Monday 12 December 2016

"वर्षाअखेरचा धमाका"

चावंडगड आणि शिवनेरी गड ट्रेक

शिवनेरीगड उंची-३५०० फूट
दुर्ग प्रकार- गिरिदुर्ग
चढाई श्रेणी- मध्यम
ठिकाण- पुणे जिल्हा, महाराष्ट्र
डोंगररांग   - नाणेघाट
दिनांक- ११ डिसेंबर २०१६ 

चावंडगड आणि ‘शिवनेरीगड असे एकत्रित दोन्ही किल्ले एकाच दिवशी करायचे असल्याने मी माझ्या लेखाच्या सुरुवातीला दोन्ही किल्ल्यांची माहिती देणार आणि मग ट्रेकविषयी लिहिणार आहे.
चावंड” - “चावंड” हा किल्ला पुणे पासून  तासाच्या तर जुन्नर शहरापासून तासाभराच्या प्रवासावर असलेल्या आपटाळे गावानजीक आहे. गडाच्या पायथ्याशी चावंड गाव वसलेले आहे. नाणेघाटापासून जुन्नरच्या दिशेने १५ कि.मी. च्या आसपास चावंड वसलेला आहे. चावंड गावात आणि आजुबाजूच्या गावांमध्ये महादेवकोळ्यांची वस्ती आहे. चावंडवाडीत रहाण्याची उत्तम सोय होते.गडावर जेवणाची सोय नाही मात्र चावंड गावात जेवणाची सोय होऊ शकते.

पाण्याची सोय- गडावर अनेक पाण्याची टाकी आहेत ज्यामध्ये बारामही पिण्याचे पाणी आहे. चावंड गावापासून गडावरजायला एक तास लागतो.

चावंड किल्ल्याचा इतिहास” 
पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यामध्ये नाणेघाटाचे पहारेकरी म्हणून नावलौकिक मिळवलेले किल्ले म्हणजे जीवधन,चावंडहडसर आणि शिवनेरी. चामुंडगडहरिश्चंद्रगडमहिषगड आणि हडसरगड हे किल्ले महाराजांच्या मावळ्यांनी जिकिरीने लढून घेतले. त्यापैकी चावंड हा एक गड होय. महाराजांनी याचे नाव प्रसन्नगड असे ठेवले.या गडाची अनेक नावे अशाप्रकारे आहेत-चामुंडचाऊंडचावंड- ही नावे चामुंडा या शब्दाचा अपभ्रंश आहेत. चुंड- हे निजामशाही आमदानीतील नाव आहे. 

जे किल्ले ऋषी नावांशी संबंधित आहेत ते अतिप्राचीन.जे किल्ले बौद्ध, जैन लेण्यांनी अलंकृत आहेत ते प्राचीन.जे किल्ले शैव, शाक्त, नाथ सांप्रदायाशी निगडित आहेत ते म्हणजे मध्यमयुगीन. असे इतिहासात म्हटले आहे. चावंड हा चामुंडा नावाचा अपभ्रंश असल्याने व त्यावर पाण्याची सात टाकी एकाच ठिकाणी असल्याने तो सप्त मातृकांशी संबंधित आहे. म्हणून तो शाक्त पंथाशी निगडित आहे. चावंड निजामशाहीत जाण्याअगोदर तेथील किल्लेदार महादेवकोळी जमातीतला असावा असे तेथील स्थानिक महादेवकोळी वस्तीवरून प्रतीत होते. येथील अवशेषांना पाहता आणि राजमार्ग अभ्यासता चावंड सातवाहनकालीन असल्याची चिन्हे दिसतात. निजामशाही वारसदाराला येथे ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला गेला. यावरून त्याची दुर्गमता दिसून येते. त्याचा इतिहास लोकसाहित्यात नक्की सापडतो.


शिवनेरी किल्ला- पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती  यांचे जन्मस्थान. किल्ला तसा फार मोठा नाही. १६७३ मध्ये ईस्ट कंपनीतील डॉ. जॉन फ्रायर याने या किल्ल्याला भेट दिली. त्याने आपल्या साधनग्रंथात, या किल्ल्यावर हजार कुटुंबांना सात वर्षेपुरेल एवढी शिधासामुग्री आहे असा उल्लेख केला आहे. 

शिवनेरी किल्ल्याचा इतिहास-‘जीर्णनगर’,‘जुन्नेरम्हणजेच जुन्नर हे शहर इसवीसनापूर्व काळापासून प्रसिद्ध आहे. जुन्नर ही शकराजा नहपानाची राजधानी होती. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा नाश केला आणि जुन्नर व येथील सर्व परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. नाणेघाट हा पुरातन व्यापारी मार्ग. या मार्गावरून फार मोठ्या प्रमाणावर वाहतूक चालत असे. यावर नजर ठेवण्यासाठी या मार्गावरील दुर्गांची निर्मीती करण्यात आली. सातवाहनाची सत्ता स्थिरवल्यानंतर येथे अनेक ठिकाणी त्यांनी लेणी खोदवून घेतली. सातवाहनांनंतर शिवनेरी चालुक्य, राष्ट्रकूट या राजवटींच्या सत्तेखाली होता. ११७० ते १३०८ च्या सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले. आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले. नंतर इ.स. १४४३ मध्ये मलिक-उल-तुजार याने यादवांचा पराभव करून किल्ला सर केला. अशा प्रकारे किल्ला बहमनी राजवटीखाली आला इ.स.अ १४७० मध्ये मलिक-उल-तुजारचा प्रतिनिधी मलिक महंमद याने किल्ला नाकेबंदी करून पुन्हा सर केला. १४४६ मध्ये मलिक महंमदच्या वडिलांच्या मृत्युनंतर निजामशाहीची स्थापना झाली. पुढे १४९३ मध्ये राजधानी गडावरून अहमदनगरला हलवण्यात आली. इ.स. १५६५ मध्ये सुलतान मूर्तिजा निजामाने आपला भाऊ कासीम याला या गडावर कैदेत ठेवले होते. यानंतर १५९५ मध्ये किल्ला व जुन्नर प्रांत मालोजी राजे भोसले यांच्याकडे आला. जिजामाता गरोदर असताना जाधवरावांनी ५०० स्वार त्यांच्या सोबत देऊन त्यांना रातोरात शिवनेरीवर घेऊन गेले.शिवनेरी गडावर श्रीभवानी सिवाई, तीस नवस जिजाऊने केला जे आपल्याला पुत्र झाला तर तुझें नांव ठेवीन. त्याऊपर शिवाजीराजे यांचा जन्म झाला. शके १५५६ क्षये नाम संवत्सरे वैशाख शुद्ध पंचमी चंद्रवार इ.स. १६३२ मध्ये शिवरायांनी गड सोडला आणि १६३७ मध्ये मोगलांच्या ताब्यात गेला. १६५० मध्ये मोगलांविरुद्धा येथील कोळ्यांनी बंड केले. यात मोगलांचा विजय झाला. इ.स. १६७३ मध्ये शिवरायांनी शिवनेरीचा किल्लेदार अजीजखान याला फितवून किल्ल्याला माळ लावून सर करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. इ.स. १६७८ मध्ये जुन्नर प्रांत लुटला गेला आणि मराठ्यांनी किल्ला घेण्याचा प्रयत्न केला मात्र अपयश पदरात पडले. पुढे ४० वर्षांनंतर १७१६ मध्ये शाहुमहाराजांनी किल्ला मराठेशाहीत आणला व नंतर तो पेशव्याकडे हस्तांतरीत करण्यात आला.
१६ ऑक्टोबर २०१६ चा कलावंतीण गड ट्रेक केला तो अजून डोळ्यासमोर येतोय कारण तो ट्रेक कठीण होता परंतु भन्नाट होता.  त्यानंतर नोव्हेंबर  २०१६ चा हरिशचंद्र गड ट्रेक काही कारणाने नाही करता आला. तसा हरिश्चंद्र गड ट्रेक मी दोनदा केला आहे. ११ डिसेंबर २०१६ चा चावंड-शिवनेरी हा फोना चा ७० वा ट्रेक आणि या वर्षीचा शेवटचा ट्रेक होता.

पुण्याहून सकाळी ७ ला निघून मध्ये एका ठिकाणी नास्ता करून निघालेलो आम्ही १०-४५ ला चावंड गावाजवळ बस लावून ट्रेक ला सुरुवात केली. पाषाण पाहून पाळीच्या सरसगड ची आठवण झाली.चावंड वाडीतील आश्रमशाळेपासून गड चढण्यास चांगली मळलेली पायवाट आहे. या वाटेने साधारण अर्धातास चढल्यानंतर आपण खडकात खोदलेल्या पायऱ्यांच्या समांतर रेषेत चालतो. गड चढत असताना खाली चावंडवाडी गाव आणि समोर विस्तीर्ण परंतु अतिशय सुंदर दिसणारा माणिकडोह सारखा सारखा त्याचे फोटो काढण्यास मजबूर करत होता. तसेच हे चावंड गाव मला एखाद्या चित्राप्रमाणे भासत होते.


माणिकडोह च्या पाण्याच्या पलीकडे कितीतरी गड दिमाखात उभे असलेले दिसत होते. गडाच्या काही  पायऱ्या चढून गेल्यावर कोणीतरी  या पायऱ्या चढण्यासाठी आधार म्हणून एका छोत्या तोफेची नळी जमिनीत पुरली आहे असे दिसले फोटो काढायचा राहून गेला माझ्याकडून.  साधारण २ इंच अंतर्गत व्यास असलेली ही तोफ अडीच फूट लांबीची आहे.जमिनीच्या वर असलेला हा भाग साधारण दोन तृतियांश आहे. या तोफेची लांबी साधारण ३ ते ३ १/४ फूट असावी. या तोफेला जंबुरका म्हणतात.या पायऱ्या अगदीच छोटा आहेत. इंग्रजांनी १ मे १८१८ रोजी चावंडवर हल्ला करून येथील पायऱ्या उद्ध्वस्त करून टाकण्याचा प्रयत्न केला. तशा सुरुंग लावल्याच्या खुणाही आपल्याला पायऱ्या चढताना दिसतात. यानंतर २०-२५ पायऱ्या चढून गेल्यावर आपल्याला प्रवेशद्वाराची तटबंदी पूर्णपणे सामोरी येते.


येथे ३ मी. लांबीच्या प्रशस्त पायऱ्या आहेत दुपारची वेळ असूनही गडाच्या पश्चिम बाजूने आम्ही चढत असल्याने उन्हाचा तडाखा एवढा जाणवत नव्हता. नवीन मेम्बर्स ना थोडासा कठीण वाटत होता हा गड परंतु त्यांनीदेखील ट्रेक पूर्ण केला. खर तर इथे रॉक प्याच चा थरार होता मस्तपैकी परंतु सध्या तिथे बऱ्याच पायऱ्या चढून गेल्यावर काही ठिकाणी लोखंडी रेलिंग लावले आहे. त्यामुळे पटकन १ तासात  चावंड गडावर पोहोचलो.


गेल्या गेल्या गडाच्या प्रवेशद्वाराजवळ गेल्यावर जीवधनगड च्या कल्याण दरवाज्याची आठवण झाली मागच्या वर्षी याच दरम्यान अगदी तशीच ठेवण. जाताच दहा पायऱ्या चढून गेल्यावर दोन वाटा लागतात. वरची उजवीकडची वाट उद्ध्वस्त अवशेषांकडे घेऊन जाते, तर डावीकडे तटबंदीच्या बाजूने जाणारी वाट आहे. उजव्या बाजूस कातळात कोरलेल्या १५-२० पायऱ्या चढून गेल्यावर काही वास्तू नजरेत येतात. एका वास्तूचा चौथरा अजून व्यवस्थित आहे. इथे आपल्याला अशा बऱ्याच वास्तू दिसतात म्हणून असा निष्कर्ष काढता येईल की इथेच सारा कारभार चालत असावा. जवळ जवळ १५ ते २० वास्तू इथे आहेत. सध्या इथे खूप गवत वाढलेले आहे.चौथरा शिल्लक आहे तेथेच मोठे गोल उखळ आहे.
मात्र त्यास खालच्या बाजूला एक छिद्र आहे. येथून आजूलाबाजूला साधारण ३०० मी.च्या परिसरात १०-१५ उद्ध्वस्त बांधकामे तशीच ७-८  पाण्याची टाकी आहेत.  ज्या भागात तटबंदी आहे त्या भागात या तटबंदीच्या बाजूने फिरण्यास जागा आहे. ही बहुदा गस्त घालण्यासाठी असावी. या ठिकाणी बराच उतार असून काही ठिकाणी हौद आहेत. थोडे पुढे उजवीकडे गेल्यावर एका मंदिराचे अवशेष आढळतात. येथेही बरेच शिल्पकाम आढळते. ज्या ठिकाणी तटबंदी ढासळलेली आहे तिथे दगड रचून ठेवलेले आढळतात. हा भाग बराच विस्तीर्ण असूनही निर्जन आणि ओसाड आहे.
जवळ जवळ अर्ध्या कि.मी.च्या परिसरात एकही बांधकाम आढळत नाही. गडाच्या दक्षिण बाजूला आणि नैऋत्येस आपल्याला तुरळक अशी तटबंदी आढळते. इथेच पाण्याची दोन टाकी आहेत. इथून पुन्हा पश्चिमेकडे निघाल्यावर आपल्याला मजबूत अशा तटबंदीचे दर्शन घडते. दोन बुरूजही आढळतात.
इथून आम्ही बालेकिल्ल्याकडे निघालो.म्हणजेच गडाच्या सर्वात उंच भागात चामुंडा देवीचे मंदिर आहे. मंदिरातील मूर्ती प्राचीन असून बांधकाम मात्र नवीन आहे. आजुबाजूला जुन्या मंदिराचे अवशेष विखुरलेले दिसतात. एक तुटलेली मूर्ती आढळते जी एखाद्या ऋषीचे प्रतीक असावी. तसेच एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या चामुंडा देवीच्या मंदिरासमोर आढळणारा नंदी. जुन्या अवशेषांमध्येही नंदीची मूर्ती आढळते. याचा अर्थ हा होतो की जवळच कुठेतरी शिवलिंग असावे आणि काळाच्या ओघात हरवले असावे. ग्रामस्थांनी श्रमदानाने जसे नवीन देऊळ बांधले तशी शेजारी असलेली दीपमाळही बांधण्याचा प्रयत्न केला आहे.यावरून असे दिसते की इथे एक शिवमंदिर असावे.एकंदरीत पाहता गडाचा घेरा विस्तीर्ण आहे. साधारण ५-६ कि.मी.चा व्यास असावा. या किल्ल्यांचा इंग्रजांनी पूर्ण नायनाट करण्याचा प्रयत्न केला, पण ते सफल झाले नाहीत. आज हेच किल्ले आपल्याला आवाहन करीत आहेत, किमान त्यांना भेट द्यायला एखादा ट्रेक तर नक्कीच करू शकतो. इथल्या स्थानिक महादेवकोळ्यांकडून आपल्याला अनेक दंतकथा ऐकायला मिळतात.





बालेकिल्यावर प्रशस्त दिसणारा महिणकडोह डोळ्यात आणि कॅमेऱ्यात साठवून आणि चावंड देवीच्या मंदिराजवळ फोना ब्यानर फोटो काढून आम्ही बालेकिल्ला उतरलो आणि गडाच्या उत्तरेला असलेल्या ६-७ एकत्रित असलेल्या आणि पाण्याने पूर्ण भरलेल्या पाण्याच्या टाक्यांजवळ खूप सारी फोटोग्राफी करून चावंडगड उतरण्यास सुरुवात केली कारण शिवनेरीगडदेखील आम्हाला पूर्ण करायचा होता.
गडाच्या पायथ्याशी येऊन एका झाडाखाली आम्ही दुपारी जेवण केले तिथेच नव्या जुन्या मेम्बर्स ची ओळख करून घेतली आणि शिवनेरी कडे रवाना झालो. खरं तर इतर किल्ल्यांवर ट्रेक ला जाताना शिवनेरी बरेचदा वाटेत दिसायचाच मला आणि जणू खुणावून मनातून म्हणत असायचा की जयू तू जवळून जा पण माझ्याकडे येऊ नकोस हा. आज मात्र मी त्याच्याकडे निघाले होते. मनोमन मीच जास्त खुश होते. कारण शिवनेरी म्हणजे आपल्या शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ आहे. आम्ही ट्रेकर्स असल्याने गडावर साखळी मार्गाने जाणार होतो परंतु संध्याकाळ होत आल्याने आम्ही मुख्य दरवाज्याने च निघालो. रविवार असल्याने शाळेच्या खूप सहली आल्या होत्या त्यामुळे एक कि.मी. चा रास्ता वाहनाने खचून भरला होता आणि वर्दळ देखील प्रचंड होती. आम्ही त्यातून वाट काढत सूर्यास्तापूर्वी शिवनेरी गडावर पोहोचून शिवाजी राजेंच्या पाळण्याचे रांगेत उभे राहून दर्शन घेतले. शिवजन्मस्थळाची वस्तू अतिशय सुंदर रित्या बांधली आहे. आणि जतण केली आहे तसेच पाण्याचे बदामी तळे,कडेलोट पॉईंट,अंबरखाना साखळी मार्गाच्या बाजूने असलेली कमान, जिजाऊ आणि शिवरायांचे मंदिर याचे दर्शन घेऊन आम्ही गडावरून निघालो.


गडावर भरपूर पाण्याच्या टाक्या आहेत,शिवाई देवीचे मंदिर आहे,अतिशय सुंदर अशी बाग आहे. आणि अजून काही ठिकाणी बांधकाम सुरु असलेले दिसले. एकेक कमानीतून जातांना राजेंचा इतिहास आठवला की अभिमानाने उर भरून येतोच येतो. इतकी वर्दळ असून शिवनेरी गाद मला स्वच्छ दिसला.गडावरून खाली जी शेती केली होती ती खूप सुंदर अशी दिसत होती. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे मला शिवनेरी वर सूर्यास्त मिळाला.

त्यावेळी तो सूर्यअतिशय सुंदर सोन्याचा गोळा भासत होता. अंधार होत आला आणि एकीकडे चंद्रदेखील उगवला होता त्यामुळे आम्ही त्या थोड्या उजेडात आमच्या बसपाशी आलो आणि तिथे चहा पिऊन घराकडे रवाना झालो. चहा पिताना एका मेम्बरने आणलेले बाजरीचे कुरकुरे छान लक्षात राहिलेत. ७ वाजता घराकडे बस निघाली परंतु सकाळी जाताना अंताक्षरी झालीच नाही इतके दमलेले असतानाही आमच्यातले छोटे ट्रेकर्स सुमित, मिहीर आणि अद्वैत यांनी बस मध्ये पोवाडे,रामरक्षा मराठी हिंदी अंताक्षरी अतिशय उत्तम रित्या सादर केले. तसेच सर्वच जुन्या-नवीन मेम्बर्स ने अंताक्षरी खेळून खूप छान धमाल आणली. यावेळी ट्रेकसाठी वेळेवर काही लोक कॅन्सल झाल्याने कमी लोक होते तरीही यावेळी चावंड-शिवनेरी ट्रेक हा "छोटा पॅकेट बडा धमका झाला." आणि छोट्या ट्रेकर्संनी त्यात  चार चाँद लगा दिये.  नवीन मेम्बर प्रकाश ने इनोवेटिव्ह,हटके  फोटोग्राफी केली ती सगळ्यांनाच आवडली. धन्यवाद मंदार सर, राणे सर,आणि२० हजाराहून जास्त साप पकडून सुरक्षितपणे त्या सापांना जंगलात सोडणारे सर्पमित्र निकाळजे काका.  ट्रेक ला आलेले सुशील-सुरेखा,प्रशांत-रेखा, दीक्षित सर, संकेत, हर्षद, निलेश,कल्याणी,सुमित, मिहीर,अद्वैत आणि सगळ्यांना मनापासून धन्यवाद. या ट्रेक साठी अचूक मार्ग दाखवणारे गणेश गोसावी यांना खास धन्यवाद. आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे ट्रेक उत्तम आणि सुरक्षितपाणे  पार पडला.

शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी इतर व्यायामसोबत महिन्यातून एखादा ट्रेक आणि भटकंती हा सर्वात उत्तम उपाय आहे. कोणतीही गोष्ट सुरु करायला वयाचे बंधन नसते.आपल्या पुण्यातलेच गोपाळ लेले यांनी वयाच्या ६१व्या वर्षी पहिला ट्रेक केला आणि त्यांनतर देखील ते ट्रेक करत राहिले. ट्रेकिंग या विषयवार त्यांनी मोट्ठे पुस्तक देखील लिहिले आहे.त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवता आपण तर खूप लहान आहोत आणि खूप ट्रेक करू शकतो असे समजायचे आणि ट्रेक सुरु करायचा. मी तरी कुठे लहानपणापासून ट्रेकिंग करतेय आटा २ वर्षे झाली ट्रेक सुरु केला आणि मला माझ्या आरोग्यास खूप सकारात्मक निकाल मिळाला. मी महिन्यातून किमान एक तरी ट्रेक करतेच. महिन्यातला एक ट्रेक हा पुढल्या महिन्याच्या ट्रेक पर्यंत शरीराची आणि मनाची शक्ती वाढवतो हा माझा स्वतःचा अनुभव आहे. कोणत्याही गोष्टीसाठी वेळ मिळत नसतो तो आवर्जून काढावा लागतो. मित्र हो..! चला आपला सह्याद्री अतिशय प्रेमात पडायला लावणारा आहे. ट्रेक जरूर करा परंतु सुरक्षितपणे करा.  गड किल्ल्यांची कोणतीही नासधूस न करता ट्रेक करुयात आणि गड किल्ले स्वच्छ ठेवूयात. नैसर्गिक संपत्तीचे जतन आणि संवर्धन करूयात.  
     

Monday 17 October 2016

"कलावंतीणगड ट्रेक"एक अविस्मरणीय अनुभव..

कलावंतीण दुर्ग ट्रेक
ठिकाण- रायगड जिल्हा
उंची- २३०० फूट
चढाई श्रेणी- कठीण
दिनांक-१६ ऑक्टोबर २०१६.

गडाची माहिती आणि इतिहास-रायगड जिल्ह्यात पनवेल पासून १५ कि. मी.अंतरावर माथेरानच्या डोंगर रांगेत कलावंतीण हा गड आहे  मुंबई पुणे महामार्गावरून जाताना डाव्या बाजूला आपणास एक डोंगररंग दिसते या डोंगर रांगेत अनेक किल्ले आपल्याला खुणावत असतात पण  "प्रबळगड" आणि "कलावंतीण सुळका" हे दोन जोड किल्ले आपले खास लक्ष वेधून घेणारे आहेत. प्रबळगड त्याच्या नावाप्रमाणेच प्रबळ आहे. तसेच गडाचा पसारा देखील विस्तीर्ण आहे. इतिहासात कलावंतीण दुर्ग नावाने नोंद असणारा हा बुरुज समुद्र सपाटीपासून २३०० फुट उंचीवर आहे. शिवरायांनी इ.स १६५७ मध्ये हा किल्ला घेतला होता. पुढे पुरंदरच्या तहामध्ये मोगलांना देण्यात येणाऱ्या २३ किल्ल्या मध्ये याचाही समावेश होता. त्यामुळे याला ऐतिहासिक महत्व देखील आहे. कलावंतीण या नावाचा अर्थ "नर्तिका" होतो. मूळ अर्थ कला सदर करणारी. पण सर्रास पणे नर्तिकेसाठी हा शब्द वापरला जातो. त्यामुळे असे समजले जाते की इथे एका नर्तिकेचे वास्तव्य होते ज्यामुळे यास "कलावंतीण" हे नाव पडले. तर काही ठिकाणी असा उल्लेख आढळतो की  एका राजाचे कलावंती राणीवर खूप प्रेम होते. कलावंती राणी आपल्याला सोडून न जावी म्हणून त्या राजाने कलावंती राणीच्या नावाने हा किल्ला बांधला असावा.
कलावंतीण गडाच्या नावामुळे आणि प्रबळगडावरून घेतलेल्या छायाचित्रांमुळे कलावंतीण गड मला नेहमी आवडत असे. आज प्रत्यक्ष तिथे मी जाणार म्हटल्यावर मनातून मी जास्त खुश होते. 

फ्रेंड्स ऑफ नेचर असोशिएशन(फोना) चा ६८ वा कलावंतीण गड ट्रेक दि.१६ ऑक्टोबर २०१६ या दिवशी आम्ही पूर्ण केला. मागच्या वेळेस "फोना"चा प्रबळगड ट्रेक माझ्याकडून मिस झाला होता त्यामुळे कलावंतीण गड मिस नाही करायचा असे ठरवले होते. परंतु १५ दिवसात ट्रेक करणे म्हणजे माझ्यासाठी जरा अवघड होते कारण मी सुद्धा माणूसच आहे. महिन्यातला एक ट्रेक म्हणजे माझ्यासाठी खूप झाला. परंतु एकदा ट्रेक ला गेले की कितीही असह्य झाले तरी फोनासोबत ट्रेक असला की माघार घेणे नाही मी तो पूर्ण करतेच आणि  "एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ." ह्या म्हणीनुसार गड चढताना कितीही कठीण टप्पा आला तरी एकमेकांच्या मदतीने ट्रेक पूर्ण होतोच होतो. मी ट्रेक करते म्हणजे मी काय फार मोट्ठी ट्रेकर नाही आणि ब्लॉग लिहिते म्हणजे मी काय खूप मोट्ठी लेखिका नाही. एक ट्रेक केला आणि  ट्रेकिंगची आवड निर्माण झाली आणि एक ब्लॉग लिहिला आणि लिहिण्याची आवड निर्माण झाली. त्यामुळे सगळ्यांनी एक ब्रीदवाक्य लक्ष ठेवा "कोणालाही कोणत्याही वयात अशक्य अशी कोणतीही गोष्ट नाहीये." आवड असली की सवड आपोआप मिळते. 
सकाळी ६:३० ला निघालेली आमची बस "हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट सांगो चेडवा दिसतो कसो खंडाळ्याचो घाट" आणि अजून अश्या कितीतरी गाण्याच्या सुरात, नादात १० वाजता गडाच्या पायथ्याशी केव्हा पोहोचली तेदेखील समजले नाही. गडाच्या पायथ्याशी बस लावून ट्रेक ला सुरुवात केली. इथे जाण्याआधी कलावंतीण गडाचे फोटोज पाहिले होते ते दृश्य तिथून तरी दिसत नव्हते.


सुरुवातीला थोडेसे चालल्यावर आम्ही काहींनी शॉर्ट कट चा रास्ता निवडला सॉलिड दमछाक झाली. मला तर असे वाटले की मी आजचा ट्रेक पूर्ण करूच शकणार नाही. खरे कारण होते दमट वातावरण आणि गडाचा चढ जास्त होता. सुरुवातीपासूनच ढगाळ वातावरण असल्याने आम्हाला वाटले की गडाच्या शेंड्यावर एवढे ऊन नसेल परंतु तसे काही घडले नाही. जाईसतोवर ज्याला चरबी नाही त्याची सुद्धा चरबी वितळली असेल. 


परंतु सोबत्यांच्या सहकार्याने आणि प्रोत्साहनाने पुन्हा चढाई सुरु ठेवली  दीड तासांनंतर पहिली १० मिनिटांची विश्रांती झाली आणि खडकावर उंच हवेत फोटो काढल्याने आणि लिंबू सरबत प्यायल्याने पुन्हा उत्साह आला. थोड्या वेळाने मात्र कलावंतीण आणि प्रबळगड दिसू लागले. परंतु दोन्ही गड आपल्या अंगावर येत आहेत की काय असे भासत होते.



इथे दगडात कोरलेली गणपतीची आणि हनुमानाची मूर्ती रेखीव दिसत होती. 


आधी असे ठरले की या ठिकाणी जेवण करून थोडी विश्रांती घ्यावी आणि मग चढाई सुरु करावी परंतु जेवल्यावर गड चढणे जाम जीवावर येते आणि एकदाचा कलावंतीण गड फत्ते करावा आणि मगच काळजाला ठंडक मिळेल असे वाटले. माची प्रबळ या तिथल्या आदिवासी लोकांच्या वस्तीतील गावातून अर्ध्या-पाऊण तासात प्रबळगड आणि कलावंतीण गड च्या खिंडीत आम्ही पोहोचलो. तिथून खाली पाहिले की विश्वास बसत नव्हता की आम्ही त्या व्ही आकाराच्या खिंडीमध्ये आलोय. तिथून मात्र कलावंतीण चा शेवटचा टप्पा अतिशय कठीण दिसत होता.




संपूर्ण दुर्ग चढण्याकरिता खडक कापून पायऱ्या बनवल्या आहेत. या दुर्गाशी माचीप्रबळ गावामधील आदिवासी लोकाचे खूप जिव्हाळयाचे नाते आहे. ते प्रत्येक वर्षी शिमग्याच्या (होळीच्या)सणाला या दुर्गावर आदिवासी नृत्ये करतात. गडाच्या माचीवर आदिवासी लोकांची वस्ती आहे. कलावंतीण गडाच्या पायऱ्या पाषाणात कोरलेल्या दिसत होत्या आणि धरायला आधाराला काहीही  नव्हते. दुपारचे ऊन म्हणते मी. तरीही पुन्हा चढाई सुरु केली. भर उन्हात सपसप सपसप एखाद्या सापासारखे चढत राहिलो. कलावंतीण च्या वरच्या टोकाला रोप लावून चढावे लागले. यावेळी तो थरार देखील अनुभवला. आम्ही दुपारी १:३० वाजता गडावर पोहोचलो.तिथे पोहोचल्यावर आजूबाजूचा नजारा पाहून सगळा शीण निघून गेला. कलावंतीण गडाचा आकार किंचित त्रिकोणी आहे. गडावरून सभोवताली माथेरान,चांदेरी,इर्शाळगड,कर्नाळा गड दिसतात. मग काय विचारू नकात. गडाच्या सगळ्या बाजूने फोटोग्राफी केली. गृप फोटोज काढले एकमेकांचे फोटोज काढले. एक हात से फोटो दे एक हात से फोटो ले. अश्या गमती-जमती सुद्धा झाल्या.


गडाच्या शेंड्यावर शिवाजी राजेंच्या घोषणा केल्या तेव्हा समोरच्या खिंडीमध्ये त्या घोषणांची गुंज कानाला अतिशय सुमधुर वाटत होती. वरून उन्हाचे चटके मात्र असे लागत होते की ही टॅन झालेली स्किन आता २-३ महिन्यांनीच पुनःपदावर येईल असे वाटते. आता मात्र पोटामध्ये कावळे ओरडण्यास सुरुवात झाली. परंतु गडावर ३२ लोकांना बसायला एकही झाड नव्हते त्यामुळे पुन्हा ३ वाजता कलावंतीण गड उतराई सुरु केली. गडाच्या मध्याशी माची प्रबळ ह्या छोट्या गावाजवळ एका ठिकाणी ट्रेकर्स साठी बसण्यासाठी जागा होती तिथेच आम्ही जेवण केले. थोडी विश्रांती करून सूर्यास्त मिळाला तर बरे होईल असा विचार करून तिथल्या पठारावरच "फोना"सोबत आलेल्या सगळ्या मेम्बर्स ची ओळख करून घेतली तिथेच सूर्यास्तासोबत चहा घेतला आणि फोनाच्या इतर कार्याची सुद्धा माहिती दिली आणि गड उतरण्यास सुरु केले.शेवटी इतका अंधार झाला की पायाखालची जमीन काही दिसेना झाले होते. रात्री ७-३० पर्यंत सगळे मेम्बर्स बसच्या ठिकाणी जमा झाले आमची बस पुण्याकडे रवाना झाली.  सुमारे १३ कि.मी.चा कठीण चढाईचा कलावंतीण ट्रेक चा थरार अनुभवला. ट्रेक लीडर मंदार सर, मनोज सर, विवेक सर, आणि निकाळजे सर यांनी गडावर लई थंडगार हवा आहे याचे जणू आमिष दाखवून आम्हा सर्व मेंबर्सना ट्रेक पूर्ण करण्यास मदत केली. ट्रेक पूर्ण केल्याच्या समाधानाने रात्री १०:३० वाजता घर गाठले.




Tuesday 4 October 2016

"भरारी"

सैराट



सैराटहा मराठी चित्रपटावर जेव्हा प्रदर्शित झाला मला तो चित्रपट मनापासून आवडला. त्यामागची कारणे अनेक आहेत. त्यावेळीच मला त्या चित्रपटाविषयी थोडंसं काहीतरी चांगले लिहावे असे वाटले होते परंतु माझ्याकडून राहून गेले. अजूनही या चित्रपटाची जादू कायम आहे त्यामुळे मी एक प्रेक्षक म्हणून आज जरी मी लिहिले तरी वावगे ठरणार नाही असे मला वाटते.


सैराटहा मराठी चित्रपट दिनांक २९ एप्रिल २०१६ या दिवशी प्रदर्शित झाला. सैराट च्या गाण्यांची जाहिरात दूरदर्शन वर मी पहात असे त्यावेळी मला वाटायचे की हा सिनेमा सुपरडुपर हिट होईल आणि सुपरडुपर हिट झालाच. मला अश्या चांगल्या वाटणाऱ्या चित्रपटासाठी पहिल्या दिवशी सिनेमागृहात जावे असे नेहमीच वाटते परंतु सैराट ज्या दिवशी प्रदर्शित होणार होता त्यादिवशीचे सिनेमागृहाचे तिकीट मला मिळेल की नाही यात शंकाच होती. सिनेमागृहाचे सैराटचे शो हाऊस फुल्ल होते. तरीही माझं नशीब कधीकधी साथ देते म्हणा. अगदीच पहिला दिवस आणि पहिल्या शो ची तिकिटे नाही मिळाली परंतु पहिल्या दिवशीच्या शो ची तिकिटे मिळाली ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट होती.सिनेमागृह कुठले ते मात्र विचारू नका. सिनेमा ला गेले सिनेमा खूप आवडला सिनेमाने सिनेमागृह दणाणून सोडले होते. सगळे झिंगूनच बाहेर पडले. 

सिनेमाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे हे आहेत. संगीत दिग्दर्शक माझे आवडते अजय-अतुल ह्यांची गाणी अफलातून, मन मोहवून टाकणारी, याड लावणारी आणि ठेका धरून नाचायला लावणारीच आहेत.नागराज मंजुळे, नितिन केणी आणि निखिल साने यांनी आटपाट प्रोडक्शन, एस्सेल व्हिजन प्रोडक्शन्स आणि झी स्टुडिओ या बॅनर अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती केली.चित्रपटातील बहुतेक सर्व गाणी अजय-अतुल यांनीच लिहिली असून पार्श्वसंगीतही त्यांनीच दिले आहे.  सैराट हा मराठी चित्रपट सृष्टीत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने आजपर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले. चित्रीकरणासाठी मंजुळे सरांनी सोलापूर जिल्ह्यातील जेऊर ह्या त्यांच्या स्वतःच्या मूळ गावाची निवड केली. हा चित्रपट महाराष्ट्र, गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, कलकत्ता, भिलाई, रायपूर, कर्नाटक, तेलंगण या ठिकाणी इंग्रजी उपशीर्षकांसहित प्रदर्शित करण्यात आला .यातले कलाकार म्हणजे आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू ह्या नव्या जोडीने आणि तानाजी गालगुंडे,अरबाज शेख पहिल्याच सिनेमात उत्तम अभिनय केला आहे. आहेच शिवाय नागराज मंजुळेदेखील कलाकार म्हणून दिसतात. अजून  इतर कलाकारांसोबत माझे ट्रेकचे फ्रेंड्स देखील आहेत. पूजा डोळस, मिथुनचंद्र चौधरी हे कलाकार आहेत. ते दोघे ह्या चित्रपटाचे सहायक दिग्दर्शक देखील आहेत. आम्ही वासोटा किल्ला ट्रेक, कातळधारा ट्रेक, आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई चा ट्रेक असे २-३ ट्रेक सोबत केले आहेत आणि मला याचा प्रचंड अभिमान आहे. ही दिग्दर्शक, कलाकार मंडळी अतिशय टॅलेंटेड आहे पण तरीही माणूस म्हणून खूप साधी आणि प्रेमळ आहेत. पुन्हा कधी सोबत ट्रेक होईल तेव्हा मी त्यांच्यासोबत नक्की सेल्फी फोटो काढणार.मंजुळे सर सुद्धा खूप अगोदर फोना च्या ट्रेक ला येत असत परंतु तेव्हा मी ट्रेक नव्हते करत. शिवाय पूजा डोळस यांचा भाऊ अभिषेक डोळस आणि श्वेता अभिषेक ही जोडी सिंगापुर ला राहतात. हे देखील २ ट्रेकला सोबत होते. सिंगापूर ला राहतात पण पुण्यात आले की नक्की सह्याद्रीच्या रांगेत ट्रेक ला येतात. एकदा ट्रेकला सिंगापूर च्या खूप छान छान गोष्टी सांगत होते. मी ऐकलंय श्वेता आणि अभिषेक डोळस ही सिंगापूरची जोडी पुण्यात आलीये. त्यामुळे एखादा ट्रेक सोबत झाला तरी आम्हाला आवडेल.  मी कधी जाईन तेव्हा जाईन परदेशात. आमच्या वतीने आमचे मित्रमंडळीच परदेशी वाऱ्या करून येतात आणि तिथले अनुभव, गंमती-जमती सांगतात. परंतु आपल्या भारतापेक्षा इतर काही देशात स्वच्छता विषयक नियम आणि इतर नियम अतिशय काटेकोरपणे पाळले जाते. आपणदेखील ही अशी शिस्त बाळगली तर वाह क्या बात है.. पण तरीही माझा भारतच सुजलाम सुफलाम आहे आणि मला प्यारा आहे. अनेक जाती-धर्म, अनेक भाषा, अनेक वेशभूषा तरीही अजून टिकून आहे. आणि त्यात सह्याद्री सारखा निसर्ग आहे की ज्यामध्ये आम्ही सध्या ट्रेकिंगचा आनंद घेतोय. हिमालयात जाईन तेव्हा जाईन पण अजून माझ्या महाराष्ट्रातले किल्ले तरी पूर्ण होऊ देत.  ट्रेक म्हंटले की मला दुसऱ्या सगळ्या गोष्टीचा विसर पडतो.   


तर मी सैराट विषयी बोलत होते. सगळ्याच कलाकारांचा अभिनय खूप छान झाला आहे. आता गं बया बावरलं”, “सैराट झालं जी’, “याड लागलं”, “झिंगाट”, ही गाणी अप्रतिम आणि तालसुरातील आहेत. मी तर जेव्हा ही गाणी आली असतील तेव्हापासून फोन मध्ये डाऊन लोड करून घेतली आहेत.  परवा  दांडियाच्या ठिकाणी प्रभाचा ग्रुप डान्स होता तिथेही  सैराट च्या गाण्यावर दीड वर्षाच्या मुलासहित ६-७ जणांनी नाच केला. लग्नाची मिरवणूक असो,गणपती बाप्पाची मिरवणूक असो की देवीची मिरवणूक असो सैराट च्या गाण्याची जादू कायम आहे. या सिनेमातील नवख्या कलाकारांचे आयुष्यच बदलून गेले आहे. जगाच्या इतिहासात सिनेमाच्याजगात सैराट चे नाव कायमचे कोरले गेले आहे. आजही सैराट सिनेमाची नशा तशीच आहे. सैराट मधले बरेच कलाकार सोलापूरचे असल्याने माझ्या आजूबाजूचे सोलापूरकर तर हवेत होते आणि अजूनही आहेत. आणि शिवाय चित्रीकरणदेखील सोलापूर मधेच झाल्याने सॉलिड भाव खातात सोलापूरकर. अर्थात ज्याला त्याला आपल्या मायभूमीच्या मित्रांचा अभिमान असतोच तसेच मलाही आहे. मी पण वेळोवेळी जाम भाव खाल्ला.  सैराट चे कलाकार पूजा डोळस आणि मिथुनचंद्र चौधरी हे माझे ट्रेक मधले अतिशय जवळचे फ्रेंड्स आहेत. नागराज सरांना मी प्रत्यक्ष कधी भेटले नाही परंतु जेव्हा त्यांना वेळ असायचा तेव्हा ते फोना सोबत ट्रेकिंग ला येत होते.खरोखर मला माझ्या सर्व मित्रमंडळींचा खूप जास्त आदर आणि अभिमान आहेच.
माझ्या वॉट्स अँप प्रोफाइल चे नाव सुद्धा मी सैराट ठेवले आहे.
"सैराट" ही निरागस प्रेमाची कथा आहे. सैराट म्हणजे कोणतेही बंधन न मानता मनमोकळे जगणे, वावरणे. सैराट ची  कथा, गीते, संगीत, कलाकारांचा अभिनयसगळॆच उत्तम आहे. सैराट चे डायलॉग तर सतत वॉट्स अँप वॉर चालू होते. "मराठीत सांगितलेले कळत नाही का इंग्लिशमध्ये सांगू का?"आजही लहान- थोरांच्या तोंडून सैराटचे डायलॉग ऐकतो आपण. सैराट चा शेवट मन हेलावणारा आहे. त्यावर अनेकांनी विचार मांडले. परंतु हा सिनेमा आहे. एखाद्या दिग्दर्शकाला त्यावेळी जे सुचले ते त्याने केले. अहो असं काय करता सिनेमा जगप्रसिद्ध झाला. आता  सिनेमाचा शेवट काय घेऊन बसलाय? काहींनी दिग्दर्शकाच्या खाजगी आयुष्यात डोकावून त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार केला बातमीपत्रात अनेक बातम्या वाचायला मिळत होत्या. परंतु कोणाचे खाजगी आयुष्य आणि सिनेमा याचा एकमेकांशी संबंध जोडू नये असे मला वाटते. एखाद्या हिंदी सिनेमाच्या दिग्दर्शकाला असे प्रश्न सहसा केले जात नाहीत. पण  साधा माणूस दिसला प्रसिद्धीच्या झोतात येताना दिसला की त्याला खाली कसा आणण्याचा हे लगेच लोकांना समजते. नागराज मंजुळे यांच्या फॅन्ड्री नंतर सैराट च्या यशामागे सिनेमाच्या दिग्दर्शकांची कलाकारांची आणि सगळ्यांचीच काय मेहनत असते ते त्यांचे त्यांनाच माहिती. या विषयात आपण प्रेक्षकांनी न पडलेले बरे असे माझे मत आहे. शाळेत एखादा नाच किंवा छोटे नाटक बसवायचे असेल तरी काय ढोर मेहेनत घ्यावी लागते ते मला स्वतःला माहित आहे. सिनेमा बनवणे आणि तो जगप्रसिद्ध होणे ही खूप मोठी कौतुकाची आणि अभिमानाची गोष्ट आहे.

"सैराट" चित्रपटाच्या गाण्यांमधून 'झिंगाट' नृत्य करणाऱ्या आणि 'सैराट झालं जी' म्हणत प्रेमाची वेगळी परिभाषा सांगू पाहणाऱ्या या सिनेमातील नायक नायिकेने प्रेक्षकांना याड लावलंयच शिवाय या चित्रपटात आणखी काही जमेच्या बाजू आहेत. जगभर गाजलेला फॅन्ड्री हा चित्रपट बनवणारा दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे यांचा हा दुसरा चित्रपट आहे. अजय-अतुल या प्रतिभावंतांनी या सिनेमाला दिलेलं संगीत ही जमेची बाजू आहे.  बर्लिन अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०१६ मध्ये सहभागी झालेला एकमेव मराठी चित्रपट आहे. बर्लिन अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आजवर निवड झालेला केवळ चौथा मराठी चित्रपट आहे. हॉलीवूडमध्ये संगीत रेकॉर्डिंग झालेला 'सैराट' हा केवळ मराठीच नव्हे तर भारतातील पहिला चित्रपट ठरलाय.रिंकू राजगुरु या इयत्ता नववीत शिकणाऱ्या अकलूजच्या (सोलापूर) मुलीने  पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावलाआहे. हा सिनेमा जगप्रसिद्ध होण्यास अशी एक ना अनेक कारणे आहेत.

पिस्तुल्या”, “फँड्रीआणि आता सैराट'’या तीनही चित्रपटासाठी अनुक्रमे सुरज पवार, सोमनाथ अवघडे आणि रिंकू राजगुरु यांना सलगपणे राष्ट्रीय पुरस्कार मिळवून देऊन हॅट्रिक साधणारे कदाचित एकमेव भारतीय चित्रपट दिग्दर्शक - नागराज पोपटराव मंजुळे हे आहेत. नवख्या गावच्या पोरांना(की ज्यांना अभिनयाचे काहीही ज्ञान नव्हते ) घेऊन अफलातून अविश्वसनीय काम करून घेणारा दिग्दर्शक अशी आपली ओळख मंजुळे यांनी बनवली आहे.  खऱ्या अर्थाने सिनेमॅटिक भाषेचा वापर करणारे ,सामाजिक भान असणारे,जातीपातीच्या विषमतेला मुठमाती देण्यासाठी झटणारे  दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे आहेत. या सिनेमाची प्रदर्शित झालेली गाणी दर्जेदार व प्रेक्षकांची मनं जिंकणारी आहेत.  आकाश ठोसर हा मराठी चित्रपट सृष्टीला मिळालेला अगदी साजेसा असा देखणा नायक आहे. एकाच त्याच त्याच अपेक्षांच्या  साच्यात बसवलेल्या आपल्या प्रेक्षकांना  नव्यानं चित्रपटाची भाषा समजून सांगणारा चित्रपट ठरला आहे. 
सिनेमा गृहात सिनेमा पाहताना पूजा मॅडम, मिथुन सर, आणि मंजुळे सर पडद्यावर दिसले की मी हाताचा शंख करून ओरडून दाद देत असे. आपली माणसे प्रत्यक्ष पडद्यावर पहाताना अभिमानाने उर भरून येतो. सैराट सिनेमा पाहणारी प्रत्येक व्यक्ती गाण्यावर नाच करायला जागेवरून उठून त्या स्क्रिन जवळ जाऊन नाचत होती. सैराटमय झाले होते सगळे. झी मराठीच्या हवा येऊ द्या या कार्यक्रमात सैराट ची टीम आल्यावर आम्ही टीव्ही समोर बसून सगळे संवाद ऐकून सैराट ची जादू अनुभवत असायचो. सैराट सिनेमा टीव्ही वर आला तरी सैराट ची जादू यत्किंचितही कमी झालेली नाही.  सैराट विषयी जेवढे चांगले बोलावे तेवढे कमीच आहे.
मला मराठी मातीचा, मराठी माणसाचा, मराठी भाषेचा, मराठी सिनेमाचा गर्व नाही तर माज आहे. प्रत्येक मराठी माणसाला मराठी मातीचा, मराठी माणसाचा, मराठी भाषेचा, मराठी सिनेमाचा अभिमान असलाच पाहिजे. सैराट सारखे असे अनेक उत्तमोत्तम मराठी सिनेमे तुमच्याकडून बनू देत आणि जगप्रसिद्ध होऊ देत. "सैराट"च्या सर्व टीम ला पुढील  वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.