Tuesday 31 December 2019

सह्यांकन- चक्रम हायकर्स ,ब्लॉग भाग -२



सह्यांकन- चक्रम हायकर्स
ब्लॉग भाग -२
रांगणागड ट्रेक
उंची - २२२७ फूट
ठिकाण- कोल्हापूर
चढाई श्रेणी - सोपी
दिनांक २२ डिसेंबर २०१९
रांगणादुर्गविषयी थोडक्यात माहिती-भारतातील महाराष्ट्र राज्याच्या कोल्हापूर जिल्हयातील रांगणा हा एक दुर्ग आहे. रांगणादुर्ग उर्फ प्रसिध्दगड सहयाद्रीच्या दक्षिणेस पसरलेल्या, परंतु  घाटमाथ्यापासून अलग झालेल्या डोंगरावर तसेच घाट कोकण व गोवा यापासून जवळच अगदी मोक्याच्या ठिकाणी वसलेला आहे. छत्रपतींच्या आवडत्या दुर्गापैकी एक दूर असा याचा समावेश असे.म्हणूनच १७८१च्या एका ऐतिहासिक कागदपत्रात, ‘येक रांगणा खबरदार तर सर्व सुरक्षित नाहीतर सकल सावंत बारदेशावर उतरेल’ असा उल्लेख आलेला आहे. गडाच्या रांगडेपणाच्या बाबतीत कोल्हापूर जिल्हयात असलेल्या १३ दुर्गांपैकी रांगण्याचा पहिला क्रमांक लागतो. 
रांगणादुर्गचा थोडक्यात इतिहास -रांगणा किल्ला बांधण्याचे श्रेय शिलाहार राजा भोज दुसरा याच्याकडे जाते. १४७० मध्ये तो महंमद गवानने जिंकला. त्यावेळी महंमद गवानने काढलेले उद्गार होते, ‘अल्लाच्या कृपेने रांगणा ताब्यात आला. त्यात मर्दमुकीबरोबर संपत्तीही खर्च करावी लागली’.
बहामनी साम्राज्य लयाला गेल्यानंतर हा किल्ला अदिलशाहीत आला. शिवकाळात अदिलशाही सरदार सावंतवाडीचे सावंत यांच्याकडे  हा गड होता. सन १६५८ मध्ये विजापूरचा सरदार रुस्तम जमानने हा गड सावंताकडून घेतला. शिवरायांचे कोकणातील अधिकारी राहुजी पंडित यांनी रुस्तम जमानकडून हा किल्ला घेतला. पुढे अदिलशहाने रांगण्याविरुध्द मोहिम उघडली. त्यावेळी छत्रपती आगऱ्याला कैदेत होते. स्वराज्याच्या अस्तित्वावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते. अशा बिकट प्रसंगी स्वत:जिजाबाईंनी खास मोहिम काढून दि १५/०८/१६६६ रोजी रांगणा जिंकला. ही एक अद्भुत घटना रांगण्याचे स्वराज्यातील महत्व अधोरेखीत करते. दि १७/०८/ १६६६ रोजी महाराजांनी आगऱ्याच्या कैदेतून पलायन केले. १४ एप्रिल ते १२ मे १६६७ या काळात रांगण्याला बहलोलखान व व्यंकोजी भोसले यांनी वेढा दिला होता. परंतु शिवरायांनी जातीने येऊन हा वेढा मोडून काढला. शिवरायांनी या गडाच्या मजबुतीकरणासाठी ६००० होन खर्च केल्याचा पुरावा सापडतो.
औरंगजेबाला दख्खन मोहिमेत हा किल्ला जिंकता आला नाही. वारणेच्या तहानुसार रांगण्याचा ताबा करवीरकर छत्रपतींकडे आला. शाहू - ताराबाई संघर्षात पन्हाळयावरुन निघून ताराबाई या गडावर वास्तव्यास आल्या होत्या. सन १७०८ मध्ये सातारकरांनी गडास वेढा दिला, त्यावेळी ताराबाईला सिंधुदुर्गावर पाठवून रामचंद्र पंत अमात्यांनी व पिराजी घोरपडे यांनी किल्ला ३ महिने लढविला. पावसाळा सुरु झाल्यामुळे छत्रपती शाहूनी वेढा आटोपता घेतला.
सावंतवाडीकरांवर कायम दबाव ठेवण्यासाठी करवीरकराच्या दृष्टीने रांगण्याला विशेष महत्व होते. सावंतवाडीकरांच्या वतीने जिव्हाजी विश्राम यांनी फितुरीने रांगणा हस्तगत केला होता. परंतु करवीरकरांचा निधडया छातीचा वीर सुभान यशवंतराव शिंदे यांनी अडीच महिने झुंज देऊन गड हस्तगत केला. करवीरकरांचे महास्थल म्हणून या गडाचा उल्लेख त्यावेळच्या कागदपत्रात वारंवार येतो. पुढे सावंतवाडीकरांनी करवीरकरांशी एकनिष्ठ राहाण्याचे ठरविले व रांगणा इंग्रजाचे राज्य येईपर्यंत करवीरकरांकडे राहिला.
रांगणा गडावरील पहाण्याची ठिकाणे-सहयाद्रीतील प्रत्येक गडावर प्रवेश करण्यासाठी  चढाई करावीच लागते. परंतु रांगणा हा गड थोडा वेगळा आहे. रांगण्यात प्रवेश करण्यासाठी चक्क डोंगर उतरुन गडात प्रवेश करावा लागतो. गडाच्या भव्य बुरुजाच्या डाव्या बाजूने दरीच्या माथ्यावरुन जाणाऱ्या छोटया वाटेने पुढे गेल्यावर गडाचा पहिला भग्न दरवाजा लागतो. प्रवेशद्वार परिसराची रचना युध्दशास्त्रातील ‘रणमंडळ’ या संज्ञेप्रमाणे आहे. ती घटकाभर थांबून समजून घ्यावी अशी आहे.


पहिल्या प्रवेशाद्वारातून पुढे गेल्यावर बुरुजाचे संरक्षण देऊन लपविलेला गडाचा दुसरा दरवाजा लागतो. याच्या आत पहारेकऱ्यांच्या देवडया आहेत. या दरवाज्याच्या उजव्या अंगाने जाणाऱ्या पायवाटेने गेल्यावर एक कोरडा तलाव लागतो. येथून पुढे जांभ्या दगडात बांधलेली जोती दिसतात. गडाच्या या भागात दोन्ही बाजूने भक्कम तट असून त्यावर चढण्यासाठी जिने आहेत. शेवटी भव्य बुरुजात एक हनुमंताचे शिल्प कोरलेला चोर दरवाजा आहे. परंतु तो दगडांनी बंद केलेला आहे. येथून पुन्हा माघारी दुसर्या दरवाज्याजवळ यायचे. समोरच उजव्या हातास वाडयाची चौकट दिसते. चौकटीतून आत गेल्यावर विहिर लागते. तिला निंबाळकरांची विहीर म्हणतात. वाडयाच्या भिंतीजवळ फारसी शिलालेख आहे. वाडा पाहून पुढे गेल्यावर समोरच गडाचा तिसरा भक्कम दरवाजा लागतो. त्याला चार कमानी आहेत.

दरवाज्यातून आत गेल्यावर सरळ पायवाटेने पुढे गेल्यास बारमाही भरलेला तलाव लागतो. तलावाच्या दुसर्या बाजूस अनेक समाध्या दिसतात. एका कोपर्यात शिवमंदिर दिसते. इथेच आमची त्या दिवसाची छावणी होती.यानंतर ओढा पार करुन आपण रांगणाई मंदिराजवळ येतो. रांगणाई मंदिर आम्ही जेवणाआधी पाहून झाले होते रांगणाई देवीचे मंदिर प्रशस्त असून, मुक्कामास योग्य आहे. मंदिरात रांगणाई देवीची ढाल, तलवार, त्रिशूळ इत्यादी आयुधे घेतलेली मूर्ती आहे.रांगणाईच्या उजव्या हाताला विष्णूची मुर्ती व डाव्या हाताला भैरवाची मूर्ती आहे. या ठिकाणी एक फारसी शिलालेखाचा दगड आहे. मंदिरासमोरच दीपमाळ आहे. रांगणाई मंदिराच्या उजव्या बाजूला मारुतीचे मंदिर आहे. 
सह्यांकनचा दुसरा दिवस दिनांक २२ डिसेंबर २०१९. आमच्या तंबूतील आम्ही चौघी पहाटे साडेपाचचा कॉल व्हायच्या आधीच उठून आवरून तयार होतो.  शिवाय चहा घेऊन धरणाच्या काठाला सकाळचा व्यायाम करण्यास सर्वच सज्ज होते. भटवाडी छावणीचा उत्तम पाहुणचार घेऊन तेथील लीडर महेश भालेराव,चेतन,रमेश दादा, रंजन महाजन, मैत्री भट, मंगेश पंडित,आणि इतरांचा निरोप घेऊन आणि व्यायाम झाल्यावर लगेच नास्ता चहा घेऊन पूर्ण सामानाची मोठी सॅक पाठीवर अडकवून गोमाजी लाड यांना मार्ग दाखवण्यासाठी सोबत घेऊन रांगणा गडाकडे निघालो.

रांगणागड ट्रेक सकाळी साडेसात-आठच्या सुमारास सुरु केला. घनदाट जंगल पार करीत, मध्ये आमच्या वाटाड्याचे गोमा दा चे गाव चिकेवाडी गाव पार करीत जंगलातील अनेक वनस्पतींची, प्राण्यांची माहिती घेत-घेत तीन तास कसे गेले समजले नाही. हे कडगाव वनक्षेत्र आहे इथे गवा आणि इतर प्राणि पाहावयास मिळतात.जाताना एक ओढा आणि मध्यात गेल्यावर एक ओढा असे दोन ओढे पार करावे लागले. 

चिकेवाडीमध्ये काही घरे जांभ्या दगडात बांधलेली तर काही कारवीची कुडाची कौलारू घरे पाहावयास मिळाली. अंगणाला छानसे कुंपण, दारात मांडव असे सुंदर चित्र या चिकेवाडीत दृष्टीस पडले.दारात गाई-गुरे तर शहराप्रमाणे पाण्याची टाकी देखील आढळली. त्यातील पाणी अतिशय चवदार गोड होते.





रांगणाला जाताना जंगलात अर्ध्यापर्यंत वाट दाखवणारे गोमा दादा यांचे घर याच चिकेवाडीमध्ये आहे. मुबलक पाणी असल्याने शेती हा व्यवसाय इथे दिसतो. या जंगलात अनेक औषधी वनस्पती आहेत. अर्ध्या वाटेपर्यंत गोमा दाद माहिती द्यायला होते तर अर्ध्या वाटेत रांगण्यावरील लिडर्स आपटे सर आणि महादेव दादा आम्हाला घ्यायला आले होते. रांगणा गडावर पोहोचायच्या थोडेसे आधी बांदेश्वर मंदिर आहे परंतु त्याची पडझड झाली आहे.

परंतु त्यातील मुर्त्या सुबक आणि कोरीव आहेत. थकलेल्या ट्रेकर्सना कोकम सरबताचा आस्वाद घेता आला. चक्रम हायकर्स किती छान काळजी घेता आणि वेळोवेळी उत्तम सोय उपलब्ध करता. या ठीकाणाहून रांगणाकडे जाताना खाली उतरून मग पुन्हा मुख्य दरवाज्याकडे चढून जावे लागते.इथे अगदी जवळ गेल्यावर रांगणाचा बुरुज आणि रांगण्याचे सौन्दर्य खुलून दिसते.
आपटे सर वेळोवेळी गडाची उत्तम माहिती देत होते. प्रत्येक ट्रेकमध्ये इतिहासाची उत्तम जाण आणि आत्मीयता असलेला असा मेंबर आमच्यासोबत असला तर आमचे अहोभाग्यच. भन्नाट फोटोग्राफी करीत आपटे सरांचे ऐतिहासिक भाष्य ऐकत रांगणागडाच्या छावणीवर दुपारी १२च्या सुमारास पोहोचलो.
तिथे आमच्या सॅक ठेवून रांगणाई देवीच्या मंदिरापाशी गेलो. आपटे सरांनी प्रत्येक बुरुजाची, प्रत्येक मंदिराची उत्तम माहिती दिली.  छोट्या छोट्या मूर्ती कोरलेल्या देवी देवतांच्या वाहनावरून कशा ओळखायच्या ते समजून सांगितले.

इतिहासाबद्दलचे ज्ञान आणि लढवय्यांबद्दलची आत्मीयता सर्वकाही वाखाणण्याजोगे होते. ऐकत राहावेसे वाटत होते. कोकण दरवाजा पाहून झाल्यावर पुन्हा कॅम्पसाईटवर येऊन पाहतो तर काय. तेथील लीडर अनिकेत आणि विलास दादा यांनी गरमगरम पुरी भाजीचा बेत केला होता. माहेरवाशिणीला माहेरी आल्यावर जसे आयते जेवण मिळाले की जे सुख मिळते ते आम्हाला सह्यांकनच्या प्रत्येक छावणीत मिळत होते. “मला सांगा सुख म्हणजे काय असते.”
दमल्या थकल्या जीवाला आयते पाणी आणि दोन घास प्रेमाचे मिळाले की स्वर्गसुखच जणू. जेवण आटोपून मंदिरात थोडीशी विश्रांती घेऊन साडेतीनच्या सुमारास पुन्हा रांगणागड फिरावयास निघालो. विश्रांती घेताना समजले की दुपारचे जेवण इतके चविष्ट झाले होते की बनवणाऱ्या लीडर्सना जेवण शिल्लक राहिले नाही.स्वतः ड्राय स्नॅक्स आणि फळे खाऊन दुपारची वेळ भागवली परंतु थकलेल्या ट्रेकर्सना भरभरून वाढले काहीही कमी पडू दिले नाही. दुपारचे जेवण खरंच एखाद्या लग्न कार्यात बनवावे तसे चविष्ट झाले होते.
छावणी लीडर अनिकेत आणि विलासदादा तुमचे मनापासून आभार. इतक्या उंच गडावर इतके सगळं सामान नेऊन ते चार-पाच दिवस पुरवणे आणि प्रत्येक वेळी चहापाण्याची,जेवणाची उत्तम व्यवस्था स्वतः करणे ही खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. प्रत्येक छावणीवर पिण्याचे वेगळे पाणी, प्लेट्स धुण्यासाठी व खरकटे कचरा टाकण्यासाठी खड्डे, हात तोंड धुण्यासाठी पाण्याचे वेगळे भरलेले ड्रम, त्यावर सूचना फलक, शौचालयासाठी पुन्हा प्रत्येक छावणीवर खड्डे त्याला किंतन आणि तंबूचे आच्छादन अशी सगळीच व्यवस्था उत्तम केली जाते.
दुपारी जेवण करून थोडीशी विश्रांती घेऊन आम्ही रांगणाचे प्रशस्त पठार फिरण्यास निघालो. अवाढव्य घेऱ्यामुळेच त्याला रांगणा हे नाव पडले असावे. प्रचंड मोठा विस्तार.असलेला असा हा रांगणा गड आहे. इथे एक ओढा आहे तो सध्या कोरडा आहे. काही ठिकाणी अगदी थोडे पाणी इथे आहे. हा ओढा पावसात भरून वाहत असतो त्या ओढ्यातील पाण्यामुळे तटबंदी ढासळू नये त्यासाठी मोठी दगडी कमान बनविली आहे पाणी जाण्यासाठीची ती वाट आहे. अतिशय सुंदर कल्पनेने गड बांधला गेला आहे. 

इथे एक पडझड झालेला जुना राजवाडा आहे तो सोडला की पुढे एक तलाव लागतो. या तलावाच्या काठावर देवळीमध्ये शिवलिंग आहे. त्या पिंडीस दोन लिंगे आहेत. अशा प्रकारची पिंड मी पहिल्यांदाच पाहिली. तलावाकडे तोंड करून उभे राहिल्यास डाव्या हाताने जाणार्या पायवाटेने पुढे चालत राहायचे.

आमच्यासोबत असलेल्या महादेव वाटाड्याने सांगितले की वाटेत छोटेसे गणेशमंदिर आहे. गडाचा पसारा खूपच मोठा असल्याने गणेश मंदिराला भेट देण्यासाठी आम्ही येताना वळणार होतो त्यामुळे हत्ती सोंडेकडे चालत राहिलो. इकडे फारसे ट्रेकर्स येत नसल्याने गड खूप शांत आणि स्वच्छ आहे. तसेच वाटा फार मळलेल्या नाहीत त्यामुळे दगडगोट्यांवर पाय अचानक मुरगळतो.जाणाऱ्यांनी काळजी घावी.
इथे आमच्यातील एक मेंबर अचानक मागे राहून गायब झाल्याने काही जण त्याची शोधाशोध करीत मागे गेले. आम्ही काहीजण जिथे पोहोचलॊ होतो तिथेच थांबलो.तिकडे मोबाइलला रेंज नसल्याने पुन्हा छावणीपर्यँत जावे लागले. इकडे तिकडे भटकत रहाण्यापेक्षा आणि आमच्या सगळ्यांच्या परतीची वाट पाहण्यापेक्षा ट्रेक मेम्बर छावणीवर परत गेला होता. खरे तर असे कोणी अचानक गायब झाले तर खूप काळजी वाटते कारण या जंगलात अनेक प्राणी आहेत. त्यामुळे एकट्याला टाकून जाणे किंवा गायब झाला तर दुर्लक्ष करणे हे चुकीचे ठरते. सगळे जण छावणीत सुरक्षितरित्या पोहोचलेच पाहिजेतच. आमच्यातील वाटाड्याला छावणीमध्ये पाठविण्यात आले तिथे हा मेंबर सुरक्षित आहे हे समजल्यावर सर्वांना हायसे वाटले. "वो दुसरा तिसरा कोई नहीं था वो तो सूर्या था."  कितीही महत्वाचे काम असो ग्रुपलीडर, को-लीडर किंवा ग्रुपमधील इतर कोणालाही किमान एका व्यक्तीला सांगून जाणे हा नियम सगळ्यांनी पाळला पाहिजे.
छावणीवर मेंबर सापडल्याने ३५ मिनिटांनी पुन्हा आम्ही त्याला घेऊनच हत्तीसोंडीच्या कोकण दरवाज्याकडे निघालो.जाताना डाव्या हाताचा आजूबाजूच्या घाटमाथ्यावरचा परिसर लक्षवेधी होता.  ही संपूर्ण माची राजगडाच्या संजिवनी माचीप्रमाणे तटबंदीने संरक्षित केलेली आहे. तटबंदीला पायऱ्याही आहेत.



संध्याकाळ होत आल्याने पावले जोरात उचलावी लागत होती.पुढे घनदाट जंगल तर एकीकडे कोकण दिसत असलेली खोल दरी होती. हत्तीसोंड दुरून रुबाबदार दिसत होती. अंधार होत आल्याने आम्ही फक्त कोकण दरवाज्यापर्यंत जाऊन पुन्हा पायपीट करून दोनलिंग असलेल्या पिंडीच्या तलावाजवळ आलो आणि तिथून त्या छोट्या गणेशमंदिराला भेट दिली.
गणेश मंदिराच्या आवारातील भिंतीवर बसून क्षणभर विश्रांती घेतली. त्याठिकाणाहून आजूबाजूचा घाटमाथा आकर्षित करतो. धरणाच्या विस्तीर्ण जलाशयाप्रमाणे विस्तीर्ण पिवळसर गवताळ जमीन आणि दूरदूर पसरलेले हिरवे-निळे डोंगर माझ्यासोबत सेल्फी काढण्यासाठी आशेने पाहत होते, खुणावत होते. खरंच ट्रेकिंगच आयुष्य किती रम्य बालपणाप्रमाणे आहे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे आणि पुन्हा पुन्हा या रांगण्यावर यावे.
सदानंद आपटे सर इतिहासाची इतकी सुंदर माहिती देत होते की पुन्हा पूर्ण गड फिरून पुन्हा-पुन्हा तोच इतिहास ऐकत रहावा वाटत होता. परंतु अंधार झाल्याने छावणीकडे रवाना झालो. लीडर अनिकेत आणि विलास दादा यांनी ओल्या भेळची सोय केली होती. त्या संध्याकाळी त्या गडावर गवतावर बसून ओल्या भेळ खाण्याची मजा काही वेगळीच होती. त्यानंतर गरमागरम चहा आणि कॉफी. अहाहा शब्दात वर्णन करणे फार कठीण आहे रे. त्यासाठी प्रत्यक्ष सह्यांकनमध्ये सहभागी व्हावे लागेल. शिवमंदिरात लाईटची व्यवस्था नव्हती परंतु गॅसबत्तीची सोय छान होती. लहानपणी गावाला लाईट गेली की एकतर गॅसबत्ती अथवा रॉकेलची बत्ती लावून अभ्यास करत असू. त्याची आठवण प्रकर्षाने झाली. थोडी विश्रांती घेऊन तोंडावर पाणी मारून गरमागरम सूपचा आस्वाद घेऊन आपटे सरांचे प्रतापराव गुर्जर यांच्या आयुष्यावरचे अनेक प्रसंग आणि इतर सर्वच ऐतिहासिक युद्ध किस्से ऐकताना भारावून गेलो होतो. आपटे सरांना तर ते प्रसंग कथन करतानादेखील गहिवरून आले होते. काय तो इतिहासाचा गाढा अभ्यास किती ती शौर्याविषयी आत्मीयता. आपटे सर तुम्हाला आम्हा सर्वांचा सलाम. तुमचे इतिहासावरील भाष्य पुन्हापुन्हा ऐकायला आवडेल. टाचणी पडली तरी आवाज यावा इतक्या शांत वातावरणात  सुमारे एक तास इतिहासातील किस्से ऐकून लगेचच गरमागरम खिचडी लोणचे, पापड, कोशिंबीर स्वीटडिश शिरा आणि थोड्या वेळाने गरमगरम मसालादुधाचा आस्वाद घेतला. छावणीचे लीडर अनिकेत रहाळकर, विलास दादा, प्रकाश पवार, अमोल, कृष्णा  खरंच आम्हाला माहेरी आल्याचा आनंद दिलात तुम्ही. अन्नदाता सुखींभव.
तेथील शिवमंदिरात सर्वांना जागा होणार नसल्याने आम्ही बरेच मेम्बर्स मंदिराच्या उघड्या प्रांगणात झोपायचे ठरवले. इथे तंबू नसल्याने ज्याने-त्याने आपापल्या स्लीपिंग बॅगमध्ये घोरण्याच्या वेगवेगळ्या तालावर एकमेकांशी जुगलबंदी सुरु केली आणि सकाळी उठून जोतो म्हणतो तो मी नव्हेच. जमिनीची गादी, टिपूर चांदण्यांच्या आकाशाचे पांघरून करून मी आभाळाकडे पाहत बसले होते. मला काही झोप येत नव्हती.  मी आपली दुसऱ्याला झोपऊन रात में तारे गिननेवाली. रात्री १२ नंतर झोप यायला लागली तर रात्रीस वाऱ्याचा खेळ सुरु झाला. स्लीपिंग बॅग मध्ये वारा घुसून बॅग उघडू पाहत होता. मी आपली डोळे बंद करून माझ्या मैत्रिणीला ढोसकून जागे केले. तू पहिले जागी हो आणि तुझ्या डोळ्यावरची स्लीपिंग बॅग बाजूला करून तुझे तोंड मला दिसेल अशी झोप आणि माझी स्लिपिंग  बॅग कोण उचलतंय ते बघ आणि लाईट कोण  मारतंय ते बघ. त्या शिवमंदिराच्या आवारात कोणाची बिशाद आपल्याला त्रास द्यायची ?? विलासदादाच ते रात्री बऱ्याच उशिरापर्यंत जागे होते आणि पहारा करीत होते. प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीची आठवण करून देत होते. हे नीट ठेव, ते नीट ठेव सकाळी सापडणार नाही. किती ती खरी काळजी. लीडर्सहो. इतकी अफाट,रांगडी माया कुठून आणता ओ??
मैत्रिणीला जागेकरून तिला जागे रहाण्याचा आग्रह करून त्रास देऊन मी इतरांच्या घोरण्याच्या तालावर थोडावेळ झोपी गेले. खरंच त्या चांदण्यांच्या छताखाली दोनतीन तासांची झोपदेखील स्वर्गसुख देऊन गेली. पहाटे नेहमीप्रमाणे ५ला उठून साडेपाचला पहिला बेड टी(आम्हाला तर घरी पण बेड-टी मिळत नाही रे)  मग सामानाची आवराआवर करून सकाळची मुख्य कामे उरकून व्यायाम करून ओळख परेड करून पुन्हा चहाबिस्कीट खाऊन छावणी लीडर्सचा आणि रांगण्याचा जड अंतःकरणाने निरोप घेऊन आमचे लीडर्स आदित्य,अनिकेत यांच्या सूचनेवरून नारायणगडाकडे निघालॊ. सह्यांकनचा दुसरा दिवस लीडर्सच्या उत्तम नियोजनामुळे  उत्तमरित्या पार पडला. चक्रम हायकर्स रॉक्स.
संदर्भ- डोंगरयात्रा - आनंद पाळंदे, दुर्गदर्शन - गो.नी. दांडेकर, नेटवरून साभार. 


Saturday 28 December 2019

सह्यांकन - पहली नजर

सह्यांकन - पहली  नजर

भुदरगड उंची- ३,२१२ फूट.
प्रकार- गिरिदुर्ग.
चढाईची श्रेणी-सोपी.
ठिकाण-कोल्हापूर
जवळचे गाव-पेठ शिवापूर (गारगोटी)  

माझ्या महाराष्ट्र राज्यात पुण्यापासून सुमारे ३१५ कि.मी. अंतरावर भुदरगड हा दुर्ग आहे. कोल्हापूर शहरापासून साधारणपणे ५०-५५ कि.मी. अंतरावर असलेला हा दुर्ग ३,२१२ फूट उंच असून तेथील भैरवनाथाच्या जागृत देवस्थानामुळे प्रसिद्ध आहे. किल्ल्याला दोन दरवाजे आहेत. तटाची मात्र खूप ठिकाणी पडझड झाली होती परंतु सध्या गडाची तटबंदी पूर्णपणे जांभ्या दगडामध्ये पुन्हा बांधली गेली आहे. येथे दरवर्षी माघकॄष्ण प्रतिपदेपासून दशमीपर्यंत मोठी यात्रा भरते.

भुदरगडचा थोडक्यात इतिहास -भुदरगड हा अजूनही चांगल्या स्थितीत असलेला गड, शिलाहार राजा भोज (दुसरा) यांने बांधला होता.त्यानंतर अदिलशाहीत बरीच वर्षे काढल्यानंतर १६६७ मध्ये स्वराज्यात आला... १६६७ मधे शिवाजी महाराजांनी भुदरगडाची नीट दुरूस्ती केली त्यावर शिबंदी ठेवून ते एक प्रबळ लष्करी ठाणे बनवले. परंतु मुघलांनी हे ठाणे ताब्यात घेण्यास अल्पावधीतच यश मिळवले. पाच वर्षानी मराठ्यांनी भुदरगडावर अचानक ह्ल्ला करून तो जिंकून तर घेतलाच,परंतु मुघलांच्या प्रमुख सरदाराला ठार मारले. मुघलांची निशाणे त्यांनी भैरवनाथास देऊन टाकली ती अजूनही या देवळात आहेत.१८व्या शतकाच्या उत्तरार्धात परशुरामभाऊ पटवर्धनांनी किल्ल्यातील शिबंदी वश करून त्यावर ताबा मिळवला. दहा वर्षे तो त्यांच्या ताब्यात राहिला... १८४४ मध्ये कोल्हापुरातील काहींनी बंड करून बरेचसे किल्ले ताब्यात मिळविले होते. त्यात सामानगड भुदरगड प्रमुख होते. त्यांचा बिमोड करण्यास जनरल डीलामोटीने ससैन्य कूच केले. १३ऑक्टोबर १८४४ रोजी इंग्रजांच्या सैन्याने भुदरगडावर पूर्ण ताबा प्रस्थापित केला. असे बंडाचे प्रयत्न वारंवार होऊ नयेत म्हणून इंग्रजांनी तेथील तटबंदीची बरीच तोडफोड  केली.(माहिती नेटवरून)
चक्रम हायकर्स मुलुंड ही सह्याद्रीतील ट्रेक आयोजित करणारी संस्था १९८३ साली स्थापन झाली. अनेक लोकांचे योगदान यामागे आहे. माझ्या मते दर दोन वर्षांनी सह्याद्रीतील सलग चारपाच दिवसांचा ट्रेक आयोजित करणारी ही एकमेव संस्था आहे. सह्याद्रीतील या कृतीला "सह्यांकन" असे म्हणतात.  "चक्रम  हायकर्स" यांचे १९ वे सह्यांकन होते. दिनांक २० डिसेंबर २५ डिसेंबर अशी आमची पहिली बॅच होती याशिवाय एक दिवस पुढे अश्या आणिक दोन बॅचेस होत्या
मला आणि माझ्या मैत्रिणीला तुषार कोठावदे याच्यामुळे सह्यांकनमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली होती आणि मिळालेल्या त्या संधीचे सोने करायचे हा माझा मूलमंत्र आहे. दिनांक २० डिसेंबर २०१९ या दिवशी रात्री मुलुंडहून साडेआठच्या सुमारास आमची सह्यांकनची पहिली बॅच निघाली. काही ट्रेकर्स पुण्यातले असल्याने ट्रेकबस मुबंई -पुणे -बंगलोर हायवे अशीच जाणार होती. मी पुण्यात माऊंटन एज आडवेंचर अँड वाईल्ड ट्रेल्स पुणे यांच्यासोबत ट्रेकिंग करते. चक्रम हायकर्स सोबत माझे हे पहिलेच सह्यांकन असल्याने, व नवीन ग्रुप असल्याने, शिवाय सलग पाच दिवसांचा ट्रेक असल्याने थोडीशी धाकधूक होती. परंतु तुषार,प्रशांत, प्राची हे तिघे पाषाणहून वाकडला आम्हाला भेटायला आल्याने माझी अर्धी काळजी तिथेच कमी झाली. आमच्या सह्याद्रीच्या गप्पांच्या नादात रात्री बाराच्या सुमारास महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची आलिशान ऐसपैस बस येऊन थांबली तरी समजले नाही. आमचे ट्रेक लीडर आदित्य आणि व कोलीडर अनिकेत बसमधून खाली उतरून तुषारला भेटल्यावर मलाच फार खास व्यक्ती असल्यासारखे वाटले. आजच्या युगात निर्मळ आत्म्याची माणसे मिळणे म्हणजे मी आपले भाग्य समजते. सह्याद्रीमध्ये फिरणारा प्रत्येक व्यक्ती निर्मळ आणि समजूतदार बनतो असे माझे मत आहे. लीडर आणि कोलीडरच्या प्रेमळ, आदरयुक्त  वर्तणुकीतून  माझ्या ट्रेकिंग ग्रुपमध्ये माझी एक सीट कायम राखीव असते या गोष्टीची मला प्रकर्षाने आठवण झाली आणि हा माझा पाच दिवसांचा ट्रेक तुफानी होणार याची ग्वाही तिथेच मिळाली. रात्री बाराच्या सुमारास आम्हाला सह्यांकनच्या हस्ते सुपूर्त करण्यास आलेल्यांचा निरोप घेऊन त्याच्याकडून स्लिंगरोप घेऊन मी बसमध्ये बसले. गप्पा मारत मधेच डुलक्या घेत रात्रीचा बसचा प्रवास सुरु होता.
(खालील फोटो  पहाटे साडेतीन वाजता एका टोलनाक्यावर टिपला आहे.)

टोल नाका आला की मी पूर्ण जागी होऊन एक तरी फोटो घेण्याचा प्रयत्न करीत असे. सकाळी साडेपाचच्या सुमारास आमची बस गारगोटीच्या हद्दीमध्ये पोहोचली.झोपेतून जागे होऊन थोडीशी आवराआवर करून  सातच्या सुमारास हॉटेल वैष्णव रेस्टोरंट येथे फक्कड चहाचा आस्वाद घेऊन पोह्याचा नास्ता करून बसमधून आम्ही भुदरगडकडे निघालो.  
आजूबाजूच्या हिरवळीतून कौलारू घरे, छोटे-छोटे रस्ते न्याहाळीत सूर्यदेवाची कोवळी सूर्यकिरणे डोळ्यांवर झेलीत आमची बस घाटवळने पार करीत साडेआठच्या सुमारास भुदरगडावर पोहोचली.
चक्रम हायकर्सचे १९व्या सह्यांकनचे बॅच आणि कॅप वाटप करून सर्वांची ओळख परेड करून भुदरगडची वारी सुरु केली.किल्ले भुदरगडवरून भुदरगड हे नाव या तालुक्याला दिले आहे. साधारणतः ९६ ते १०० गावांचा हा तालुका आहे.  गारगोटी हे येथील मुख्य ठिकाण. भुदरगड हे फक्त तालुक्याचे नाव आहे, तालुकास्तरीय सर्व कामकाज गारगोटी या शहरातून चालते. गारगोटी पासून १० किलोमीटर अंतरावर भुदरगड किल्ला आहे. गारगोटी शहर कोल्हापूर शहरापासून ५० किलोमीटर अंतरावर आहे. वेदगंगा नदीचा प्रदेश असणारा हा विभाग शेती आणि शैक्षणिक क्षेत्रात पुढे आहे.
गडावर जाण्याच्या वाटा-गडावर जाण्यासाठी गारगोटी वरून पाल बार्वे मार्गे किंवा गारगोटी वरून पुशपनगर राणेवाडी मार्गे जाता येते. पेठ शिवापूर गावातून डांबरी सडक भुदरगडावर जाते. पूर्वी पेठ शिवापूर ही बाजारपेठ होती. या मार्गाने गडावर पोहचताच उजव्या हाताला भैरवनाथाचे वेगळया धाटणीचे हेमाडपंथी मंदीर दिसते.मंदीराभोवती ओवऱ्या,कमानी दिपमाळा आहेत.मंदीरासमोरील तटबंदीत असलेल्या बुरुजावर ध्वजस्तंभ तोफ आहे.देवळामागील वाटेने पुढे गेल्यावर जांभ्या दगडात बांधलेला भव्य वाडा दिसतो. वाडयात गडसदरेचे अवशेष आहेत. वाडयाच्या पलिकडे करवीरकर छत्रपतींनी जिर्णोध्दार केलेले पुरातन शिवमंदीर आहे. सभा मंडपात छत्रपती शिवरायांचा अर्धपुतळा स्थापित केला आहे. मंदीर मुक्कामासाठी योग्य आहे.


वाडयाजवळील पायवाटेने पुढे गेल्यावर भुदरगडचे वैभव असलेला बांधीव दुधसागर तलाव लागतो. यातील पाणी मातीच्या गुणधर्मामुळे दुधट रंगाचे झाले आहे. तलावाशेजारी भग्नावस्थेतील भवानी मंदीर मंदीरात आदिशक्ती भवानीची शस्त्रसज्ज देखणी मुर्ती आहे. तलाव उजव्या हाताला ठेवून काठाने पुढे गेल्यास अनेक समाध्या दिसतात. आणखी पुढे गेल्यावर गुहेत असलेले गुहेच्या बाहेर सभा मंडप असलेले मंदीर लागते. मंदीरात अनेक देवतांच्या मुर्ती दिसतात. तेथुन झाडीतून मळलेल्या वाटेने उत्तरेकडे पुढे गेल्यास, आपण एका छोटया तलावाजवळ येतो. त्या ठिकाणी समाध्या आहेत. या ठिकाणी गडाची उत्तम स्थितीत असलेली उत्तर तटबंदी आहे.

तटातील दगडी जिन्याने तटावर चढले असता, आपणास गड पायथ्याच्या पेठ शिवापूर गावचे सुंदर दर्शन होते.
पुन्हा माघारी दुधसागर तलावाजवळ यायचे तलाव जेथे संपतो, तेथे पुर्वेकडच्या सरळ वाटेने पुढे गेल्यास नामशेष झालेले गडाचे प्रवेशद्वार आहे. दोन्ही बाजूनी दगड लावलेल्या वाटेने खाली उतरल्यावर एक भलीमोठी चौरस शिळा या शिळेत कोरुन काढलेली १०० चौफूटांची खोली (पोखर धोंडी) दिसते.
येथून पुन्हा माघारी आल्यावर प्रवेशद्वाराच्या बाजूला एक नंदी दिसतो. त्यासमोर जमिनीच्या पोटात खोदून काढलेले भुयार आहे. भुयाराच्या पायर्या उतरुन आत गेल्यावर अन्य मुर्त्यांसोबत जखुबाइची मुर्ती दिसते.
 

आपण जागोजागी जिने असलेल्या पश्चिम तटबंदीवर चढायचे भैरवनाथ मंदीरापर्यंत चालत जायचे. त्या ठिकाणी तटबंदीत आणखी एक बुजलेला दरवाजा दिसतो.गडावर चिर्याच्या कोरडया पडलेल्या विहिरी दोन तलाव आहेत.परंतु त्यातील पाणी पिण्यास अयोग्य आहे.गडावरील सर्वात सुस्थितीतील प्रे़क्षणीय वास्तू म्हणजे श्री भैरवनाथाचे मंदिर. गडावर एक मोठा तलाव आहे. त्याच्याच काठी शंकराची दोन मंदिरे तसेच भैरवीचे मंदिर आहे. हिलाच जखुबाई म्हणून ओळखतात.
गडावर थोडीशी झाडी आहे. गडावरुन दुधगंगा-वेदगंगा नद्यांची खोरी, राधानगरीचे दाट अरण्य आंबोली घाटाचा हिरवागार परिसर दृष्टीस पडतो. गडाच्या सर्वबाजूनी वनीकरण केल्यामुळे हा गडाखालील परिसर सदैव हिरवागार दिसतो. गडाखाली पेठ शिवापूर, गडबिद्री, जकींनपेठ, शिंदेवाडी, कदमवाडी, वरेकरवाडी, राणेवाडी, माडेकरवाडी, कालेकरवाडी, घावरेवाडी, चोपडेवाडी, पडखंबे, बारवे अशी छोटी गावे आणि वाड्या आहेत.
गडाच्या तटबंदीवर अनेक ठिकाणी तोफा लावण्याचे मोठमोठाले कोनाडे, मशाली लावण्यासाठीचे छोटे खाचे अशा अनेक गोष्टी निरीक्षण करून पहिल्या तर निदर्शनास येतात. गडावरील कचरा उचलायला जमलं नाही तरी किमान प्लास्टिकसारखा कचरा करू नये हा आम्हा ट्रेकर्सचा नियम आहे. तरीही न राहवून आम्ही गडावरील प्लास्टिकचा कचरा गोळा केला. 


भुदरगडावरील जांभ्या दगडातील घरे खूपच आकर्षक होती. ते कोंबडीच्या पिल्लांचे लुटूलुटू फिरणे, दुपारच्या वेळी बायकांचे ओसरीवर बसून गप्पा मारणे पाहिले आणि मन क्षणात कोकणात रवाना झाले. 

सह्यांकनच्या पाच दिवसांच्या ट्रेकमधील पहिल्या दिवशी सकाळच्या कोवळ्या सूर्यकिरणांमध्ये भुदरगड पूर्ण फिरून झाल्यावर गडावरील गावातील एका शाळेतील अंगणात आम्ही दुपारचे जेवण आटोपले (चक्रम हायकर्सने आयोजित केलेले दुपारचे जेवण) गप्पाटपा करीत थोडी विश्रांती घेऊन लगेच भटवाडी कॅम्पसाईटकडे रवाना झालो. जाताना मौनी महाराज यांच्या समाधीला आणि वाड्याला भेट दिली.  



मौनी महाराज आणि शिवाजी महाराज यांच्या भेटीविषयी येथे लिहिलेले आढळले.मौनी महाराज छत्रपति शिवाजी महाराज या दोन विभुतिंची भेट जेथे घडली ते पाटगाव.मौनी मठ हा लाकुड दगडातील बांधकामाचा दुर्मिळ नमुना मनाला भुरळ पाडतो. येथे मौनी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेउन काही वेळ शांत बसलो तर खूप वेगळा शांत अनुभव येतो.पाटगावची छोटीशी बाजारपेठ आहे. कोकणाच्या तोंडाशी वसलेले हे दुर्गम गाव अतिपर्जन्याचे ठिकाण आहे असे म्हणतात.गावचे वेदगंगेला अडवणारे मौनीसागर धरण वेळ असल्यास पहावे, निसर्गइतिहाससंस्कुती यांचा त्रिवेणि संगम अनुभवायचा असेल तर  भुदरगड पाटगावला अवश्य  भेट द्यावी.

मौनी महाराज समाधीचे दर्शन घेऊन साडेचारच्या सुमारास आम्ही पाटगाव धरणाजवळच्या आमच्या भटवाडी कॅम्पसाईटवर पोहोचलो. पोहोचताच आमचे स्वागत गरमागरम चहा.बिस्किटे थॊड्या वेळाने हलका नास्ता स्वीट कॉर्न विद चाटमसालाने झाले. तेथील तंबूमध्ये आमच्या सॅक ठेवून आम्ही धरणाच्या जलाशयाच्या दिशेने सूर्यास्ताचा परमानंद घेण्यासाठी रवाना झालो. एकीकडे आमच्यासाठीचा स्वयंपाक बनत असल्याचा सुवास येत होता तर एकीकडे सूर्य अस्तास जात होता. दोन्ही गोष्टी परमानंद देणाऱ्या.
ओळख नसल्याने आम्ही नकळत ग्रुप लीडर्सकडूनदेखील फोटोग्राफी करून घेतली. फोटोग्राफी करून सूर्य अस्ताला गेल्यावर लगेच गरमागरम रस्समचा आस्वाद घेता आला. लगेचच गरमागरम रात्रीच्या जेवणाचा आस्वाद घेऊ लागलो. जनरेटर लावून लाईटची व्यवस्था छान होती. पिण्याचे पाणी, हात आणि प्लेट धुण्याचे पाणी त्यावर सूचना फलक लावलेले होते. जवळच घनदाट देवराई असल्याने गावकऱ्यांनी तिथे एक नंबर, दोन नंबरला जाण्यास बंदी आणली होती त्यामुळे सह्यांकनच्या लीडर्सने निसर्गाला कोणतीही हानी पोहोचवता शौचखड्डे खणून माती टाकण्याची सोय केली होती. बाजूला किंतन लावले होते. तंबू लावले होते. मुले मुलींसाठी वेगळी सोय केली होती. अरे कुठून आणता हा उत्साह आणि  ह्या वेगळ्या भन्नाट कल्पना??
सगळे कसे जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे घडत होते.
 

आम्ही नवीन जागी आहोत याचे भान हरपले होते. कोण कुठून आलाय कशाची चिंता नाही. सगळे एकत्र मिळून सर्व कामे करीत होते. चक्रम  हायकर्सच्या या मेहनतीला माझा सलाम आहे. रात्रीचे जेवण आटोपून थोडा वेळ म्हणता-म्हणता रात्री साडेदहापर्यंत जुन्या-नव्या हिंदी- मराठी गाण्याची महफिल छानच रंगली होती.
त्यानंतर गारवा वाढल्याने आणि ग्रुपच्या नियमानुसार सकाळी लवकर रांगणागड ट्रेक असल्याने सर्वजण आपापल्या तंबूमध्ये रवाना झाले.सह्यांकनचा पहिला दिवस इतक्या आपुलकीने आणि उत्तमरीत्या पार पडला की आम्हाला नवीन ग्रुपमध्ये आहोत याचा विसर पडला. चक्रम हायकर्स रॉक्स. 

(या लेखात  सह्यांकनच्या पहिल्या दिवसाचा पहिला भाग आहे. बाकीचे लेख दुसऱ्या भागात येतील)