Tuesday 4 October 2016

"भरारी"

सैराट



सैराटहा मराठी चित्रपटावर जेव्हा प्रदर्शित झाला मला तो चित्रपट मनापासून आवडला. त्यामागची कारणे अनेक आहेत. त्यावेळीच मला त्या चित्रपटाविषयी थोडंसं काहीतरी चांगले लिहावे असे वाटले होते परंतु माझ्याकडून राहून गेले. अजूनही या चित्रपटाची जादू कायम आहे त्यामुळे मी एक प्रेक्षक म्हणून आज जरी मी लिहिले तरी वावगे ठरणार नाही असे मला वाटते.


सैराटहा मराठी चित्रपट दिनांक २९ एप्रिल २०१६ या दिवशी प्रदर्शित झाला. सैराट च्या गाण्यांची जाहिरात दूरदर्शन वर मी पहात असे त्यावेळी मला वाटायचे की हा सिनेमा सुपरडुपर हिट होईल आणि सुपरडुपर हिट झालाच. मला अश्या चांगल्या वाटणाऱ्या चित्रपटासाठी पहिल्या दिवशी सिनेमागृहात जावे असे नेहमीच वाटते परंतु सैराट ज्या दिवशी प्रदर्शित होणार होता त्यादिवशीचे सिनेमागृहाचे तिकीट मला मिळेल की नाही यात शंकाच होती. सिनेमागृहाचे सैराटचे शो हाऊस फुल्ल होते. तरीही माझं नशीब कधीकधी साथ देते म्हणा. अगदीच पहिला दिवस आणि पहिल्या शो ची तिकिटे नाही मिळाली परंतु पहिल्या दिवशीच्या शो ची तिकिटे मिळाली ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट होती.सिनेमागृह कुठले ते मात्र विचारू नका. सिनेमा ला गेले सिनेमा खूप आवडला सिनेमाने सिनेमागृह दणाणून सोडले होते. सगळे झिंगूनच बाहेर पडले. 

सिनेमाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे हे आहेत. संगीत दिग्दर्शक माझे आवडते अजय-अतुल ह्यांची गाणी अफलातून, मन मोहवून टाकणारी, याड लावणारी आणि ठेका धरून नाचायला लावणारीच आहेत.नागराज मंजुळे, नितिन केणी आणि निखिल साने यांनी आटपाट प्रोडक्शन, एस्सेल व्हिजन प्रोडक्शन्स आणि झी स्टुडिओ या बॅनर अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती केली.चित्रपटातील बहुतेक सर्व गाणी अजय-अतुल यांनीच लिहिली असून पार्श्वसंगीतही त्यांनीच दिले आहे.  सैराट हा मराठी चित्रपट सृष्टीत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने आजपर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले. चित्रीकरणासाठी मंजुळे सरांनी सोलापूर जिल्ह्यातील जेऊर ह्या त्यांच्या स्वतःच्या मूळ गावाची निवड केली. हा चित्रपट महाराष्ट्र, गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, कलकत्ता, भिलाई, रायपूर, कर्नाटक, तेलंगण या ठिकाणी इंग्रजी उपशीर्षकांसहित प्रदर्शित करण्यात आला .यातले कलाकार म्हणजे आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू ह्या नव्या जोडीने आणि तानाजी गालगुंडे,अरबाज शेख पहिल्याच सिनेमात उत्तम अभिनय केला आहे. आहेच शिवाय नागराज मंजुळेदेखील कलाकार म्हणून दिसतात. अजून  इतर कलाकारांसोबत माझे ट्रेकचे फ्रेंड्स देखील आहेत. पूजा डोळस, मिथुनचंद्र चौधरी हे कलाकार आहेत. ते दोघे ह्या चित्रपटाचे सहायक दिग्दर्शक देखील आहेत. आम्ही वासोटा किल्ला ट्रेक, कातळधारा ट्रेक, आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई चा ट्रेक असे २-३ ट्रेक सोबत केले आहेत आणि मला याचा प्रचंड अभिमान आहे. ही दिग्दर्शक, कलाकार मंडळी अतिशय टॅलेंटेड आहे पण तरीही माणूस म्हणून खूप साधी आणि प्रेमळ आहेत. पुन्हा कधी सोबत ट्रेक होईल तेव्हा मी त्यांच्यासोबत नक्की सेल्फी फोटो काढणार.मंजुळे सर सुद्धा खूप अगोदर फोना च्या ट्रेक ला येत असत परंतु तेव्हा मी ट्रेक नव्हते करत. शिवाय पूजा डोळस यांचा भाऊ अभिषेक डोळस आणि श्वेता अभिषेक ही जोडी सिंगापुर ला राहतात. हे देखील २ ट्रेकला सोबत होते. सिंगापूर ला राहतात पण पुण्यात आले की नक्की सह्याद्रीच्या रांगेत ट्रेक ला येतात. एकदा ट्रेकला सिंगापूर च्या खूप छान छान गोष्टी सांगत होते. मी ऐकलंय श्वेता आणि अभिषेक डोळस ही सिंगापूरची जोडी पुण्यात आलीये. त्यामुळे एखादा ट्रेक सोबत झाला तरी आम्हाला आवडेल.  मी कधी जाईन तेव्हा जाईन परदेशात. आमच्या वतीने आमचे मित्रमंडळीच परदेशी वाऱ्या करून येतात आणि तिथले अनुभव, गंमती-जमती सांगतात. परंतु आपल्या भारतापेक्षा इतर काही देशात स्वच्छता विषयक नियम आणि इतर नियम अतिशय काटेकोरपणे पाळले जाते. आपणदेखील ही अशी शिस्त बाळगली तर वाह क्या बात है.. पण तरीही माझा भारतच सुजलाम सुफलाम आहे आणि मला प्यारा आहे. अनेक जाती-धर्म, अनेक भाषा, अनेक वेशभूषा तरीही अजून टिकून आहे. आणि त्यात सह्याद्री सारखा निसर्ग आहे की ज्यामध्ये आम्ही सध्या ट्रेकिंगचा आनंद घेतोय. हिमालयात जाईन तेव्हा जाईन पण अजून माझ्या महाराष्ट्रातले किल्ले तरी पूर्ण होऊ देत.  ट्रेक म्हंटले की मला दुसऱ्या सगळ्या गोष्टीचा विसर पडतो.   


तर मी सैराट विषयी बोलत होते. सगळ्याच कलाकारांचा अभिनय खूप छान झाला आहे. आता गं बया बावरलं”, “सैराट झालं जी’, “याड लागलं”, “झिंगाट”, ही गाणी अप्रतिम आणि तालसुरातील आहेत. मी तर जेव्हा ही गाणी आली असतील तेव्हापासून फोन मध्ये डाऊन लोड करून घेतली आहेत.  परवा  दांडियाच्या ठिकाणी प्रभाचा ग्रुप डान्स होता तिथेही  सैराट च्या गाण्यावर दीड वर्षाच्या मुलासहित ६-७ जणांनी नाच केला. लग्नाची मिरवणूक असो,गणपती बाप्पाची मिरवणूक असो की देवीची मिरवणूक असो सैराट च्या गाण्याची जादू कायम आहे. या सिनेमातील नवख्या कलाकारांचे आयुष्यच बदलून गेले आहे. जगाच्या इतिहासात सिनेमाच्याजगात सैराट चे नाव कायमचे कोरले गेले आहे. आजही सैराट सिनेमाची नशा तशीच आहे. सैराट मधले बरेच कलाकार सोलापूरचे असल्याने माझ्या आजूबाजूचे सोलापूरकर तर हवेत होते आणि अजूनही आहेत. आणि शिवाय चित्रीकरणदेखील सोलापूर मधेच झाल्याने सॉलिड भाव खातात सोलापूरकर. अर्थात ज्याला त्याला आपल्या मायभूमीच्या मित्रांचा अभिमान असतोच तसेच मलाही आहे. मी पण वेळोवेळी जाम भाव खाल्ला.  सैराट चे कलाकार पूजा डोळस आणि मिथुनचंद्र चौधरी हे माझे ट्रेक मधले अतिशय जवळचे फ्रेंड्स आहेत. नागराज सरांना मी प्रत्यक्ष कधी भेटले नाही परंतु जेव्हा त्यांना वेळ असायचा तेव्हा ते फोना सोबत ट्रेकिंग ला येत होते.खरोखर मला माझ्या सर्व मित्रमंडळींचा खूप जास्त आदर आणि अभिमान आहेच.
माझ्या वॉट्स अँप प्रोफाइल चे नाव सुद्धा मी सैराट ठेवले आहे.
"सैराट" ही निरागस प्रेमाची कथा आहे. सैराट म्हणजे कोणतेही बंधन न मानता मनमोकळे जगणे, वावरणे. सैराट ची  कथा, गीते, संगीत, कलाकारांचा अभिनयसगळॆच उत्तम आहे. सैराट चे डायलॉग तर सतत वॉट्स अँप वॉर चालू होते. "मराठीत सांगितलेले कळत नाही का इंग्लिशमध्ये सांगू का?"आजही लहान- थोरांच्या तोंडून सैराटचे डायलॉग ऐकतो आपण. सैराट चा शेवट मन हेलावणारा आहे. त्यावर अनेकांनी विचार मांडले. परंतु हा सिनेमा आहे. एखाद्या दिग्दर्शकाला त्यावेळी जे सुचले ते त्याने केले. अहो असं काय करता सिनेमा जगप्रसिद्ध झाला. आता  सिनेमाचा शेवट काय घेऊन बसलाय? काहींनी दिग्दर्शकाच्या खाजगी आयुष्यात डोकावून त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार केला बातमीपत्रात अनेक बातम्या वाचायला मिळत होत्या. परंतु कोणाचे खाजगी आयुष्य आणि सिनेमा याचा एकमेकांशी संबंध जोडू नये असे मला वाटते. एखाद्या हिंदी सिनेमाच्या दिग्दर्शकाला असे प्रश्न सहसा केले जात नाहीत. पण  साधा माणूस दिसला प्रसिद्धीच्या झोतात येताना दिसला की त्याला खाली कसा आणण्याचा हे लगेच लोकांना समजते. नागराज मंजुळे यांच्या फॅन्ड्री नंतर सैराट च्या यशामागे सिनेमाच्या दिग्दर्शकांची कलाकारांची आणि सगळ्यांचीच काय मेहनत असते ते त्यांचे त्यांनाच माहिती. या विषयात आपण प्रेक्षकांनी न पडलेले बरे असे माझे मत आहे. शाळेत एखादा नाच किंवा छोटे नाटक बसवायचे असेल तरी काय ढोर मेहेनत घ्यावी लागते ते मला स्वतःला माहित आहे. सिनेमा बनवणे आणि तो जगप्रसिद्ध होणे ही खूप मोठी कौतुकाची आणि अभिमानाची गोष्ट आहे.

"सैराट" चित्रपटाच्या गाण्यांमधून 'झिंगाट' नृत्य करणाऱ्या आणि 'सैराट झालं जी' म्हणत प्रेमाची वेगळी परिभाषा सांगू पाहणाऱ्या या सिनेमातील नायक नायिकेने प्रेक्षकांना याड लावलंयच शिवाय या चित्रपटात आणखी काही जमेच्या बाजू आहेत. जगभर गाजलेला फॅन्ड्री हा चित्रपट बनवणारा दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे यांचा हा दुसरा चित्रपट आहे. अजय-अतुल या प्रतिभावंतांनी या सिनेमाला दिलेलं संगीत ही जमेची बाजू आहे.  बर्लिन अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०१६ मध्ये सहभागी झालेला एकमेव मराठी चित्रपट आहे. बर्लिन अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आजवर निवड झालेला केवळ चौथा मराठी चित्रपट आहे. हॉलीवूडमध्ये संगीत रेकॉर्डिंग झालेला 'सैराट' हा केवळ मराठीच नव्हे तर भारतातील पहिला चित्रपट ठरलाय.रिंकू राजगुरु या इयत्ता नववीत शिकणाऱ्या अकलूजच्या (सोलापूर) मुलीने  पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावलाआहे. हा सिनेमा जगप्रसिद्ध होण्यास अशी एक ना अनेक कारणे आहेत.

पिस्तुल्या”, “फँड्रीआणि आता सैराट'’या तीनही चित्रपटासाठी अनुक्रमे सुरज पवार, सोमनाथ अवघडे आणि रिंकू राजगुरु यांना सलगपणे राष्ट्रीय पुरस्कार मिळवून देऊन हॅट्रिक साधणारे कदाचित एकमेव भारतीय चित्रपट दिग्दर्शक - नागराज पोपटराव मंजुळे हे आहेत. नवख्या गावच्या पोरांना(की ज्यांना अभिनयाचे काहीही ज्ञान नव्हते ) घेऊन अफलातून अविश्वसनीय काम करून घेणारा दिग्दर्शक अशी आपली ओळख मंजुळे यांनी बनवली आहे.  खऱ्या अर्थाने सिनेमॅटिक भाषेचा वापर करणारे ,सामाजिक भान असणारे,जातीपातीच्या विषमतेला मुठमाती देण्यासाठी झटणारे  दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे आहेत. या सिनेमाची प्रदर्शित झालेली गाणी दर्जेदार व प्रेक्षकांची मनं जिंकणारी आहेत.  आकाश ठोसर हा मराठी चित्रपट सृष्टीला मिळालेला अगदी साजेसा असा देखणा नायक आहे. एकाच त्याच त्याच अपेक्षांच्या  साच्यात बसवलेल्या आपल्या प्रेक्षकांना  नव्यानं चित्रपटाची भाषा समजून सांगणारा चित्रपट ठरला आहे. 
सिनेमा गृहात सिनेमा पाहताना पूजा मॅडम, मिथुन सर, आणि मंजुळे सर पडद्यावर दिसले की मी हाताचा शंख करून ओरडून दाद देत असे. आपली माणसे प्रत्यक्ष पडद्यावर पहाताना अभिमानाने उर भरून येतो. सैराट सिनेमा पाहणारी प्रत्येक व्यक्ती गाण्यावर नाच करायला जागेवरून उठून त्या स्क्रिन जवळ जाऊन नाचत होती. सैराटमय झाले होते सगळे. झी मराठीच्या हवा येऊ द्या या कार्यक्रमात सैराट ची टीम आल्यावर आम्ही टीव्ही समोर बसून सगळे संवाद ऐकून सैराट ची जादू अनुभवत असायचो. सैराट सिनेमा टीव्ही वर आला तरी सैराट ची जादू यत्किंचितही कमी झालेली नाही.  सैराट विषयी जेवढे चांगले बोलावे तेवढे कमीच आहे.
मला मराठी मातीचा, मराठी माणसाचा, मराठी भाषेचा, मराठी सिनेमाचा गर्व नाही तर माज आहे. प्रत्येक मराठी माणसाला मराठी मातीचा, मराठी माणसाचा, मराठी भाषेचा, मराठी सिनेमाचा अभिमान असलाच पाहिजे. सैराट सारखे असे अनेक उत्तमोत्तम मराठी सिनेमे तुमच्याकडून बनू देत आणि जगप्रसिद्ध होऊ देत. "सैराट"च्या सर्व टीम ला पुढील  वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

1 comment: