Monday 25 January 2016

"पुनरुत्थान समरसता गुरुकुलम"
क्रांतिवीर चाफेकर विद्यालय परिसर,
गावडे जलतरण तलावाशेजारी,
पंढरीचा मळा,
चिंचवडगाव, पुणे-४११०३३.


कुठून सुरुवात करावी हे समजतच नाहीये आज. सध्या मी  ट्रेक ला जावून आले की गंमती, मजा, आपण आयुष्य कसे आणि कित्ती आंनदाने उपभोगतोय याबद्दलचा माझा blog असायचा. तो पुढेदेखील असेलच  अर्थात मी ट्रेक ला गेले तर.
परंतु काल  मी अशा एका ठिकाणाला भेट दिली आणि खारीचा वाटा उचलला की जिथे तुम्हीही जाल तर पुन्हा पुन्हा भेट देवून खारीचा वाटा उचलालच. मी रविवारी दिनांक २४ जानेवारी २०१६ या दिवशी  "पुनरुत्थान समरसता गुरुकुलम" या गृरुकुलम ला भेट दिली. मी आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रात किव्वा अन्य ठिकाणी असलेल्या आश्रम अथवा अश्या बर्याच संस्था फक्त ऐकल्या आहेत. आणि त्या ठिकाणी चालत असलेले प्रकार फक्त ऐकिवात आहेत. किव्वा दूरदर्शन वरच्या बातम्या मध्ये ऐकलंय, पाहिलंय. ते ऐकलेले असं त्या संस्थान मध्ये दिलेली देणगी किवा मदत तिथे असलेल्या गरजूंपर्यंत बरेचदा पोहोचत नाही. किव्वा तिथे मुला मुलींचे सग्गळ्या प्रकारचे शोषण होते. हे ऐकिवात होते त्यामुळे मी केव्हाही दारात आलेल्या अश्या कुठल्याही संस्थेच्या लोकांना कधी मदत केली नाही. आणि कधी कुठल्या आश्रम किव्वा संस्थेला भेट दिली नाही. मनात एक प्रकारचा राग होता.चीड असायची.अर्थात सगळ्याच संस्था तश्या नसतात. आणि जोवर एखाद्या व्यक्तीचा,ठिकाणाचा, वस्तूचा प्रत्यक्ष भेटून अथवा अनुभव घेतल्याशिवाय आपण आपले मत मांडू नये याचा चांगला अनुभव मला काल आला. मी जरी अश्या ठिकाणाला कधी भेटी दिल्या नाही किंव्वा देणग्या दिल्या नसल्या तरीही मला सामाजिक जाणीव आहे. मला जशी जमेल तशी मदत मी प्रत्येक व्यक्तीला करत आलेय. मग तो नातेवाईक असो, मित्र असो, मैत्रीण असो, माझी कामवाली असो, गरजू असो कोणीही असो. अगदी मी माझ्या २ व्हीलर वरून जात असताना कोणाला गरज असली तर तिथली परिस्थिती पाहून थांबून मदत करते.  

साधारण ७ वर्षांपूर्वीचा एक प्रसंग आठवतोय मला. माझे मिस्टर श्री. दीपक यांना त्यांच्या ऑफिस मधून एका कलीग ने (श्री आगाशे)यांनी सांगितले की लंडन हून एक आजी- आजोबा आलेयत त्यांना एका गुरुकुलम ला भेट द्यायची आहे आणि ते चिंचवड ला आहे तर त्यांना घेवून जा. माझे मिस्टर जेव्हा त्या वेळी गुरुकुलम ला भेट देवून आले त्या आजीआजोबांच्या निमित्ताने तेव्हा ते आल्यावर जो अनुभव सांगत होते तिथला तो सुन्न करणारा होता. कारण त्यावेळी श्री प्रभुणे यांनी हा वंचित मुलांच्या शिक्षणाचा वसा घेतला होता परंतु ती फक्त सुरुवात होती. कोणत्याही मोठ्ठ्या कार्याची एकट्याने केलेली  सुरुवात ही  फारच कठीण असते. त्याचा पाया रोवायला अवधी हा लागतोच लागतो. त्या ७ वर्षांपूर्वी मुलांना तिथे त्यांचे आईवडील सोडून जायचे. एक वर्षांनी आले तर आले आईवडील नाहीतर ह्या मुलांचे आईबाप हे श्री गिरीश प्रभूनेच झालेत. तेव्हा फक्त ४०-५० मुलं होती. आता या गुकुलम मध्ये ३५० हून अधिक मुले शिक्षण घेत आहेत. 


आपल्या देशात भिन्न भाषा,वेश, जाती-पंथ असले तरीही सर्वांना उत्कर्ष करण्याची संधी होती. उपेक्षित -वंचित घटकांना ज्ञानार्जनाच्या मार्गाने सर्वश्रेष्ठ पदापर्यंत पोहोचण्याचा मार्ग उपलब्ध होता. उगम,उगमाच्या ठिकाणी नदीचा प्रवाह करंगळी एव्हढासुद्धा  नसतो. हृषी-मुनी -महापुरुष यांची कुळ पाहू नयेत या प्रकारची विचारसरणी होती. आपल्यातलाच एक घास, एक तुकडा  भाकरी, शेतातले पसाभर धान्य अश्या वंचितांना आपुलकीनं दिलं जायचं. शिक्षणाची केंद्रआश्रम पाठशाळा हे समाज च चालवत असे. गावातल्या छोट्या व्यवस्थेपासून ते तक्षशीला, नालंद, कशी, पैठण अश्या विद्यापीठापर्यंत सर्वत्र ज्ञानार्जनाचे कार्य समाजाच्या बळावर सुरु असे.





आणि अशातूनच आजच्या परिभाषेत बोलायचे झाले तर उपेक्षित -मागास जाती जमातीतूनच -वंचित घटकातून वेद-महाभारत-रामायण-इतिहासकर्ते महर्षी व्यास, वाल्मिकी अगस्ती, विश्वमित्रांसारखे असंख्य हृषीमुनी या भूमीने दिले. प्रत्येकाकडे कला होती जगण्याचे साधन होते. हातात काम होते,सर्वच गोष्टींवर सर्वांचा अधिकार होता. स्वतःबरोबरच जगाच्या कल्याणाच्या विचाराने धडपडत होते. आणि बघता बघता केव्हातरी या समरसतेचा प्रवाह खंडित झालाच. उच्चनीचता जातीभेद,प्रांत-भाषाभेद, अंधश्रद्धा-रुढीच्या गुलामगिरीत भारतमाता अडकली. विषमतेने ग्रासली. दरिद्री बनली.पृथ्वी भारत आमची आई आहे  आंम्ही तिचे पुत्र आहोत या बंधुभावाच्या नात्याचा विसर पडला. आज फासे पारधी, डोंबारी कोल्हाटी , लमाण, नंदीवाले, मरिआई वाले, गोंधळी, वासुदेव, बेरड-रामोशी, सुतार, भात-सिक्लागरी, घिसाडी यासारख्या असंख्य भटक्या विमुक्त तसेच पूर्वाश्रमीच्या अस्पृश भटक्या, विमुक्त अपृश्य गणल्या गेलेल्या जाती आणि वनवासी अनुसूचित जमातीतले असंख्य घटक शिक्षणापासून वंचित आहेत. त्यातूनच आजची भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. समाजाचा मोठ्ठा घटक दुर्बल वंचित उपेक्षित राहिला तर समाजाचा गाडा गतिमान कसा होणार??  आपण सर्वांनी मिळूनच या समरसतेच्या गाड्याला बळ द्यायला हवे.चालना द्यायला हवी. हे समाजचक्र गतिमान करायला हवं. समरसतेचा आणि शांतीचा संदेश देणारे सर्वश्रेष्ठ तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माउली, मोरया गोसावी आणि भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणारे क्रांतिवीर चापेकर याच्या या पवित्र भूमीत भारतमातेच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहणारे आणि साकार करण्यासाठी हे पुनरुत्थान समरसता गुरुकुलम. सुरु झाले आहे. सध्याच्या अस्वस्थ करणाऱ्या परिस्थितीवर मात करायची  ती आपण सर्वांनी मिळूनच. आपण काह्रीचा वाट जरी उचलला तरीही खूप झाले.

मुलांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास साधणारे गुरुकुलम. गुरुकुलम या संस्थेवर श्री गिरीश प्रभुणे, पुनम -प्रधानाचार्य , सतिश अवचार- आचार्य, मारुती वाघमारे- निवासी , दिपाली,गणेश,राजाभाऊ विश्वास, राहुल, अशी बरीच मंडळी कार्यरत आहेत. आज या वंचितांच्या शाळेत ३५० हून जास्त  मुले शिकत आहेत. ९ जून २००६ ला शिवराज्याभिषेक दिनी या गुरुकुलम ची सुरुवात झाली. पहिली ते १२वी अशा क्रमाने ही मुले शिकत आहेत. ही मुले प्रामुख्याने फासे पारधी , वडार,कष्टकरी वर्गातील आहेत. ज्यांच्या पालकांना शिक्षण काय कोणते घ्यावे  हे समजत नाही. मुलही शाळेत न जात भटकत रहातात. गुरुकुलम मध्ये त्यांना मराठी भाषेबरोबरच विज्ञान, संगणक, तंत्र कौश्यल्य जसे शेती -भाजीपाला लागवड कंपोस्ट खात, रोपवाटिका, बांधकाम, सायकल आई मोटारसायकल दुरुस्ती, प्लंबिंग, रंगकाम इत्यादी सोबत मूर्तीकला, संगीत, गायन, वादन, चित्रकला, लेखन , वाचन, संभाषण असे ऐकून वीस विभागात मार्गदर्शन दिले जाते. वनौषधी पक्षीनिरीक्षण, खगोल निरीक्षण यांचाही अभ्यास घेतला जातो


दहा दहाच्या गटाने हे सर्व विषय शिकवले जातात. या शिवाय नैपुण्य गटात विविध खेळांचे मार्गदर्शन दिले जाते. हे सर्व अनौपचारिक शिक्षणाच्या पद्धतीद्वारे शिकवले जाते. मुळच्या कलाकौशल्य गुणांचा विकास आणि दुर्गुनांचा ऱ्हास, आधुनिक आणि पारंपारिक ज्ञानाची सांगड घालून शिक्षण देने. मुले इथेच  राहत असल्याने हे शक्य होते. यासाठी चिंचवड येथे निसर्गरम्य वातावरणात हे गुरुकुलम आकार घेत आहे. पंच्कीशावर आधारित स्वंतंत्र असा हा अभ्यासक्रम विकसित करून ही  मुले ४ थी च्या शिष्यवृत्ती परीक्षेला बसतात. तसेच ७,१०,१२वीच्या परीक्षा देतात, देतील याशिवाय विविध स्पर्धात्मक परीक्षात क्रीडा स्पर्धात भाग घेतात.
एकूणच काय तर त्यांच्या मनाचा कल  लक्षात घेवून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करायचा आहे आणि आधुनिक कळला सुसंगत असे त्यांना घडवायचे आहे यासाठी अनुभवी मार्गदर्शक तज्ञ शिक्षक आचार्यागण , सेवाभावी कार्यकर्ते आणि आपणासारखे असंख्य हितचिंतक हे गुरुकुलम चालवीत आहेत . या मुलांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होवून जगाच्या कानाकोपर्यात ही  मुले यशस्वीपणे निश्चित जातील तरीही त्याचं मन कुटुंबात समाजात आणि मातृभूमीत रमेल.
मला माझ्या कुटुंबाला समाज कार्य करायला आवडते आम्ही जसे जमते तसे या गुरुकुलम ला ही मदत करतो. कारण ही मुले शिक्षण घेताहेत. आपल्या मुलांना एवढ्या  संधी उपलब्ध असूनही  आपली मध्यमवर्गीयाची मुले देखील कधी कंटाळा करतात. हा विषय वेगळा आहे तरीही या मुलांना जर आपण जमेल तशी मदत करावयास हरकत नाही. माझे मिस्टर  गेली ७ वर्षे सतत एक महिन्याचा ४००० पर्यंत चा एक खर्च तिथे देतात. जोपर्यंत आम्हाला जमेल तोपर्यंत करणार आम्ही. इथल्या मुलांना आपल्या मुलांचे जुने परंतु चांगले वापरण्याजोगे कपडे असतील ते देखील आपण देवू शकतो ही मुले आनंदाने घालतात. अगदीच पैशाचे कोणाला जमत नसल्यास आपला आठवड्यातला काही वेळ किव्वा महिन्यातला सुटीचा काही वेळ जरी या मुलांसोबत घालवला तरी त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा असतो.कारण ही मुले वर्षातून एकदा आपल्या घरी जातात किवा काही तर जातच नाहीत. काहींना त्यांचे आईवडील सोडून गेले ते आलेले सुद्धा  नाहीत  अशीही मुले इथे आहेत. काल मी जेव्हा पहिल्यांदा इथे भेट द्यायला गेले तेव्हा एका ग्रुप ने येवून इथे जत्रा भरवली होती की जेणेकरून सुटीच्या दिवशी सगळ्या  खेळाचा आनंद घेवू शकतील. मुलांना एकावेळी बाहेर नेणे अशक्य होते. त्या ग्रुप ने स्वखर्चाने या मुलांना खेळण्याचा आनद दिला त्यांच्यासोबत खेळले देखील.

ज्याला ज्याला गुरुकुलम ची माहिती मिळाली तो डायरेक्ट गुरुकुलम ला जावून जमेल ती मदत करतो. कोणी पैशाची  मदत करतो, कोणी वस्तू नेवून देतो, कोणी खाद्य  पदार्थ  देतो, कोणी शैक्षणीक साहित्य देतो. मी पहिल्यांदा गेले तेव्हा मी विचारले कसली नितांत गरज आहे ते जमल्यास देईन मी आणून. मला ते म्हणाले सध्या मुलांच्या परीक्षा चालू आहेत त्यामुळे जमले तर A४ साहिज रिम पेपर द्या. मी संध्याकाळी १०रिम नेवून दिल्या. हे समाधान शब्दात सांगणे कठीण आहे. आणि महत्वाचे हे आहे की आपल्यावर कसलीही सक्ती नाही. कोणी न कोणी येतोच आणि मनापासून मदत करतो.
मी २४ जानेवारी च्या रविवारी गेले होते तेव्हा ही मुले जत्रेत गुंग होती.मला जास्त त्यांच्या सोबत फोटोज काढता आले नव्हते.  मी त्या जत्रेचे फोटोज काढले शिवाय या गुरुकुलम चे मुख्य अध्यक्ष कार्यकर्ते श्री गिरीश प्रभुणे यांचा साधा वेश पाहून मला विनोबा भावेंची आठवण झाली. इतक्या महान व्यक्तीसोबत आठवण म्हणून एक फोटो काढलाच मी अर्थात त्यांच्या परवानगीनेच. खरतर ७ नंतर कोणालाही परवानगी नाहीये जायला.  परंतु मी आणि माझे मिस्टर रात्री जेव्हा तिकडे गेलो होतो रिम पेपर द्यायला तेव्हा मुलांच्या जेवणाची वेळ होती. मी आवर्जून आत गेले. तेव्हा मला त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. पण आज ती मुले माझ्यासाठी सेलिब्रिटी होती. काही मुले जेवण करत होती. एक लहान मुलगी वाढणाऱ्या मुलीला म्हणते ताई मला जरा जास्त वाढ ग. मला हसू आले. तिथे सगळ्या मुलांना जेवण ते मुबलक मिळते. कसलीही कुचंबना नाहीये. आतमधेच दवाखाना आहे. काही नवीन बांधकाम चालू होते. मुलांसाठी जेवणाचा hall बांधणे सुरु होते. मी सगळं गुरुकुलम दुपारी फिरून घेतले. मुलांनी अतिशय सुंदर पद्धतीने सगळ्या भिंतीवर वारली पेंटिंग केलेले दिसले.कलाकार आहेत ही मुले. अशा खूप गोष्टी आहेत सांगण्यासारख्या. जेवढे आता आठवले ते सांगितले.
मला राजकारण आवडत नाही. पण आजच्या पिढीतही मी तरुण कार्यकर्त्यांना निस्वार्थीपणे काम करताना पाहिले आहे. अभिमान वाटतो या आजच्या पिढीचा सुद्धा.आपण जे समाज कार्य करतो त्याचा टेंभा मिरवायला नाही आवडत. परंतु आपले रोजचे आयुष्य, घर-संसार, नोकरी सांभाळून जर अशा शिक्षणापासून वंचित मुलांसाठी खारीचा वाटा  उचलता आला तर किती समाधान मिळते आपल्याला याचा अनुभव मला आला.


याआधी  गुरुकुलम चा विषय जरी काढला माझ्या मिस्टरांनी तरी मी चिडायचे परंतु आता तो राग ती चीड पूर्ण निघून गेली आहे. आणि उलट मला माझ्या मिस्टरांचा अभिमान वाटतो आहे. शिवाय "फोना" सारख्या चांगल्या (निसर्ग वाचवणारी संस्था) करणाऱ्या संस्थेशी मी जोडली गेलीये त्यात आता या  गुरुकुलम संस्थेशी मी जोडली गेलेय. अभिमान वाटतो आहे मला.   या मुलांची शिक्षणाची ओढ, जगण्याची धडपड, कलेची आवड बघता हे शिकलेय की, "अशा लोकांना मदत करा की ज्यांना खरोखर मदतीची गरज आहे, अश्या लोकांवर प्रेम करा की ज्यांना खरोखर प्रेमाची गरज आहे, अश्या लोकांवर वेळ आणि पैसा खर्च करा की जे आपल्या वेळेची आणि प्रेमाची कदर करतील आणि आपल्याला आपल्या प्रत्येक कार्याची कदर करतील आणि लगेचच पावती देतील." २०१६ हे वर्षे अश्या बर्याच चांगल्या संधी घेवून आलेय माझ्या पुढे. आणि मी प्रत्येक संधीचे सोनेच करते.मग ती संधी ट्रेक ची असो, blog लिहिण्याची असो किंव्वा समाजकार्याचा खारीचा वाटा  उचलण्याची असो. 

11 comments:

  1. he matr agadi kharay ki jyana kharokhar madatichi garaj aste asha lokana madat kartana 10 vela vichar karava laagto. tyamule khare garju vanchit rahtat. samajatil datrutv kami nahi jhalele, sanvedna nahi bothat jhalya pan madaticha garivapar hou naye ase vatate. mala tase vait anubhav hi aalet kahivela.

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you hemlata.
      aani agadi khare aahe tu mhanate te.

      Delete
  2. आपण एक व्यक्ती म्हणून आसपासच्या वातावरणाला कशी प्रतिक्रिया देतो ते आपल्यावरचे संस्कार, आपली जडणघडण आणि आपण कोणाची संगत ठेवतो यावर अवलंबून असते.आपल्या भाकरीतला एक तुकडा जे वंचित आहेत त्यांच्यासाठी पण आहेच.एक मित्र म्हणून आणि एक गिर्यारोहक म्हणून मला तुझा आणि तुझ्या पतिचा अभिमान वाटतो.keep it up dear! Well done!

    ReplyDelete
  3. jayude good work

    ReplyDelete
  4. Replies
    1. Very nice Jayashree.., ha aansnd jagat kuthech bhetu shakay nahi...keep it up

      Delete
    2. Very nice Jayashree.., ha aansnd jagat kuthech bhetu shakay nahi...keep it up

      Delete