अजून किती वेळ आहे?? असे विचारल्यावर अजून पाचच मिनिटे आहेत असे आमच्या लीडर्सच्या शब्दात सांगून समजूत काढत असे.   असे करत करत एकमेकाला धीर देत  दुपारच्या एक वाजता आम्ही चंदेरीच्या सुळक्याजवळ पोहोचलो. परंतु गुहा काय अजून दिसता दिसेना. त्याठिकाणी आधी ५ मिनिटे बसून मग आम्ही गुहेकडे निघालो. अमोल, प्रवीण म्हणाले मॅडम तुमचा स्टॅमिना चांगला आहे.थँक यु ट्रेकर्स.  परंतु खरे तर माझे हाल काय होतात ते फक्त मला माहित असते. महत्वाचे म्हणजे  हा स्टॅमिना ट्रेकच्या सातत्यामुळे येतो. आपला निर्धार आणि फोना टीम आणि लीडर्सच्या सहकार्यामुळे कठीणातील कठीण ट्रेक देखील आपण सहज करू शकतो फक्त आपण लीडर्सच्या नियमांचे वेळोवेळी पालन केले पाहिजे.


जवळपास दीडच्या सुमारास आम्ही गुहेत पोहोचलॊ. गुहेत जाताना तिथे एक पाण्याचे टाके आहे त्यात रंगीबेरंगी मासे पहावयास मिळाले. यात कायम पाणी असते असे गणेश गाईड म्हणाला. आम्ही तोंडावर ते गार पाणी मारून गुहेकडे रवाना झालो. गुहेजवळ छोट्या घंटा असलेली कमान आहे. पुढे गेल्यावर गणपतीची मूर्ती आणि शंकराचे छोटे संगमरवरी मंदिर बांधलेले दिसले. इथे पूजा होत असावी असा अंदाज येतो कारण हळदकुंकू पसरलेले दिसले.  तसेच त्या छोट्या मंदिराजवळ लाद्या मारलेल्या दिसल्या. इतक्या वर हे सामान नेऊन हे बांधकाम कसे केले असावे हा मला आणि सगळ्यांना पडलेला मोठा प्रश्न आहे. कारण आम्ही फक्त पाणी आणि जेवणाचा डबा असलेली छोटी सॅक घेऊन जातो तरी थकून जातो.

शंकराची पिंड, नंदी  यांची पूजा करीत असतानाची पार्वतीची मध्यम आकाराची मूर्ती हसरी,अतिशय रेखीव देखणी होती. जे आधी पोहोचले ते ३-४ जण  जण इतर ग्रुपचे २ एक्सपर्ट ट्रेकर्स सोबत असल्याने सुळक्यावर गेले. खरंतर लीडर्सचा आदेशच होता की वरच्या कठीण सुळक्यावर यावेळी आपण जाणार नाही आहोत फक्त २००० फुटापर्यंत जाऊन गडाची माहिती घेऊन उतराई करणार होतो. टप्प्या-टप्प्याने ट्रेकर्स येत होते.चंदेरी  गुहेत पोहोचल्याचा आनंद स्वर्गसुखाइतकाच होता. त्या गुहेत ३०-४० जण आराम करू शकतील इतकी जागा आहे. पूर्ण गुहेला आतून चंदेरी रंगाचा स्प्रे केल्यासारखा वाटत होता. आम्ही आमचे जेवणाचे डबे काढून जेवण केले.
३०० फूट वर सुळक्यावर गेलेले आमचे दोघे ट्रेकर्स परत आले आणि आमच्यातील बनसोडे काकांना डिहायड्रेशन होऊन त्रास झालेला ऐकला त्यावेळी लीडर्ससहित सगळे फर्स्ट एड् चे सामान घेऊन सुळक्याकडे रवाना झाले त्यांना कसेबसे करून गुहेपर्यंत आणण्यात आले. ट्रेकिंग करताना आपले वय, आपणच आपली क्षमता ओळखून वेळोवेळी थोडेथोडे पाणी पिणे गरजेचे आहे.  गरजेप्रमाणे पाणी शरीरात गेले नाही तर पायात कळा येतात चालणे अशक्य होते आणि त्याचा त्रास स्वतःबरोबर सर्व ट्रेकर्सना देेखील होतो, वेळ वाया जातो. कृपा करून सर्व ट्रेकर्सनी याची नोंद घ्यावी.जेवण झाल्यावर  ट्रेकर्स ची ओळख करून घेतली. फोनासोबत प्रत्येक वेळी हुरहुन्नरी ट्रेकर्स असतातच. यावेळी रोहितचा मित्र प्रवीण हरपळे हा एक त्यातला होता. "महाराष्ट्रातील गढी" यावर तो पुस्तक लिहितो आहे. प्रत्येकाकडे वेगवेगळी उत्कृष्ट  कला असते त्याचे ज्ञान पुस्तकरूपाने तोच आपल्यासमोर आणणार आहे.प्रवीणला शुभेच्छा दिल्या. 


ट्रेकिंगचे सातत्य आणि ब्लॉगचे सातत्य यासाठी मला, माझ्या पार्टनरला तसेच फोनाचे ८० ट्रेक उत्कृष्टरित्या(बेष्टंम बेष्ट) पार पाडले यासाठी ट्रेक लीडर्स राणे सर आणि मंदार सर यांना रोहितने फोना ट्रेकर्स ग्रुप आणि  फोनाच्या सेक्रेटरी निर्मला मॅडम, निकाळजे काका  यांच्या कडून "शौर्यगाथा मावळ्या शक्तिपीठांची" हे प्रमोद बोराडे आणि प्रिया बोराडे लिखित पुस्तक बक्षीस देण्यात आले. लीडर्सचा सत्कार म्हणजे सगळ्या ट्रेकर्सचे आणि फोना टीमचे कौतुक. 'अंधार फार झाला एक दिवा पाहिजे या देशाला जिजाऊंचा शिवा पाहिजे" या राजू राऊतांच्या पोवाड्याने गुहा दणाणून गेली. आमच्यातील ३ ट्रेकर्स चंदेरी सुळक्यावर गेले होते ते म्हणाले की गुहेच्या थोडे पुढे सुळक्याच्या पायथ्याशी देखील एक टाके आहे. कातळमाथ्याचा विस्तार फक्त लांबी पुरताच आहे. रुंदी जवळजवळ नाहीच. छोटी अरुंद वाट, खाली दरी त्यामुळे हल्ली सुळक्याचा माथा गाठणे फारच कठीण झाले आहे. वर  शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा एका मोठ्या शिळेवर भगव्यासोबत विराजमान आहे
सुळक्यावरून उगवतीला माथेरान, पेब डोंगररांग इ. दिसते. तर मावळतीला भीमाशंकरचे पठार, सिद्धगड, गोरखगड, पेठचा किल्ला इ. दिसतात.बाकी काही असो वेळेअभावी मला त्या तिन ट्रेकर सोबत चंदेरी सुळक्यावर जाता आले नाही त्यामुळे अजूनही जीवाची अतिशय घालमेल होतेय.😢 तब्बेत बिघडलेल्या ट्रेकरला बरे वाटल्यावर बॅनर फोटो काढून ४ वाजता चंदेरी किल्ला उतराईस सुरुवात केली. उतरताना आजूबाजूचे गड, किल्ले, घनदाट जंगल डोळ्यात आणि  कॅमेऱ्यात साठवून घेतले आणि उतराईला सुरुवात केली. आजूबाजूला कसलाही आधार नसल्याने आणि घसरडे असल्याने चढताना जितके कठीण वाटत होते त्यापेक्षा जास्त उरताना पाय लटपट करीत होते.


यावेळी ट्रेक मध्ये मी आणि निर्मला अश्या दोघीच लेडी ट्रेकर्स  असल्याने मला आमचा दोघींचा अभिमान वाटत होता तरीही मी कविता, ऋतुजा, बाकीच्या सर्व लेडी ट्रेकर्सना मिस करीत होते. कारण त्यांनी हा चंदेरीचा अप्रतिम सोनेरी ट्रेक मिस केला.उन्हामुळे चढताना साडेतीन ते ४ तास लागलेला चंदेरी दोन ते ३ तासात उतरलो. उतरताना ६ नंतर सावली असल्याने थोडा गारवा होता. एकीकडे सूर्य मावळत होता परंतु आम्ही चंदेरीच्या एकदम पायथ्याशी चालत असल्याने आम्हाला तो दिसत नव्हता परंतु त्या संधीप्रकाशात सह्याद्रीच्या डोंगररांगा अतिशय गडद दिसत होत्या. अंधार होऊ लागल्याने सकाळी न दिसलेले घोस्ट ट्री आता उठून दिसू लागले होते.

शेवटचा टप्पा पार करताना पायातले बळ नेहमीच संपते. परंतु इतका मोठा गड सर केल्याचा परमानंद असतो.यावेळी पार्टनर सोबत असल्याने आणि त्यात लग्नाचा वाढदिवस असल्याने मला हा ट्रेक कायम स्मरणात राहील असा होता. ७ च्या सुमारास पूर्ण अंधार झाल्यावर मोबाईल बॅटरीच्या उजेडात चिंचवली गावात आम्ही पोहोचलो. आमचा गाईड गणेश याने शेवट पर्यंत सर्व ट्रेकर्स येईस्तोवर आमची साथ सोडली नाही. त्याचा आणि चंदेरीचा समाधानी मनाने आणि जड अंतःकरणाने निरोप घेऊन आम्ही अंताक्षरीच्या तालात पुन्हा त्याच मार्गाने पुणे गाठले. फोना लीडर्सचे उत्तम-योग्य नियोजन आणि सर्व ट्रेकर्सचे उत्तम सहकार्य यामुळे फोना टीमचा ८० ट्रेक उत्तमरीत्या पार पडला. या ट्रेकचे बेस्ट फोटोग्राफर दीपक, रोहित, जय, प्रतीक,दिगू, दिनेश,अविनाश, शेवाळकर सर, प्रवीण लष्करी  सर आणि सगळ्यांचेच विशेष कौतुक. "फोना रॉक्स."   


गणेश ढुमणा-चंदेरी ट्रेक गाईड मोबाईल नंबर-७०३०९७६७८०)