Thursday 29 September 2016

"नजर भेट"

"नजर भेट' 
दिनांक-२७ सप्टेंबर २०१६
डहाणू गड (मुसळ्या डोंगर)
ठिकाण- ठाणे जिल्हा.   


गेला सप्टेंबर महिना काहींना काही कारणाने खूप धावपळ चालू आहे. जाम दमछाक झालीये माझी. पण मन मात्र आनंदी आणि उत्साही आहे. हाताला खाज आल्यासारखं झालंय सध्या. म्हणजे मला काहींना काही ना काही चांगलं लिहावसं वाटतं. २५ सप्टेंबर चा भोरगिरी भीमाशंकर चा ट्रेक केला. दुसऱ्या दिवशी वाढदिवस असल्याने त्याच दिवशी ट्रेक चा  चा लेख पूर्ण करायचे ठरवले आणि लेख पूर्ण केला सुद्धा.अर्थात इतर सगळी कामे करूनच. दुसऱ्या दिवशी गुजरात च्या दिशेने रवाना व्हायचे होते. माझ्या वाहिनीची आई अचानक ४-५ दिवस आजारी पडून देवाघरी गेली. वहिनीला भेटायला जायला जमले नाही. त्यामुळे २७ तारखेला वहिनीच्या आईच्या तेराव्या दिवशीच्याउत्तर कार्यास जायचे ठरवले आणि पहाटे उठून मुलांच्या शाळेची तयारी करून आणि अजून थोडी कामे आटोपून घेऊन पुणे-लोणावळा-मुंबई पुणे हायवे -ठाणे - घोडबंदर रोड- वसई- मनोर - चारोटी -उर्से अशा प्रवासाच्या दिशेने निघालो.
नेहमीप्रमाणे घोडबंदर रोड ला ट्राफिक जाम होताच एक ते दीड तास आमचा ट्राफिक मधेच गेला.कधी कधी हा  ट्राफिक मात्र उगाच असतो. कोणीतरी वाहन चालक उगाच मध्ये घुसून स्वतःची लेन सोडून समोरची लेन देखील ब्लॉक करतात. आम्हाला वाटले रस्त्याचे काम चालू असेल परंतु नंतर ट्राफिक पोलिसांनी दंडुके दाखवल्यावर रस्ता चुटकीसरशी मोकळा झाल्यावर समजले की जाण्याच्या घाईमुळे वाहन चालकांनी उगाचच समोरचा आमचा रास्ता अडवून धरला होता. 

एक ते दीड तासांनी रास्ता मोकळा झाल्यावर आम्ही गुजरात कडे निघालो.  तेव्हा पावसाने चांगलीच हजेरी लावली. खरे तर आम्हाला मुंबई-अहमदाबाद हायवे वर डहाणूजवळ चारोटी नाक्यापासून आत १०-१२ कि. मी. जायचे होते. आणि वाहिनीच्या आईचे उत्तर कार्य आटोपून आणि तिथल्या सर्व मंडळींना भेटून  आम्हाला लवकरात लवकर निघून अंधार व्हायच्या आत पुणे गाठायचे होते. चारोटी नाक्यापासून आत जायचा रास्ता खूप छोटा आहे. परंतु सध्या पावसामुळे सगळे नदी-ओढे भरून वाहत होते. सर्वत्र हिरवे गवत आणि हिरवी भातशेती छान दिसत होती. त्यामुळे प्रवासाचा थकवा जात होता. उर्से या गावी वाहिनीचा भाऊ श्री संतोष पाटील (ज्यांनी माझा "के-टू-एस ट्रेक' चा लेख आवडल्यावर "दैनिक महासागर' या बातमी पत्रामध्ये छापून आणला होता.) यांच्या घरी आम्ही पोहोचलो. कार्य पार पडले. त्या कार्याच्या वेळी मी त्या ठिकाणी काही गोष्टी ऐकल्या त्या मला मनोमन पटल्या त्या इथे नमूद करते. उत्तर कार्याला खूप गर्दी होती.  नातेवाईक आणि मित्र परिवार हजर होता. संतोष पाटील हे गरजू लोकांसाठी लगेच धावून जाणारे आहेत धडपडणारे आहेत. स्वतःचे कुटुंब सांभाळून त्यांना जे जे चांगले कार्य करता येईल ते ते त्या ठिकाणी ते करतात. त्यांच्या उर्से या गावात जेवणासाठी गावातल्याच सर्व महिला कार्यरत होत्या. गावात एक समाजगृह आहे. संतोष पाटील यांनीसमाजगृहाच्या च त्या समाजगृहासाठी त्यांची स्वतःची जागा गावाला दिली होती.  त्या समाजगृहाच्या ठिकाणी गावातले सगळे कार्यक्रम होतात. आजकाल कोणत्याही गावात एकी नसते. परंतु या गावात एक गाव -एक गणपती,तसेच नवरात्र मध्ये गावमिळून एकाच देवीची स्थापना केली जाते. आपण हे जे सण साजरे करतो ते एकत्र येण्यासाठीच. त्यामुळे संतोष पाटील यांनी पुढाकार घेऊन ही संकल्पना राबविली आहे आणि आजपर्यंत जपली आहे याचे मला कौतुक वाटले. माणसाकडे पैसे असला तरी दानत नसते किंवा माणुसकी विसरतो माणूस. परंतु खूप श्रीमंत नसून देखील श्री संतोष पाटील हे वेळोवेळी गरजूंना मदत करतातच. त्यांच्या आईच्या कार्याच्या वेळी आलेल्या पाहुण्यांना त्यांनी साधे परंतु उत्तम जेवण दिले शिवाय गावात आठवीपर्यंत शाळा आहे त्या सर्व 150 विद्यार्थ्यांना देखील त्यांनी जेवण दिले. ऐकून समाधान वाटले. समाजाची सेवा सेवा म्हणजे नेमके काय असते ? तर आपला एक माणूस म्हणून समाजातील सर्व थरातील गरजूंना उपयोग झाला पाहिजे असे माझे मत आहे.

तिथल्या सर्व मंडळींना भेटून संध्याकाळी ४ वाजता आम्ही पुण्याच्या दिशेने निघालो सोबत माझे आई-बाबा, काका, एक आतेबहीण असे आम्ही ५-६ जण निघालो. तिथून निघाल्यावर जाताना मला एक गड दिसला होता परंतु कार्यस्थळी वेळेत पोहोचायची घाई असल्याने मी फोटोग्राफी करणे टाळले. येताना मात्र गाडीतूनच का होईना काही फोटो काढले. तो गड अतिशय देखणा दिसत होता त्यामुळे मला मोह आवरला नाही. तो गड म्हणजे ठाणे जिल्यातील पालघर तालुक्यातील  डहाणू च्या महालक्ष्मी देवीचा डोंगर आहे. दिसायला अगदी मुसळासारखं दिसतो त्यामुळे त्याला मुसळ्या डोंगर असेही म्हणतात. आजकाल ट्रेकिंगसाठी सुद्धा हा गड प्रसिद्ध आहे. त्या भागात असे खूप गड आहेत  की जे ट्रेकिंगसाठी प्रसिद्द आहेत परंतु आपण "फोना" ट्रेकर्स ना थोडे दूर आहे इतकेच. तरीही एकदा तरी त्या भागात म्हणजे पश्चिम कोकणात जाणे होईल अशी आशा करते.


आदिवासींची आदिमाता असलेली डहाणूची महालक्ष्मी महाराष्ट्र आणि गुजरातमधील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे. इथल्या देवळातील पुजारी आदिवासी असून सोवळं न नेसताच देवीची पूजा करतात. बऱ्याच वर्षांपासूनच परंपरा आजही चालू आहे.बखरकार फेरिस्ता यांनी हे दैवत एकेकाळी अतिशय श्रीमंत होतं असं म्हटलं आहे. १००८ मध्ये सुलतान महम्मदाने हल्ला करून देवस्थान लुटलं होतं.त्या वेळी त्याने सात लाख सुवर्ण दिनार , सातशे मणांचे सोन्या-चांदीचे पत्रे दोनशे मण शुद्ध सोन्याच्या लगडी , दोन हजार मण अशुद्ध चांदीचे पट, वीस मण रत्नं , हिरे , मोती , पाचू , माणिक असा किमती ऐवजी लुटून नेला होता. तर गझनीच्या महम्मदाने हे देऊळ लुटून तिथे मशीद बांधली. मुस्लीम राज्य खालसा झाल्यानंतर, इथे पुन्हा मंदिर बांधलं गेलं. त्या वेळी राजा तोरडमल यांच्यासोबत अकबर बादशहाने देवीचं दर्शन घेतलं होतं. पंजाब प्रांत स्वतंत्र केल्यानंतर राजा रणजितसिंहाने मंदिरावर सोन्याचा कळस चढवला. अशा ऐतिहासिक नोंदी नोंदवण्यात आल्या आहेत.पुराणातच अनेक अख्यायिका आहेत.कोल्हापूरची महालक्ष्मी गुजरातकडे जात असताना तिला हा परिसर खूपच आवडला. म्हणून देवीने गडाच्या टोकावर मुक्काम केला. पांडव अज्ञातवासात असताना या ठिकाणी त्यांनी मुक्काम केला होता.देवीचं मुख्य मंदिर डहाणूपासून अठरा किलोमीटर आणि मुंबई-अहमदाबाद हायवेवरील चारोटी नाक्यापासून आठ किलोमीटर असलेल्या वधवा गावाजवळील गडावर आहे. मंदिरपायथ्यापासून चारशे फूट उंचावर असून तिथे जाण्यासाठी नऊशे पायऱ्या आहेत. एक हजार फूट उंच शिखरामुळे देवीचा डोंगर सहज दिसतो. या मंदिरात जाण्यासाठी खूप परिश्रम पडत असल्याने डोंगराच्या पायथ्याशीही मंदिर बांधण्यात आलं आहे.हे मंदिर हायवेवर चारोटी नाक्यापासून अवघ्या तीन किलोमीटरवर आहे. इथे नेहमी गर्दी  असते. मात्र यात्रेच्या वेळी भाविक वरच्या मंदिरात जातात. पौणिर्मेच्या मध्यरात्री १२ वाजता सातवी कुटुंबातील प्रमुख पुजारी ध्वज, पूजेचं साहित्य , देवीची ओटी भरण्याचं साहित्य घेऊन पायथ्याशी असलेल्या मंदिरातून एकटाच निघतो. ध्वजलावण्याचं ठिकाण पायथ्यापासून १४०० फूट उंच शिखरावर आहे. तिथे पोहोचल्यावर तो तुपाचा दिवा लावून ध्वज फडकवतो. मग यात्रा सुरू होते.

डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी आईची प्रसिध्द याञा साधारण  एप्रिल मध्ये  असते. ही याञा १५ दिवस चालते. मंदिरातील पूजेचा आणि गडावर ध्वज लावण्याचा मान वर्षानुवर्षे आदिवासी बांधवाचा आहे . जव्हार च्या संस्थाना कडून ध्वज वाघाडी मार्गे विवळवेढे गावात आणला जातो. आणि चैञशुध्द पौर्णिमेला रात्री मुसळ सारख्या दिसणाऱ्या डोंगरावर (मुसल्या डोंगर-महालक्ष्मी गड) ध्वजारोहण होते आणि याञेला सुरूवात होते. जिल्हयातील आदिवासींची आदिमाता म्हणून ओळखली जाते. माझा भाऊ रुपेश आणि माझ्या माहेरच्या गावातील लोक आणि आसपासच्या गावातील लोक या देवीच्या यात्रेच्या दरम्यान पदयात्रा करतात.


त्या गडाचे फोटोकाढून मुंबई-अहमदाबाद हायवे वर  शिरसाट या ठिकाणी माझ्या बाबांनी दिलेला स्पेशल चहा प्यायलो आणि पुण्याकडे निघालो. नेहमीप्रमाणे घोडबंदर रोड ला खाडीपुलाजवळ ट्राफिक जाम होताच. पण गाडीत बसल्या बसल्या तिथेही  सुंदर संध्याकाळचे फोटो काढायचा मोह मला आवरला नाही. एका बाजूला सोनाच्या गोळा अस्ताला चालला होता तर दुसऱ्या बाजूला खाडीमध्ये डोगर उभा होता असे भासत होते. ट्राफिक मधून पादचारी रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांनाही मी कॅमेऱ्यात कैद केले आहे. एक ते दीड तासाने तिथला रास्ता थोड़ा मोकळा झाल्याने आम्ही पुन्हा न थांबता रात्री १० वाजता पुण्यात घरी पोहोचलो. जे मनाला पटले ते लिहिले, जे खटकले ते ही लिहिण्याचा प्रयत्न केला आहे बघा तुम्हाला आवडतंय का ते....





Monday 26 September 2016

"भोरगिरी-भिमा" तुफानी ट्रेक

भोरगिरी ते भिमाशंकर ट्रेक
चढाई श्रेणी-मध्यम
ठिकाण- पुणे जिल्हा
दिनांक - २५ सप्टेंबर २०१६


पुणे जिल्ह्यामध्ये असलेल्या खेड तालुक्याचे मुख्य गाव म्हणजे राजगुरुनगर. क्रांतिकारक राजगुरू यांचा जन्म येथे झाल्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ खेड गावाचे नाव बदलून राजगुरुनगर असे ठेवण्यात आले. राजगुरुनगर हे तालुक्याचे गाव असून ते पुणे-नाशिक या महामार्गावर,भीमा नदीच्या तीरावर वसलेले आहे.भीमा नदीचा उगम सह्याद्रीच्या मुख्य रांगेतील भीमाशंकरजवळ होतो तेथून ती राजगुरुनगर येथे येते. या भीमा नदीच्या किल्ले भोरगिरी विसावला आहे. भोरगिरीचा किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून साधारण ७००मीटर आहे.भोरगिरी किल्ला छोटेखानी असून,पावसाळ्यात येथे हिरवागार निसर्ग आणि प्रदूषणविरहित वातावरण अनुभवता येते. भोरगिरी ते भीमाशंकर हे अंतर ८ कि.मी. आहे परंतु भोरगिरी गड जाऊन-येऊन आणि भीमाशंकर असे एकूण अंतर आम्ही १० ते ११ कि. मी. चाललो असेल.

घनदाट जंगल आणि ओढे,धबधबे,नदी यातून जाताना रमतगमत करता येणारा छान,सुंदर असा ट्रेक  होणार यात शंका नव्हती. या संपूर्ण ट्रेक मार्गावर असंख्य धबधबे आणि अनेक रानफुले पाहायला मिळतात.  भोरगिरी नावानेच परिचित असलेल्या या किल्ल्याच्या पायथ्याला भोरगिरी नावाचे लहानसे गाव आहे. राजगुरुनगरपासून साधारण ५० कि.मी. अंतरावर भोरगिरी आहे.राजगुरुनगर हे पुणे नाशिक रस्त्यावर पुण्यापासून ४० किलोमीटरवर आहे. तेथून डावीकडे वळून चासकमान, वाडा या गावांवरून टोकावडेमार्गे जाणारा रस्ता भोरगिरी गावाशी संपतो. जाताना वाटेत भीमा नदीवरील धरण पहाता येते. भोरगिरी गाव हे पुण्यापासून किमान ९० कि.मी.अंतरावर येते.इथे भीमेच्या काठावर कोटेश्वर मंदिर आहे. या कोटेश्वर मंदिराबद्दल अशी आख्यायिका सांगतात की देवांनी इथे असलेल्या पाण्याच्या डोहामध्ये स्नान केले होते. त्यामुळे तो डोह पवित्र झाला आहे. म्हणून आजही इथले स्थानिक उत्सवाच्या काळात इथे असलेल्या डोहात अंघोळ करतात. झंझराजाने जी बारा शिवालये बांधली त्यात या कोटेश्वरचाही समावेश आहे, असे मानले जाते.किल्ल्यावर खोदलेल्या गुहा आहेत. तेथे एक शंकराचे आणि महालक्ष्मीचे देऊळ आहे. किल्ल्यावर जाताना पावसाळ्यात अनेक नैसर्गिक धबधबे दिसतात. नैसर्गिक पाण्याची कुंडे दुथडी भरून वहात असतात.


'भोरगिरी-भीमाशंकर' जरी हा ट्रेक असला तरीही भारतातील बारा जोतिर्लिंगांपैकी भीमाशंकर हे महाराष्ट्रातील एक जोतिर्लिंग आहे त्यामुळे बारा जोतिर्लिंगाची माहिती द्यावी असे मला वाटते त्यामुळे या बारा जोतिर्लिंगाची माहिती मी इथे देत आहे.ही माहिती मी नेटवरूनच शोधल्याने यामध्ये किलोमीटरचा थोडाफार फरक असू शकतो.
बारा जोतिर्लिंगे-
सोमनाथ- हे बारा ज्योर्तिर्लिंगांपैकी पहिले जोतिर्लिंग देशातील प्राचीन तीर्थस्थळांत सोमनाथ मंदिराचा समावेश होतो. त्याचा उल्लेख स्कंदपुराण, श्रीमदभागवत गीता, शिव पुराणात आढळतो. वेद, ऋग्वेदातही सोमेश्वर महादेवाचा महिमा वर्णिला आहे. काठेवाडचे दक्षिणेस असलेल्या वेरावळ बंदराला समुद्रमार्गाने आणि रेल्वेने जाता येते. वेरावळहून प्रभासपट्टण तीन मैल लांब आहे.
मल्लिकार्जुन- गुंटकल बेसवाडा - या छोट्या लाइनवर नंद्याळ स्टेशन आहे. तेथून 28 मैलांवर असलेल्या आत्माकुमार गांवाला मोटारीने जावें लागतें. आत्माकुरहून मल्लिकार्जुन 43 मलै श्रीशैल्यपर्वतावर आहे. रागावून गेलेल्या कुमार कार्तिकेयाला भेटण्याकिरतां (मल्लिका) पार्वती व अर्जुन (शंकर) येथें आले म्हणून मल्लिकार्जुन या नावाने प्रसिद्ध झाले. मल्लिकार्जुनाच्या पलीकडे पांच मैलांवर पाताळगंगा (कृष्णा) आहे.
महाकालेश्वर- उज्जैनचे महाकाल मंदिर हे शंकराच्या बारा ज्योर्तिर्लिंगांपैकी एक आहे. हे एकमेव दक्षिणमु्खी शिवलिंग आहे. तांत्रिक-मांत्रिकांसाठीही हे मंदिर खूप महत्त्वाचे मानले जाते. श्री महाकाल मंदिराची प्रशंसा महाभारतकालीन वेद व्यासांपासून कालिदास, बाणभट्ट आणि राजा भोज यांनीही केली आहे. येथील मंदिराची निर्मिती अकराव्या शतकात झाली. त्यानंतर जवळपास 140 वर्षानंतर दिल्लीचा सुलतान इल्तुतमिशाने उज्जैनवर आक्रमण करून हे मंदिर उध्वस्त केले. सध्याचे मंदिर मराठाकालीन आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार अडीचशे वर्षांपूर्वी शिंदे घराण्याचे दिवाण बाबा रामचंद्र शेणवी यांनी केला होता. ओंकारमांधाता उज्जयिनी-खंडवा रस्त्यावर मोरटक्का स्टेशनापासून दहा मैलांवर नर्मदेच्या-काठी आहे. हे नर्मदेच्या दुभंग झालेल्या बेटांत डोंगरावर आहे.
अमलेश्वर- ओंकारमांधाता. उज्जयिनी-खंडवा रस्त्यावर मोरटक्का स्टेशनापासून दहा मैलांवर नर्मदेच्या-कांठीं आहे. हें नर्मदेच्या दुभंग झालेल्या बेटांत डोंगरावर आहे. तेथेच गौरी सोमनाथ व भैरवशीला ही स्थानें आहेत. दुसरें ॐकार या नांवाचें लिंग नर्मदेच्या दक्षिण तीरावर आहे. हा सर्व भाग ॐकारच्या आकाराचा आहे, म्हणून यास ओंकार अमलेश्वर असें म्हणतात.
वैद्यनाथ- शिवपुराणांतील श्लोकाप्रमाणें 'वैद्यनाथं चिता भूमौ' असा पाठ आहे. संथाल परगण्यांत पूर्व रेल्वेवरील जसीडोह स्टेशनापासून तीन मैल दूर ब्रँच लाइनवर वैद्यनाथ आहे. तेथील शिवालय प्रशस्त आहे. या स्थानीं कुष्ठरोगापासून मुक्त होण्याकरितां पुष्कळ रोगी येतात. बहुतेक विद्वानांच्या मतें हें ज्योतिर्लिगाचें स्थान आहे. दक्षिणेंत बारा ज्योतिर्लिगाच्या श्लोकांत 'वैद्यनाथ चिता भूमौ' याऐवजी 'परल्यां वैजनाथं' असा पाठ आहे. परळीवैजनाथयाचें स्थान मराठवाड्यांत परभणी स्टेशनापासून चोवीस मैल दक्षिणेस आहे.
रामेश्वर- दक्षिण भारतांत प्रसिद्धच आहे. रामचंद्राने याची स्थापना केल्यामुळें याला असें नांव पडलें.
नागेश्वर- श्लोकांतील पाठ, 'नागेश दारुकावने' असा आहे आणि त्याप्रमाणें द्वारकेजवळचें लिंग तें हेंच ज्योतिर्लिग होय, असें बर्याच लोकांचे म्हणणें आहे. गोमती द्वारकेपासून थेट द्वारकेला जाणार्या रस्त्यावर बारा-तेरा मैलांवर पूर्वोत्तर रस्त्यावर हें स्थान आहे. औंढ्या नागनाथ हेंच नागेश ज्योतिर्लिंग होय, असें दक्षिणेतील लोकांचे म्हणणें आहे. मराठवाड्यांत पूर्णा-हिंगोली ब्रँचवर चौडी स्टेशन लागतें. तेथून पश्चिमेस चौदा मैलांवर हें स्थान आहे. आल्मोडापासून सतरा मैलांवर उत्तर-पूर्वेस योगेश (जागेश्वर) शिवलिंग आहे. त्यालाच कांहीं लोक नागेश ज्योतिर्लिंग म्हणतात.
काशीविश्वेश्वर- जगाच्या प्रलयकालांत शंकर ही नगरी त्रिशूलावर धारण करतो. गंगा नदीच्या पश्चिम किनार्यावर वसलेले वाराणसी जगातील प्राचीन शहरांपैकी एक मानले जाते. ही नगरी भारताची सांस्कृतिक राजधानी म्हणूनही विख्यात आहे. याच नगरीत काशी विश्वनाथाचे वास्तव्य आहे. हे मंदिर शंकराच्या प्रमुख ज्योतिर्लिंगामधील एक मानले जाते. लोक येथे केवळ दर्शनासाठीच येतात, असे नाही तर आयुष्यात मोक्ष प्राप्ती व्हावी ती इथेच असे त्यांना वाटते. परदेशातूनही लोक येथे येतात आणि गंगेच्या घाटाच्या सानिध्यात वसलेल्या मठ-मंदिरात जाऊन मनाला शांती देऊ शकणार्या साधूंच्या चरणी नतमस्तक होतात.
त्र्यंबकेश्वर- शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांमध्ये त्र्यंबकेश्वरचा समावेश होतो. दक्षिणेची काशी मानले जाणार्या नाशिकपासून हे ज्योतिर्लिंग 35 किलोमीटरवर आहे. ज्योतिर्लिंग स्तोत्रातही त्र्यंबकम गौतमी तटे असे म्हणून त्र्यंबकेश्वराचा उल्लेख केला आहे.त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी या पर्वताच्या पायथ्याशी वसले आहे. हा पर्वत म्हणजे शिवाचे एक रूप मानले जाते. याच पर्वतावर पवित्र गोदावरी नदी उगम पावते.
केदारेश्वर-हिमालयावर हरिद्वारहून केदार 150 मैल आहे. केदारनाथाचें देऊळ वैशाख ते आश्विन उघडें असतें. नंतर कार्तिकापासून चैत्रापर्यंत तें बर्फांत बुडालेलें असल्यामुळे बंद असतें.
घृष्णेश्वर- (घृष्णेश्वर) दौलताबाद स्टेशनापासून दहा मैलांवर घृष्णेश्वर आहे. शेजारी शिवकुंड (शिवालय) नांवाचें सरोवर आहे. घृष्णेच्या (घृश्मेच्या) प्रार्थनेवरून शंकर येथें स्थिर झाले म्हणून घृणेश्वर म्हणतात.
भीमाशंकर-शंकराच्या बारा ज्योर्तिर्लिंगांपैकी भीमाशंकर आहे. पुण्यापासून ९० किलोमीटरवर असलेले हे तीर्थस्थान पश्चिम घाटात वसले आहे. भीमा नदीही याच परिसरात उगम पावते. शंकराने या ठिकाणी त्रिपुरासुराचा वध केला. त्यानंतर आलेल्या घामातून भीमा नदीचा उगम झाल्याची पौराणिक कथा आहे. हे देऊळ तुलनेने अलीकडच्या काळात बांधले आहे. याचा कळस नाना फडणवीस यांनी अठराव्या शतकाच्या सुमारास बांधला. शिवाजी महाराजही या देवळात येऊन गेल्याचे सांगितले जाते. महाशिवरात्रीला येथे मोठी जत्रा भरते. मंदिराच्या मागे मोक्षकुंड आहे. तसेच घनदाट जंगल आहे. शेकरू हा खारीसारखा दिसणारा दुर्मिळ प्राणी येथे आढळतो. 



२५ सप्टेंबर २०१६ या दिवशी 'फोना' चा ६७ वा भोरगिरी ते भोरगिरी ते भिमाशंकर हा ट्रेक आयोजित करण्यात आला या गोष्टीचा आनंद होताच परंतु २६ सप्टेंबर माझा वाढदिवस असल्याने जर त्या दिवशी ट्रेक असता तर अजून जास्त मज्जा करता येईल असे वाटले. पण मजाच करायची म्हटली दिवस आनंदातच घालवायचा म्हंटलं तर इन ऍडव्हान्स मध्ये पण आपण ते करू शकतो. किंबहुना २५ तारखेला ट्रेकिंग च्या फ्रेंड्स सोबत वाढदिवस साजरा करणे आणि २६ तारखेला घरच्यांसोबत वाढदिवस साजरा करणे अशी दुहेरी पर्वणी मला मिळाली होती. परंतु हा आठवडा जरा धावपळीचा गेल्याने मला केक वैगेरे बनवून नेता आला नाही. पण ट्रेक चुकवायचा नाही असे मी मनोमन ठरवले होते. त्यात अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे माझी शाळेची मैत्रीण ममता ही देखील माझ्यासोबत ट्रेक ला येणार होती. आम्ही १० वि नंतर पुन्हा असे भेटलोच नव्हतो.त्यामुळे मी जास्त खुश होते. ती पुण्यातच राहत असून आम्ही फक्त वॉट्सऍप वर आणि फोन वर बोलत असायचो. मला कुठल्याही संधी चे सोने कसे करायचे हे चांगले माहित आहे.



२५ सप्टेंबर ला सकाळी आमची बस तळेगाव, निगडी, चाकण मार्गे भोरगिरी ला निघाली. पुणे ते भोरगिरी हे अंतर सुमारे ९० कि.मी. आहे. राजगुरूनगर मार्गे जाताना चासकमान धरण अतिशय सुंदर दिसत होते . असे वाटत होते की बस थांबवून मनसोक्त फोटोग्राफी करावी. परंतु वेळेचे बंधन असते त्यामुळे ते निसरसौंदर्य फक्त डोळ्यात साठवले, बसमध्येच पोह्याचा नास्ता करून १० वाजता भोरगिरीला पोहोचलो. ग्रुप लीडर नी  ट्रेक ची माहिती देऊन आम्ही आधी भोरगिरी हा छोटा गड एका तासात पूर्ण केला. या गडावर ५-६ पाण्याचे टाके आहेत, एक शंकराचे मंदिर आहे. अप्रतिम निसर्गसौंदर्य डोळ्यात आणि कॅमेऱ्यात साठवून घेतले. हिरवे हिरवेगार गालिचे पसरले होते जणू. सहज ओठावर 'हिरहिरवे गार गालिचे हरित तृणांच्या मखमालीचे' या ओळी येतात। या गावात आम्हाला भातशेती पाहायला मिळाली. आम्ही पुन्हा भोरगिरीच्या पायथ्याशी येऊन त्या गावातील एक शेतकरी गाईड म्हणून घेतला आणि भीमाशंकरच्या ट्रेक ला सुरुवात केली.

ट्रेक सुरु झाला त्यावेळी भिमानदीने आमचे स्वागत केले. भिमानदीचा उगम भीमाशंकर च्या मंदिराजवळून होतो. पिवळी फुले आणि त्या पाण्याचा खळखळ आवाज वाह खरंच मन मोहून टाकणारे वातावरण होते ते.. सर्वच डोंगरांनी धुक्याची  शाल पांघरली होती. आम्ही ओढे, जंगल पार करत चालत होतो. जंगल पार करत असतांना भिजण्याचा आनंद आम्ही घेतला. भीमाशंकरचे जंगल अतिशय घनदाट आहे. या जंगलामध्ये चित्ता आढळतो तसेच हरीण आढळते असे म्हणतात. तसेच अनेक प्रकारचे पक्षीही पाहायला मिळतात. जंगल पार करताना अंधारबन ची खूप आठवण झाली. धुक्यामुळे फार दूरचे काही दिसत नसायचे. तरीही फोटोग्राफीचा मोह आवरत नव्हता आणि त्यामुळे थकवा जाणवत नव्हता. दुपारचे २:३० वाजता आम्ही गुप्त शिवलिंग आहे त्याठिकाणी आम्ही ग्रुप फोटो काढून जेवण केले आणि लगेच भीमाशंकर चढायला सुरुवात केली.भीमाशंकर च्या वाटेमध्ये कारवींचे जंगल आहे.  शिवाय कारवीच्या झाडांना ५-७ वर्षातून फुले येतात. ती या वर्षी आम्हाला पाहायला मिळाली. निळ्या आणि सफेद रंगाची फुले दिसत होती सर्वत्र. 


एक तासात भीमाशंकर गाठले. तिथे  मस्त गरम गरम चहा घेतला आणि नागफणी पॉईंट ला जायचे ठरवले कारण त्या पॉईंट वरून खाली गोरखगड, कोथळीगड हे अतिशय सुंदर दिसतात. परंतु धुक्यामुळे आम्हाला ते दृश्य दिसू शकले नाही. भीमाशंकर च्या जंगल चा ट्रेक केला तो छान झाला. परंतु भीमाशंकर च्या मंदिरातील जे निर्माल्य मंदिराजवळ कुठेही टाकले जाते ते निर्माल्य आणि तिथला प्लास्टिक पिशव्यांचा आणि इतरही कचरा याचे व्यवस्थापन याची सोय केलेली नाही. ते थेट नदीतून आणि जंगलाच्या ओढ्यामधून जसे ओढे वाहतात तसे जंगल भर पसरले आहे.मोट्या प्रमाणावर  हा कचरा सगळीकडे पसरतो आणि मग प्रदूषण होण्यास कारणीभूत ठरतो. प्रसिद्ध तीर्थस्थळी स्वच्छता ही आढळून आली नाही ही एक गोष्ट खटकली. बाकी मंदिराजवळ जंगलात अनेक औषधी वनस्पती विकावयास होत्या. मंदिराचे आवार मोट्ठे आहे आणि बांधणी देखील उत्तम आहे. ट्रेक संपल्यानंतर आम्ही वेळेअभावी मंदिराचे दुरूनच दर्शन घेतले आणि आम्ही ५:३० ला पुण्याकडे निघालो. थकलो होतो तरीही जाता-येता  अंताक्षरी जोशात सुरु होती.
त्यात भर म्हणजे माझ्या वाढदिवसाची ट्रीट मला द्यायचीच होती. त्यामुळे मुख्य रस्ता येईस्तोवर आम्ही मराठी, हिंदी, तामिळ, पंजाबी, ऐराणी, जर्मन गाण्याचा आस्वाद घेतला. आणि एका हॉटेलमध्ये थांबून माझ्या वाढदिवसाची ट्रीट म्हणून मी सगळ्यांना अनलिमिटेड वडापाव आणि चहा दिला.(खाणाऱ्यांनी१किंवा२ च खाल्ला ती गोष्ट वेगळी) दुसऱ्या दिवशीच्या माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव सगळ्यांनी गाण्यातून, कवितेतून केला. मंदार सर,राणे सर, निकाळजे, महेश पाठक, रूपा, तनया, रोहिणी, स्नेहल, अबोली, सोरभ, प्रतीक, आनंद, निखिल, मी आणि माझी मैत्रीण ममता आम्ही सगळ्यांनी धमाल केलीच परंतु अंताक्षरी च्या वेळी विवेक,रोहित,शालाभ,स्नेहल खोल्लम, रश्मी, शुभांगी  आणि शैलजा ला खूप मिस केले. सगळ्यांची नावे नाही आठवत सॉरी फ्रेंड्स परंतु नव्या जुन्या सगळ्याच मेम्बर्सने तुफानी मजा आणली. माझी मैत्रीण ममता आणि आम्ही २५ वर्षांनंतर भेटल्यामुळे मनसोक्त गप्पा मारल्या आणि ट्रेक चा आणि फोटोग्राफीचा देखील मनमूराद आनंद लुटला. आम्ही रात्री १०:३० घरी पोहोचलो ट्रेक अतिशय सुरेख अप्रतिम आणि अविस्मरणीय झाला. धन्यवाद सगळ्यांना. 

Wednesday 7 September 2016

मी "स्री" "मनाची उकल"

मी "स्त्री" "मनाची उकल"

मी आतापर्यंत माझ्या "भिंगरी" या ब्लॉग मध्ये जास्तीत जास्त "ट्रेकिंग" या विषयावर लिखाण केले आहे. मी म्हणजे काय मोट्ठी लेखिका किंवा कवयत्री नाही किंवा एखाद्या सामाजिक विषयावर मोठमोट्ठे लेख लिहिणारी सामाजिक लेख लिहिणारी समाजसुधारक नाहीये. परंतु जे लिहिते ते मनापासून मनापर्यंत पोहोचते आणि वाचक मनातून सुधारतो असे मला बऱ्याच वाचकांनी सांगितले आहे हेच खूप आहे माझ्यासाठी. मी माझ्या आनंदासाठी तर लिहितेच शिवाय ज्यांना हे लिहिलेले वाचून आनंद मिळतो त्यांच्यासाठी लिहिते. आज मी स्त्री च्या मनाची उकल हा विषय समोर ठेवून जे मनाला पटले ते लिहिणार आणि जे मनाला बोचले ते लिहिणार आहे.  "मी" म्हणजे एक मुलगी आहे एक "स्त्री" आहे हे विसरून चालत नाही कारण आपण मुलगी आहोत स्त्री आहोत हे समाजात आपल्याला सारखं सारखं आठवून दिले जाते. तरी बरे आम्हा स्रियांना स्वतःला या गोष्टीचा अजून तरी विसर पडलेला नाहीये.
आज मी या ठिकाणी प्रत्येक ठिकाणचे आणि प्रत्येक व्यक्तीचे नाव घेऊन उल्लेख करू इच्छित नाही. माझा जन्म एका खेड्यात झाला आहे. माझ्या जन्माआधी माझ्या आईची एकूण सात मुले जन्माला येऊन काही दिवस जगायची आणि मग त्या मुलाचा मृत्यू व्हायचा.  मी जयू जन्माला आले आणि जगले आणि त्यांनतर ची ३ मुले जगली. त्या माऊलीला या मुलांच्या जन्मावेळी काय त्रास झाला असेल हे मी स्वतः आई झाल्यावरच मला समजले आणि आईला मानसिक त्रास झाला असेल ते आणि वेगळेच. घरात मूल जन्माला न येणे म्हणजे त्यात स्त्रीचाच दोष असल्यासारखे तिला नको त्या नावाने संभोधले जाते हे कुणाला सांगायला नको शिवाय आमच्या जन्माच्या वेळी खेड्यात घरोघरी एका नवरा-बायकोला किमान ५-७ मुले तरी असायची. त्यामागे कारणे भरपूर असतील. घरची श्रीमंती असेल, घरात खूप माणसे असली की आनंदी वातावरण असेल, असे असेल, अशिक्षितपणा असेल, कुटुंबनियोजनाचा अभाव असेल. कारणे खूप असतील. परंतु मी जन्माला आले आणि माझ्या नंतर ची ३ मुले जगली आणि माझ्या बाबांनी खूप जमीन वैगेरे घेतली त्यामुळे मी भाग्ग्याची होते. असे घरातले म्हणायचे अजून म्हणतात. "बेटी धनाची पेटी" तसे झाले असावे. आणि हो माझ्या पाठीवर मला ३ भाऊ आहेत. माझे मामा मावशी काका सगळॆ मुंबईत नोकरी करीत होते आणि चांगले सुशिक्षित होते त्यामुळे त्यांनी आधीच सांगितले की बाय ला म्हणजे माझ्या आईला लाडाने अजूनदेखील बाय म्हणतात. ही  मुलगी "मी जयू"जगली, सुखरूप असली तर पुढे एक मूल झाल्यावर तिचे कुटुंबनियोजनाचे ऑपरेशन करून घेऊ.  आधीच तिला इतक्या डिलिव्हरीज करून तिचे शरीर कमजोर झाले आहे. माझ्या पाठीवर माझ्या नंतर  २-२ वर्षाच्या अंतराने मला भाऊ झाले परंतु माझी आई तेव्हाची इयत्ता चौथी शिकलेली असताना सुद्धा तिचे विचार आधुनिक होते. तिला तिच्या शरीराची पर्वा नव्हती. ती म्हणाली  मला अजून एक मुलगी हवी आहे. जर आत्ताही मुलगा झाला तर मी मग कुटुंबनियोजनाचे ऑपरेशन करून घेईन आणि शेवटचा चार नंबर चा ही मुलगाच झाला. म्हंजे घरात मुलगी मी तशी एकटीच. परंतु माझे फक्त खायचे प्यायचे लाड केले जायचे बाकी शिस्त म्हणजे शिस्त. आजीने,आईवडिलांनी, काकाने, मामा मावश्यांनी,आत्यांनी लावलेली शिस्त आजही कामाला येतेच येते. या कडक शिस्तीमुळे मी माझ्या मुलांना आणि घरात जरा कमी लाडकी आहे.परंतु माझ्या दोन्ही मुलांना शिस्त ही आहेच आहे. परंतु माझे माझ्या प्रभाशी आणि ट्रेक मधल्या सगळ्या लहान मुलांशी छान जमते.
घरात वडील अतिशय शिस्तीचे होते आणि त्यांना सगळे गावातले देखील खूप घाबरायचे. माझ्या वडिलांना फकिराच्या झोळीतून काढले असल्याने त्यांचे एक नाव रघुनाथ तर दुसरे नाव फकीर होते. आजीला ३ मुलीनंतर जो मुलगा झाला होता तो म्हणजे माझे वडील. पूर्वी काय नि आता काय वंशाला दिवा हा हवाच. तर माझे वडील माझ्या आजोबांच्या वंशाचा दिवा आहेत. माझ्या वडिलांच्या वडिलांना पाहण्याचे माझे भाग्य नव्हते परंतु सगळे म्हणायचे की आजोबा खूप गोरे होते. वडिलांचा रंग ही गोराच आहे. मला ६ आत्या एक काका आईवडील असे मोट्ठे कुटुंब होते. सगळ्या आत्त्यांचे सासर जवळच होते एखाद किलोमीटर अंतरावर. त्यामुळे येणे जाणे असायचेच. मला लहानपणी वाटायचे थोड्या दिवसांसाठी कुठेतरी जात असाव्यात ह्या आत्या. माझ्या आत्या माझे लाड करायच्या माहेरी आल्यावर मला झोपताना गोष्टी सांगायच्या. माझ्या आईला बिचारीला कामातूनच वेळ मिळत नव्हता.
माझे काका (की ज्यांच्या दोन्ही मुली डॉक्टर आहेत) दुसरीत असताना माझे आजोबा वारले त्यामुळे माझ्या वडिलांचे शिक्षण फक्त इयत्ता सातवीपर्यंतच झाले कारण त्यांच्यावर सगळ्या कुटुंबाची जबाबदारी पडली होती. वडिलोपार्जित शेतीकडे लक्ष देणे खूप गरजेचे होते. कारण आमचा परंपरेने चालत आलेला व्यवसाय फक्त शेती होता. वडिलांनी शाळा सोडली आणि शेतीमध्येच लक्ष घातले. आमचे किराणा मालाचे दुकान ही होते तेदेखील माझे वडील बाहेर गेले की आम्ही मुले चालवायचो. आम्ही भावंडे आज मुंबईत शिकलो असतो इंग्रजी शाळेत तर कदाचित डॉक्टर इंजीनीअर असतो. पण जे शिकलो तेही शिक्षण घेणे काहींच्या नशिबात नसते. जो तो आपापल्या परीने शिकत असतो. आम्ही मुलांनी खूप शिकावे असे त्यांना वाटायचे परंतु माझे भाऊ शेतीच्या कामात बाबांना मदत करायचे आणि शिकायचे. कधी गुरे राखणारा गुराखी नाही आला की भाऊ शाळेला दांडी मारून गुरे राखायला जायचे. कधीकधी मी सुद्धा हे काम केले आहे. पण हे  काम सुद्धा इमानदारीतच केले बरे. कधी गुरे दुसऱ्याच्या शेतात घातली नाहीत. पण ज्या दिवशी माझ्यावर गुरे राखायची वेळ येई त्यादिवशी मात्र मी तापाने फणफणत असायची. वडिलांच्या नकळत विटी दांडू, गोट्या, लगोरी, लपाछुपी,पत्ते, असे खेळ खेळत लहानाचे मोठे झालो. आई बाबा सांगायचे इथे कामं केलीस तरच सासरी कामं करशील हो. त्यामुळे आईला घरकामात मदत करायला शेतात काम करणाऱ्या बायका असायच्या त्या मदत करायच्या. मग माझ्या वाट्याला काय काम असायच तर मोट्ठे घर झाडणे, विहिरीवरून हंडा कळशीने पाणी आणणे, कपडे धुवायला विहिरिवर जाणे. कारण तेव्हा नळयोजना नव्हती किंवा इंधन विहिरी  नव्हत्या. आता घरोघरी इंधन विहिरी आहेत. गावातल्या सुनांची मजा आहे, शहरासारखं घरातच पाणी.  माझे भाऊ १०-१२ ग्रॅज्युएट आणि मी पोस्ट ग्रॅज्युएट असे आम्ही शिकलो. फकीर पाटलाची पोर असे मला सगळे हाक मारत असत.
तसे गावाकडे मुलगी जेमतेम दहावी-बारावी झाली की तिचे लग्न लावून देत असत. कारण मुलगी मोट्ठी दिसायला लागल्यावर तिला आपसूकच लग्नासाठी स्थळे यायला लागतात. आणि वडिलांनाही काळजी लागते. माझेही तसेच झाले होते. मी बारावी झाल्यावर मला स्थळे यायला सुरु झाले होते परंतु मला अजून शिकायचे होते आणि  वडिलांचीही खूप इच्छा होती मुलीने शिक्षिका व्हावे आणि किमान गावाकडच्या हायस्कुल मध्ये मुलीने शिकवावे. मी म्हणता म्हणता मुंबई, नासिक आणि पुणे येथे राहून पोस्ट ग्रॅजुयेशन आणि बीएड पूर्ण केले. त्यात मी टायपिंग च्या परीक्षेतही डिस्टिंक्शन मिळवले आहे. आता नोकरीसाठी काम्पुटर मध्ये एक्सपर्ट असावं लागतं तसं पूर्वी नोकरीसाठी किमान टायपिंग परीक्षा पास असाव्या लागत असत. त्यामुळे माझ्या वडिलांनी मला जे-जे चांगले आणि उपयोगी पडणारे शिक्षण घेता येईल ते घेण्याचा सल्ला दिला होता. आणि मी आपली जमेल तसं जमेल तिकडे राहून शिकत होते. कधी मामा कधी मावशी, कधी मुंबई,कधी नासिक, कधी पुणे. शिक्षणासाठी मी घरापासून दूर राहिले खरी पण आज तिन्ही शहरातली माणसे मी जोडली ती कायमची जोडली.
मी बाहुली किंवा भातुकली हा खेळ कधी खेळायचे नाही. मला नेहमी वेगळे काहीतरी करायला आवडते त्यामुळे सगळे मुलांचे खेळ खेळत असे मी. आणि अश्या आम्ही बऱ्याच मुली होतो.गावातल्या आम्ही २-३ मुली तेव्हा माझ्या बाबांची मोट्ठी उंच सायकल घेऊन गुपचूप चालवायला शिकलो. आज मी टू व्हिलर तर विमानासारखी चालवते. पण फोर व्हिलरचे आर. टी.. चे लायसन असून मला गाडी हातात मिळत नसल्याने तेव्हढी एक हौस बाकी आहेच. पण मला उत्तम गाडी येते. म्हणजे सांगायचं मुद्दा एकच आहे की प्रत्येक मुलींमध्ये काहीतरी वेगळे असतेच असते. ते तिला स्वतःला शोधता आले पाहिजे. तिने स्वतःच स्वतःमधील क्षमता ओळखून अनेक कला अंगी जोपासाव्यात. या सगळ्याला कुटुंबाची थोडी तरी साथ हवीच. मी हे सगळं करते ते सगळॆच काही माझ्या घरच्यांना आवडतेच असे नाही. पण तरीही मला कर म्हंटले जाते हेच खूप आहे माझ्यासाठी.आपल्यावर घरचे विश्वास टाकतात ना तो आपण सार्थ करून दाखवायचा एव्हढेच मला माहित आहे.आपण मुलींनी आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा गैरफायदा नाही घ्याचा म्हणजे झाले तर. मी घरातल्यांना सगळे वेळेवर देते किव्वा कुठे कमी पडत नाही म्हणून मी बिनधास्तपणे हे असं पेटी शिकणे, ट्रेकिंग करू शकते. कोणाला विश्वास बसेल की नाही माहित नाही मी ट्रेक ला जाताना पहाटे ५ वाजता कपडे धुवायची एक मशीन लावून जाते तेव्हढेच घरातल्यांचे एक काम हलके होते. हे मी का सांगते तर कोणाला हर्ट होण्यासाठी नाही तर  मुलींनो मला खूप लोकांनी ऐकवले आहे की तू मज्जा करते, फिरते, त्यांना मला हे सांगावेसे वाटते की हो मी आयुष्य जगते पण मी मला जमेल ती जबाबदारी पार पाडते आणि मग जाते बाहेर.    
मी मला मिळणाऱ्या पॉकेट मनी मधून माझ्या वाढदिवसाला स्वतःसाठी हार्मोनियम विकत घेतले होते २-३ वर्षांपूर्वी पण त्यासाठी चांगल्या संगीत शिक्षाकडून शिकणे गरजेचे होते. त्यासाठीचा क्लास मात्र मी आता लावला आणि मला पेटी वाजवणे जास्त आवडू लागले आहे. कारण मला संगीत आवडते. आणि मैत्रिणींनो तुम्हाला सांगू इच्छिते की  सगळ्या काळज्या,चिंता,दुःख, यांना विसरायचे असेल तर संगीतासारखा दुसरा सोबती नाही.
पदवीने एम.ए. बीएड.झाले खरी परंतु नोकरी करावी अशी घरच्यांची इच्छा नव्हती त्यामुळे प्रत्यक्ष शाळेत किंवा कॉलेजात शिकविले नाही. शिक्षकदिन च्या दिवशी हे देखील विसरून गेले मी मी देखील एक शिक्षिका आहे. हो पण जिथे मिळेल त्या ठिकाणी फुकट सल्ले द्यायला मात्र मी विसरत नाही.
मला लग्नाआधी स्वयंपाक फार काही येत नव्हता सासू आणि ननदांनी मला शिकवले  आणि मी शिकत गेले. मी कुठलेही काम मन लावून शिकते आणि मन लावून करते त्यामुळे कदाचित माझ्या हातचे पदार्थ चांगले होत असावेत. परवाच्या "झी मराठी" चॅनेल वरच्या "हवा येऊ द्या" या कार्यक्रमात "पदमश्री. पद्मजा फेणाणी-जोगळेकर" यांना हवा येऊ द्या मधल्या कलाकारांनी सहज प्रश्न विचारला की तुम्हाला स्वयंपाक येतो किंवा नाही? त्यावर त्यांनी खूप छान उत्तर दिले की"मला स्वयंपाक येतो मी रोज स्वयंपाक करते देखील पण मला ते काम करायला आवडत नाही." मला ते वाक्य अगदी पटले. मी मनोमन हसले कारण माझेही तसेच आहे मला स्वयंपाक करायला आवडत नाही पण मी ते काम रोजच न चुकता करते.  खरे तर  मला हे जेवण बनवणे आणि वाढत राहणे बिलकुल आवडत नाही.पण हे काम प्रत्येक स्त्री ला मरेपर्यंत करावे लागते. नोकरी करणाऱ्या स्त्रियांनाही हे काम करावेच लागते. पण जर या कामाची तिचा पावती मिळाली तर कोणतीही स्त्री तेच काम आनंदाने करते. तसे मात्र होत नाही. बाहेरची दुनिया तारीफ करते. आणि घरातल्यांना काय वाटते की रोजच चांगले बनवते रोजच काय तारीफ करायची?? तारीफ करायला पैसे लागत नाही किंवा फार खूप कष्ट पडत नाहीत. हा फक्त मोट्ठे मन लागते. की जे प्रत्येकाकडे नसते.
लग्न झाल्यावर सगळ्या जबाबदाऱ्या आल्याचं. लग्न होऊन पुण्यात आल्यावर मी आजपर्यंत एकदाही राखी पौर्णिमेला माहेरी गेलेली मला तरी आठवत नाही. कारण माझ्या दोन्ही दिरांना भाऊ मानून राखी बांधते, आणि नणंदेच्या मिस्टरांनाही राखी बांधते त्यामुळे मला माहेरी ३ भाऊ असून मी तिकडे फक्त पोस्टाने राखी पाठवते  आणि भाऊबीजेला भाऊ मला भेटायला येतो किंवा सासरची भाऊबीज झाल्यावर दिवाळीच्या सुटीमध्ये मी गावी गेले तर तिकडे भाऊबीज होते.नाहीतर  इथेच राखी पौर्णिमा,इथेच भाऊबीज इथेच दिवाळी इथेच सगळे सण साजरे करतेय. मला बहीण नाही त्यामुळे मी माझ्या नणंदांना, आणि माझ्या जावांना बहीण समजून प्रेम देत आले. पण सासर ते सासर असते सगळे हेवे दावे गैरसमज आले. चालायचंच पण म्हणून आजपर्यंत कुठल्याही जबाबदारीपासून, कर्तव्यापासून मी दूर नाही गेले. प्रत्येक  स्त्री ला काहींना काही दिव्यातून जावेच लागते. त्यातून देखील मार्ग शोधणे हे महत्वाचे.
लग्नानंतर सगळंच बदलतं म्हणतात तसंच माझ झालं होत माझ्या स्वतःच्या सगळ्या आवडी- निवडी सगळ्या बाजूला ठेवल्या अगदी खाण्यापिण्याच्या आवडी सुद्धा. मुलांना, नवऱ्याला काय आवडेल, पाहुण्यांना काय आवडेल  तेच बनवायचं अर्थात चांगलंच  आणि तेच मी खायचं. इतरांना काय आवडते तेच करायचं असंच सगळं चालायचं. अश्या खूप गोष्टींचा राग, समज-गैरसमज  सगळं मागे ठेवून आता इतरांच्या आवडी जपण्याबरोबरच स्वतःच्याही आवडी जपू लागले आहे. मला आधीपासूनच फोटोग्राफी चे वेड आहेच, त्यात महिन्यातुन एकदा ट्रेकिंग ला जाते. त्यामुळे फोटोग्राफी ची कसर भरून निघते आणि ब्लॉग लिहिला की मग लिखाणालाही आनंद मिळतो. शिवाय वाचकांनाही सफारीचा आनंद देता येतो. ब्लॉग वाचणारे अनेक प्रकारचे वाचक आहेत. काही फक्त चांगला म्हणणारे. काही माझ्या ब्लॉग मधल्या त्रुटी सांगणारे, काही माझा ब्लॉग आवर्जून वाचणारे आहेत, काही ब्लॉग लिहायचा आग्रह करणारे आहेत, काही ब्लॉग ब्लॉग न वाचणारे सुद्धा आहेत, काही ब्लॉग म्हणजे काय माहित नसूनही ब्लॉग आवर्जून वाचणारे आहेत. काहींना विचारावे लागते ब्लॉग पाठवून का ?? त्याचे उत्तर ही न देणारे फ्रेंड्स आहेत. "व्यक्ती तितक्या प्रकृती." काही म्हणतात ब्लॉग मध्ये घरच्यांचा उल्लेख करत जा, काही जण म्हणतात अशी प्रत्येकवेळी उल्लेख करण्याची आवश्यकता नाहीये. असे अनेक हजारो स्वभावाची माणसे मला भेटली. परंतु मी त्यांच्या सल्ल्याचा माझ्या लिखाणात चांगल्यासाठी वापर करते आहे.
आयुष्यात हे करायचं राहून गेले ते करायचे राहून गेले. ह्या सगळ्याला इतरांइतकेच आपण स्वतः देखील तितकेच जबाबदार असतो हे लक्षात असू दे मुलींनो, स्त्रियांनो. सगळ्या गोष्टींचा ताण घेत बसलो तर अनेक आजार मागे लागतात आणि  कशातून  निष्पन्न होत नाही. मी स्वतः या सगळ्याचा अनुभव घेतला आहे. कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी ठराविक वय हवे असे काही नाही. मला एव्हढे आजार असूनदेखील मी ट्रेकिंग करते. ब्लॉग वाचणार काही जण मला विचारतात की घरात कोण करते मग?? काही जण विचारतात अगं आत्ताच तुझ्या घरात पूजा झाली ना मग तू लगेच ट्रेकिंग ला कशी चालली दमली की नाही?? त्यांना मी सांगू इच्छते की माझ्या घरात फक्त भांडी फारशी ला बाई आहे ते देखील मला संधिवात आहे. पाण्यात खूप खूप काम केले की माझी हाडे सुजतात त्यामुळे भांडी घासायला बाई असली तर माझा आजार कवटाळत बसण्यातला वेळ वाचवते. तोच वेळ मी एखादी कला शिकण्यात घालवते. त्यामुळेच मी पेटीचा क्लास लावून सध्या  पेटी सुद्धा शिकते आहे शिकत राहीन. ट्रेकिंग करते, पेटी शिकते म्हणजे घरात लक्ष नसते किंवा घरातली कामे टाकून बोंबलत फिरते असे नाहीये. आणि हो हे पेटी वैगरे शिकते ते काही रोज रोज नसते आठवड्यातून एकदा किव्वा दोनदा असते ते देखील एकच  तास असते. आणि हा एक तास आपण कितीदातरी गप्पा मारण्यात टी व्ही बघण्यात घालवतो.. मी त्याच एक तासाचा असा वापर करते. माझ्या कित्तेक मैत्रिणी आहेत की ज्यांना देखील नोकरी करण्यास परवानगी नाहीये त्या घरच्या घरी शिकवण्या घेऊन आपल्या ज्ञानाचा चांगला वापर करतात. मला घरी असा काही करणे मनापासून आवडत नाही. कधी कधी स्वतःचा राग येतो की मी गृहिणी आहे. परंतु आज मी सकारात्मक विचार करते की  मी आज नोकरी करीत नाही त्यामुळे एका अर्थाने हे खूप चांगले आहे. कारण मी जर नोकरी करून तारेवरची कसरत करत असते तर मी माझ्या कुटुंबाकडे आणि स्वतःकडे तितके उत्तमरित्या लक्ष देऊ शकले नसते आणि माझ्या मुलांचे नवऱ्याचे आरोग्य आता जसे चांगले आहे तसे राहिले नसते. मुलांचे आणि स्वतःचे छंद देखील मला जोपासता आले नसते.
माझ्या घरी आत्ताच ऑगस्ट महिन्यात सत्यनारायणाची पूजा झाली त्यावेळी. माझ्या घराची साफसफाई मी एकटीनेच केली. कारण ह्या कामवाल्या असली कामे आपल्या मनासारखी करत नाहीत त्यांना वेळ नसतो आणि केलंच तर थुका लावल्यासारखे करतात. माझ्या घरात ५-६ वर्षांपूर्वी सफेद रंगाचे फर्निचर जास्त आहे त्यामुळे ते जरा जास्तच स्वच्छ ठेवावे लागते. घराची साफसफाई आपण स्त्रिया रोजच करतो पण. पण तरीही एकूण एक कोपरा पुसायला मला २० दिवस लागतात. मधेच माझी तब्बेत बिघडते आणि रोजचे रुटीन चे काम असतेच मुलांना सोडा आणा माझी बाहेरची कामे सगळं सुरु असते.माझ्या घरी येणारी प्रत्येक व्यक्ती मला सांगते की आत्ताच घराचे रिनूयेशन केलास का ग? म्हणजे याचा अर्थ  असा होतो की माझं घर सुद्धा नेटनेटके आणि स्वच्छ असतेच. मला नावे ठेवणाऱ्यांनी एकदा माझ्या घरी येऊन बघा मी ट्रेकिंगला बोंबलत फिरते की काय करते ते... अश्या कामाच्या वेळी मी वॉट्स अँप बंद ठेवले आणि मिस्टरांना म्हंटलं मी वॉट्स ऍप बंद ठेवलं होते  ५-६ दिवस तर बरीच कामे झाली माझी. तर त्याचा माझ्यावर विश्वास  बसला नाही. घरातली माणसे इतकी नालायक समजतात मला???  माझ्या हातात फोन असतो म्हणजे मी वॉट्स अँप फेसबुक बघत असते हा लोकांचा फार चुकीचा गैरसमज आहे. फोटो एडिटिंग चे मला वेड  आहे. याची त्याची उणीदुणी काढत बसण्यापेक्षा आणि आपले दुःख उगाळत बसण्यापेक्षा स्वतःला आवडत्या कामात गुंतून घेते. 
काही जण टोमणे मारतात की जयू ला ट्रेकिंग म्हंटले की खूप उत्साह येतो. तर असे बिलकुल नाहीये. मला सगळ्या कामात सारखाच उत्साह असतो. मग ती घरची पूजा असो, घरी २५-३० लोक जेवायला येणार असो, कुठला सण असो, कुठे लग्नाला जायचे असो, नटणे सजणे असो, किव्वा अपार्टमेंट चा एखादा प्रोग्रॅम असो, होळी असो, दिवाळी असो, सगळीकडे सारखाच उत्साह असतो. फक्त आपली खोपडी सटकलेली नाही पाहिजे.
मी जे आहे ते समोर बोलते पण सगळ्याच व्यक्ती तश्या नसतात. माझ्या तोंडावर एक आणि पाठीमागे एक बोलत असतात. त्याचा आता माझ्यावर काहीही दुष्परिणाम होऊ देणार नाही मी. कारण अर्धे आयुष्य या असल्या फालतू गोष्टींमध्ये गेले. मला जे शिकता आले नाही ते शिकण्याचा सल्ला मी माझ्या मुलांना देते. मुलांचा अभ्यास मीच तर घेते. त्यांनी अभ्यासाव्यतिरिक्त एखादी तरी कला शिकावी असा माझा आग्रह असतो. गाणे शिकावे किंवा एखादे वाद्य वाजवायला शिकावे. मैदानी खेळ खेळावेत. फक्त बक्षिसे मिळविण्यासाठीच नव्हे तर आपण शारीरिक दृष्ट्या सुधृढ रहातो यासाठी भरपूर खेळा. माझा मुलगा करते ब्लॅक बेल्ट आहे. स्केटिंग केले ५-६ वर्षे. क्रिकेट देखील खेळत होता. आता फुटबॉल खेळतो.नुसता पुस्तकी कीडा  होण्यापेक्षा अभ्यासा व्यतिरिक्त दुसरंही खूप काही शिकण्यासारखे आहे. माझी मुलगी देखील तिच्या शाळेत उत्तम गुणांनी पास होते.बास्केट बॉल खेळते. मी जर फक्त माझ्या स्वतःच्यात च मश्गुल असते तर मला सांगा हे सगळं शक्य असता का??
स्त्री मनाची अवस्था कोणीही कधीही जाणू शकत नाही फक्त स्त्रीच एका स्त्री ची व्यथा समजू शकते. मग ती व्यथा कुठलीही असो.
तेव्हा शिकलेल्या टायपिंग चा मला खूप उपयोग झाला आणि आता ब्लॉग लिहिण्यासाठी देखील उपयोग होत आहे. बाहेर नोकरी करायला नको म्हणत हतोय घरातले त्यामुळे मी घरी काही व्यवसाय करावा या हेतूने डेटा एंट्री चे कामदेखील केले १-२ वर्षे पैसे भरपूर मिळाले आणि मनालाही शांतीही  मिळाली की मी सुद्धा काहीतरी करू शकते याची. परंतु चेतन शाळेत गेला की मी सगळी कामे करून संगणकावर टायपिंग चे काम सुरु करीत असे. माझा टायपिंग चा वेग जास्त असल्याने मला मजा वाटायची आणि जास्तीत जास्त पाने टाईप करून व्हायची आणि माझे काम लवकर व्हायचे.  पण सतत च्या जास्तीच्या कामामुळे मानेचे दुखणे मागे लागले ते लागले. २ वर्षांनी मग काम बंद करावे लागले.  मग ऑनलाईन एम एल एम पण केले. हे करू की ते करू या नादात स्वतःच्या आरोग्याकडे लक्षच दिले नाही आणि अनेक आजार मागे लागले. गृहिणी काय आणि नोकरी करणारी स्त्री काय. तिला दोन्हीकडे कसरत करावीच लागते. या विषयावर बोलावे तेव्हढे कमीच आहे.
आपण स्त्रिया अशाच असतो सगळ्यांकडे लक्ष देतो इतरांची काळजी घेतो. परंतु स्वतःसाठी खूप कमी जगतो. इतरांचेही लाड करा कुटुंबाचे लाड करा सगळ्यांचे करा पपण आधी स्वतःचे लाड करा, छंद जोपासा,आरोग्यासाठी योगा-प्राणायाम करा, दुसऱ्यांना जसे चांगले पदार्थ खायला घालतो तसे स्वतःदेखील खा. डाएट वगैरे मी तरी करीत नाही. जेव्हा हेवी जेवाल तेव्हा जास्तीचे चालणे करा फक्त. आणि माझा म्हणाल तर मी स्वतः २ एक वर्षांपासून ट्रेकिंग करतेय त्यामुळे मला त्याचा फायदा खूप झाला आहे. माझा संधीवात आणि मानेची दुखणी, मणक्यातील ग्याप, अशी बरीच दुखणी गायब झाली आहेत. शिवाय ट्रेकिंग करता करता फोटोग्राफी ची हाऊस देखील पूर्ण होते. आणि ब्लॉग लिहिला की लिखाणाची हाऊस देखील पूर्ण होते. मी म्हणत नाही तुम्ही ट्रेकिंगच करा. पण शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी किमान रोज चालणे तरी असावेच. कोणतीही गोष्ट शिकायला वयाची अट नाही हे मी माझ्यावरून सांगतेय. पण तरीही ज्यांच्या मनात जे प्रश्न पडतात ना कि मी फक्त ट्रेकिंग ला भटकत राहते आणि घरात दुर्लक्ष असते तसे मात्र बिलकुल नाहीये. माझ्या घरातल्यांना विचारू शकता. कारण माझ्या कुटुंबाचे आरोग्य माझ्यापेक्षा चांगले आहे. अजून काय हवे आहे.
माझी मावशी मुंबईमध्ये नोकरी करते परंतु तिचे घर बघाल तर काय म्हणाल.चकाचक असते कायम. तिच्याकडे मी एक-२ वर्षे शिकायला होते त्यामुळे तिचा हा गुण माझ्यात उतरणे सहज शक्य आहे. ती जेवणाचे पदार्थ अतिशय सुंदर चविष्ट आणि नाजूकरित्या करायची तशीच सवय मला लागून गेली.माझ्या आजीच्या आणि आईच्या हातच्या पदार्थांना खूप छान चव होती त्यामुळे ती देखील माझ्यात उतरणे आलेच.. मैत्रिणींनो तुम्हाला एक सांगू इच्छिते की आपल्या सभोवताली जेव्हढी माणसे आहेत त्यांच्यात चांगले वाईट दोन्ही गुण असतात. त्यातला आपण चांगलाच गुण अचूक हेरायचा आणि आपल्यात आणायचा. बघा काय कयामत होते. माझ्या खाण्याच्या पदार्थाची तारीफ करणाऱ्या व्यक्ती भरपूर असतील पण अचूक तारीफ करणारी रूपा पाठक. ती म्हणते जयू तू नुसत वारं जरी फोडणीला घातलस तरी ते चविष्ट बनते. माझा भाऊ त्याला माझ्या हातचे जेवण आवडते. मी कुठलाही ड्रेस सारी परिधान केले तरी त्याला माझ्यात माधुरी दीक्षित दिसते. म्हणतो ताई तू माधुरी दीक्षित दिसते आज. हे जरा जास्तच होते. पण त्याला वाटते ते वाटते. पण आपल्याला कोणाची तारीफ करावीशी वाटली तर मनापासून खरंच करून घ्या. समोरच्याला तुमचे मन किती सुंदर आहे हे समजते. मी राहते त्या अपार्टमेंट मध्ये सगळ्या लोकांना मी केलेल्या पुरणपोळ्या, उकडीचे मोदक, तसेच व्हेज नॉन व्हेज जेवण अतिशय आवडते मी जेवण सुंदर बनवते. तसेच बाकी गूण आहेत. घरातली माणसे कायम घरातल्या स्त्री ला गृहीतच समजतात. तू काय रोजच चांगले बनवतेस त्यात काय कौतुक करायचे?? म्हणजे काय तर घरकी मुर्गी दाल बराबर. असेच झाले की हे..   पण जर मी बेचव जेवण बनवले तर लगेच सांगाल की नाही?? तसे चांगले बनवल्यावर देखील चांगल्याची देखील तारीफ कार्याला शिका.
आजकाल मी जे लेख लिहिते त्या लेखांचे वाचन केलेले जास्त आवडेल. कौतुकच केले पाहिजे असे काही नाही. त्यातल्या त्रुटी सांगा. एक समीक्षक म्हणून वाचा. तुम्हाला त्या लेखातून काहीतरी चांगलेच घ्यावयास मिळेल, काहीतरी प्रेरणा मिळेल, माझा ब्लॉग वाचून सुमित भावसार या छोट्या मुलाला देखील असा ब्लॉग लिहावासा वाटतो माझ्या बऱ्याच मैत्रिणींना देखील काहीतरी लिहावेसे वाटते. म्हणजे नक्कीच त्यात काहीतरी आहे. सहज आठवलं म्हणून सांगतेय एका ग्रुपवर एक वर्षांपूर्वी एकदाच माझा ब्लॉग टाकला होता आणि म्हंटले होते ब्लॉग वाचा परंतु  त्यातल्या एक-दोघांच्या फक्त प्रतिक्रिया आल्या. ब्लॉग वाचल्याच्या... बाकीच्यांना विचारले तर तर म्हणे वेळ नाही मिळाला मोठ्ठा आहे फार लेख.मी ते वाक्य लक्षात ठेवून पुन्हा त्या ग्रुप वर आजतागायत ब्लॉग टाकला नाहीये. मी म्हणते रोजचे वर्तमानपत्र तर आवर्जून वाचता ना वेळ काढून न चुकता?? त्या वर्तमानपत्राएवढा मोठ्ठा तर माझा ब्लॉग नक्कीच नाही. दुसऱ्यांची उणीदुणी काढत बसतात, स्वतःची दुःख उगाळत बसतात. त्यापेक्षा हा ताजा ताजा महिन्याचा महिन्याचा ब्लॉग वाचा. आणि आनंदी व्हा.
माझ्या कित्तेक वाचणाऱ्या मैत्रिणी म्हणतात जयू तुला इतके सुचते कसे आणि एव्हढा सय्यम येतो कुठून तुझ्यात लिखाणाचा. ?? “यही तो बात है..शायद इसे प्याशन बोलते हैस्वतःला चांगल्या कामात गुंतवले की सगळं आपोआप चांगले सुचते आणि चांगलेच लिहिले जाते..... लिहावे तेव्हढे कमीच आहे. वाचकांचा आग्रह झाला तर राहिलेल्या गोष्टी सुद्धा दुसऱ्या ब्लॉग मध्ये लिहिल्या जातील. म्हणजे.. क्रमशः ...