Tuesday, 11 April 2017

आशिया खंडातील दोन नंबर वर असलेल्या अद्भुत व्ह्यालीचा थरार

ट्रेक- सांधण व्हॅली (रॅपलिंग)
ठिकाण- अहमदनगर जिल्हा
दिनांक- ८-९ एप्रिल २०१७
चढाई श्रेणी- मध्यम-कठीण




सांधण व्हॅली हे ठिकाण महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यात साम्रद या गावाजवळ आहे. सांधण व्हॅली ही निसर्गतः जमिनीला पडलेली एक भेग आहे.  ही भेग जवळपास ४५०-५०० फूट खोल आणि २५ फूट रुंद काही ठिकाणी १० फूट रुंद आणि एक किलोमीटर लांब आहे.  सांधण व्हॅली हा एक निसर्गाचा एक रौद्र तरीही अतिशय मोहक अवतार आपल्याला पाहायला आणि अनुभवायला मिळतो.   "सांधण व्हॅली" ला  "द व्हॅली ऑफ शॅडोम्हणून देखील संबोधतात. एक अद्भुत व्हॅली म्हणून आशिया खंडामध्ये दोन नंबरवर ह्या व्हॅलीची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात सह्याद्रीमधील एक नंबरची मोठी अशी ही सांधण व्हॅलीच आहे.
कोणत्याही गोष्टीमध्ये सातत्य नसले  तर त्याचा आपल्याला विसर पडतो आपण कंटाळतो किंवा सोडून देतो किंवा त्यात गोष्टींमध्ये सातत्य आणण्याचा प्रयत्न करतो. माझ्यासाठी मग ती गोष्ट म्हणजे ट्रेक असो ब्लॉग असो अथवा अजून कोणतीही गोष्ट शिकणे असो. मागच्या महिन्याचा फोना ग्रुपचा एक ट्रेक झाला नाही आणि परीक्षांचे वातावरण चालू असल्याने मलादेखील बाहेर जाता आले नाही त्याचा माझ्या आरोग्यावर किती परिणाम झाला ते मी स्वतः अनुभवले आहे. 
ट्रेक चा वेडापिसा छंद असा लागला जीव हा ट्रेक मध्ये गुंतला.. ह्या ओळी मला स्वतःसाठी मी लावून घेतल्या आहेत.मी १-२ वर्षांपासून ट्रेकिंग करते आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर मी दोनदा सर केले परंतु क्लाइंबिंग आणि रॅपलिंग मी केले नव्हते त्याचे मला काही महिने वेध लागले होते. पुण्यातल्या इतर कोणत्या ट्रेकिंग ग्रुप मध्ये रॅपलिंग आणि क्लाइंबिंग च्या ऍक्टिव्हिटीचा ट्रेक असला की मी मैत्रिणी गोळा करून आणि आमच्या फोना च्या ग्रुप लीडर ना विचारून जायची तयारी करत असे. परंतु योग काही आला नव्हता.  ८-९ एप्रिल २०१७ चा "फोना" ग्रुप चाच ७२ वा ट्रेक आयोजित करण्यात आला आणि त्यात रॅपलिंग ऍक्टिव्हिटी होती. माझ्या मनातला आनंद गगनात मावत नव्हता. १ सीट बुक करून ठेवली होती. मला काही करून किमान एकदा तरी रॅपलिंग करावयाचे असल्याने ७  एप्रिल ला माझे जाण्याचे पक्के झाले.
दिनांक ८ एप्रिल २०१७ शनिवारी आम्ही दुपारी ११-०० वाजता तळेगाव- निगडी-नाशिकफाटा -मंचर-खेड बोटा-ब्राह्मणवाडा-कोतुळ- राजूर-रतनवाडी-साम्रद अशा मार्गाने ट्रेक मेम्बर्स घेत  निघालो. पुण्यापासून साम्रद हे गाव जवळपास १९६ कि. मी. अंतरावर आहे. तिथे पोहोचण्यास जवळपास ५ तास लागतात. खेडपासून एक तास पुढे गेल्यावर नेहमीच्या प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी नारळ फोडण्याचा कार्यक्रम करून एक ग्रुप फोटो काढून पुढच्या प्रवासाला निघालो.

भुकेची वेळ झालीच होती बस थांबून जास्त वेळ वाया न घालवता सोबत आणलेले आमचे जेवणाचे डब्बे काढून आम्ही बस मधेच खाऊन घेतले अंताक्षरी सुरु केली आणि वातावरण उत्साही झाले. बरेचसे नवीन मेम्बर असल्याने अजूनच मजा आली. दिनेश आणि प्रतीक यांनी सुपरमॅन चा रोल अर्धा अर्धा केला(एकाने सुपरमॅन ची टोपी घातली तर एकाने सुपरमॅन चे शर्ट घातले होते) ऐकावे आणि पाहावे ते अद्भुतच. (हाहाहा)


बस २० मिनिटे थांबवून ड्राइवर काकांना जेवणाचा डबा देऊन जेवण करावयास सांगून आम्ही जरा तिथल्या आंब्याच्या सावलीत थांबलो तिथल्या दत्तमंदिरात श्री. दत्ताचे दर्शन घेतले आणि तिथल्या शेतात पाय मोकळे केले.  इलाईत चिंचा,कैऱ्या आणि चिंचा खाल्ल्या.  मग पुन्हा अन्ताक्षरीच्या तालावर प्रवास सुरु झाला. ५:३० ला आम्ही अकोले तालुक्यातील रतनवाडी गावात उतरलो.

रतनवाडी गावातून रतनगडला जाता येते. रतनगडचा ट्रेक करताना या ठिकाणी थांबलो होतो. रतनवाडी ला उतरल्यावर आम्ही सगळ्यात आधी श्री. अमृतेश्वर मंदीराचे दर्शन घेतले. १२०० वर्षांपूर्वीचे हे अतीशय देखणे हेमाड्पंथी कोरीव मंदीर आहे. मंदीराला पुर्वाभिमुख मुख्य द्वार व पश्चिमाभिमुख दुसरे द्वार अशी २ द्वारे आहेत. विविध शिल्पाकृतींचा खजिनाच इथे भरला आहे.मंदिरात एका बाजूंला खलबत्याच्या आकाराचे काही होते. तिथले स्थानिक लोक म्हणत होते की मनात एक इच्छा धरून  कानाला हात पकडून हाताच्या कोपराने तोच दगड एका दमात उचलून अलगद ठेवेल त्याच्या मनातील इच्छा पूर्ण होते. आमच्यातील बऱ्याच हौशी कलाकारांनी  तो दगड उचलून त्यातील गंमत अनुभवली आणि मंदिराच्या सुंदर नक्षीकामाचे फोटोग्राफी केली.

जवळ विहीर होती त्या विहिरीवर पाणी पिण्याचा आणि विहिरीतून पोहऱ्याने पाणी काढण्याचा आंनद घेतला आणि बाजूला गावातील मुले क्रिकेट खेळत होती तिथे काही लोक चेंडूफळी खेळून आले. मग चहा घेऊन साम्रद गावाकडे निघालो.

रतनवाडीपासून साम्रद हे गाव जवळपास ८ कि. मी. आहे.संध्याकाळी  ६-३० च्या सुमारास आम्ही साम्रद गावात पोहोचलो. अशी आशा होती की लवकर पोहोचलो तर तिथल्या मिनी कोकणकडयावरचा सूर्यास्त अनुभवता येईल परंतु तिथे पोहोचेपर्यंत सूर्य दिसेनासा झाला होता.




परंतु इथे सह्याद्री आपले राकट सौंदर्य दाखवत उभा होता. रतनगड खुट्टा यांचे एका वेगळ्याच बाजूने अतीशय प्रेक्षणीय दर्शन होत होते. बाजूलाच आजोबाचा महाकाय पर्वत आपल्याला आजोबा का म्हणतात ते दाखवून देत होता. कळसुबाई, अलंग, कुलंग व मदनगड आणि कळसुबाई यांचे पाठीमागच्या बाजूने रौद्र दर्शन होत होते. अतिशय रम्य संध्याकाळ तोच लालसर संधिप्रकाश मन मोहून घेत होता. सूर्यास्त नाही मिळाला तरी रतनवाडीहून जाताना बसमधून दिसणारा भंडारदरा धरणाचा अथांग जलाशय मनाची तहान शमवून गेला.
आम्ही त्या सह्याद्रीच्या डोंगररांगांच्या संध्याकाळचे सौंदर्य डोळ्यात साठवून घेतले आणि लगेच आमचे टेन्ट जागेला लावून घेतले.

साम्रद हे गाव छोटेखानी आदिवासी गाव आहे. इथे चहा, नास्ता, जेवणाची उत्तम सोय होते. वेळ पडली तर दत्ता भांगरे याच्या घरात एक पडवीत २०-२५ लोकांची झोपण्याची सोया सुद्धा होईल इतकी जागा आहे. आम्ही चहा घेतला काहींनी मॅगी सूप चा आनंद लुटला.
आम्ही ३२ लोकांचे जेवण तयारच होते. मस्त पिठले भाकरी वरण-भात  पापड लोणचे याचे जेवण आटोपून घेतले.आमच्यातली काही कलाकार मंडळी सांधण व्हॅली च्या नावाशी कॅमेऱ्याने खेळत होती. शेवटी मोबाईलचा लाईट आणि मोठा कॅमेरा यामुळे एक उत्तम फोटो जमवलाच.  

गावात हनुमान मंदिरात काही कलाकार मंडळी आली होती त्यांची कला बघण्यासाठी आम्ही लोक साम्रद गावातील मंदिरात गेलो आणि आम्ही देखील त्या घुंगराच्या नाचत सहभागी झालो. तिथे एक राक्षसरूपी ड्रेपरी करून आलेल्या कलाकार माणसाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. जाऊ तिथे थोडा भाव खाऊ आणि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद लुटू इतकेच आम्हा ट्रेकर्सना समजते.

रात्री ११:०० च्या सुमारास तंबू मध्ये आलो आणि किमान १२ वाजता तरी झोपायचे ठरवले होते दुसऱ्या दिवशी उन्हाच्या आता रॅपलिंग करावयाचे होते त्यासाठी  ५ वाजता ट्रेक सुरू करायचा  होता परंतु आमच्या ग्रुप सोबत अजून बरेच ग्रुप ने तिथे तंबू ठोकले होते त्यातील काही ग्रुपचे रात्रीचे २:३० वाजेपर्यंत जरा जास्तच मोठमोठ्याने ओरडणे असा गोंधळ चालू असल्याने मला तरी लवकर झोप लागली नाही. सुरक्षिततेसाठी मुलींचे टेन्ट गृप लीडरने काळजीने मध्यभागी घेतले होते. आणि सगळेच जण बराच वेळ जागे होतो. पहाटे ३ नंतर हवेतला गारवा वाढल्याने झोप लागते ना लागते तोवर ४:३० चा गाजर वाजला आम्ही उठलो आणि भराभर आवरून सकाळी ६:३० वाजता आम्ही ट्रेक ला सुरुवात केली.


१०/१५ मिनिटातच वाट दाट झाडीत शिरली. व थोड्याच वेळात आम्ही एका घळीच्या मुखाशी आलो. सांधण व्हॅलीचे वैशिट्य म्हणजे ही जमिनीच्या पातळीखाली आहे. इथे खाली थोडेसे उतरावे लागते. अतिशय अरूंद अशी ही लांबच लांब जमिनीला पडलेली भेग आहे.व्हॅलीच्या  सुरुवातीलाचा एक जिवंत झरा आहे जो कधीही आटत नाही. आत व्हॅलीचे सापासारखे लांबच लांब वळण दिसत होते. काही ठिकाणी १५/२० फूट तर काही ठिकाणी जेमतेम २/३ फूट अशी ती अतिशय निरुंद व्हॅली होती. दोन्ही बाजूला काळ्याकभिन्न कातळकड्यांनी ती बंदिस्त केली होती.पहिला कातळ्टप्पा उतरताच एका पाणसाठ्याने आमचा मार्ग अडवला. साधारण १.५ फूट खोल १२/१३ फूट लांब अश्या त्या पाण्यातून शेवाळलेल्या दगडांवरून आम्ही कौशल्याने मार्ग काडून पलीकडे गेलो. मोबाइल बॅगेत टाकला परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने एक-दोघांचा मोबाईल भिजला. त्यामुळे हा पाण्याचा टप्पा पार करण्याआधी मोबाईल प्लास्टिक बॅगमध्ये पूर्ण पॅक करून बॅगेत टाकून बूट काढून घ्यावेत आणि त्याच्या लेस बांधून खांद्याला लटकवावेत आणि हळूहळू साखळी करून पाण्याचा टप्पा पार करावा म्हणजे पुढचा प्रवास नीट होतो.  आता तीव्र उतार सुरु झाला होता. व्हॅली अधिकाधिक अरूंद होत होती. कुठेही सपाट मार्ग नव्हता. दरडी, लहानमोठे दगडगोटे यांचा अक्षरश: तिथे खच पडला होता. कुठेही पाय ठेवावा तर पायात ताकद आणि ग्रीप हवी नाहीतर सारखा पाय घसरतो. 

अप्रतीम अश्या ह्या निसर्गनवलाने आम्ही अवाक झालो होतो. ही अरूंद व्हॅली पाणी व ज्वालामुखी यांच्या एकत्रीत परीणामामुळे बनली असावी. पूर्ण सांधण व्हॅलीत कधीही उन पोहोचत नाही त्यामुळे कायमच सुखद गारवा असतो.पण फक्त सांधण व्हॅली पर्यंतच हा गारवा असतो. साधारण  एक की. मी. ची ही व्हॅली आहे. त्यांनतर पुढे अजून २ की.मी. खोल व्हॅलीमध्ये  उतरून आम्ही रॅपलिंग च्या प्रतीक्षेत होतो. खरं तर आम्ही ५-७ जरा जास्तच पुढे गेलो होतो त्यात मी(जयू) आणि खोल्लम स्नेहल, दीपक गवळी, महेश अवटे, अनिल जाधव, राजेश जठार,संदीप गोरे, तुषार इतके लोक होतो. "पर वो कुछ लोग इस जयू को छोड के चले गये. पर "ऐ ५ लोगो अगले  ट्रेक को मै तुम्हे देख लुंगी" हर एक ट्रेक का नशा वेगळा होता है."
रॅपलिंग ची उत्सुकता शिगेला पोहोचली होती तिथेही नंबर होते अर्थात आम्ही पुढे असलेले मेम्बरच घाईवर होतो पण मनात भीती सुद्धा होतीच. काही चुकलं आणि पडलो धडपडलो तर?? पण खरे तर असे काही होणार नाही अशी खात्री होती कारण "फोना"ग्रुपने तसे तज्ञ सोबत आणले होते तसेच ट्रेकिंग करणारे अनुभवी लोकदेखील आमच्यासोबत होते. ४-५ ट्रेकर नंतर माझा नंबर होता. रॅपलिंग साठी तिथल्या गावातील दत्ता भांगरे आणि त्याचे सहकारी यांनी मिळून आम्हाला एकामागून एक असे करून ३२ लोकांना सुरक्षितरित्या आणि शांतपणे ५०-६० खोल दरीत रॅपलिंग करीत उतरवले. 








दत्ता भांगरे याने त्याच्या १८-१९ वयापासून हे रॅपलिंग चे तंत्र आत्मसात केले. तसे ट्रेंनिंग घेतले आहे आणि तोच त्याचे सहकारी खंडू मामा यांच्या सोबत येणाऱ्या ट्रेकर्स ना रॅपलिंग देखील शिकवतो आणि सुरक्षित रित्या उतरवतो. आधी स्वतः रॅपलिंगचे रोप स्वतःला बांधून तयारीत असतो. ही व्यक्ती साम्रद गावातीलच असल्याने ट्रेकर्स ना सोपे जाते. रॅपलिंग सुरु झाले,सगळे सगळ्यांना चियर अप करत होते. फोटो काढत होते. मला स्वतःला विश्वास नव्हता की मी रॅपलिंग करीत आहे. आणि सुरक्षित रित्या सगळ्या मेम्बर्स चे रॅपलिंग झाले. दत्ता भांगरे ला आणि जुने मेम्बर्स राणे सर, मंदार सर, रोहित, विवेकानंद,दिनेश,अविनाश,स्नेहल खोल्लम, आनंद, दिग्विजय, प्रकाश,  प्रतीक, गीता, रश्मी, मुक्ता, ऋजुता, हिरल, सेजल, हेरंब, गणेश गोसावी, राजेश जठार, तुषार, महेश, संदीप गोरे, अंबादास कदम, प्रदीप मिश्रा, शेवकर सर, अभिनव, सगळ्यांना सलाम. सगळ्याच्यां सहकार्याने रॅपलिंग चे सगळे पॅच चांगल्यारितीने पार पडले. 
आम्ही पुढे असलेलो ५-७ जण पुढे जात राहिलो पुढे ४ टप्पे पुन्हा रॅपलिंग चे पॅच आले होते तिथे रोप ची अतिशय गरज होती तरीही आमच्यातल्या एक्सपर्ट लोकांनी आम्हाला बिना रोपचे दोन टप्पे पार करवले.मी तर खडकाला लटकून,हात सोल्वटून घेतले. इतने बडे (सेमी हार्ड) ट्रेक में ऐसी छोटी-छोटी बातें तो होती रहती है. वेळ आली तशी एकाच्या डोक्यावर बसून उतरले. लहानपणी मामाच्या खांद्यावर बसलो होतो त्याची खूप आठवण झाली. अनिल जाधव सॉरी आणि धन्यवाद. वेळप्रसंगी लाल टी-शर्ट दीपक चा अनिल जाधव यांचा जाम ओरडा खाल्ला. काय झालं होतं मला काय माहिती रॅपलिंग चा ६० फुटाचा पॅच पार पडल्यावर जरा समजेना झालं होतं. मला बिना रोपचे कठीण पॅच उतरायला जास्त भीती वाटत होती. मी जर पडले आणि माझे एखादे हाड मोडले तर याच लोकांना उचलून न्यावे लागणार याची मला चिंता वाटत होती म्हणून मी जरा जीवाला जपत होते इतकेच. नाहीतर हम भी किसीसे कमी नहीं है.  (हाहाहा). 


पुढे दरी उतरत राहिलो. पण तिसऱ्या एक कठीण पॅच ला संदीप गोरे सोडले तर मात्र आम्ही सगळेच थांबलो.संदीप गोरे यांनी रॅपलिंग च्या पुढचे दोन्ही कठीण पॅच एकट्याने बिना रोप चे पार केले परंतु ते पुढे थांबले होते. नंतर मात्र आमची "फोना"ची गॅंग रॅपलिंग करून उतरत होती तसतसा आवाज घुमू लागला. कितीही  ठरवले की दरीमध्ये आरडाओरडा करायचा नाही तरी इतक्या लोकांचा आवाज एकत्र आला की तोच आवाज घुमतो आणि मोठ्याने बोलतो असा भास होतो. आम्ही ५-७ जण आपले पुढे आलो खरे पण माकडांची कॉलनी दिसली आणि जरा भीती वाटली कारण आवाज व्हायला लागला की ती माकडे सैरभैर पाळायला लागतात आणि मग  दगड पडायला सुरुवात होते. असेही अधून मधून दगड पडतच होते.  त्यामुळे आम्ही कपारीच्या अगदी कडेला बसून राहिलो आणि खंडू मामांनी इतक्या दुरून,वरून आमच्यासाठी आणलेला पोह्याचा नास्ता केला. खंडू मामा सुद्धा चकित झाले की अरे एवढा कठीण रॉक पॅच बिना रोप चा कसा पार केला म्हणून. शेवटच्या कठीण पॅच ला रोप लावून आम्हाला सुद्धा कमरेला दोर बांधून आम्ही उतरलो.


जसे आम्ही सगळ्यांच्या पुढे जात होतो तसे दरी उतरत राहिलो. आता मात्र उन्हाचा तडाखा वाढला होता. एप्रिलचे ऊन त्यात मध्ये कुठेही प्यायचे पाणी, सरबत असे काहीही नाही. किमान ४ लिटर पाणी जवळ हवेच हवे तरच आपण ट्रेक पूर्ण करू शकतो. पुढे गेल्यानंतर मात्र दरी उतरताना तापलेले खडक हाताला चटके देत होते. हातात ग्लोज घातले तरी काही उपयोग होत नव्हता. सांधण दरी उतरून झाली परंतु आता पुन्हा २-३ तासाची दुसरी दरी चढायची होती. भुकेची वेळ झाली होतीच. काही लोक गावातील लोकांना दरीतच जेवण बनवण्याची ऑर्डर करतात आणि तिथे जेवून ऊन कमी झाले की मग डोंगर चढाई सुरु करतात. परंतु आमच्यातले काही ट्रेकर्स आघाडीवर होतो(मी सुद्धा होते बरे त्यात) त्यातले ५-६ जण लीडर च्या सांगण्यावरून आधीच पुढे गेले होते. त्यामुळे सगळ्यांनीच आता चढाईला सुरुवात केली. दुपारचे १२:३० ऊन मी म्हणत होते. टोपी,सफेद पंचा असून माझ्या पायातले तर त्राणच गेले होते.
मागची मंडळी  हळूहळू येत होती. पण मला काही केल्या ऊन सहन होईना. छोटेसे झुडूप जरी आले तरी बसू वाटू लागले. ग्रुप लीडर राणे सर आणि रोहित सर मागे राहिलेल्या मंडळीला हळूहळू घेऊन डोंगर चढाई करत होते तर ग्रुप लीडर "मंदार सर द ग्रेट" थकलेल्यामध्ये कसा हुरूप आणायचा हे त्यांना पक्के माहिती आहे. "थोडेच राहिले थोडेच राहिले"असे करत करत थोडी सावली आली की गंमत जम्मत करीत बराच मोठा टप्पा भर उन्हात पार करवला. मागून सगळी टीम आली. सगळेच पार दमले होते.
मी तर म्हणत होते की ४ वाजता येईन आता नाही येऊ शकत. रडून पण घेतलं थोडं.  एक तास राहिला असताना एका झाडाखाली थांबून मग आमच्यात उत्साह आणण्यासाठी लीडर राणे आणि मंदार सर, प्रतीक आणि सगळ्यांनीच गाणी,पोवाडे,शिव गर्जना आणि शूर मराठे यांच्या गोष्टी सांगायला कमी नाही केले. एखाद्या लहान मुलाला झोपवण्यासाठी जसे अंगाई गीत गातात  तसेच आमच्यात पुन्हा बळ येण्यासाठी गाणी आणि पोवाड्यांचा आधार घेतला (अंधार फार झाला एक दिवा पाहिजे-या देशाला जिजाऊचा शिव पाहिजे)आणि त्याचा उपयोग सुद्धा झाला. मी पुन्हा हळूहळू चढाई करायला सुरु केली. आणि थांबत थांबत का होईना २:४५ ला आम्ही तिथल्या कोकणकड्याच्या टोकावर पोहोचलो. हळूहळू सगळेच येत होते. आता सपाट रस्त्यावर कोणीच कोणाची वाट पाहत नव्हते. जो-तो बसजवळ कधी पोहोचतो हेच बघत होता. आम्ही काही मंडळी ३:१५ ला आमच्या बसजवळ पोहोचलो. पुढे असणारे स्नेहल खोल्लम आणि इतर ५ लोक २ तास आधी पोहोचून जेवून आराम करून निवांत बसले होते. आम्ही देखील पोहोचल्यावर तोंडावर पाणी मारून आधी जेवण केले आणि मग दत्ता ट्रेकर्स मार्गदर्शकच्या घराच्या  मांडवात येऊन बसलो. सर्व मंडळी आल्यावर जेवण आटोपून ट्रेक कश्याप्रकारे  सुखरूप पार पडला यावर चर्चा करून संध्याकाळी ६ वाजता ट्रेक संपवून आम्ही पुण्याकडे रवाना झालो आणि रात्री ११:३० घरी पोहोचलो. काहींना उन्हाचा त्रास झाला पण अशा छोट्या छोट्या गोष्टी होऊ शकतात. अश्या प्रकारे अद्भुत सांधण व्हॅलीचा ट्रेक आणि रॅपलिंग चा भन्नाट अनुभव घेऊन नेहमीप्रमाणे सर्व ट्रेकर्स च्या सहकार्याने जवळपास ८ कि.मी चा ट्रेक यशस्वी  (सकाळी ६:३० ते दुपारी ४) झाला. 


सांधणव्हॅली चा ट्रेक करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी हमखास घ्यावी ती म्हणजे अनुभवी ग्रुपसोबतच इथे जावे.गरज असल्यास एखाद्या गावकऱ्याला  सोबत घ्यावे. खडक व जंगलातून वाट काढावी लागत असल्यामुळे, अनेकदा सरपटणाऱ्या  प्राण्यांशी गाठभेट होते, मग पायाच्या संरक्षासाठी म्हणून चांगले बुट घालणे व कपड्याची एखादी जोडी सोबत असणे अत्यावश्यकच आहे. धाडस म्हणून चुकून देखील एकट्याने जाणे टाळावे. तसंच दरी पार करताना रात्र झाल्यास रहाण्याची सोय तिथेच होऊ शकते, म्हणून त्यासाठी तंबूंची व्यवस्था आपल्यासोबत असलेली बरी.  ऊन असल्याने टोपी आणि सफेद रुमाल असावा की ज्याने कान आणि मान झाकली जाते आणि उन्हाचा त्रास कमी होतो.  गावकऱ्यांना आगाऊ सूचना दिल्यास खाण्याची व्यवस्था होते. पण तयार जेवण, थोडा खाऊ, भरपूर पाणी, लिंबू पाणी, सोबत न्यायलाच हवे. कृपा करून ट्रेकिंग जाताना आपण तिथला गडांवरचा कचरा साफ करू शकत नाही तर निदान आपण तिथे पाण्याच्या बाटल्या,थर्माकोलची  ताटे, प्लास्टीक चा कचरा टाकून येऊ नये. आपला सह्याद्री स्वच्छ आणि सुंदर ठेवूयात. धन्यवाद....


Monday, 30 January 2017

"आकाशगंगादर्शन एक अद्भुत अनुभव "

आकाशगंगा दर्शन एक वेगळा अनुभव
दिनांक- २८ जानेवारी रात्री ७:३० ते २९ जानेवारी पहाटे ५:३०
ठिकाण- जावण गाव,मुळशी,पुणे. 



२३ जानेवारीच्या कळसुबाई ट्रेक ला अजून एक आठवडा सुद्धा होत नाही तोवर लगेच संशोधन प्रेसेंटस  "आकाशगंगा दर्शन" ह्या इव्हेंट चा मेसेज ट्रेकिंग च्या "फोना"ग्रुप वर येऊन धडकला. हो नाही हो नाही करत माझ्यासाठी नाही परंतु माझी मुलगी प्रभासाठी मी या इव्हेंट ला जायचे ठरवले. मनोज राणेसरांनी आमची नावे दिली. अचानक जायचे ठरल्यावर  धावपळ आलीच.  आम्ही२८ जानेवारी ला संध्याकाळी ६ वाजता घर सोडले. महेश पाठक आणि त्यांचे कुटुंब, सचिन चव्हाण यांचे कुटुंब यांच्या २ गाड्या आणि सुरेखा खंडागळे यांच्या गाडीत मी माझी मुलगी राणे सर आणि त्यांचा मुलगा कृष्णा आणि अजून एक प्रभाचा वर्गमित्र प्रथम असे सगळे आम्ही मुंबई-पुणे हायवेने निघालो. जावण गाव पुण्यापासून ४० कि.मी. अंतरावर आहे. सोमाटणे फाटा सोडल्यावर काही अंतर गेल्यावर आमचा एक टर्न चुकल्यामुळे आम्ही ४ कि. मी. पुढे गेलो. एका गावात योग्य मार्ग विचारून आणि जीपीएस मुळे पुन्हा ४ कि.मी. मागे येऊन योग्य ठिकाणी पोहोचलो. त्यावेळी माझी मैत्रीण सुरेखा हिने तिची स्वतःची चारचाकी गाडी भारी चालवली. तिचा घाटामध्ये गाडी चालवायचा सराव झाला असे राणे सर गंमतीने म्हणाले.  

७:३० वाजता आम्ही जावण गावात खंडोबा मंदिराजवळ उतरलो. श्री.मयुरेश प्रभुणे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यानुसार त्यांनी तशी सगळी तयारी करूनच ठेवली होती.  गेल्या गेल्या आम्ही आमच्या बॅगा गाडीतून काढून घेतल्या. तिथे मोट्ठे ३ दुर्बीण संच आधीच लावले होते. आम्ही २०-२५ जण वेळेवर पोहोचलो होतो शिवाय अजून पुण्यातून २५ जणांची बस येणार होती. 

गेल्या गेल्या दुर्बिणीतून मंगळ ग्रह पाहता आला. मी लहानपणी मुंबईच्या नेहरू तारांगणातून हे असं पाहिलं होत परंतु त्यावेळी मी कोणकोणते ग्रह पाहिले होते ते यावेळी तरी मला आठवत नव्हते. मंगळाला सूर्याभोवती प्रदक्षिणा घालावयास साधारण ६८७ दिवस लागतात तर स्वतःभोवती प्रदक्षिणा घालावयास  २४तास ३६ मिनिटे लागतात. 


दुर्बिणीजवळ  रांगा लावून शिस्तीत सगळे ग्रह पाहण्याचा आनंद  घेत होते. थोड्यावेळाने राहिलेले मेम्बर्स आले. ते देखील दुर्बिणीजवळ रांग लावून ग्रह तारे पाहण्यात मग्न झाले.आमचा एक ग्रह पाहून झाला होता दुर्बिणीजवळ उगाच गर्दी करण्यापेक्षा आम्ही तिथे असलेले खंडोबा मंदिर गाभाऱ्यात जाऊन पाहिले. मंदिर अतिशय नीटनेटके आणि स्वच्छ होते. विजेची उत्तम सोय होती.  


त्यानंतर आम्ही आमचे जेवणाचे डब्बे काढून जेवण करून घेतले. 

तोपर्यंत मयुरेश प्रभुणे यांच्या टीम ने दुर्बिणीत शुक्र ग्रह सेट करून ठेवला होता तो आम्ही पहिला.
सूर्यमालेतील शुक्र हा बुधग्रहानंतरचा दुसरा ग्रह. ह्याचा आकार जवळपास आपल्या पृथ्वी एवढा आहे. या ग्रहास देखिल आंतर ग्रह म्हणतात. कारण हा ग्रह देखिल सूर्य आणि पृथ्वी यांच्या मध्ये आहे. याच मुळे हा ग्रह देखिल आपणास फक्त सकाळी किंवा संध्याकाळी दिसतो.या ग्रहावरील वातावरण अतिशय दाट असल्याने सूर्याचा त्यावर पडलेला प्रकाश मोठ्या प्रमाणावर परावर्तित होतो. त्यामुळे शुक्र अन्य ग्रहापेक्षा फारच तेजस्वी दिसतो. 
शुक्र ग्रह पाहून झाल्यावर श्री. मयुरेश प्रभुणे सर जेव्हा  तिथे जवळच मोकळ्या सुरक्षित जागी प्रत्यक्ष आकाश दर्शन घडवित होते तेव्हा मात्र आम्ही मंत्रमुग्ध झालो होतो. लेझरटॉर्च च्या सहायाने आम्हाला प्रत्यक्ष आकाशातील ग्रह तारे याविषयी माहिती देत होते. त्यांचे विज्ञानाविषयीचे ज्ञान जबरदस्त होते. माझ्या बुद्धीपलीकडचे होते हे सगळे परंतु माझी मुलगी प्रभा हे सगळे उत्सुकतेने ऐकत होती आणि पाहत होती मी जसे जमेल तसे समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. मी फक्त जोतिष शास्त्रापुरते १२ राशींचा तात्पुरता विचार करीत असे.
अवकाश निरीक्षणाची रात्र ही अमावस्येची रात्र असावी त्यानुसार अमावस्याच होती आणि मंदिराच्या आवारातील सगळे दिवे बंद करण्यात आले होते. त्यामुळे तारे स्पष्ट दिसत होते. साधारणपणे वर्षभर पद्धतशीर अवकाश निरीक्षण करणाऱ्यांनाच सर्व अवकाशस्थ वस्तूबद्दल माहिती होते. परंतु तरीदेखील एखाद्या नवख्या अवकाश निरीक्षकास सुरवातीस काही गोष्टी ओळखण्यास कठीण जातात मलाही ते कठीण जात होते.  आकाशामध्ये चमकणारी प्रत्येक गोष्ट ताराच असेल असे नाही. म्हणून अवकाशामध्ये चमकणारी वस्तू काय असेल त्यासंबंधीची कल्पना येण्यासाठी खालील गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे.
कृत्रिम उपग्रह ( सॅटेलाईट्स) - ही अवकाशामध्ये चमकणारी वस्तू आपणास वेगाने जाताना दिसेल. कमी वेळामध्ये ही वस्तू आपणास अवकाशातील एका ठिकाणाहून दुसऱ्या  ठिकाणी जाताना दिसेल. जास्तीत जास्त एक मिनिटभर ती आपणास दिसेल.
ग्रह - आपणास माहीत आहेच तरी देखिल व्यवस्थित निरीक्षण केल्यास आपणास जाणवेल की ग्रह चमकत नाहीत. ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश असतो तर ग्रह सूर्याचा प्रकाश परावर्तित करतात. तसेच ताऱ्यांच्या  मानाने ते कितीतरी पट पृथ्वीच्या जवळ असल्याने त्यांचा प्रकाश स्थिर जाणवतो.
तारे - ग्रहांच्या मानाने तारे कितीतरी पट दूर असल्याने त्याच्या पासून येणारा प्रकाश पृथ्वीवरील वातावरणाच्या माध्यमातील धुलिकणांमुळे अडला जातो व इतरत्र पसरला जातो. पृथ्वीवरून त्यांना पाहताना त्याचा प्रकाश हालताना आणि तुटक मिळतो. म्हणूनच तारे चमकताना किंवा लुकलुकताना दिसतात.
उल्का - सर्वात जास्त वेगाने जाणारी तसेच क्षणात अदृश्य वस्तू म्हणजे उल्का. एखाद्या धूमकेतूची परिभ्रमण कक्षा जर पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेला छेदून गेली असल्यास, पृथ्वी सूर्य प्रदक्षिणा करताना त्या विशिष्ट जागेतून जाताना त्या धूमकेतूच्या मागे द्रव्यामधील धूलीकण, दगड इतर वस्तू गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीच्या दिशेने आकर्षित होतात व पृथ्वीवर आदळण्या आधीच वातावरणामध्ये घर्षणाने नष्ट होतात. त्यांनाच उल्का असे म्हणतात. प्रचंड वेगामध्ये वातावरणामध्ये प्रवेश केल्यावर घर्षणाने त्या उल्का पेट घेतात. परंतु आकारमानाने लहान असल्यामुळे जमिनीवर पोहचण्या आधीच त्या नष्ट होतात. कधीतरी आकाशात पाहताना अचानक एखादा तारा तुटल्यासारखे आपणास जाणवते त्याच उल्का.
धूमकेतू -  धूमकेतू ओळखणे तर सर्वात सोपी गोष्ट. सर्वसाधारणपणे सूर्यमालेत प्रवेश करताच धूमकेतूमागे आपणास शेपटी असलेली दिसेल. ही शेपटी बर्फाच्छादित धुलीकणांची असते व जसजसा तो धूमकेतू सूर्याच्या अधिक जवळ येऊ लागतो, त्यावेळेस हे बर्फाच्छादित धुलीकण विरघळून धूमकेतू पासून अलग होतात आणि धूमकेतूमागे धुलीकणांची एक शेपटी तयार होते. त्यामुळे धूमकेतू एखाद्या झाडूसारखा दिसू लागतो. काही आठवड्यांमध्ये तो आपली सूर्य प्रदक्षिणा संपवून पूर्ववत दूर जाऊ लागतो व त्याबरोबर त्याची शेपटी देखिल लहान होत होत अदृश्य होते.
विश्वाच्या निर्मितीच्या बऱ्याच संकल्पना आतापर्यंत निरनिराळ्या शास्त्रज्ञांनी मांडल्या आहेत. या सर्व संकल्पना त्या-त्या शास्त्रज्ञांनी त्यांनी केलेल्या अभ्यासाच्या निष्कर्षावरून तसेच कल्पना  करून मांडल्या आहेत. कुठल्याही गोष्टीची निर्मिती ही त्या गोष्टीच्या निर्मितीच्यावेळी असलेल्या परिस्थितीवरून काढली जाते. पण विश्वाच्या निर्मितीनंतरच इतर सर्व गोष्टी निर्माण झाल्या त्यामुळे विश्वाची निर्मिती कशी झाली असावी हे सांगणे तितकेसे सोपे नाही.
साधारण पणे १३ ते २० अब्ज वर्षापूर्वी एक मोठ्या स्फोटातून सध्याच्या विश्वाची निर्मिती झाली असावी असा शास्त्रज्ञांनी शोध लावला आहे.सुरुवातीला म्हणजेच साधारणपणे १३ ते २० अब्ज वर्षापूर्वी संपूर्ण विश्व एका बिंदूवत स्वरूपात होते. त्यानंतर झालेल्या त्याच्या महास्फोटामूळे त्यातील सर्व द्रव्य अंतराळामध्ये फेकले गेले. त्यापासूनच पुढे एक-एक गोष्ट तयार होत सध्याचे विश्व आपण पाहत आहोत.
साधारण १९३१ दरम्यान बऱ्याच खगोलसंशोधकांना त्यांच्या अवकाश निरीक्षणामध्ये असे आढळून आले की अंतराळातील सर्वच आकाशगंगा आपापल्या स्थानापासून सरकत असून त्या एकमेकांपासून दूर जात आहेत. आकाशगंगांचे एकमेकांपासून दूर जाणे हे ज्याप्रमाणे एखाद्या रबरी फुग्यावर काही चित्रे काढून तो जर फुगा फुगविला तर ता फुग्यावरील चित्रे ज्याप्रमाणे एकमेकांपासून दूर जाताना दिसतील त्याच प्रमाणे या अंतराळातील आकाशगंगा एकमेकांपासून दूर जात आहेत. याचाच अर्थ त्या भूतकाळामध्ये कधीतरी एकमेकांच्या जवळ अथवा एकत्रित असाव्या ज्या नंतर काही कारणास्तव एकमेकांपासून दूर जाऊ लागल्या. पुढे असा निष्कर्ष लावण्यात आला की महास्फोटानंतर त्या स्फोटातील द्रव्य अंतराळामध्ये फेकले गेले. या द्रव्यापासूनच पुढे आकाशगंगांची निर्मिती झाली. 


एकामागोमाग एक उत्तम आम्हाला समजेल अशी माहिती मयुरेश देत होते आणि ५० लोकांचा समुदाय शांतपणे  गोधंळ न करता ते ऐकत होता आणि अवकाशात पाहत होता. ध्रुवतारा कसा ओळखायचा हे खूप छान समजून सांगितले. वर्षभरात आपणास जाणवेल की सर्व तारे पृथ्वी भोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतात धृवतारा हा असा एक तारा आपणास जाणवेल की ज्याने वर्षभरात आपली जागा स्थिर ठेवली आहे. पृथ्वीचा अक्ष थोडासा कललेला आहे हे आपणास माहीत आहे. पृथ्वीच्या अक्षाच्या मध्यापासून एक काल्पनिक सरळ रेषा काढल्यास त्या रेषेवरच धृव ताऱ्यांचे  स्थान आहे. म्हणून वर्षभरात आपणास इतर तारे पृथ्वीभोवती गोलाकार फिरल्याचे जाणवतात, परंतु धृव तारा स्थिर जाणवतो. २० नक्षत्रांची माहिती दिली.
व्याधSirius  ,अगस्ती-Canopus,  मित्र- Rigil Kentaurus,स्वाती -Arcturus ,अभिजित-Vega ब्रम्हहृदय-Capella,राजन्य- Rigil,प्रश्वा,Procyon, काक्षी-Betalgeuse ,अग्रनद Achernar, मित्रक-Hadar ,श्रवणAltair,ऍक्रक्स-Acrux रोहिणी-Aldebaran,ज्येष्ठा-Antares,चित्रा-Spica,प्लक्ष-Polllux,मीनास्य-Fomalhaut,हंस-Deneb,मिमोसा-Mimosa 
रात्रीच्या वेळेस जर चंद्र अवकाशामध्ये असेल तर त्याच्या प्रकाशित बाजूने सरळ रेषा ओढल्यास ती बरोबर आपणास पश्चिम दिशा दाखवेल. तसेच जर त्याच्या काळोख असलेल्या बाजूकडून सरळ लंब रेषा ओढल्यास ती आपणास पूर्व दिशा कळेल.परंतु रात्रीच्या वेळेस अवकाशामध्ये चंद्र नसेल तर दिशा ओळखण्यासाठी काही तारकासमुहांची देखिल मदत होते. अशा प्रकारे रात्रीच्या वेळेस तारकासमुहांद्वारे दिशा ओळखता येतात. 
इंग्रजीमधील 'एम' किंवा 'डब्ल्यू' आकाराप्रमाणे दिसणाऱ्या आणि  शर्मिष्ठा तारकासमुहाच्या मधील पाच प्रमुख ताऱ्यापैकी तिसऱ्या  व चौथ्या ताऱ्यामधून  सरळ लंबरेषा आखल्यास ती रेषा सरळ उत्तर ध्रुवताऱ्याकडे  जाईल.सप्तर्षी तारकासमुहातील प्रमुख सात प्रमुख ताऱ्यापैकी पहिल्या दोन ताऱ्यांना  जोडून सरळ रेषा आखल्यास ती रेषा सरळ उत्तर ध्रुवताऱ्याकडे जाते. मृग तारकासमुहामध्ये असलेले मृगाचे तोंड नेहमीच उत्तर दिशा दर्शविते.सिंह तारकासमुहामध्ये असलेले सिंहाचे तोंड नेहमीच पश्चिम दिशा दर्शविते.तसेच वरीलपैकी कोणताही तारकासमूह अवकाशामध्ये दिसत नसल्यास आपणास ओळखता येत नसल्यास साधारण दोन-तीन तास ताऱ्यांचे  निरीक्षण केल्यास आपणास त्यांच्या बदललेल्या जागेवरून त्यांची उगवण्याची पूर्व दिशा लक्षात येईल.
आपली पृथ्वी ज्या सूर्यमालेमध्ये आहे ती 'मंदाकिनी' नावाच्या आकाशगंगेमध्ये आहे. अवकाशातील सर्वच गोष्टीचे एकमेकांपासून अंतर फारच असल्याने दोन अवकाशीय गोष्टींमधील अंतर प्रकाशाच्या वेगाने मोजले जातात. आपल्या पृथ्वीवरून दिसणाऱ्या जवळपास सर्वच गोष्टी आपल्या आकाशगंगेमधील आहेत याचाच अर्थ आपल्या आकाशगंगेचा आकार प्रचंड मोठा आहे. या सर्वांना सामावून घेणाऱ्या आकाशगंगेच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत प्रकाशाला पोहोचायला जवळजवळ १ लाख वर्षे लागतात.
आपल्या आकाशगंगेमध्ये साधारण २०० अब्ज तारे आहेत. आपल्या आकाशगंगेमध्ये आपल्या सूर्यापेक्षा लहान तसेच आपल्या सूर्यापेक्षाही हजारो पट आकाराने मोठे तारे, तारकागुच्छ, तेजोमेघ, वायूचे ढग, धुळीचे ढग, मृत तारे, नवीन जन्माला आलेले तारे अशा अनेक गोष्टी आहेत. लहान मोठ्या असलेल्या ह्या आकाशगंगा जवळपास १ कोटी प्रकाशवर्षे एवढ्या अंतरामध्ये पसरलेल्या आहेत.
तिथले काही जणांनी तर सर अवकाशाची माहिती देत होते तिथेच म्याट टाकून अवकाशाचे निरीक्षण केले.मला हे आकाशनिरीक्षण सगळं अद्भुत वाटत होते. मला तर असे वाटत होते की एखाद्या अवकाश यानाद्वारे आपण अवकाशाची सफरच करीत आहोत की काय इतक्या छान रीतीने मयुरेश सर समजून सांगत होते जरा डोळ्यावर झोप येत होतीच तरीही आवडत होते . रात्री १२ च्या पाहिलेले अवकाश आणि पहाटेला दिसणारे अवकाश यात फरक असणार आहे याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.
रात्रीचा १ वाजला होता. आता चहा चा ब्रेक झाला. मयुरेश सरांची टीम सगळळी तरुण पिढी होती.  आणि अतिशय उत्साहाने सगळे सरांना सहकार्य करत होते. कारण मोठमोठाले दुर्बीण संच सारखे सेट करावे लागत होते. कारण आम्ही पाहणारे नवखे होतो. आम्ही आपला त्या दुर्बीण संचाला हात लावून च तारे निरीक्षण करत होतो. मयुरेश सरांनी चहा बनवायला शिकवलेल्या एका मुलीने चहा बनवला आणि ५० जणांच्या मोट्ठ्या ग्रुपला आणून आणून दिला कारण आम्ही आता तिथल्या खंडोबा मंदिरात स्लाईड शो बघण्यासाठी एकत्रित जमलो होतो. परंतु बऱ्याच लोकांना झोप आवरत नव्हती.  जरा सर येईस्तोवर एक पडी  मारावी असा विचार करून कोणी टेन्ट काढले कोणी मंदिरातच आपापल्या म्याट काढल्या आणि चहा पित बसलो. छोटी मंडळी जरा झोप आली म्हणून लुडबुड करत होती. कारण त्यांना हा आकाश निरीक्षणाचा पहिलाच अनुभव होता.
मुली कुठेही गेल्या तरी पटकन ऍडजस्ट होतात. सरांच्या टीम मधल्या मुलीने तिथे ५० जणांचा चहा बनवून सगळ्यांच्या हातात आणून दिला.  आम्ही साडेसातला आल्यापासून मयुरेश सर सतत उभे आणि कार्यरत  होते तरीही थकलेले  दिसत नव्हते की चिडत नव्हते याचे मला नवल वाटे. काहींनी सर येईस्तोवर आणि स्लाईड शो सुरु होईस्तोवर एखादी डुलकी मारली असावी. २:३० च्या दरम्यान मयुरेश सर आता एक वाक्य बोलून गेले. की मी जर २ ते अडीच तास उभा राहून बोलणार असेल काही माहिती सांगणार असेल तर तुम्ही फक्त बसून ऐकायला काही हरकत नाही. आम्ही काय समजायचे ते समजून गेलो आणि झोप येत असून काहीजण म्याट वर आडवे झालेले उठूनच बसले. न चिडता शांतपणे खूप संयमाने आम्हाला झोपेतून खाडकन जागे केले. थंडी तर खूपच होती परंतु आम्ही बसलो असल्याने आम्हाला जास्त थंडी जाणवत होती. 
श्री.मयुरेश प्रभुणे सरांनी स्वतःविषयी माहिती देताना जे सांगितले ते ऐकून सर्वांना खूप कौतुक वाटले. कारण ते विज्ञान शाखेचे विद्यार्थी नव्हते. फक्त आवड आहे म्हणून या क्षेत्रात वळले. आणि इतरांना मार्गदर्शन करून विज्ञानाची गोडी लावली. त्यांची मराठी भाषा जशी अस्खलित तसेच इंग्रजी भाषा देखील उत्तम होती. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स मध्ये विज्ञान पत्रकार म्हणून आहेत. इंग्रजी व मराठी नियतकालिकात सिटीझन सायंटिस्ट म्हणून आहेत. सेंटर ऑफ सिटीझन सायन्स चे कारवाहक आहेत. १३ वर्षे विज्ञान लेखन केले आहे. भारतीय मान्सून चा सर्वंकष अभ्यास करणाऱ्या "प्रोजेक्ट मेघदूत" चे संचालन केले आहे. हौशी आकाशनिरीक्षक. भारतीय अवकाश कार्यक्रमाचा अभ्यास आणि वार्तांकन. साधी राहणी हुशार विचारसारणी असे अनेक पैलू आम्हाला पाहावयास मिळाले.   
स्लाईड शो मधून त्यांनी खगोलशास्त्रज्ञांविषयी सांगायला सुरुवात केली.
आर्यभट, वराहमिहीर,ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य, अश्यांची माहिती सांगितली. आर्यभट भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह अंतराळात विहार करू लागला. प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने ताठ व्हावी अशी ही घटना पहिल्या कृत्रिम उपग्रहाचे नाव होते 'आर्यभट'. आर्यभट हा भारताचा महान खगोलविद्वान होता, खगोलीय गणिती होता, खगोलशास्त्राचा प्रणेता होता. म्हणून आर्यभटाचे कर्तृत्व असामान्य आहे. आर्यभटाचे शिष्य वराहमिहीर, लल्ल वगैरे त्यास 'आर्यसिद्धांत' म्हणून संबोधायचे. खगोलविद्वानांनी त्यांच्या ग्रंथरचनेतील भाग आपल्या विवेचनासाठी घेतला.
पहिल्या आर्यभटानंतर एक थोर खगोल शास्त्रज्ञ भारतात होऊन गेला. वराहमिहीर अवंती येथे वास्तव्य करीत असे. वराहमिहीराने ज्या विषयांवर लेखन केले आहे ते विषय भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी पूर्वीही हाताळले आहेत. 
ब्रम्हगुप्त हा एक प्रतिभाशाली भारतीय खगोलशास्त्रज्ञ होऊन गेला. व्याघ्रमुख राजाच्या राज्यसभेत खगोलशास्त्रज्ञ होता. व्याघ्रमुख राजा उत्तर गुजरातचा प्रमुख होता. 
महान भारतीय खगोलशास्त्रज्ञ भास्कराचार्य ह्याचे सर्व शिक्षण त्याचे वडील मोरेश्वर यांच्याजवळ झाले. ते स्वतः एक पारंगत खगोलशास्त्रज्ञ होते. त्यांनी करणग्रंथ व जातकग्रंथ लिहिले. ज्ञानसंपन्न वडिलांच्या सानिध्यात भास्कराचार्यावर चांगले संस्कार झाले व तो विविध शास्त्रांत निष्णात झाला.
त्या काळात अत्याधुनिक साधने उपलब्ध नसतानाही गॅलिलिओ, आईन्स्टाईन, न्यूटन यांनी कसकसे शोध लावले याविषयी ते सांगत होते. या ससंशोधकांनी कसे शोध लावले असतील त्याचा आपण फक्त विचारच करू शकतो.
पहाटेचे ४:३० वाजले होते. पहाटे अवकाश कसे दिसते ते पाहण्याची उत्सुकता आता लागली होती. रात्री आणि पहाटे ताऱ्यांच्या दिशांमध्ये झालेले बदल स्पष्टपने दिसत होते. एक क्षण विश्वासच बसत नव्हता. सकाळी दुर्बिणीतून शनी हा ग्रह पहावयास मिळाला तसेच ज्युपिटर देखील पाहावयास मिळाला.  

ज्युपिटर म्हणजे गुरु ग्रह आम्ही पाहिला त्याचा फोटो देखील दुर्बिणीतून काढला आहे तो वर दिला आहे. सूर्यमालेतील पाचवा ग्रह म्हणजे गुरू.  गुरू म्हणजे एक श्रेष्ठ स्थान. नावाप्रमाणेच सर्व ग्रहांचा गुरू आहे. कारण त्याचा आकारच त्याचे मोठे वैशिष्ट्य आहे. हा सर्व ग्रहांमध्ये सर्वात मोठा आहे. दुसऱ्या शब्दांमध्ये सांगायचे तर आपल्या पृथ्वी सारख्या अकरा पृथ्वी या ग्रहाच्या व्यासावर ओळीने सहज बसू शकतील. गुरू ग्रहांच्या चंद्राप्रमाणे शनी या ग्रहाच्या कड्यांचे देखिल सर्वप्रथम दर्शन गॅलिलिओने आपल्या दुर्बिणीतून घेतले. प्रचंड आकाराचा असून देखिल याची घनता पाण्याहून कमी आहे. समजा जर एका मोठ्या समुद्रामध्ये जर शनी ग्रह टाकला तर तो चक्क तरंगू लागेल.
लहान मोठ्या असंख्य खडकांपासून शनी ग्रहाची कडी निर्माण झाली आहेत. कधी एके काळी शनीच्याच एखाद्या चंद्राचा स्फोट होऊन त्यापासून ही कडी निर्माण झाली असावीत. वस्तुतः या कड्यांची संख्या असंख्य असली तरी प्रामुख्याने या कड्यांची सात निरनिराळ्या कड्यांमध्ये विभागणी करण्यात आली आहे.अतिशय कमी तापमानामुळे या कड्यांतील सर्व तुकडे बर्फाच्छादित आहेत. या कड्यांची जाडी जवळपास १० ते १५ कि. मी. आहे. शनी ग्रह त्याच्या अक्षाशी साधारण २८ अंशांनी कललेला असल्यामुळेच पृथ्वीवरून आपणास त्याची कडी व्यवस्थित दिसतात. अन्यवेळी पृथ्वी शनीच्या विषुववृत्त पातळीत येते, तेव्हा त्याची कडा जवळजवळ अदृश्य होते व त्याजागी शनीला छेदणारी एक बरीक रेषा आपणास दिसते.
शनीला एकूण ३० उपग्रह आहेत. त्यामधील टायटन आकाराने बुध ग्रहा एवढा आहे.


श्री.मयुरेश सर म्हणाले की अवकाश संशोधनासाठी कोणत्याही शाखेची व्यक्ती सहभागी होऊ शकते. आकाशगंगा दर्शनाची माहिती जशी जमेल तशी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मयुरेश प्रभुणे सरांनी आवर्जून सांगितले की प्रत्येक गोष्टीची थोडी सवय थोडा अभ्यास केला की सगळं काही जमते. आपण तर पुण्यात राहतो. पुण्यात अश्या गोष्टींसाठी खूप सोयीसुविधा उपलब्ध आहेत.आपली पिढी खूप भाग्यवान आह.  या बाबतीत. पहाटेचे ५:३० वाजले. मयुरेश सरांच्या टीम ने पुन्हा एकदा ५० लोकांना चहा दिला आणि आम्ही आवरता आवरता ६ वाजता तिथून रवाना झालो. ट्रेकिंग करते  निसर्गावर, गडकिल्ल्यांवर ब्लॉग लिहिते  पण या विषयावर मी कधी लिहीन असे वाटले नव्हते. जिथे गरज होती तिथे माहिती शोधून शोधून तुमच्यापुढे आणली आहे. चला तर मग एकदा तरी अवकाश संशोधनाचा भाग होऊयात. राशींविषयी, साडेसातीविषयी, ग्रहणाविषयी बऱ्याच जणांना समज गैरसमज होते. त्याविषयी  चर्चा करून ते मयुरेश सरांनी दूर केले. माझ्यासारख्या विज्ञानाची जास्त आवड नसलेल्या व्यक्तीमध्ये  अवकाशाविषयी आवड निर्माण होणे म्हणजेच मयुरेश सर करीत असलेल्या अवकाश संशोधनामध्ये खारीचा वाटाच. अवकाशदर्शनाची सुवर्णसंधी श्री मयुरेश प्रभुणे सर यांनी आम्हाला दिली त्यासाठी त्यांचे आणि त्यांच्या टीमचे खूप खूप आभार.