Monday, 11 June 2018

१९ कि.मी.चा अँडवेंचर्स अफलातून ट्रेक..



माणिकगड ट्रेक
दिनांक - १० जून २०१८
ठिकाण- रायगड जिल्हा,
डोंगररांग -पनवेल
चढाईश्रेणी = मध्यम-कठीण
उंची - समुद्रसपाटीपासून २५०० फूट

"माऊंटन एड्ज ऍडव्हेंचर अँड वाईल्ड ट्रेल्स पुणे" आयोजित माणिकगड ट्रेक दिनांक १० जून २०१८ चा रविवार उजाडला आणि आम्हा ट्रेकर्सच्या आनंदाला पारावार उरला नाही. खरेतर जून महिना म्हणजे पावसाळी ट्रेक नव्हेच. कारण पाऊस म्हणावा तसा जोरदार सुरु झालेलानसतो. डोंगररांगांमध्ये चंदेरी धबधबे कोसळताना दिसू लागले की मगच पावसाळी ट्रेकची संकल्पना खऱ्या अर्थाने सार्थ ठरते.एप्रिल मधील मधुमकरंदगडट्रेक नंतर कडक असह्य उन्हाचा मे महिन्याचा एकच  ट्रेक चुकला तरी आम्हाला असे वाटले की बरेच महिने ट्रेक झाला नाही आणि अस्वस्थ वाटू लागते. परंतु ती एका ट्रेकची कसर मी कौटुंबिक सहलीतून भरून काढली. कोणत्या ना कोणत्या रीतीने निसर्गाशी जडलेले नाते कायम ठेवायचे इतकेच आम्हा ट्रेकर्सना समजते.

रविवार दिनांक १० जून २०१८ या दिवशी सकाळी आम्ही माउंटन एड्जच्या १७ ट्रेकर्सची बस सकाळी ६:३० वाजता निगडी-तळेगाव-खांडगे पेट्रोलपम्प- लोणावळा- खोपोली-रसायनी-चावणे मार्गे रोडलगत असलेल्या स्वराज फॅमिली रेस्टोरंट मध्ये चहा नास्ता करून अन्ताक्षरीच्या तालावर सावणे गावात पोहोचली. पुण्यापासून माणिकगड मोबाइल नकाशाच्या अंतरानुसार सुमारे ११४ कि.मी. असून अडीच तासांच्या अंतरावर आहे तर निगडीहून सुमारे ९७ कि.मी, अंतरावर असून २ तासाच्या अंतरावर आहे. बसमध्ये बसल्यापासूनच पावसाने हजेरी लावली होती. तसेच लोणावळा खंडाळा घाटामध्ये देखील अविरत ढग दाटून पाऊस पडत असल्याने नेहमी दुरून हॅलो करणारा ड्युक्स नोज त्या दिवशी मात्र दिसला नाही. पाऊस सतत पडत असल्याने ट्रेक करायला जास्त मजा येईल असे मनोमन वाटत होते. सावणे गावात गेल्यावर देखील पावसाने आमचे स्वागत केले. इथे आपली लाल परी (एस. टी.बस)येण्याची सोय आहे. तसेच इतर वाहनांची देखील सोय आहे. ट्रेक लिडर्सने महत्वाच्या सूचना दिल्यानंतर साडेनऊच्या सुमारास प्रत्यक्ष ट्रेक सुरु झाला.
सावणे गावातून वाट दाखवणारा वाटाड्या घ्यावा असा विचार केला परंतु त्यावेळी कोणी मिळेना मग लिडर्सने गावकर्यांना माणिकगडची वाट विचारून घेतली आणि आम्ही चालू लागलो. त्यातला एक गावकरी म्हणे आता माणिकगडावर चाललात ??? माशा तुम्हाला खूप त्रास देणार हो.  आम्हाला एक क्षण वाटले की मधमाश्याच त्रास देणार असे त्याला म्हणायचे आहे. पाऊस सुरु झाल्यावर माशा कुठेही जास्त प्रमाणात आढळून येतात त्या माशा जास्त आढळतील असे त्याचे म्हणणे होते.त्यानंतर आम्ही थोडे निश्चिन्त होऊन चालू लागलो.
पावसाळ्यात एका गावातून दुसऱ्या छोट्या पाड्यात जाण्यासाठी ओढ्यावर अतिशय सुंदर असा लाकडी पूल तयार करून ठेवला होता आम्ही सर्व ट्रेकर्सने हावडाब्रिजवर असल्यासारखी हावऱ्यासारखी फोटोग्राफी केली.त्या छोट्या पाड्यात छोटी छोटी कुडाची,(कारवीची)कौलारू घरे उठून दिसत होती. 

 जरा पूढे गेल्यावर स्वप्नात नसतानादेखील जांभूळ आणि करवंदाच्या रानमेवा आम्हाला आयताच मिळाला. त्याचा चालता चालता आस्वाद घेत आम्ही पुढे चालू लागलो त्यावेळी ढगांची शाल पांघरलेला माणिकगड अधून मधून ऊन पडल्याने आम्हाला वाकून पाहत होता. जणू काही तो आमची वाट पाहत होता असे  भासत होते. 

लीडर राणे सर एकाला सोबत घेऊन पुढे जाऊन स्वतः  वाट पाहून आम्हाला येण्याचा इशारा करीत नंतरच आम्ही चालत असू. आपण लहानपणी निसर्गचित्र म्हंटलं की जे डोंगराचे  चित्र काढायचो त्याप्रमाणे माणिकगड दुरून दिसत होता. अर्धा तास पुढे गेल्यावर पायथ्याच्या गावकऱ्यांच्या जंगलात जाणाऱ्या पाऊलवाटा दिसत होत्या परंतु गडाची नेमकी वाट ठरत नव्हती. गावातला एक माणूस जंगलात भेटला तो अर्ध्या तासाने येतो म्हणाला आम्हाला त्याची वाट पाहण्या इतका वेळ नसल्याने आमची आम्ही वाट शोधत राहिलो.त्या घनदाट जंगलातून एक-दोन छोटे डोंगर पार केल्यानंतर मात्र दमट वातावरण असल्याने घामाच्या धारा मात्र पावसात नाहल्यासारख्या दिसू लागल्या.काही ट्रेकर्स मागे राहिल्याने आम्ही घळीमध्ये थांबून शिट्यांद्वारे इशारे करून पुन्हा एकत्र आलो.आमचे लाडके लीडर रोहित यांच्या लाडक्या सहचारिणीचा वाढदिवस आहे असे समजल्याने  आमच्यातील ट्रेकर पाफाळे यांनी अतिशय उत्तम काव्यातून वैशाली रोहित नागलगाव हिला सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देऊन पुढच्या प्रवासाला निघालो.
अर्धा तास धापा टाकत पुढे गेल्यानंतर पुन्हा लीडर्स वाट शोधत असताना ५-६ फूट लांबीच्या सापाने दर्शन दिल्यावर सर्वांना काठी घेऊन सावधगिरीने डोंगर चढाव करण्याची सूचना दिली. तसे आमच्यामध्ये हजारो साप पकडून सुरक्षित रित्या जंगलात सोडणारे सर्पमित्र  निकाळजे सर असताना असताना आम्हाला कसले आले भय आणि कसली आलीये भीती.
तिसरा डोंगर पार केल्यावर एका ठिकाणी पठारावर माणिकगडाचं जे काही दर्शन आम्हाला घडलं ते शब्दात वर्णन करणं खरोखरच कठीण आहे.  माणिकगड एखाद्या रत्नाप्रमाणे चमकू लागला होता कारण दाटलेले ढग सारखेच बरसत होते आणि मधेच ऊन पडत होते त्यामुळे त्या माणिकरत्नाचा तो पाषाण पॉलिश केल्याप्रमाणे चमकताना अतिशय देखणा दिसत होता.माणिकगडचा आकार आयताकृती आहे शिवाय दोन्ही बाजूला दोन सुळके एखाद्या सोबत्याप्रमाणे सोबतीला उभे आहेत. गडावर जाण्याच्या मुख्य वाटा तश्या दोन आहेत पहिली वाट माणिकची लिंगी मार्गे आणि दुसरी खिंडीतून जाते ती वाट. तेथील वाटाड्या घेतल्या शिवाय जाऊ नये.
या जंगलातून जाताना किल्ल्याचा कातळकडा नेहमी आपल्या डावीकडे राहतो एवढं लक्षात ठेवलं तरी वाट चुकणार नाही. माणिकगड या किल्ल्याला प्रदक्षिणा केल्याप्रमाणे मोठा घेरा पूर्ण करून जावे लागते त्यामुळे याला घेऱ्याकिल्ला देखील नाव आहे असे वाटते.  पाऊस एका आठवड्यापासून सुरु झाल्याने अधे मध्ये जंगलातून छोटे झरे वाहू लागले आहेत. संपूर्ण जंगल हिरव्यागार गालिच्याने आच्छादले आहे त्यामुळे चालताना सुखद गारवा जाणवत होता.जंगलातुन वाट काढताना घामाने भिजत होतो तरी पठारावर आल्यावर फिरता कुलर जसा मधेच गार वारा सोडतो तसा वेगाने गार वारा अंगाला झोंबत होता त्यामुळे थकवा कुठच्याकुठे पळून जात होता.
माणिकगडाच्या पायथ्याजवळ गेल्यावर अजून एक दुसऱ्या बाजूने येणारी वाट आमच्या वाटेला मिळाली परंतु आमच्यासोबत इतर ४-५ ट्रेकर्स सोडले तर कोणीही आम्हाला दिसत नव्हते. माणिकगडाचे  दोन्ही सुळके आता स्पष्ट दिसत होते.राजाचे २ वजीर असल्याप्रमाणे भासत होते.इथून थोड्या अंतरावर पायपीट केल्यावर दुपारी पावणेबाराच्या सुमारास वाटेमध्ये आम्हाला एक हनुमानाची मूर्ती दिमाखात उभी असलेली दिसली.  तिथेच गडावर जाण्याच्या पुढच्या वाटेविषयीचा बॅनर नेचर फ्रेंड सोसायटी पनवेल या ट्रेकग्रुप उत्तमरीत्या बांधलेला आढळला. आता इथून पुढे खरा गडाचा कातळमाथा चढाई होती त्यामुळे सर्व ट्रेकर्स थोडा वेळ थांबून पुन्हा एकत्र  निघालो त्यावेळी मात्र पावसाने चिंब भिजवले. काहींंनी छत्री काढून पावसाला पळून लावले.


पाऊस पडल्याने आता तो मातीचा चढ मात्र घसरडा झाला होता. परंतु गडाचा माथा अजून एक-दीड तासावर असेल असा अंदाज बांधून आम्ही चढाई सुरु केली. भुकेची वेळ आणि कठीण चढाईची वेळ एकच झाली. आमच्यातील एखाद दुसर्याने घसराईचा आनंददेखील घेतला असे ऐकले. आधीच मोबाइल फुटल्याने मी मोबाइल सॅकमध्ये सुरक्षित ठेवला होता परंतु संपन्न मोबाइल सेफ्टी कव्हर घेऊन सोबत असल्याने आमची अधून मधून हवी ती कातळमाथा सोबत फोटोग्राफी सुरु होती.
राणे सर, दीपक, सुप्रिया, पाफाळे सर विनोद, संपन्न, सलोनी आम्ही पुढे रवाना झालोय हे लक्षात आले परंतु पुन्हा घनदाट जंगातून वाट असल्याने त्यातदेखील २ ग्रुप झाले. सगळ्या फसव्या वाटा असल्याने ट्रेक ग्रुप मोठा ग्रुप असो वा छोटा ग्रुपसोबतच चाललेलं योग्य ठरते.  वेळ आणि श्रम वाचवल्याने फायद्याचे ठरते. 
माणिकगडाला अजून किती मोठा घेरा आहे हेच समजत नव्हते. घनदाट जंगलातून वाट काढून थोडे पुढे गेल्यावर मात्र आता खरा चढ लागला. पावसाने माती भुसभुशीत झाली होती त्यामुळे सावधगिरीने आम्ही ५-६ जण चढत होतो. त्यात इतर ४ ट्रेकर्स सोबत आमच्यातील दीपक सरसर घोरपडीसारखा सारखा गडावरील एका टप्प्यावर पोहोचल्याने तो वरून आम्हाला समोर वाट दिसत असून अजून आमच्या उजव्या हाताच्या बाजूने घेरा  करून येण्याचा इशारा करीत होता. मनात विचार आला हा तर इथून सरसर गेला आणि आम्ही का दुसरीकडून जायचे ?? तरी एका ट्रेकरचा सल्ला ऐकावा म्हणून आम्ही त्याचे ऐकून विनोद, मी, सुप्रिया थोडी रिस्क घेऊन त्याच्या इशाऱ्यावर नाचत होतो. १५ मिनिटांच्या चढाईनंतर मात्र आम्हाला अजून इतर ट्रेक ग्रुप दिसू लागले ते वडगावच्या वाटेने चढाई करीत आले होते. आम्ही एक टप्पा पार केल्यावर वरून पहिले तर तो कठीण चढ आम्ही तिघे नक्कीच चढू शकलो असतो याची खात्री पटली  कारण १००हुन अधिक ट्रेक करणारा विनोद, आणि सगळ्यात पुढे माझ्यासोबत आघाडीवर असणारी आणि दूधसागरसारखा मोठा ट्रेक करून आलेली सुप्रिया असे आम्ही सोबत होतो. वर आल्यानंतर वाटले आता चढाई संपली आहे. परंतु अजून एक मुख्य टप्पा बाकी होता. आम्ही खाली असलेल्याना वाटेचा इशारा केला आणि एका ठिकाणी बारीक धार असलेल्या झऱ्याचे पाणी रिकाम्या बाटल्यांमध्ये भरले आणि चेहऱ्यावर मारले.


माणिकगडाचं एक वैशिष्टय म्हणजे चारही बाजूने कडे असताना किल्ल्याला ठराविक अंतरावर दुहेरी स्तरातील तटबंदी दिसते. आपण ज्या खालच्या बाजूच्या तटबंदीवर पोहोचतो तिथे सुरुवातीलाच पाण्याचे टाके आहे. राणे सर, रोहित सर सर्व ट्रेकर्सना घेऊन मागोमाग आलेच. सगळेच ट्रेकर्स अफलातून थकले होते. हनुमान मंदिरापासून गडमाथ्यावर पोहोचायला दिड तास लागला. माथ्यावर पोहोचल्यावर मात्र गुलाब पाणी शिंपडावे तसे वाऱ्याच्या प्रचंड वेगाने आमचे स्वागत केले.दाटलेले ढग आपल्याला कवेत घेतात की काय असे वाटत होते. इथून किल्ल्याच्या वरच्या भागातील तटबंदीचे दोन बुरुज स्पष्ट दिसतात. आपण चालत आलेल्या पायवाटेवरून गडाचा माथा उजवीकडे ठेवत पुढे जायचं आणि गडाच्या  माथ्याला एक डावीकडून छोटा वळसा घालून आपण माणिकगडाच्या माथ्यावर पोहोचतो सकाळी साडेनऊला सुरु केलेली पायपीट दुपारी दीडच्या सुमारास थोडा वेळ थांबली.
गडाच्या माथ्यावर समोरच स्वागताला मोठा चुन्याचा घाणा आहे या चुन्याच्या घाण्याच्या समोरच माणिकगडाचं  चौकोनी आकाराचं छोटंसं प्रवेशद्वार असून त्याच्या माथ्यावरच्या पट्टीवर कोरलेली गणपतीची मूर्ती अतिशय रेखीव व सुंदर आहे.
दरवाज्याच्या शेजारीच एक छोटेखानी घुमटी आहे.
दरवाज्यातून आपण सरळ पुढे गेलो की माणिकगडाच्या सर्वोच्च माथ्यावर आपण येऊन पोहोचतो. त्यानंतर मात्र चहूबाजूस नजर फिरवली असता डोळ्याचे पारणे फिटता फिटत नव्हते. कुठून आलो, किती चाललो, किती दमलो, किती घसरलो, हे सगळे एका क्षणात विसरलो. हेच तर ट्रेकिंगचे खरे स्वर्गसुख आहे. ट्रेकिंग का करता हे विचारणाऱ्यांनी एकदा तरी हे ट्रेकसुख घेऊन बघा मगच समजेल.
गडाच्या माथ्यावरून कर्नाळा किल्ला स्पष्ट दिसत होता. दमट वातावरण असल्याने आजूबाजूचे किल्ले स्पष्ट दिसत नव्हते. नाहीतर ऊन असेल आणि आकाश निरभ्र असेल तर आणि डीएसएलआर असेल तर कलावंतीण, प्रबळगड, चंदेरी-म्हैसमाळ, साकशी किल्ला, मिऱ्या डोंगर आपण सहज पाहू शकतो. गडावरून जांभिवली धरण दिसते.
गडावर इतर ग्रुप मोठ्या संख्येने दिसले. गडाच्या एका टोकाला मोट्ठेच्या मोठे खडक उभे आहेत. पाफाळे यांनी कडक आवाजात  शिवस्तुतीचे काव्य ऐकवले आणि शिवगर्जना करून बॅनर फोटो घेऊन २च्या सुमारास जेवण करून घेतले. गडावर ऐकून ३-४ पाण्याची टाकी आहेत. वाचनात आले की गडावर एका ठिकाणी शिवलिंग आहे आणि इथे महाशिवरात्रीला मोठी जत्रा भरते तेव्हा पूर्ण वडगाव आणि जवळची गावे किल्ल्यावर येतात. हा एक छोटा भाग आमच्याकडून मिस झाला. जेवण झाल्यावर प्रत्येक नवीन ट्रेकरची ओळख करून घेतली. लिडर्सने गडाविषयी थोडक्यात माहिती दिली.माणिकगड शिवाजी महाराजांनी बांधला नसून कान्होजी आंग्रे यांनी १७०६ मध्ये बांधला आणि १८१८ मध्ये इंग्रजांनी पाडला. हा किल्ला आजूबाजूच्या किल्यांवर देखरेखीसाठी, टेहळणीसाठी  वापरला जात असे. गडावर राहण्याची जेवणाची कोणतीही सोय नाही. ती आपली आपण करावी. तसेच स्थानिक लोकांकडून समजले की गडावर नोव्हेंबर पर्यंत टाक्यांमध्ये पाणी असते. त्यामुळे उन्हाळी ट्रेकदरम्यान किमान तीन लिटर पाणी सोबत ठेवावे.
जेवणानंतर  आजच्या ट्रेकची पाहुणी बर्थडे गर्ल सौ. वैशाली रोहित नागलगावकर हिच्या वाढदिवसाचा घरून आणलेला केक कापला आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन हे नवीन दाम्पत्य असल्याने दोघांनीही मस्त उखाणा घेतला. ट्रेकदरम्यान इतक्या उंचावर वाढदिवस साजरा होणे खूप भाग्याची आणि आंनदाची गोष्ट आहे. महत्वाचे म्हणजे पहिला ट्रेक असून तिने उत्तमरीत्या पूर्ण केला थकलेल्याचा लावलेशदेखील तिच्या चेहऱ्यावर दिसला नाही. प्रिय वैशाली, एका उत्तम लीडरची उत्तम ट्रेकर पार्टनर, लाईफ पार्टनर शोभता आपण.  सलोनी हिने मेंदू जागृत ठेवण्याचे तंत्र आणि त्याचे प्रात्यक्षिक सादर केले, त्या रम्य वातावरणात सायली हजार असताना सायलीचे गाणे नाही झाले तर काय मजा मग. आपल्या मधुर खणखणीत आवाजात सायलीचे शास्त्रीय गाणे चार चाँद लावून गेले. खरंच मंत्रमुग्ध करणारं वातावरण आम्ही त्या दिवशी माणिकगडावर  अनुभवले.
गडावरून उठावेसे तर वाटत नव्हते तरीही ३च्या सुमारास परतीची वाट धरली आणि पाऊस कोसळायला लागला आम्ही पुन्हा मस्त त्या गार वाऱ्यासोबत गार पाण्यात चिंब न्हाहून निघालो परंतु उतरताना मात्र वाट चिकट आणि घसरडी झाल्याने घसारा होत होता कारण खूप ट्रेकर्स एका वेळी उतराई करीत होते. माझे गुढगे आज आवाज करीत होते आणि दुखत होते परंतु उतरणे तर भाग होते. पाऊण तास उतराई केल्यावर दीपक याने तेथील एका ठिकाणी  उंचावर जाऊन छोट्याश्या झऱ्यातून पाण्याच्या बाटल्या भरून आणून मी लिंबूचे सरबत बनवले त्याचा आस्वाद ७-८ जणांनी घेतला आणि पुन्हा उतराई सुरु केली. चढताना हनुमान मंदिराजवळून सुमारे दीड तास लागला होता तर उतरताना पायाला भिंगरी लागल्यासारखे आपोआप उतरतो त्यामुळे एका तासाआधीच हनुमान मंदिर गाठले. निसर्गमित्र ट्रेकिंग ग्रुप पनवेल यांचा ६५ ट्रेकर्स चा मोठा ग्रुप होता.
माउंटन एड्ज ग्रुप मध्ये नेहमी जसे सगळ्या एज ग्रुपचे ट्रेकर्स असतात तसे ते होते. एक तासाच्या अंतरावर गेल्यावर चालताना गप्पांच्या नादात त्यांच्यातील एक ट्रेकर आमच्यात मिक्स होऊ गेली आणि म्हणते ओह माय गॉड मी एकटीच तुमच्या ग्रुपमध्ये आहे रस्ता चुकले मी. त्यानंतर चेक केल्यावर समजले की आम्हीच आमची सकाळची सावणे गावाची पायवाट नकळतपणे सोडून वडगावच्या वाटेने त्या निसर्गमित्र पनवेल ग्रुप सोबत चाललो होतो. १८ मधील ७-८ जण पुढे होतो आणि बाकीचे खूपच मागे होते. वेळेवर फोनला रेंज मिळाल्याने संभाषण झाले. आता पुन्हा मागे जाण्यात काही अर्थ नव्हता खूप अंधार झाला असता त्यापेक्षा निसर्गमित्रच्या सोबत त्यांनी वाडगावमधील एक गाईड आणला होता त्याने वाशिवली गावात जाण्याचा सल्ला दिला.
त्यानंतर आमचे सर्व ट्रेकर्स एकत्र आल्यावर ६ वाजता वाशिवली गावाच्या दिशेने चालू लागलो. आता माणिकगडचा आकार त्रिकोणी पर्वतासारखा दिसू लागला होता. इतक्या वेगळ्या अंशाच्या कोनामध्ये आम्ही कुठून कुठे पायपीट केली होती. फसव्या वाटा असल्याने आपला वेळ वाचवायचा असेल तर गावातील वाट दाखवणारा वाटाड्या नक्की घ्यावा नाहीतर थकलेलो असताना  ३-४ कि. मी. ची. जादाची पायपीट करावी लागते आणि ती फार कंटाळवाणी, असह्य होते. एखादा गुराखी दिसला की आम्ही विचारले असता ठाकरवाडी अर्धा तास आहे असेच म्हणत असे. अर्धा तास पुढे गेल्यावर शेतात काम करणाऱ्या बायका दिसल्या त्या पुन्हा तसेच म्हणायच्या अर्धा तास बाकी आहे. ठाकरवाडी मधले लोक देखील तसेच म्हणाले अजून फक्त अर्धा तास बाकी आहे. तो अर्धा तास काय लवकर संपेना झाला होता. 
यावेळी आमच्यासोबत आमच्या बसचे ड्राइवर दादा देखील श ट्रेकला आले आणि ट्रेक पूर्ण केला. (शिल्पकार मुंडे बंधू -०८८८८९२०८४३,०८४२१६०१६२९)  ठाकरवाडी गावातून पाणी पिऊन तिथून दोन टू व्हिलर घेऊन ड्राइवर आणि आमचे लीडर राणे सर सावणे  गावाकडे रवाना झाले.

ठाकरवाडीतून वाशिवली गावात जाण्यासाठी लोहगड उतरताना जो कठीण उतार आहे अगदी तसाच होता. थकलेल्या पायाला तो शेवटचा एक तास फार मोठा आणि आठवणारा होता. ठाकरवाडीमधून उतरताना पहिल्यांदाच लालपिवळी छटा नसलेला पांढऱ्या रंगाचा सूर्यास्त कॅमेऱ्यात कैद करून वाशिवली गाव गाठले.  दुपारी ३  वाजता सुरु केलेली उतराईची पायपीट १९ कि. मी अंतर कापून साडेसातच्या सुमारास थांबली. राणे सर  ४-५ कि.मी. अंतर जाऊन आमची ट्रेक बस घेऊन येईस्तोवर आम्ही वाशिवली गावात शिवाजी देशमुख यांच्याकडे चविष्ट वडापाव आणि लज्जतदार चहाचा आस्वाद घेतला. शिवाजी देशमुख यांच्याकडे चहा, नास्ता, जेवणाची उत्तम सोय होते. मोठा ग्रुप असला तरीही त्याच्याशी संपर्क साधून उत्तम जेवणाची सोय तो करतो तसेच गडावर जाण्यासाठी गाईड देखील देतो. (शिवाजी देशमुख -८६९८७२६१११-वाशिवली गाव).
एकोणीस कि.मी ची थकवणारी पायपीट म्हणजे सेमी हार्ड ट्रेकसाठी अडव्हेंचर्सच झाली. ड्राइवर धरून १८ ट्रेकर्सचा माऊंटन एड्जचा ८५ वा ट्रेक सगळ्यांच्या सहकार्यामुळे यशस्वीरित्या पार पडला. रात्री ८ वाजता वाशिवली गावातून निघून अन्ताक्षरीच्या तालावर पुणे गाठले. लिडर्सची ऍडव्हेंचर्स  मेहनत,(दिडशेेेहून अधिक कठीण ट्रेक करणारे राणे सर, रोहित सर, निकाळजे सर) ट्रेकर्सचा संयम, आणि ड्राइवर सहित सगळ्यां नवीन जुन्या ट्रेकर्सचे सहकार्य आणि फोटोग्राफी, कविता, गाणी, मदत, यासाठी सहभाग खूप मोलाचा आहे. ट्रेकर्स ८० असोत की १८ असोत तीच मजा, तोच उत्साह, तोच जल्लोष.नवीन ट्रेकर्स सलोनी, दीपक,वैशाली, भूषण, संपन्न यांचे विशेष कौतुक आणि स्वागत आणि रेगुलर ट्रेकर्सचे मनापासून अभिनंदन.(सरिता, सायली,सुप्रिया,अपूर्वा,पफाळे सर,विनोद,शेवाळकर सर, हर्षद मित्र हो,फँटास्टिक जॉब)  
माऊंटन एड्ज ऍडव्हेंचर अँड वाईल्ड ट्रेल्स पुणे" रॉक्स.




Tuesday, 17 April 2018

मधुर मधु ट्रेक...।



मधुमकरंदगड ट्रेक
प्रकार-गिरिदुर्ग
डोंगररांग -महाबळेश्वर
चढाईश्रेणी –मध्यम
 उंची - सुमारे ४०५४ फूट
जिल्हा -सातारा
दिनांक- १४-१५ एप्रिल २०१८
मधुमकरंदगडाची थोडक्यात माहिती-मधुमकरंद गड हा सातारा जिल्ह्यात जावळी तालुक्यात आहे. तळेगावपासून सुमारे १८६ कि.मी. अंतरावर असून सुमारे साडेचार तासांचा प्रवास करावा लागतो. प्रतापगडावरून हा गड दृष्टीस पडतो. गडाची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे ४०५४ फूट इतकी आहे. मधुमकरंद जुळ्या भावंडांप्रमाणे आहेत `सातारा रायगड आणि रत्नागिरी या तीन जिल्ह्यांची हद्द म्हणजे मधू शिखर होय. शिवाजी महाराजांच्या काळात आजूबाजूच्या गडांवर टेहेळणीसाठी या गडाचा वापर होत असे . जावळीच्या घनदाट खोऱ्यात हा गड वसलेला आहे. गडाचे वैशिष्ट्य असे की आकाश निरभ्र असेल तर दुर्बिणीच्या साहाय्याने गडाच्या एका टोकावरून महाबळेश्वर दिसते तर दुसऱ्या बाजूने कोकणातील विलोभनीय दृश्य आपण पाहू शकतो
शेतकऱ्याला जसे ऊन, वारा, पाऊस, थंडी ची पर्वा नसते तो आपला सतत कार्यरत असतो. तसेच आम्हा ट्रेकर्सना कोणत्याही ऋतूमध्ये ट्रेक असला तरी कसलेही भय वाटत नाही. ट्रेकचा मेसेज माउंटन एज  ट्रेकग्रुप वर येऊन  धडकला  की महत्वाची कामे आटोपून आणि तब्बेत ठणठणीत ठेवून ट्रेकला सदैव तयारच असतो. दिनांक १४-१५एप्रिल २०१७ चा माऊंटन एज ऍडव्हेंचर ट्रेक ग्रुपचा ८३ वा मधुमकरंदगड ट्रेक दिवस उजाडला आणि आनंदाला पारावार राहिला नाही. कारण फेब्रुवारी सुरु झाला की ऊन मी म्हणत असते त्यामुळे ट्रेकला जाताना जरा धाडस करूनच पूर्ण तयारीनिशी जावे लागते. गडाच्या उंची आणि अंतरानुसार पाणी घावे, ट्रेक सॅक कमीत कमी वजन असलेली, डोक्यावर टोपी, सफेद रुमाल,पंचा, ट्रेक शूज, सैलसर ड्रेस, फोटोसाठी कॅमेरा किंवा मोबाईल, खजूर, लिंबू सरबत किंवा ग्लुकॉन डी,मोबाईल बॅटरी सहायक, टॉर्च, जरुरीनुसार औषधे, जादाचा एक ड्रेस, किमान इतक्या तयारीत ट्रेकरने असावे.

रणरणत्या उन्हामुळे १५एप्रिल रविवारी सकाळी ट्रेक सुरु करावयाचा असल्याने  शनिवारी रात्री ११ वाजता आम्हा ६१ ट्रेकर्सच्या दोन बसेस तळेगांव-निगडी-बिजलीनगर-डांगे चौक-चांदणी चौक- सातारा हायवे - वाई फाटा- पाचगणी -महाबळेश्वर- आंबेनळीघाट-पारगांव बायपास-शिवकालीन ब्रिज - हातलोट मार्गे जावळीच्या घनदाट अरण्यातून घोणसपूर- मधुमकरंदगड कडे निघाली. दरम्यान प्रवास सुखाचा होण्यासाठी नारळ फोडून मध्ये पुढे  एका ठिकाणी १० मिनिटांचा ब्रेक घेऊन पुढच्या प्रवासाला निघाली. वाई फाटा सोडल्यानंतर गार वारा सुखावून गेला आणि खुणावू लागला की आता तुम्ही महाबळेश्वरच्या हद्दीत पदार्पण केले आहे. इतक्या अंधारात तो घाट पार करताना उजव्या हाताला अनेक गड  किल्ले आणि आजूबाजूचा परिसर मंद दिव्यांनी काजव्याप्रमाणे लुकलुकत होता.राजेंच्या पावनभूमीत आहोत याचा अभिमान आहे मला. बघता बघता हलक्या डुलक्या घेत असतानाच पहाटेचे ५ वाजले आणि त्या जावळीच्या घनदाट जंगलात आमची बस थांबून लीडर्सनी खाली उतरून थोडा अंदाज घेतला की बरोबर चाललो आहोत ना ? कारण ती मॅप वाली मधेच झोप लागल्यासारखी थांबली होती. १० मिनिटे पुढे गेल्यांनतर समजले की आम्ही न चुकता अगदी बरोबर चाललो होतो. 

सकाळी ६ च्या दरम्यान आम्ही जंगल व्हॅली रिसॉर्ट या ठिकाणी पोहोचलॊ. बसमधून उतरून पटापट फ्रेश होऊन इडली चटणीचा नास्ता करून त्या सकाळच्या प्रसन्न वातावरणात मनसोक्त फोटोग्राफी करून पुन्हा मधुमकरंद गडाकडे निघालो. इथून सुमारे ४-५ की. मी अंतरावर मधुमकरंद गड आहे. सकाळी ७ वाजता लीडर्सनी ट्रेकसंदर्भातील सूचना देऊन लगेच ट्रेकला सुरुवात केली. मधुमकरंदगड हे एकमेकांना जोडलेले आहेत.

कारवीची मातीची कौलारू घरे, प्रत्येक घरापुढे शेणाने सारवलेले अंगण, घरासमोर भाताच्या लोम्ब्यांच्या राशी, प्रत्येक घराला कुंपण,सकाळ्ची कोवळी सूर्यकिरणे धरणीमातेला भेटावयास आली आणि धरणी उजळून निघाली. अप्रतिम असे ते दृश्य मला माझ्या माहेरची आठवण करून देत होते. 

शिवगर्जना करून ट्रेक सुरु झाल्यावर लगेचच एक नदी (सध्या एका ठिकाणी अगदी तळाशी पाणी असलेली) त्यावर असलेला छानसा पूल ओलांडून, काही कौलारू घरांची अंगणे पार करीत  आम्ही त्या घनदाट जंगलात प्रवेश केला.  अजून वॉर्म अप होईपर्यंत खरी कसोटी असते याच चढावावर प्रचंड धाप लागली, घाम गळू लागला होता परंतु हिरवेगार घनदाट जंगल असल्याने आणि सकाळची वेळ असल्याने थोडा गारवा असल्याने तोच घसरणारा चढाव देखील जर सोपा वाटू लागला.
डिहायड्रेशन होऊ नये म्हणून तहान लागली नाही तरी थोडे थोडे पाणी जरून प्यावे.या जंगलात मधमाशांचा रहिवास असल्याने डार्क परफ्युम अथवा डिओड्रंट न मारलेला उत्तम. आणि चढताना उतरताना वाटेच्या बाजूच्या झाडांना फांद्यांना न धरलेले चांगले कारण चापड्या आणि इतर सरपटणारे विषारी साप या फांद्यांवरच लपलेले असतात त्यामुळे  सावधगिरी बाळगलेली उत्तम. गावातुन चढताना गावातील २ जण  त्या जंगलातून कळशीभरून मध घेऊन येताना आणि बाटल्यांमध्ये भरताना आमच्यातील काहींना दिसले.
 

२ तासाच्या अंतरावर गेल्यावर गडाच्या मध्यात श्री मल्लिकार्जुनाचे देऊळ लागले. त्यात सुंदर असे वेगळ्या प्रकारचे शिवलिंग पहावयास  मिळाले.  
इथे राहण्याची उत्तम सोय होते तसेच आपल्याला हवे असल्यास जेवणाची सोय देखील होते.  आपल्याला शाकाहारी  जेवण बनवण्यासाठी येथील भांडी आपल्याला मिळू शकतात. या मंदिरात दरवर्षी यात्रा भरते. इथे जंगम समाज असल्याने जास्तीत जास्त शंकराची मंदिरे आढळतात. या ठिकाणी कै. एम आर  भिलारे याच्या अर्धपुतळ्याचे स्मारक बांधले आहे. तसेच विसाव्यासाठी एक पत्र्याचे शेड बांधलेले दिसले.
या ठिकाणाहून कोयना धरणाचा दूरवर पसरलेला अथांग जलाशय उठून दिसत होता. तसेच अधून मधून आभाळ आल्याने सूर्यकिरणांचा लपंडाव सुरु होता.  
सर्व ट्रेकर्स या मंदिरापर्यंत आल्यानंतर गडाचा वरचा टप्पा सुरु केला. थोडी विश्रांती न घेतलेली बरी कारण शरीर थंड झालं की पुन्हा सुरुवातीचा वॉर्म अपचा कठीण अनुभव येतो. परंतु ट्रेकर्स जास्त असल्याने कोणाचीही गैरसोय होऊ नये, फसव्या वाटा चुकू नयेत यासाठी सर्व ट्रेकर्स पुन्हा सोबत निघाले. काही ट्रेकर्सने मोबाईलला साऊंड सिस्टीम कनेक्ट करून गाणे लावले. लीडर्सनी इथे मात्र अडवले ते बरे केले.  लीडर्सच्या बोलण्याचा कोणीही राग मनू नये. नियम सगळ्यांना सारखेच.  ट्रेकर्स हो, सुमधुर संगीत सगळ्यांना आवडते परंतु तेच संगीत निसर्गाच्या ठिकाणी मोठ्या आवाजात न लावलेले बरे कारण हे जंगल हा निसर्ग प्राणी-पक्षी यांचे घर आहे. आपण त्यांच्याच घरात जाऊन त्यांचाच त्रास देतो हे कितपत योग्य आहे? कसल्याही मोठ्या आवाजाने हे प्राणि पक्षी व्यत्ययीत होतात. आपल्या घरात येऊन आपल्यावर  कोणी रुबाब केलेला, हक्क गाजवलेला, आपल्याला त्रास दिलेला चालेल का आपल्याला? नाही चालणार. मग आपण देखील निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर प्राणि, पक्षी, पानाफुलांची सळसळ, वाऱ्याचा नाद, सूर्यकिरणांचा लपंडाव याचा अनुभव घेऊ. ओंकारचा जप करून पाहू यातदेखील आपण मनमुराद आनंद घेऊ शकतो.
गडाच्या मध्यानंतर वणवे लावून गवत पेटवले होते त्यामुळे वाटा स्पष्ट दिसत होत्या परंतु एखाद दुसरेच झाड दिसत होते.त्यामुळे सकाळचे साडेदहाच  वाजून गेले होते तरी उन्हाने घामाच्या धारा सुरु झाल्या होत्या परंतु त्या अधिक शोभून दिसत होत्या आणि त्या घामाने सगळ्यांचे चेहरे चकाकत होते. माथ्यावर जायला २ वाटा आहेत एक डावीकडून एक उजवीकारून दोन्ही वाटा घसरड्या आणि कुठेही रेलिंग नसलेल्या आहेत त्यामुळे सावकाश आणि सांभाळूनच जावे. काही ट्रेकर्स डावीकडून गेले.
आम्ही उजव्या बाजूने गेलो या बाजूने खूप चढून पुढे गेल्यावर पांडवकालीन पाण्याचे तळे पाण्याने भरलेले दिसले.  ही खांब असलेली रहाण्यासाठी कोरलेली गुहा असावी त्यानंतर ती गुहा खोदून त्याचे तळे बांधले गेले. हे पाणी पिण्यालायक आहे.इथे हातपाय धुण्यास सक्त मनाई आहे.  या तळ्यातूनच खाली पायथ्याच्या गावामध्ये पाईपने इतक्या उंचावरून पाणी घेतले आहे आणि ते पाणी एका दगडी टाकीमध्ये साठवून त्या पाण्याच्या टाकीला वरून शेड केले आहे त्यामुळे पाणी अगदी बर्फतुल्य आणि अमृततुल्य आहे.

ते पाण्याचे तळे पार केल्यावर पुन्हा थोडा कठीण चढ लागतो. एका ट्रेकरने वरून आवाज दिला इथून मुलींनी येऊ नका दुसऱ्या सोप्या वाटेने या. असे म्हंटल्यावर  मग वाघिणींच्या शेपटावर पाय दिल्यासारखे वाटले. त्यानंतर मग आम्ही हटकून त्याच वाटेने गडाचा माथा गाठला. हो वाट कठीण जरूर होती परंतु अशक्य नव्हती. आमच्यासोबत इतके अनुभवी लीडर्स असताना आणि मनात जिद्द असतं कोणतीच गोष्ट अशक्य नाही असे मला वाटते. गडाच्या माथ्यावर पुन्हा एक शिवमंदिर आणि एक स्मारक दिसले.स्मारकाजवळ फडकणाऱ्या भगव्यासोबत फोटो काढून आणि मंदिरात दर्शन घेऊन तिथेच थोडावेळ बसलो.कृपा करून कोणत्याही गडावर कोणत्याही  स्मारकावर, तोफांवर, ऐतिहासिक संपत्तीवर कोणीही उभे राहून फोटो काढून नये.  तिथे एक-दोनच झाडे होती इतक्या उंचावर भर उन्हात अश्यावेळी झाडांची महती कळते. 

आजूबाजूला दिसणाऱ्या गडकिल्यांविषयी परिसराविषयी लीडर्सनी थोडक्यात माहिती दिली.इथून जर आकाश निरभ्र असले तर एका बाजूला महाबळेश्वर, एका बाजूला महिपतगड, रसाळगड, सुमारगड दिसतात, प्रतापगड गड दिसतो.जे महाबळेश्वरचे प्रसिद्ध पॉईंट ट्रिपला जाणारी लोक अनुभवतात तेच कठीण पॉईंट आमच्या लीडर्सनी ट्रेक करून चढून आलेत आणि टाळ्यांची दाद मिळवळीये तो अनुभव ऐकून आम्हाला आमच्या माउंटन एज ग्रुपचा आणि ग्रुप लीडर्सचा अभिमान वाटतो.   

मधू सुळक्यावरील वाट तशी निमुळती आहे शिवाय दोन्ही बाजूला घसरड्या उतरणी आहेत कोणी अचानक घसरला तर दरीतच पडणार. त्यामुळे ६० जणांचा मोठा ग्रुप घेऊन मधू सुळक्यावर जाण्याचे आमच्या लीडर्सने टाळले. ११ च्या सुमारास गड उतरण्यास सुरुवात केली आता आम्ही दुसऱ्या बाजूने उतरू लागलो. वाट घसरडीच होती. रिस्क घेणे आपला छंद आहे म्हणा. इतके अनुभवी लीडर्स आणि  ट्रेकर्स सोबत असताना कसले आले भय आणि धास्ती कर लो थोडी मस्ती.
उतरताना सोबत आणलेल्या पिशवीमध्ये गडावर  थोडाफार प्लास्टिकचा कचरा होता तो भरून आणण्याचे उत्तम कार्य आमच्यातील ट्रेकर्सने केले. तसा गड बऱ्यापैकी स्वच्छ होता.गावकरी या बाबतीत जागरूक असलेले दिसले.

१२ च्या सुमारास गडाच्या मध्यभागी आल्यावर पत्र्याच्या शेडमध्ये क्षणभर विश्रांतीसाठी बसले असताना इतिहाप्रेमी सारंग याने जाणता राजा नाटकातील संवादाचे सादरीकरण उत्तमरीत्या केले. साडेबाराच्या सुमारास गड उत्तराईस सुरुवात केली. लगेच हरणटोळ या सापाने आम्हाला झाडावर उभे राहून सलामी दिली. चाललात का शूरवीर ट्रेकर्स हो ? शांततेत जावा. सर्पमित्र निकाळजेंनी सापाला पकडून सापांविषयी माहिती देऊन साप पुन्हा जंगलात त्याच्या घरात सोडला. जो गड चढताना जितका कठीण वाटत होता तोच गड  आता पायाला भिंगरी लावल्यासारखे  आम्ही उतरत होतो. झाडांचा पाला तुडवीत उतरत होतो. सपसपसप आवाज होत होता. येथील घनदाट अरण्यात हिंस्र श्वापदांची वस्ती आहे. झाडांची छोटी मोठी मुळे जमिनीतून  वर आल्याने पाय अडकवून काहीजण पडत होते. याच वाटेने आपण गेलो यावर विश्वासच बसत नव्हता. जो गड चढताना  ३ तास लागले तोच गड  आम्ही एक ते दीड तासात उतरलो. उतरताना मला असे वाटत होते की तोच पालापाचोळा, झाडांची मुळे, झाडांची सावली, पानांची सळसळ, गार वारा पिशवीत भरून आणावा.  उतरल्यानांतर बाकीचे ट्रेकर्स येईपर्यंत  जाताना भेटलेल्या अनुसया आणि सुमन या दोघींसोबत आम्ही गप्पा मारल्या त्यांचा निरोप घेऊन बसजवळ आलो. आता मात्र पोटात कावळे नाहीतर डोमकावळे  ओरडायला लागले होते.  
पाणी पिऊन पिऊन पोटाची विहीर झाली होती. सगळे ट्रेकर्स आल्यावर आमच्या बस ४-५ कि.मी वर असलेल्या जंगल व्हॅली रिसॉर्टकडे निघाल्या. जावळी खोऱ्याच्या घाट वळणाच्या रस्त्यावर उतारावर एका ठिकाणी बस मागे जाऊ लागली तेव्हा सगळ्यांचे धाबे दणाणले होते. सगळे जण खाली उतरून चाकाखाली दगड लावण्याचा पराक्रम करून मग बस एका झटक्यात पुढे गेली तेवढाच १० मिनिटे आम्हाला जंगल सफारीचा आनंद घेता आला. 

सकाळी ज्या रिसॉर्टला उतरलो होतो त्याच ठिकाणी लीडर्सने आमची जेवणाची उत्तम सोय केली होती. इतक्या घनदाट जंगलात रहाण्याची,जेवणाची उत्तम रीतीची सोय असणारे रिसॉर्ट असणे हीच एक किमया आणि नवल होते. अप्रतिम चविष्ट जेवण, झाडाला बांधलेला झोपाळा, भाज्या आणि स्ट्रॉबेरीचा छोटा मळा, वाहता एक पाण्याचा पाट असे सगळे  भारी आंनंददायी  वातावरण असल्याने सगळे ट्रेकर्स थोडावेळ तिथेच विसावले आणि प्रतापगडाची  धावती भेट कॅन्सल केली. 

आमच्यासाठी उत्तम जेवण बनवणाऱ्या त्या रिसॉर्टच्या कर्मचाऱ्यांचा निरोप घेऊन आम्ही दुपारी ४ वाजता इथून निघालो आणि ४०० वर्षांपूर्वीच्या शिवकालीन शिवाजी पुलाच्या भेटीस निघालो. ह्या पुलाचे बांधकाम अतिउत्कृष्ट आहे आणि वेगळे आहे. इतक्या वर्षानंतर अजूनदेखील हा पूल जसाच्या तसा आहे.वरून पाषाण हृदयी दिसणारी एखादी व्यक्ती मनाने फार हळवी असते त्याप्रमाणे वरून साधा डांबरी दिसणाऱ्या रस्त्याच्या खाली इतका मजबूत दगडी पूल आहे.  यावर पुलाखाली गेल्यावर विश्वास बसला. उत्कृष्ठ बांधकामाचा उत्तम नमुना म्हणजे हा शिवाजी पूल आहे. शक्ती आणि युक्तीसाठी ग्रेट शिवरायांना सलाम.

वेळेअभावी प्रतापगडाची धावती भेट कॅन्सल केल्याने मी मनोमन खर तर नाराज झाले होते.  परंतु चेक कोस्टच्या थांब्यावर दुसऱ्या  बसमधले महान गायक आमच्या धावत्या भेटीला आले आणि दुसरी बस चालू झाल्याने आमच्याच बसमध्ये बसले त्यामुळे तालासुरात अंताक्षरी, जुगलबंदी, मग दम शेराज आणि मग नेहमीप्रमाणे हमरीतुमरी शिवाय मजाच नाही रे. असल्या संगीतमय वातावरणात प्रतापगडची धावती भेट मी कधी विसरले मला समजलेच नाही. त्यानंतर मॅप्रो गार्डनला १५ मिनिटांची भेट दिली आणि आमच्या प्रतीक दादाला शहर आणि जॉब बदलीचा छोटासा आईस क्रिमचा सेंड ऑफ दिला(अजून मोठा सेंड ऑफ बाकी आहे काळजी नसावी)  आणि आम्ही पुन्हा त्याच घाटमार्गे पुणेकडे रवाना झालो. लीडर्सचे उत्तम नियोजन, सर्व ट्रेकर्सचे उत्तम सहकार्य, सर्वांचा वातावरण उत्तम ठेवण्यास सहभाग, या सर्वामुळे माऊंटन एज ऍडव्हेंचर ट्रेक ग्रुपचा ८३ वा मधुमकरंदगड ट्रेक उत्तमरीत्या पार पडला. मंदार सर, राणे सर, अनिल सर, सर्पमित्र निकाळजे (रोहित मिसिंग )यांना मनापासून धन्यवाद. नवीन ट्रेकर्सचे स्वागत, सर्व फोटोग्राफर्सचे खूप खूप कौतुक. लिटिल चॅम्प्स कृष्णा आणि आदित्यचे कौतुक. माऊंटन एज ऍडव्हेंचर ट्रेक ग्रुप रॉक्स