Monday, 15 December 2025

आजोबा पर्वत ट्रेक

आजोबा पर्वत ट्रेक 

ठिकाण - ठाणे जिल्हा 

चढाई- मध्यम श्रेणी

दिनांक- 13 डिसेंबर 2025

उंची- 4511 फुट 

ट्रेक टीम- Mountain edge Trek group 

शनिवारी रात्री दहाच्या सुमारास निघालेलो आम्ही पहाटे साडेपाचच्या सुमारास डेहेणे गावात पोहोचलो. त्याठिकाणी बाळकृष्ण दादा यांच्या घरी चहा नाश्ता आणि जेवणाची सोय होती. आम्ही गेल्या गेल्या त्यांच्या वठाणात म्हणजे घराच्या मधल्या दालनात आम्हाला सतरंज्या अंथरूण ठेवल्या होत्या. काही जणांनी वामकुक्षी घेतली. काही जणांनी तर वाघाची डरकाळी फोडली. 😂😂 आम्ही फक्त विस मिनिटे पाठ सरळ केली. ब्रश करून लगेच आवरून तयार झालो.‌चहा नास्ता तयार झाला. थोडं खाऊन लगेच बसमध्ये बसलो. कारण ट्रेकच्या सुरूवातीच्या जागेपर्यंत बस जाते.‌तिथून पुढे कच्चा रस्ता आहे. 

या ठिकाणी एक ग्रुप फोटो घेवून ट्रेक सुरु  झाला. कोवळ्या उन्हात शांततेत हसत हसत सगळे जण फोटो काढत काढत निघालो होतो.तीन किलो मीटरची पायपीट करून वाल्मिकी ऋषींच्या आश्रमाजवळ आम्ही पोहोचलो. जाताना सोबत उगवता सूर्य शांत, स्वच्छ, सुंदर वातावरण होते. आकाश निरभ्र असल्याने डावीकडे अलंग मदन आणि कुलंगची डोंगररांग तसेच रतनगड कळसूबाई रांग साद घालत होती. माझ्या ट्रेक न केलेल्या मैत्रीणी आणि मी पहिल्यांदाच सह्याद्रीत सोबत ट्रेक करीत होतो.

माझ्या मनात ट्रेक पूर्ण होईपर्यंत धाकधूक होती की यातल्या एकीने जरी ट्रेक पूर्ण नाही केला तर मला वाईट वाटेल. त्यामुळे मी मुद्दामच सुरूवातीच्या टप्प्यात कोणाच्याही सोबत राहिले नाही. जसा ज्याचा वेग तसं चालत राहिलो.‌ अधेमधे सोबत होतोच.‌बरेचसे नविन ट्रेकर्स होते. माझ्या पायाची शिर जणू फाटली होती इतकी वेदना मला होत होती. माझ्या मनात एकच विचार होता नैसर्गिक रित्या त्या नसा ताणल्या गेल्या की वेदना वाढून दुखणं पुर्ण बरे होते. 

ट्रेक सुरु केल्यावर साधारण दिड तासात वाल्मिकी ऋषींच्या आश्रमाजवळ पोहोचलो येथील वातावरण अतिशय शांत आणि मनाला समाधान देणारे होते. घनदाट जंगल आणि उंच उंच झाडे यामुळे आश्रमात सावली होती. सितामाई न्हाणीघराकडे लवकुश पाळण्याकडे असे सुचना फलक नजरेस पडले. 


रामायण महाभारतातील प्रसंग आपण पुस्तकात वाचले आणि दुरदर्शनवर आपण हे प्रसंग मालिकांमध्ये पाहिलेत परंतु प्रत्यक्षात सितामाता या ठिकाणी काही काळ वास्तव्यास होत्या अशी आख्यायिका आहे.सितामाता यांचा पादस्पर्श झालेल्या जागी आपण आलोय यात खूप मोठे समाधान आहे. वाल्मिकी ऋषींनी समाधी घेतली ते स्थळ येथे आहे. मदीराच्या आवारात विरगळी आहेत. थोडा वेळ थांबून आम्ही आजोबा पर्वत च्या वरच्या बाजूला निघालो. पायवाट होती पण ती कशी? तर जिथून धबधबा पडतो तशी दगडधोंड्यांची वाट. खडा चढ होता आणि माझ्या पायाच्या वेदनेने मी अक्षरशः रेटत रेटत तो पाय ओढत तो खडा चढ चढत होते. अधे मधे माझ्या मैत्रिणींच्याकडे माझं लक्ष होतेच. 

आजोबा पर्वत हे महाराष्ट्रातील माझ्या माहेरच्या ठाणे जिल्ह्यात, शहापूरजवळ बालाघाट रांगेत असलेले एक ऐतिहासिक आणि पौराणिक ठिकाण आहे, जे लव-कुशचे जन्मस्थान मानले जाते, याठिकाणी सीतेने वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात आश्रय घेतला होता.लव-कुश वाल्मिकी ऋषींना आजोबा म्हणत असत. या ठिकाणी वाल्मिकी ऋषी यांचे वास्तव्य होते. येथे वाल्मिकी आश्रम देखील आहे.त्यामुळे या गडाला आजोबा पर्वत असे म्हणतात अशी आख्यायिका आहे. हा किल्ला ट्रेकिंगसाठी लोकप्रिय असून, याच्या ३००० फुटांच्या उंच भिंतीमुळे तो साहसी गिर्यारोहकांसाठी एक आव्हान आहे आणि येथे लव-कुशच्या पादुका असलेली गुहा व पाण्याचे टाके आहेत, ज्यामुळे याला धार्मिक महत्त्वही प्राप्त झाले आहे.

आजोबा पर्वताची प्रमुख वैशिष्ट्ये थोडक्यात खालील प्रमाणे आहेत.


पौराणिक महत्त्व विचारात घेता रामायणातील लव आणि कुश यांचा जन्म याच पर्वतावर झाला, म्हणून याला 'लव-कुश जन्मस्थान' म्हणतात.आजोबा पर्वतचे  भौगोलिक स्थान पहाता हा आजोबा पर्वत रतनगड आणि हरिश्चंद्रगड यांच्यामध्ये बालाघाट रांगेत येतो.ट्रेकिंगसाठी मध्यम श्रेणीचा ट्रेक असून, पूर्वेकडून किंवा पश्चिमेकडून  दोन्ही बाजूने चढाई करता येते, पूर्वेकडील मार्ग जवळपास 7 ते आठ तास फक्त जाण्यासाठी लागतात. वर जेवणाची सोय आपली आपण करून. रात्री विश्रांती घेऊन सकाळी परतीचा मार्ग धरून दुपारी पायथ्याच्या गावात येता येते.  म्हणजे काय ?तर  आजोबा टॉपपर्यंत जावयास दीड दिवसाची वेळ पाहिजे.


आमचा ट्रेक फक्त सितामाईच्या लव-कुश पाळणा असलेली गुहा इतकाच होता.  तो एक दिवसात पूर्ण होतो. परंतु त्यासाठी पुण्यावरून रात्री 10 ते 11 च्या सुमारास निघालो तर आपण पहाटे पोहोचून सकाळी चहा नाश्ता केला की लगेच ट्रेक सुरू केला तरच हा ट्रेक एक दिवसात पूर्ण होतो.
डेहेणे गावातून निघाल्यावर वाल्मीकी आश्रमात पर्यन्त जावयास जवळपास दीड तास लागतो. आणि तिथून सितामाई च्या लवकुश पाळण्यापर्यंतच्या गुहेत पोहोचण्यास सुमारे दीड तास लागतो.
माझ्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यापासून सुमारे ४८ किमी अंतरावर डेहेणे गाव आहे.इथून आजोबा पर्वत ला'आजा पर्वत' किंवा 'आजोबा गड' असेही म्हणतात. आजोबा पर्वत हा ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमींसाठी एक उत्तम ठिकाण आहे, जिथे इतिहास, पौराणिक कथा आणि निसर्गाचा सुंदर संगम पाहायला मिळतो. आजोबा किल्ल्याची ऊंची समुद्रसपाटीपासून सुमारे ४५११ फुट इतकी आहे. किल्ल्याचा प्रकार गिरीदुर्ग आहे.
काही दिवसांपूर्वी थेरपी योगा क्लाससाठी जाताना एक मांजर माझ्या वेग असलेल्या activa खाली आली मांजरीला वाचवण्यासाठी गाडी खूप धडपडली.  ब्रेक दाबून जागेवरच गोल फिरून आपटली. मांजर वाचली आणि घाबरून पळून गेली. त्यावेळी पायाला जबरदस्त मुका मार लागला.  काळानिळा झाला होता पाय. त्यानंतर ती नस दुखायला लागली बसता येत नाही.असा काहीसा प्रकार होता मी पुणे ते आजोबा पर्वत प्रवास आणि ट्रेक कसा पूर्ण केला हे माझं मला ठाऊक. असो.

10 वर्षापासून या ट्रेकमुळे मी Arthritis  वर मात केली  त्यामुळे अजून तरी ट्रेक सोडणार नाही.  किंबहुना यावेळी ट्रेकमध्ये 60 te 70 वर्षांची तरुण मंडळी आल्यामुळे मला तर जास्त छान प्रेरणा मिळाली. शिवाय यावेळी माझ्या नॉन ट्रेकर्स मैत्रिणी होत्या म्हणुन ट्रेक कॅन्सल केला नाही.  आपण एकमेकांन कडून अशा चांगल्या प्रेरणा घेत राहिलो तर आयुष्यभर आनंदी राहू आणि सुदृढ राहु असे माझे मत आहे. जगाचा निरोप घेईपर्यंत फिट रहायचे असेल आणि आजारी पडायचे नसेल तर आपल्याला जो व्यायाम जमेल तो करायलाच पाहिजे. मला सह्याद्री आवडतो म्हणून मी ट्रेक करते.😅. मला हे सर्व सांगायला गरजेचे का वाटले.  कधी कधी लोकांना वाटते ही Jayuu नुसता ट्रेक, तो कॅमेरा, photography यातच असते.  पण यामागची मेहनत कष्ट कसरत आपल्याला ठाऊक असते.  मला स्वतःला जे आवडते त्यासाठी मेहनत केलीच पाहिजे.  आपोआप काहीही मिळत नसते. माझी कधीच कोणाशी स्पर्धा नसते.  की मी हा कॅमेरा घेतला तो कॅमेरा घेतला वैगेरे.  Photography ची आवड होती ट्रेकला जाऊन photography मध्ये सुधारणा होऊन सराव होऊन वेगळा कॅमेरा घेऊन सह्याद्रीच्या पाऊलखुणा टिपण्याचा प्रयत्न करते.

दहाच्या सुमारास लवकुश पाळणा असलेली गुहा आहे तेथे आम्ही सर्वजण पोहोचलो. लवकुश पाळणा आहे तेथे असलेले पाण्याचे टाके ओलांडून पुढे टोकाजवळ गेले की महाराष्ट्रातील सर्वात कठीण समजले जाणारे Alang मदन आणि कुलंग हे त्रिकूट दिसते. तसेच Ratangad खुटा kalsubai शिखर, Sandan दरी ही रांग आकाश निरभ्र असेल तर स्पष्ट दिसते. आम्हाला दिसली.  Trek Leader राणे sir यानी अतिशय सुंदर रित्या स्पष्टीकरण सहित माहिती दिली. मंदार sir यांनी अतिशय सुरेख गोष्ट केली ती म्हणजे आम्हा स्त्रियांना पाळणा गायला लावला.  आजोबा पर्वतला जोडून कात्राबाई शिखर आहे. तो देखील भन्नाट ट्रेक आहे. आमच्या सोबत गावातील वाटाड्या बाळकृष्ण दादा होते त्यांनी अचूक मार्ग दाखवून उत्तम माहिती दिली. 
"छत्रपती शिवाजी महाराज की जय"🚩 शिव गर्जना करून मी माझा ड्रोन बाहेर काढून जमतील तसे चांगले शूट घेतले. ब्यानर फोटो घेवून लवकुश पाळण्याकडे गेलो. आम्ही स्त्रियांनी पाळणा गायला आणि साडेअकराच्या सुमारास परतीच्या प्रवासाला निघालो.कारण जेवण डेहणे गावात होते.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही ट्रेकर्स youngsters 60 te 70 वर्षाचे होते त्यांनी उत्तमरित्या ट्रेक पूर्ण केला. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. वय हे फक्त आकडा असतो. धमक इच्छा आपल्या मनात असावी लागते.आपण अशा प्रेरणादायी व्यक्तींकडून प्रेरणा घेत असतो.
आम्ही काही ट्रेकर्स पुढे आलेल्यांनी वाल्मिकी आश्रमात विश्रांती घेतली सितामाईचे न्हाणीघर आणि सितामाईचा हात या ठिकाणाला भेट दिली  आणि दुपारी अडीचच्या सुमारास सर्व ट्रेकर्स आले. आमची बस गावात निघाली आणि गावात बाळकृष्ण दादा यांच्या घरी veg non veg जेवणाचा आस्वाद घेतला. बाकीच्याचे जेवण उरकत होते तोपर्यंत मी गावातून आजूबाजूच्या डोंगर रांगेचा drone शॉट घेऊन परतीच्या वाटेला निघालो कर्जत मार्गे सुसाट निघालो वाटेत "राणे कॉर्नर" Tea house मध्ये चहा घेऊन रात्री 11.30 दरम्यान घरी पोहोचलो.  
जाताना रात्रीच्या प्रवासात सगळ्यांनी विश्रांती घेतली आणि निघाल्यावर दमल्यामुळे सगळेच शांत होते त्यामुळे तोंडाची गाणी वाजली नाहीत. गडावर एक पाळणा गायला आणि सायलीच 1 गाणं ऐकलं तेवढेच माझ्या कानाला आणि मनाला समाधान. 😅♥️
जय जिजाऊ 🚩🙏
जय शिवराय 🚩🙏
जय शंभू राजे 🚩🙏
आपल्या peb फोर्ट ब्लॉग नंतर खूप दिवसांनी लिहिला आहे blog. वाचा वेळ मिळेल तेव्हा. 😊
वेगळा आणि अतिशय भारी ट्रेक होता मध्यम श्रेणीचा  आणि छोटा कमी अंतराचा ट्रेक असल्याने माझ्या non treker जिगरीना  trek पूर्ण करता आला. 😊💐🥳
अतिशय उत्तम नियोजन होते.  जेवण एकदम झक्कास होते अन्नदाता सुखी भव 👏
Dear मंदार सर 
राणे सर 
रोहित सर 
मनापासून आभार. 
Mountain Edge रॉक. 🚩♥️♥️
सर्वांचे छायाचित्रण उत्तम आहे.  
धन्यवाद 
भेटू सह्याद्रीत गडकिल्ल्यांवर 🚩♥️.
.
.
.
Patil Jayuu


Wednesday, 28 August 2024

पेब किल्ला थरारक अनुभव

पेब किल्ला 
जिल्हा - रायगड 
उंची - २१०० फूट 
दिनांक २५ ऑगस्ट २०२४ 
ग्रुप-माऊंटन एज अँड ऍडव्हेंचर पुणे 

पेब किल्ला हा रायगड जिल्ह्यात माथेरान डोंगररांगेत आहे. पेब किल्याला विकटगडदेखील म्हणतात. समुद्रसपाटीपासून  जवळपास २१०० फूट इतकी पेब गडाची उंची आहे. नेरळ रेल्वेस्टेशनला उतरून जिप्सीने माथेरानकडे जाता येते. जर धुके पाऊस नसेल आभाळ निरभ्र असेल तर पेब किल्ल्यावरून आजूबाजूचे चंदेरी, श्री मलंगगड, प्रबळगड असे बरेच गडकिल्ले दिसतात. गडावर राहण्याची सोय शिवाजी शिडी वाटेने गेलात तर त्या  गुहेत पन्नास ते शंभर माणसे राहू शकतात  परंतु जेवणाची सोय नाही. जेवण आपले आपण न्यावे लागते 
बापरे किती वर्षांनी ट्रेक लेख लिहितेय मी आठवत पण नाही. लेख कसा लिहायचा??? हे पण विसरले की काय? तर नाही विसरले. लिहिणे मी कधी हि विसरू शकत नाही. "अलंग मदन कुलंग ट्रेक"नंतर मी ट्रेकिंगचा सविस्तर असा ब्लॉग लिहिलाच नाही. हो, ४ वर्षे झाली असतील. हात दुखतो का दुखतो?? कसा दुखतो देवास ठाऊक. हात अजून बरा होतोच आहे तोवर पावले सुजायची पावले सुजायची कमी झाली मग काय तर गुढग्यात वात  येतो. कसला वात आणि कसलं  काय एकंदरीत काय तर ट्रेकला न जाण्याची नाटकं असतील हिची असे लोकांना वाटत असेल परंतु तसे अज्जीबात नाही बरे. खरे तर ट्रेक माझा आत्मा आहे मग मी मृत्यू शय्येवर असले आणि जर कोणी म्हटलं की "जयु ट्रेक लावलाय येतेस का" तर मी मृत्यू शय्येवरून तडक उठून ट्रेकला तयार असेन. लंगडा पाय लंगडा हात घेऊन मी असे कित्येक ट्रेक केलेत तेदेखील माझ्यासाठी कठीण असणारे . हिमालयात दोन्ही पाय नसलेले लोक जातानाचे व्हिडीओ मी पहाते आणि प्रेरणा घेते.मित्र हो, परमेश्वराने आपल्याला तर सर्व अवयव दिलेत ते फिट ठेवायचे असतील तर माझ्यासाठी ट्रेक हा भन्नाट पर्याय आहे. 

डिसेंबर २०२३ मध्ये चक्रम हायकर्स ट्रेकग्रुपसोबत २ दिवसांचा आंबिवली -पर्वत-चकदेव-महीमंडणगड-आंबिवली असा जवळपास ४५ किलोमीटर्सचा  रूट केला होता त्यानंतर २०२४ मध्ये एप्रिलमध्ये कोथळे भैरवगडमार्गे कारकाई ट्रेक केला. मग एका गुढग्यात वात येऊ लागला त्याने माझा आत्मविश्वास कमी झाला. काही वैद्य बोलू लागले मॅडम खूप झाले ट्रेक आता बंद करा. काही वैद्य म्हणाले काही नाही गुढगा बरा झाला की जावा ट्रेकला. मागच्या महिन्यात म्हणजे जुलैला पुन्हा तोच लंगडा गुडघा घेऊन चक्रेश्वर ते तासूबाई एका दिवसात जवळपास २२तें २५ किलोमीटरचा ट्रेक केला. त्यानंतर आता ऑगस्ट महिन्यात एखादा मध्यम चढाईचा ट्रेक करावा आणि शांत रहावे  असा विचार केला होता." माऊंटन एज अँड ऍडव्हेंचर पुणे" यांनी पेब किल्ला ट्रेक लावला होता. मी आतापर्यंत एकदाही पेब किल्ला ट्रेक केला नाही फक्त ऐकलं होतं की ट्रेक मध्यम चढाईचा आहे. म्हणून शेवटच्या ३ दिवस आधी जागा बुक केली. 
२५ ऑगस्ट रविवारी सकाळी निगडीहून निघालेली बस ट्रेकर्सना गोळा करत लोणावळ्याच्या दिशेने निघाली. सोबत  धुवाधार पाऊस होता. पाऊस असावा परंतु आमच्या ट्रेकमध्ये अडथळा नको येउदे रे महाराजा असे मी म्हणत होते  परंतु निसर्गापुढे आपले काहीही चालत नाही. नेमका बसचा वायपर बंद पडला आणि मुसळधार पावसामुळे ड्रायव्हरला काहीही दिसत नव्हते त्यामुळे वायपर दुरुस्तीसाठी आम्ही मनशक्ती केंद्राजवळ नाश्त्यासाठी थांबलो तोपर्यंत बसचालकाने फिटर बोलवून वायपर दुरुस्त केला. तब्बल दोन तास उशीर झाल्याने त्यानंतर मात्र बस कुठेही न थांबवता अंताक्षरी चालू ठेवली आणि आम्ही सकाळी साडेदहाच्या सुमारास नेरळला पोहोचलो. तेथून  ओमनीच्या सहाय्याने १५ मिनिटात माथेरान रोडवर पोहोचलो तेथून पेब किल्ल्याकडे जाण्यासाठी जवळपास ४-५ किलोमीटरचा रेल्वेरुळाच्या रस्त्यावरून वळसा घालून आम्ही मालडुंगे येथे पोहोचलो. हा रेल्वे रुळावरचा प्रवास इतका जादुई होता की इथून माझी पावले निघत नव्हती, 

पाऊस पडून गेला ते धबधबे वाहताना सुंदर मोत्याच्या धारांप्रमाणे भासत होते. धुक्याचे ढग हिरव्यागार डोंगरांवर चित्रात रंगवल्याप्रमाणे सफेद छटा काढताना भासत होते. सगळल्याचं मैत्रिणी माझ्यासाठी नवीन होत्या कारण २ वर्षांनी माऊंटन एज अँड ऍडव्हेंचर पुणे"सोबत ट्रेक ला आले होते. मी जमतील तसे व्हिडीओ फोटो माझ्या इन्स्टा ३६० मध्ये लॉक केले.बरेच ट्रेकर्स निसर्ग फोटोग्राफी करताना पाहून मला आनंद झाला शिवाय माझा दुसर्याने काढलेला एक तरी फोटो येणार याचा मनोमन आनंद दुसरे काहींनाही. 

रेल्वे आली असती तर अजून भारी विडिओ क्लिप मिळाली असती . रेल्वे रुळावरून चालण्याचा अनुभव भन्नाट होता. इथे थोड्याच अंतरावर चालत गेले की रेल्वे रुळावरून दिसणारा कड्याचा गणपती आहे. त्या ठिकाणी  माथेरान परिसर फिरणारी किंवा  फक्त कड्याच्या गणपतीकडे जाणारी मंडळी गर्दी करून उभी होती. कड्याच्या गणपतीकडे जायला घनदाट जंगलातुन जावे लागते शिवाय  छोटी वाट आहे परंतु  पाऊस असल्याने किमान पूर्ण कपडे घालणे आवश्यक आहे परंतु सहलीला आलेलं निम्मे लोक अध्या कपड्यातच होते. खंत वाटली. असो.

कड्याच्या गणपतीकडे जाणारी वाट इथून जाते. 
लीडर्सने ट्रेकविषयी आवश्यक सूचना केल्या आणि आम्ही पेब किल्ल्याकडे निघालो. आधी कड्याच्या गणपतीला भेट दिली नमस्कार केला एक बॅनर फोटो घेतला आणि पुन्हा थोडे माघारी येऊन पेब किल्याकडे प्रस्थान केले. पाऊस सतत सुरु होता. एका बाजूला दरी एका बाजूला डोंगर अशी ती छोटीशी घसरडी वाट होती. जपून चालले नाही तर डावीकडे थेट दरीत प्रस्थान होईल. लीडर्सने सूचना देऊनदेखील कित्येक ट्रेकर्सचे बूट ट्रेकबूट नव्हते. फुल बाहीचे टीशर्ट फुल ट्रॅकपँट न घसरणारे बूट ऊन पावसापासून संरक्षण म्हणून टोपी, रुमाल ,थंडी लागू नये म्हणून किमान वरचा रेनकोट किंवा थंडी लागणार नाही असे जाकीट सोबत हवेच. ट्रेक उन्हाळी असो किंवा पावसाळी असो एक दिवसाच्या ट्रेकला किमान २-३ लिटर पाणी हवे. एनर्जी म्हणून चिप्स, शेव, अशा चटपटीत पदार्थांऐवजी खजूर, गुळ, शेंगदाणा राजगिरा चिकी,खारे किंवा भाजलेले  शेंगदाणे,  सफरचंद, काकडी लिंबू सरबत हे कायम जवळ हवेच. कोणती वेळ कधी येईल सांगू शकत नाही. मध्यात पाणी मिळेल न मिळेल ज्यादाचे पाणी जवळ हवेच, पाणी बाटली ऐवजी ते डी कथेलान ला मिळते ते पाण्याचे ब्लॅडर असले तर उत्तमच. यामुळे घोट घोट पाणी पिता येते आणि आपले शरीर डिहायड्रेड होत नाही. बघा पटते का ते ?

कोरोना काळात मी काही आडवाटेवरचे ट्रेक केले त्यात बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी मी शिकले त्या इथे सांगाव्या वाटतात म्हणून सांगते. पुढच्या ट्रेक ला त्या किती आत्मसात करायच्या त्या आपल्या आपण ठरवाव्या. आजूबाजूचे सुंदर निसर्ग नजरे कॅमेऱ्यात आणि डोळ्यात साठवत आम्ही एका शिडीजवळ पोहोचलो. या लोखंडी शिड्या भागाभागातून जरी आणून लावल्या असल्या तरी त्या लावताना त्यांना किती कठीण वाटले असेल. या शिड्या ज्यांनी लावल्या त्यांना मनापासून धन्यवाद . जिथे जिथे कठीण चढाई/उतराई आहे तिथे शिड्या असल्याने आपण ट्रेकर सहज जाऊ शकलो. त्या शिड्यावरील मधल्या काही पायऱ्या थोड्या सैल झाल्या आहेत त्यामुळे जपून आणि बसून गेले तर उत्तमच. एक शिडी पार केल्यावर पुन्हा वळसा घालून पुढे पेब माथ्याकडे आम्ही निघालो.चढाई मध्यम होती परंतु पाऊस सारखा पडतच असल्याने आम्ही चालतच राहिलो. 

एक मोठा शिडीटप्पा आम्हाला पार करायचा होता. लोखंडी शिड्या आणि त्यात काही शिड्यांचे स्क्रू ढिले झाल्याने पुन्हा जपून जायचे होते. जपून जायचे त्यात तो पाऊस म्हणतो मी. आणि मला हे सगळं माझ्या कॅमेऱ्यात कैद करायची हौस भारी.कोणतीही घाईगडबड न करता मी स्वतःला सुरक्षितपणे करून निर्सग आणि ट्रेकर्सच्या हालचाली कॅमेऱ्यात टिपत असते. दुसऱ्याला मदत करायची म्हटली तरी आधी आपण एक स्टेबल पोज घ्यायची मग दुसऱ्याला हात द्यायला हे प्रत्येकाने कायम लक्षात ठेवावे. दुपारी दीडच्या सुमारास एल आकाराची मोठी शिडी पार केल्यावर पंधरा वीस मिनिटात आम्ही पेब माथ्यावरील शिडीजवळ पोहोचलो.
त्या शिडीवरून तोल जाऊन पडले कुणी तर जबर जखमी होऊन माणूस मारू शकतो. बेफिकीरपणा केला की अंगास येतो. असे अपघात इथे झालेत. परंतु आमचे ट्रेक लीडर यांचे एकदम  बारीक लक्ष असते. एकूण एक ट्रेकर ट्रेक पूर्ण करून घरी सुखरूप कसा पोहोचेल याची ते तंतोतंत पाहणी करून काळजी घेतात. शेवटच्या शिडीच्या पायऱ्या आणि बाजूला हात धरण्याचे बार देखील सैल झाले आहेत त्यात तो सोसाट्याचा वारा. टोपी कॅमेरा आणि मी उडून जात होतो. या ठिकाणी किरण मध्ये थांबून एकेकाला त्या शिडीवरून सावकाशपणे वर घेत होता.दुपारी दोन वाजता आम्ही पेब किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचलो. 

इथे कमीत कमी जागेवर अधांतरी बांधलेले दत्तमंदिर म्हणजे देवाचा आशीर्वादच आहे. इतक्या वरती इतकं जड सामान नेऊन मंदिर बांधणे खूप कष्टाचे काम आहे. आपल्याला नुसते चालणे कठीण वाटते. मंदिरात दत्तमूर्तीला नमस्कार करून गडमाथ्यावर एक बॅनर फोटो घेऊन आम्ही लगेच उत्तरेला सुरुवात केली कारण आमचे जेवण गडाच्या पायथ्याशी ठाकरवाडी वस्तीवर होते. 
आमच्याजवळ थोडे पाणी आणि थोडा वरचा खाऊ होता तोच आम्ही अधून मधून खात होतो कारण भूक तर खूप लागली होती. आता थोडेसेच अंतर राहिले बरं का या आशेवर आम्ही उतरत होतो. चढाईपेक्षा पावसात उतरायची रिस्क जास्त असते. घसरडे दगड निमुळती वाट दगडगोट्यातून धबधबे पडतात की ज्या वाटेने पावसात फार कोणी जात नाही. पावसाचा जोर वाढला की या वाटा पाण्याने तुडुंब भरून धोधो वाहू लागतात त्यातून पावले टाकणे फारच जिकरीचे काम असते आणि आम्ही ते करीत होतो. गडमाथ्यावर २-३ वर्षांपूर्वी इथे अपघात झाल्याने मंदिराच्या एक टप्पा खाली तारेचे कुपन लावले आहे आम्ही त्या तारेच्या कुंपणाखालून बसून घुसून शिवाजी शिडीमार्गे आनंदवाडीकडे उतराई करू लागलो. तेथे काही ग्रुप होते. 
आमचा मोठा ग्रुप आणि लहानथोर वयाची मंडळी पाहून ते म्हणाले ही वाट कठीण आहे इथून जाऊ नका. परंतु आमच्या ट्रेकलिडरना  ती वाट माहित होती त्यामुळे आम्ही निश्चिंत होतो आहे. खाली उतरताना पहिल्याच वाटेवर काहींना हात टेकल्याने मुंग्या चावल्याने बोटाना लाली आणि सूज आली. माणूस घाबरून जातो काय चावले असेल बरे ?? सोबत डॉक्टर आणि प्रथोमपचार बॉक्स असल्याने चिंतेचे कारण नव्हते.  इंजेक्टबल मेडिसिन सुद्धा होती. डॉ राजेंद्र यांनी लगेच मेडीसिन दिल्याने मुंगी दाह कमी झाला.घनदाट जंगल निमुळती वाट पोटात कावळे नाहीतर डोमकावळे ओरडत होते. वाटेत ट्रेकर्सने केलेले मार्किंग शोधावे लागे. आम्ही काही ट्रेकर्स पुढे होतो बरेचदा किरण एक टप्पा खाली जाऊन मार्किंग पाहून येई आणि लीडर्सना आणि मागच्यांना सांगत असे अरे, हीच वाट आहे. काही ठिकाणी तुटलेल्या पायऱ्या अती घसरडे तुटलेले वेडे वाकडे दगड काय ती बेक्कार वाट होती. आठवले तरी जीव घाबरतो. लढताना लढणारे कसे आले गेले असतील हा विचार खरोखर विचार करायला लावतो. 


पेब गडाला नुसते वळसे घालत आम्ही उतराई करत होतो. सुरपारंब्याचा  खेळ खेळत होतो जणू. आम्ही दिसतो का बघा बरे?? घसरून पडण्यापेक्षा अगदी लहानमुलांसारखे रांगत उतरत होतो आम्ही. दुपारी सव्वातीनच्या सुमारास आम्ही श्री. छत्रपती शिवाजी शिडीजवळ आलो. खाली तुटलेल्या पायऱ्यांच्या जागी जुनी लोखंडी शिडी होती परंतु खाली दरी आणि वरून धोधो पाऊस असल्याने सगळ्यांना सुरक्षित खाली जाण्यासाठी लीडरने सोबत आणलेला  मोठा रोप आजूबाजूच्या झाडांना  घट्ट रोवून एकेक ट्रेकर्सला सुरक्षितरित्या खाली सोडीत होते. शिडी उतरताना उलटा  वॉटरफॉल डोळ्यावर फटकारे मारत होता आणि म्हणत होता, "भर पावसात कोणी तुम्हाला या कठीण वाटेने येण्याचा सल्ला दिला ?आम्हाला बाबा थ्रिल हवे होते म्हणून आम्ही या वाटेने आलोय. "या ठिकाणी थांबल्यावर थोडे सरबत थोडे पाणी पिऊन थोडा सुका मेवा खाऊन घेतला. घोट घोट सरबत पित असताना कुणीतरी मैत्रीण म्हणाली तयारी बघा हिची. हो एक दिवसाच्या ट्रेकला जेवणाची सोय जरी असली तरीही गरजेचा खाऊ पाणी सरबत हे जास्तीचे आपल्याजवळ असावे खूप उपयोगी पडते.  

तीन ट्रेकर्स गेल्यावर मी शिडी उतरले कारण इथले विडिओ तर केलेच पाहीजेत.छानपैकी शिडीवाट कॅमेऱ्यात कैद केली आणि मी ती शिडी उतरले. ३ ट्रेकर्सच्या नंतर मी चौथा ट्रेकर आम्ही खाली असलेली अतिघसरडी वाट एकमेकांच्या मदतीने सावकाशपणे पार करून पेब किल्ल्याच्या मुख्य गुहेजवळ  पोहोचलो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोफेसोबतच्या भल्यामोठ्या पुतळ्याला मुजरा करून आम्ही गुहेत पोहोचलो. खूप भिजल्याने थंडी भरली होती. गुहा प्रचंड मोठी आणि कोरडी होती. शंभर लोक आराम करू शकतील इतकी मोठी गुहा इथे आहे. आतमध्ये स्वामी समर्थांची प्रतिमा रेखाटली आहे. 



गुहेत गेल्यावर थंडी उडाली. स्मिता मॅडमकडे बराच चखणा खाऊ होता. मी शक्यतो ट्रेक दरम्यान तेलकट खायचा टाळते. परंतु भूकच इतकी लागली होती की चिप्स,भुजिया एक सफरचंद होता ते सगळं आम्ही वाटून खाल्लं. सर्व ट्रेकर्स शिडी उतरल्यावर आम्ही गुहेजवळून निघालो आणि कारवीच्या जंगलात शिरून चालू लागलो. चालत राहिलो चालत राहिलो आणि एका तासात साडेचार वाजता एका मोठ्या रॉक पॅच जवळ येऊन थांबलो. इथे थांबलो असता स्मिता म्हणाली जयू बस झाले फोटो चला पटापट अंधार होईल आता.  रॉक पॅच आला म्हणून थांबलो होतो आपण. लीडर्सने रॉक पॅच उतरण्यासाठी पुन्हा रोप बांधला आणि एकेका  ट्रेकरला सुरक्षितरित्या रॉक पॅच पार करवला. या ठिकाणी थंडी भरलेली एक भुभू होती तीला बिस्कीट दिलं की तिची थंडी उडाली आणि ती शेवटपर्यंत आमच्या सोबत होती. चालताना पायात मध्ये मध्ये येतात हे भुभू परंतु वेळ प्रसंगी आपली सोबत देखील करतात.
इथे लाईन लावून आम्ही बसलो होतो तोपर्यंत माझी मात्र बसल्याबसल्या फोटोग्राफी सुरु होती. जर धुके नसते तर आजूबाजूच्या दऱ्या स्पष्ट दिसल्या असत्या आणि माझा इन्स्टा ३६० शांत झाला असता. २९ जणांना तोच मोठा रॉकपॅच पार करायला जवळपास दीड तास लागला. आता मात्र पोटाला आग लागली होती. सहाच्या सुमारास खाली उतरणाऱ्या दोन वाट दिसल्या. यातली कोणती वाट असेल असा आम्ही अंदाज लावत होतो. मी आणि अजून काहींनी अंदाजे ओळखलेली वाट अचूक होती परंतु कसली बिकट वाट होती ती. माझा वात येणारा गुडघा आता जागा झाला. जणू काय मला म्हणू लागला.,"सोपा ट्रेक सांगून आणलेस मला आणि सकाळपासून लै दमवलास आता तुला बघतो मी " ती रडू आणणारी वाट इतकी बेक्कार होती आणि आम्ही इतके थकलेलो, इतके भुकेलेलो होतो की कोणाला बोलावे ?? कळेना झाले होते. मी चालू शकत नाही  सगळेच थकलेले, कोणी नवीन, पहिल्यांदाच ट्रेकला आलेले, प्रत्येकजण हिरमुसलेल्या होता. माझे पाय तर एखादा बेवडा चालवा तसे ते एकमेकात गुंतत होते. किरण मी आर्याची मम्मी, पोलिस अश्विनी मॅडम आणि त्यांचे सहकारी मित्र गोरे सर असे आम्ही पुढे होतो.  किरण मार्किंग बघत बघत चाले आणि किरण म्हणे," चला या रे " अशा वेळी किरणला एखादी त्याची कविता ऐकवायला सांगायला मला सुचले नाही . कारण नुसते चालण्यापेक्षा फोटो काढले काहीतरी वेगळी चबरचबर केली, गमती काढत चालत राहिलो की थकवा कमी जाणवतो. एक तासात मोबाईल कॅमेरा काढायची आठवणदेखील मला राहिली नाही.किंबहुना मी आवर्जून मोबाईल बाहेर काढला नाही कारण दुपारी चारच्या आत पोहोचणार म्हंटल्यावर मी माझा हेड टॉर्च बसमध्ये ठेवण्याचा मूर्खपणा केला होता त्यामुळे अंधार झाला तर त्या घनदाट जंगलात मोबाईल फ्लॅशलाईट उपयोगात येईल. एका तासात आम्ही एका ओढ्याजवळ पोहोचलो आणि वाटेवरच एक छोटी दरड कोसळलेली होती त्यामुळे वाट दिसेना गड्या वाट दिसेना. मंदारसर मागून आलेच. 
कोरोना काळात डोंगरयात्रा सोबत आडवाटेवरची भटकंती सुरू केली. मग दोन दिवसीय मोठा म्हणण्यापेक्षा गर्दी नसलेल्या ठिकाणी जायची सवय लागली.त्यामुळे mountain edge Pune सोबत काही वर्षांत कमी ट्रेक झाले म्हणून काय कोणी माहेराला विसरते का?? तर अजिबात नाही.मी हल्ली हल्ली आमचा तुषार भाऊ अनुभवी ट्रेकर आहे त्यांचेसोबाबत  काही ऑफबीट ट्रेक केलेत  त्यामुळे  कुठून वाट असू शकते याचा थोडासा अंदाज येतो. किरण ओढ्यात जाऊन बघ ही वाट असू शकते बघ. आणि देवाची करणी आणि नारळात पाणी तसेच आम्हाला वाटेचे मार्किंग सापडले आणि जीव भांड्यात पडला. मागचे सगळे आले आणि आम्ही ओढा क्रॉस करून पुढे गेलो आणि एका झाडाजवळ थांबलो. 


संध्याकाळचे सात वाजले होते. आता मात्र आमच्यात आपसात थोडेही अंतर पडले तर वाट चुकायची दाट शक्यता होती. सगळॆ एकत्र आले आणि चालू लागलो. मंदारसर अजून किती आहे ओ ???आता मात्र होती नव्हती तेवढी ताकद हिम्मत संपायला आली होती. परंतु एकजण म्हणेल तर शप्पथ. एका ठिकाणी थोडा उजेड दिसला आणि असं वाटलं जंगल संपलं असं वाटलं आणि आम्ही रिलॅक्स झालो आणि गवतावर घसरून धपाधप पडलो. सकाळपासून न घेतलेला सुसुचा हॉल्ट सगळ्यांनी घेतला आणि पुन्हा बेवड्याची चाल चालत राहिलो. जंगलातून बाहेर पडलो जंगल संपले असे वाटले की पुन्हा ते जंगल यायचे पुन्हा आम्ही चालायचो. आता मात्र किर्रर्र अंधार पडला होता. सगळ्यांचे मोबाइल फ्लॅशलाईट, हेड टॉर्च टॉर्च बाहेर निघाले. परंतु तरीही अति थकव्यामुळे आणि भुकेमुळे धपाधप घसरत होतो आणि पडत होतो. डि. पी. सरांकडे हेड टोर्च होता तो मला फार उपयोगी पडला मनापासून धन्यवाद सर. रात्रीच्या  साडेआठ वाजताच्या सुमारास आमच्या लाईटचा उजेड पाहून पायथ्याच्या गावातील अनोळखी तीनचार पोरं माणुसकीखातर मोठ्या बॅटऱ्या घेऊन आम्हाला घ्याल आली.  शेवटचा  अर्धा तास कसा उतरलो आमचा आम्हाला ठाऊक. गावातल्या लाईट दिसत होत्या आणि आमची चिखलमय वाट संपत नव्हती. माय आठवली. रात्री नऊच्या सुमारास आम्ही आनंदवाडीत आम्ही उतरलो पुन्हा एक ते दीड किलोमीटर चालून फणसवाडीत पोहोचलो. दुपारचे २ वाजताचे जेवण आम्ही रात्री ९-१० दरम्यान जेवलो. बिचारे दुपारपासून जेवण बनवून आमची आतुरतेने वाट पहात होते. आम्ही जवळ आलोय हे समजल्लेयावर अंगणात टेबल खुर्च्या टाकून पटापट जेवण वाढले आम्पही काही जणांनी घरात बसून जेवण केले.गुलाबजामून दोन भाज्या चपाती तांदळाची भाकरी पापड वरण भात अशी संपूर्ण थाळी पाहून पोट भरलं. अन्नदाता सुखी भव.
आम्ही आमचे ओले कपडे बदलले आणि बसमध्ये बसून पुणेकडे रवाना झालो. रात्री २ वाजता घरी पोहोचलो. मध्यम म्हणता म्हणता असा अतिकठीण घडलेला ट्रेक अनुभवला. ट्रेकमध्ये सहभागी झालेले डॉक्टर्स, पोलीस,लहानथोर मंडळींचं कौतुक करावे तेवढे कमी आहे . किरण खूप मेहनत घेतलीस असाच सुरक्षितपणे सह्याद्रीत भटकत रहा. मी फोटो काढायचे बंद केलेत म्हणणारे सगळ्यात जास्त पोज देत होते हाहाहाहा ही गोष्ट गंमतीची आहे परंतु महत्वाची देखील आहे. फोटोच्या  नादात पाय घसरून तोल जाऊन जीव जाऊ शकतो तर स्वतःला आणि दुसऱ्याला सुरक्षित ठेऊन निसर्गाचा आनंद लूटा आणि निसर्ग कॅमेऱ्यात कैद करा. सर्व ट्रेकर्सना कळकळीची विनंती आहे कोणत्याही ट्रेकला साधा समजू नका,  ट्रेकच्या पूर्ण तयारीतच ट्रेकला जावा. 
पेब ट्रेक दरम्यान डॉ काशिद झोपे सर, दिक्षित सर, शिल्पा, जय, मीनल, कस्तुरी गोरे सर, रोहिणी मॅडम आणि सर्वांनीच  उत्तम फोटोग्राफी केलीये. डॉ. काशिद सर आणि कस्तुरी यांनी अप्रतिम लिहिले आहे. खरंच कमी शब्दात सुंदर वर्णन केलय. मला खूप आवडले. ओळखी झाल्या नाही त्यामुळे मला सगळ्यांची नावे ठाऊक नाहीत. ग्रेट मंदार सर आणि राणे सर ट्रेक कितीही मोठा असो दमवणारा असो आम्ही फक्त आणि फक्त तुमच्यावर विश्वास ठेवून ट्रेकसाठी येतो आणि तो विश्वास तुम्ही सार्थ ठरवता. मनापासून धन्यवाद आणि साक्षात दंडवत. आम्ही ट्रेक पूर्ण करू शकत नाही असा चकार शब्द एकही ट्रेकरने काढला नाही. एकमेकांना सहकार्य केले आणि कोणालाही मोठी दुखापत न होता सुरक्षिरित्या आपण घरी पोहोचलो. हा ट्रेक सोनेरी क्षण म्हणून आठवणीत राहील असा जवळपास चौदा ते सोळा किलोमीटरचा भन्नाट ट्रेक होता. गर्ल Gang संख्या वाखाणण्याजोगी होती. Girls and Boys Guys Keep Trekking. मी कुठेही गेले तरीMountain Edge माझ्यासाठी माहेरघर आहे.  
Mountain Edge Pune,Maharashtra, India.
गर्ल पॉवर 



Wednesday, 14 February 2024

अग्निकर्म आणि विध्दकर्म संशोधन केंद्र


आज वसंत पंचमी आहे.आज सरस्वती देवीची आराधना, पूजा केली जाते. सरस्वती देवीला आज आपण जे मागू ते ज्ञान, ती कला देवी आपल्याला आशिर्वाद म्हणून नक्की देते.अशी आख्यायिका आहे. त्यानिमित्ताने थोडंसं लिहावं वाटलं म्हणून मी हे लिहितेय.
मी एक सामान्य ट्रेकर आहे आणि कधीतरी मराठी ट्रेक लेख लिहिते.
परंतु माझी ट्रेकिंगची सुरुवात मला दहा वर्षांपुर्वी संधीवात सुरू झाल्यानंतर झाली हे वाचून वाचणार्यांना आश्चर्य वाटेल.परंतु ते सत्य आहे.विषय असा आहे की मला RA Factor positive वगैरे काय असतं ते काहीही माहिती नव्हते. या दुखण्यामध्ये सांधेदुखी असते असे ऐकले परंतु मला फक्त हाताचे पंजे आणि माझी पावलं इतकंच दुखत असे फक्त ते वेदनेचे प्रमाण फार जास्त होते आणि मी तेव्हा चालू शकत नसल्याने मला पुढील काळात कंबर दुखी किंवा इतर दुखणी सुरू होवू नये या भितिने मी त्वरित उपचार म्हणून Alopathy चं औषध सुरू केले आणि त्यामुळे मी काही दिवसांनी चालू शकले. परंतु रोजचा medicine चा Heavy Dose आणि पंधरा दिवसांनी Steroid injections शिवाय माझ्याकडे पर्याय नसे‌. परंतु जास्त चालणे करावयास सुद्धा भिती वाटे. हातापायाची बोटं सुजायची आणि प्रचंड वेदना व्हायच्या त्या औषधं घेवूनदेखील सहन कराव्या लागल्या. पाण्यातील कामं केली की वेदना तिप्पट होत असे.तेव्हा एका गोळीची मला Alergy होऊन द्रुष्टी जाण्याइतपत साईड इफेक्ट झाले होते‌.
माझ्या डोळ्यांवर त्वरित उपचार केले म्हणून माझी द्रुष्टी जाताजाता राहिली आणि परमेश्वर क्रुपेने सुदैवाने आजही मी हे जग पाहू शकते‌. Alopathy औषधं खाऊन पोटात दुखत असे कारण माझं जेवण/रोजचा आहार फार कमी असल्याने ती औषधं माझ्या आतड्यांना सहन होत नव्हती‌. Alopathy चे Doctor medicine चा Dose बदलून कमी करून द्यायचे आणि आश्चर्यचकीत व्हायचे की या व्यक्तीचं दुखणं बरं होत नाही तरी ही व्यक्ती ट्रेकिंग कशी करत असेल‌.
ही औषधे चालू असताना एकीकडे महिन्याला/तीन महिन्यांनी किडणी लिवरचे चेकअप असतेच‌‌. Steroid च्या अतिवापरामुळे हाडे ठिसूळ होणे, किडणी लिवर खराब होणे हे ऐकून मी घाबरून Dipression मध्ये जाऊन मला काही काळ निद्रानाश झाला.पुन्हा ती झोप लागली नाही म्हणून त्यावर औषधोपचार, मग केसगळती झाली त्यावर औषधोपचार असं सगळं भयानक होतं ते सगळं.मग शांत झोप लागली जावी यासाठी mild Dose म्हणून एक गोळी घेतली की मी आख्खा दिवस ग्लानीत असे मला सतत झोप येई. मुलं लहान,मुलांंचा अभ्यास आणि घरातील कामे कशी होणार ? भविष्यात माझं कसं होणार??या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करता मी एक छंद म्हणून ट्रेकिंग चालू केले आणि हळूहळू मला महिन्यात एक दिवस का होईना वेदनेचा विसर पडू लागला‌. हळूहळू मी steroid injections बंद करून वेदना सहन केली‌.गोळयांचे डोस कमी केले‌. एका बाजूला आयुर्वेदिक औषधे सुरू होतीच आणि ट्रेक सुरुच ठेवला‌. कोरोना काळात बाहेर पडलो तर कोरोना होईल या भितिने Doctor कडे गेलेच नाही‌.😊😂त्यावेळी बिल्डिंगमध्ये एक योगाशिक्षक असल्याने मी योगा सुरू केला. सुरूवातीला कमालीचा त्रास झाला परंतु हळूहळू योगा सवयीचं होऊन दुखणं कमी झालं. तेव्हापासून Alopathy औषधोपचार बंद केलत.एकतर वेदना सहन करायची नाहीतर कधीतरी आयुर्वेदिक औषधे घेत असे. मागच्या वर्षी माझा मनगटात हात मुरगळला आणि बरेच उपचार घेवून त्याची सूज आणि वेदना काही केल्या कमी होत नव्हती‌.मी हैराण होवून वेदनांनी रोज रडत असे.  Doctor शुभम राजाराम जानकर यांचं नाव एका मैत्रिणीकडून ऐकलं‌. परंतु मला इंजेक्शनचा Fobiya असल्याने सुई टोचून घेण्याची हिम्मत माझ्यात नव्हती.तरी म्हटलं एकदा जाऊन तरी बघावं काय आणि कशी उपचार पद्धती आहे ते म्हणून फोन करून Appointment घेतली आणि अग्निकर्म आणि विध्दकर्म ही उपचार पद्धती सुरू केली. दोन आठवड्यात थोडा फरक जाणवला आता आठवड्याला ही उपचार पद्धती सुरू आहे.हाताची सूज कमी झाली आणि वेदना कमी झाली.त्यात भर म्हणून मला मध्येच कमरेत लचकले होते. काही केल्या चालता येत नव्हते माझ्या hectic schedule मुळे बरे व्हायला बारा दिवस लागले परंतु सरांच्या अग्निकर्म आणि विध्दकर्म या उपचार पद्धतीमुळे आता पुर्ण बरी झाली. माझं संधीवाताचं दुखणं मध्येच वाढलं होतं ते नुसत्या अग्निकर्म आणि विद्यकर्म यानेच बरं होतंय.कमीत कमी औषधं किंबहुना औषध नाही आणि फरक हा आहेच‌. मला स्नायुदुखीचा त्रास आहे तोही कमी होतोय‌.मनापासून धन्यवाद Doctor. तिथे येणारे पेशंट पहाता माझं दुखणं काहीच नाही असं वाटतं. केमो केलेले पेशंट,लकवा मारलेले पेशंट, Special मुलं, एक वर्ष मुलापासून ते वयस्कर मंडळी पर्यंत सर्व आजारांवर औषधोपचार करणारे असे हे Doctor आयुष्यात पहिल्यांदाच पाहिले‌. टक्कल पडलेल्या डोक्यावर केस उगवण्यासाठी देखील इथे उपचार केले जातात आणि उपचार पद्धतीने डोक्यावर उगवलेले केस पेशंट इतरांना दाखवतात.
पेशंट चा प्रश्न असतो Docter, "माझं दुखणं कधी बरं होणार ??" सर म्हणणार, "तुम्ही लवकरच बरे होणार" हा कमालीचा सकारात्मक दृष्टिकोन पेशंटची निम्मे वेदना कमी करतो. आमच्या एका ओळखीच्या पेशंटला अचानक पाच वर्षे झाली निद्रानाशाची समस्या होती‌. ती पेशंट इतर ठिकाणी लाखो रूपये खर्च करून अनेक औषधोपचार करून काहीच फरक नाही म्हणून Doctor जानकर सरांकडे आल्यावर सरांच्या औषधोपचार पद्धतीने दोन महिन्यांतच फरक पडला. ज्या व्यक्तीला पाच वर्षे रात्री झोप लागली नाही त्या व्यक्तीला आता रात्री किमान दोन तास झोप लागते. हे चमत्कारापेक्षा कमी नाही. नेपाळची एक पेशंट सरांकडे येवून बरी होतेय.असे कितीतरी पेशंट लाखो रुपये खर्च करून इतर Doctor नी सांगितले की आता यापेक्षा वेगळे उपचार नाहीत असे पेशंट सरांकडे येवून बरे होतांना दिसत आहेत.
Doctor सर, तुमच्या हातात आणि मुखात सरस्वतीचा वरदहस्त आहे. सर तु्मची प्रकृती कायम उत्तम राहो. तुमच्याकडून सदैव असेच करोडो व्यक्ती वेदनेतून बाहेर येवोत. 
.
.
.
संपर्क -
Doctor शुभम राजाराम जानकर
श्री विश्वश्री आयुर्वेद चिकित्सालय अग्निकर्म आणि विध्दकर्म
+91 95884 12914
.
.
.
Jayuu Patil-Sane
१४ फेब्रुवारी २०२४

Monday, 4 December 2023

हेअर कट

साधी गोष्ट पण खटकणारी गोष्ट.....
हो आपल्या आवडीनिवडी वयानुसार बदलत जातात.
एखाद्याला वयानुसार वर्षानुवर्षे एकाच साच्यात बसवलेल्या नियमात रहायला आवडतं विशेषता जग काय म्हणेल या चिंतेने..
एखाद्याला वेगवेगळ्या स्टाईलचे कपडे परिधान करून मिरवायला आवडते..
एखाद्याला चालू घडामोडींवरील वर्तमानातील ट्रेंडनुसार सतत बदलत रहायला आवडते.
एखाद्याला नुसतंच साधं आयुष्य जगायचे म्हणून जगायला आवडते.
एखाद्याला जगाची चिंता करत कुढत रहायला आवडते.
एखाद्याला सतत दुसऱ्यांना नावे ठेवायला आवडते.
एखाद्याला वेगवेगळ्या हेअर स्टाईल करायला आवडते.
एखाद्याला नुसतंच टक्कल आवडते.
एखाद्याला केसांचा टोप लावायला आवडते.
एखाद्याला शरीर मन तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायाम करायला आवडते.
एखाद्याला चांगुलपणाचा नुसता देखावा करायला आवडते.
एखाद्याला मैत्रीसाठी सर्वस्व पणाला लावून स्वतःची वाट लावून घ्यायला आवडते.
एखाद्याला एकटे रहायला आवडते.‌
एखाद्याला फक्त संसार नोकरी इतकंच मर्यादित रहायला आवडते.
एखाद्याला घर नोकरी सांभाळून अनेक छंद जोपासला आवडते.
एखाद्याला नवनवीन गोष्टी शिकायला आवडते.सतत नवनवीन गोष्टी शिकणे आणि त्यातून इतरांना प्रोत्साहन देणे हे आवडते.
एखाद्याला वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला आवडते.
एखाद्याला स्वतःसाठी वस्तू खरेदी करायला आवडते..
एखाद्याला दुसऱ्यांसाठी वस्तू खरेदी करायला आवडते.
एखाद्याला गडकिल्ले फिरून त्यांचा अभ्यास करायला आवडते.
एखाद्याला फक्त गडकिल्ले फिरून फोटो काढायला आवडते.
एखाद्याला फक्त रिलसाठी फिरायला आवडते..
एखाद्याला जगाचा इतिहास किंवा तेथील निसर्गसौंदर्य रिल बनवून त्यात माहिती टाकून जगासमोर आणावी वाटते..
एखाद्याला नुसतंच मनसोक्त फिरणं आवडते..
एखाद्याला फक्त फोटोग्राफी करायला आवडते..
आता या वयात हे का ??
या वयात ते का?
या वयात असंच रहावं असा अट्टाहास का असतो??
अरे स्त्री असो वा पुरुष असो आपण मरेपर्यंत मरमर मरत कामं करत रहातो.आईवडील मुलांसाठी नातेवाईकांसाठी सगळं करत रहातो.मग जर आपण आपल्याला आवडलेल्या गोष्टी केल्या तर फरक काय पडतो??
आपल्या शोभतील असे कपडे शोभतील अशी केशरचना केली टक्कल केलं काय फरक पडतो??
इतकं वय झालंय का आपलं?
इतके कमकुवत विचार करणारे आहोत का आपण???
खूप कमी लोक असतात आपल्याला प्रोत्साहन देणारे..
आपण आपल्या आवडी जपतो याला पैसा उडवणं म्हणत नाही.
माझा खाण्यापिण्याचा खर्च इतरांच्या मानाने कमी आहे.मी पाच दिवस न जेवता उपाशी राहून फक्त पाणी सटरफटर खाऊन खूप कामं करू शकते. मला वर्तमान जगायला आवडते.
जे आवडते तेच मी खाते न आवडणारी एकही गोष्ट मी उगाचच ताटात वाढून त्याचा नास करत नाही. .
आपण दुःखी असल्यावर सहानुभूती देणारे खूप असतात ते मनोमन मात्र खुश असतात.
आपण आपल्याला खुश ठेवण्यासाठी जे आवडेल ते करावे.
चांगले रहा, योग्य व्यायाम करायला आवडते तो करा फिटनेसकडे लक्ष द्या.आवडीची गाणी ऐका, चित्रपट बघा, पैसा योग्य वेळी योग्य ठिकाणी वापरावा.
चणे आहेत तर दात नाही असं होवू नये...
मला एक हेअर कट आवडला तो हेअर कट केला तर किती लोकांनी नावं ठेवली.तोंडं वाकडी केली.‌
बापरे..
नंगे पुंगे कपडे घालून मिरवण्यापेक्षा आवडलेला आणि शोभणारा हेअर कट कधीही चांगला.‌😅😂बरं ज्यांना अंगप्रदर्शन करायला आवडते त्यांनी ते पण करावं, खुशाल करावं, शेवटी प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे.😅
आम्ही पण Shorts,half प्यांटी घालतोय. आणि जोवर पोटावर अजून फोटोसाठी जिरवायची बारी आली नाही तोवर शोभतील असे कपडे घालून मिरवणार.‌
पण ट्रेक आला की तो मी नव्हेच...😂😍😅
तर एका हेअर कट वरून हे सुचलं.
हो मी उच्च शिक्षित असून एक होममेकर आहे.
मुलांवर चांगले संस्कार केलेत.
मी Trekking करते‌.
मी Traveler आहे.
मी ब्लॉगर आहे.
मी You Tuber आहे.
मी Photography करते,शिकते.
मी calligraphy शिकते.
मी बाईक राईड करते,शिकते.
मी कार चालवते, शिकते.
मी हार्मोनियम शिकते.जराशी वाजवते‌.😂😅
मी विनोदी लिहिते‌. 
फक्त मी रागीट आणि रोखठोक आहे त्यामुळे आपला मित्र मंडळ कमी आहे.
.
.
.
यात कोणालाही टोमणा नाही की कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. तुमची शपथ 💯🙏😅
.
.
.
Patil Jayuu 
४डिसेंबर २०२३

Tuesday, 28 November 2023

रवळ्या जवळ्या ट्रेक

रवळ्या जवळ्या ट्रेक
ठिकाण-नासिक
चढाई श्रेणी -मध्यम कठीण
दिनांक २६नोव्हेंबर२०२३
डोंगरयात्रा ट्रेकग्रुप, पुणे
रवळ्यागड उंची -४३६९फूट
जवळ्या गडाची उंची -४०५५फूट
सप्टेंबर २०२३ च्या केदारनाथ ट्रेकयात्रेनंतर माझा ट्रेक झाला नाही मग मला जरा कोमात गेल्यासारखे वाटत होते.२६ नोव्हेंबर २०२३ ला डोंगरयात्रा ट्रेकग्रुप पुणे यांच्या सोबत नासिकमधील रवळ्या जवळ्या आडवाटेवरची भटकंती केली आणि मला कोमातून बाहेर आल्यासारखे वाटले.


नासिक मधील सातमाळा रांग
१.अचला 
२.अहिवंत 
३.सप्तशृंग
४. मार्कांड्या 
५. रवळ्या
६. जवळ्या
७.धोडप
८.कांचना
९.इंद्राई
१०.राजधेर
११. कोळधेर
१२.चांदवड
यालाच अजंठा सातमाळ रांग असेही म्हणतात.नासिकमधील अजंठा सातमाळ रांगेतील रवळ्या जवळ्या हे दोन उंच गड एकाच प्रशस्त पठारावर वसलेले आहेत.गुगलवर सापडलेली रवळ्या गडाची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ४०५५ फूट इतकी आहे.तर जवळ्या गडाची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ४३६९फूट इतकी आहे.गड तसे दुर्लक्षित आहेत. अजिबात गर्दी नसते.❣️परंतु लिडरच्या भाषेत म्हणायचं तर दर्दी ofbeat Trekers ना गर्दी नकोच असते.😊❣️

जवळ्याच्या गडमाथ्यावर तुटलेल्या अवस्थेत पायऱ्यांची वाट खडतर होती परंतु डोंगरयात्रा ( Dongaryatra Adventure Club) चे ट्रेकलिडर आणि त्या दिवसाचे ट्रेकगाईड Doctor भोजराज गायकवाड यांच्या सहाय्याने आणि ट्रेकर्सच्या सहायाने आम्ही बिनादोरानेच सर केली आणि गडमाथ्यावर पोहोचलो.


गडावर जाऊन सोबत नेलेले जेवण थेपला चटणी खाऊन गडमाथ्यावर एक फेरी टाकली. गडमाथ्यावर चार मोठी पाण्याची टाकी आहेत त्यातले पाणी पिण्यासाठी योग्य आणि स्वच्छ दिसले.


अखंड पाषाणात कोरलेल्या पायऱ्यांचा तो सुंदर जिना चढताना उतरताना कोथळी गडाच्या पाषाणात कोरलेल्या जिन्याची आठवण येते.जिना चढताना उजव्या हाताला एक शिलालेख कोरलेला आहे.
उतरताना आम्ही जवळ्या गडाला फेरी मारून पठारावर उतरलो तेव्हा त्या बाजूला कोरीव खांब असलेली एक छोटी गुहा आढळून आली.
पठारावर फक्त कारवींच्या तीन घरांची तिवारी कुटुंबांची वस्ती. एक स्वच्छ पाण्याने भरलेले टाके आहे.मी त्या टाकीतील एक ओंजळ पाणी पिऊन घेतले कारण त्या नितळ पाण्याची चव आपल्या बिसलेरीच्या पाण्याला नसते.

दगडी रांजण, भग्नावस्थेत असलेली शंकराची पिंडी, नंदी आणि मंदिरांचे तुटलेल्या अवस्थेत दगड वगैरे आहेत.एका ठिकाणी एक ढासळलेली कबर आढळली. या ठिकाणी जेवणाची सोय नाही आपलं आपण जेवण बनवून खाऊ शकतो.

अगदीच इथे मुक्काम करायचा असेल तर पठारावरील या तीन घरामध्ये तीन चार माणसांची रहाण्याची सोय होते किंवा आपण आपला तंबू नेऊन तिथे राहू शकतो.


रवळ्या गडावर जाताना देखील तेथे रोप लावावा लागतो. सह्याद्रीतील फार एक्स्पर्ट ट्रेकर्स बिनादोरानेच जाऊ शकतात.

रवळ्या गडावर जाताना एक छोटा चिमणी क्लाइंब patch आहे त्याठिकाणी सर्वजण रोप न लावताच चढून गेले.सर्वांचे कौतुक.
गडावर दोन तीन पाण्याची टाकी आहेत परंतु त्यात शेवाळ होते ते पाणी पिण्यासाठी योग्य वाटले नाही. 
उन्हाळ्यात जाताना आपले पाणी छोटा चिरीमिरी खाऊ खजूर, गुळ चिक्की फळं,काकडी, लिंबू सरबत असं सोबत असावं.किंवा आपला साधा चपाती भाजीचा डबा जरूर न्यावा. रवळ्या गडावर सगळ्यांना जाता यावे यासाठी लिडरनी एका कठीण Rock patch होता तिथे रोप लावला होता त्यामुळे सर्वजण गडावर सुखरूप पोहोचले. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ढगाळ वातावरण होते त्यामुळे पाणी कमी लागले.
शेवटी पावसाने आपली गंमत सुरू केल्याने आम्ही काही ट्रेकर्सच रवळ्या माथ्यावर पोहोचून अक्षरशः त्या रचलेल्या दगडांना शिवून धूम ठोकत पळतच उतरलो.
गडावर प्रचंड प्रमाणात टोचणार्या काट्यांची झुडपे होती.ते काटे घरी आलेत हातात टोचून.पुढे नासिक ते पुणे जवळपास २५०-५४ की. मी चा प्रवास करायचा होता.त्यामुळे ट्रेक संपल्यावर लगेचच की मुंबईकरांचा निरोप घेऊन पुणे कडे रवाना झालो.एका दिवसात सकाळी आठच्या सुमारास सुरू केलेला ट्रेक संध्याकाळी सव्वाचारच्या सुमारास संपला.रवळ्या जवळ्या असा जवळपास १६_१८कि.मी.चा ट्रेक यशस्वीपणे पूर्ण केला.
येताना नासिककडील प्रसिद्ध पाववडा खाण्यासाठी एक दुकानात वळालो पाचच्या सुमारास जो धुवाधार पाऊस लागला त्या पावसाने रात्रीच्या बारापर्यंत अक्षरशः झोडपून काढले.परंतु खूप दिवसांनी ट्रेकला शरीराचा धुर निघाल्याने मन प्रसन्न व प्रफुल्लीत झाले व भाऊ खुश झाला.💃✌️😍
धन्यवाद Team Dongaryatra / डोंगरयात्रा
Manoj Vitthal Bhaleghare
Ravindra Shrirang Shedge
Pune Mumbai Trekers... 
"बास झालं हे जगणं, असेच ट्रेक करताना आयुष्याची अचानक exit व्हावी..
कुणाला आपला त्रास नको. कुणाशी आपलं वैर नको.आपल्यावर कुणाचं कणभर जरी प्रेम असेल ते असंच अनंत रहावं आणि आपण कसलंही ओझं न ठेवता आपण हसत हसत विलिन व्हावं.‌..."

@jayuuPatil

28-11-2023