Tuesday 15 March 2016

"ध्यास k2s चा"

"ध्यास के टू एस चा"


कात्रज ते सिंहगड ट्रेक
चढाई श्रेणी - कठीण
दिनांक - ११ मार्च २०१६ 

खरे तर आजच्या ब्लॉग चा विषय "कात्रज ते सिंहगड ट्रेक" हा आहे परंतु वाचक हो,आपण ज्या पुण्यात राहतो त्या पुण्याचा अभिमान असलेल्या सिंहगडाची माहिती ही हवीच.पुण्याच्या नैर्ऋत्येला साधारण २५ कि.मी अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ४४०० फूट उंच आहे. सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर हा गड आहे. दोन पायर्यासारखा दिसणारा खंदकाचा भाग आणि दूरदर्शनचा उभारलेला मनोरा यामुळे पुण्यातून कुठूनही तो ध्यानी येतो. पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग असा प्रचंड मुलुख या गडावरून दिसतो.याचे आधीचे नाव कोंढाणा. पूर्वी हा किल्ला आदिलशाहीत होता.[दादोजी कोंडदेव] हे आदिलशहाकडून सुभेदार म्हणून नेमले होते. पुढे इ.स. १६४७ मध्ये गडावर आपले लष्करी केंद्र बनवले. पुढे [इ.स. १६४९] मध्ये शहाजी राजांच्या यांच्या सुटकेसाठी शिवाजी राजांनी हा किल्ला परत आदिलशहाला दिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये कोंडाणापण होता. मोगलांतर्फे  उदयभान राठोड हा कोंडाण्यावरचा अधिकारी होता. हा मूळचा राजपूत पण नंतर मुसलमान झाला होता.सिंहगडचे मूळ नाव कोंढाणा होते आणि [छत्रपती शिवाजी महाराज|शिवाजी महाराजांच्या] काळात त्यांचे विश्वासू सरदार आणि बालमित्र तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळ्यांनी(मावळ प्रांतातून भरती झालेल्या सैनिकांनी) हा किल्ला एका चढाई दरम्यान जिंकला. या लढाईत तानाजींना वीरमरण आले आणि प्राणाचे बलिदान देऊन हा किल्ला जिंकल्यामुळे शिवाजी महाराजांनी "गड आला पण सिंह गेला" हे वाक्य उच्चारले. पुढे त्यांनी गडाचे कोंडाणा हे नाव बदलून सिंहगड असे ठेवले. सिंहगड हा मुख्यतः तानाजी मालुसरे यांच्या बलिदानामुळे प्रसिद्ध आहे.
दोन वर्षांपासून मला के टू एस चा जणू ध्यास च लागला होता. काहीही झाले तरी जायचेच हा माझा स्वत:चा ठाम निर्णय होता. का? तर मी काय मोठ्ठी ट्रेकर्स वैगेरे काही नाहीये. महिन्याला आपला एखादा गड जेमतेम करतेय.  तब्बेत बरी नसते तर काही जण म्हणतात कशाला जातेयस जयू?? मग माझे उत्तर असते की "मला मरायच्या आधी जगायला आवडते म्हणून मी हे ट्रेक करते" आणि जीवघेणे ट्रेक देखील करणार आहे जीवात जीव असेल तोवर तरी. या महिन्याचा ट्रेक कुठला असेल याची उत्सुकता होतीच. कारण उन्हाळा सुरु होतो आणि मुलांच्या परीक्षा चालू असतात त्यामुळे सगळ्यांचा विचार करून आमचे F.O.N.A. चे मेम्बर्स ट्रेक आयोजित करतात. त्यांनी हुशारीने के टू एस ची तयारी केली की जेणे करून मुलींना न सांगता गपचूप जाता येईल आणि परीक्षा असल्यामुळे तशा मुली, लेडीज कमीच येतील आणि त्यांना कळवले नाही तर येणारच नाहीत. खरं तर मोठ्ठ्या ग्रुप मध्ये लेच्यापेच्याला नेणे खायचे काम नाही. आम्ही लेचेपेचे नाहीच आहोत. पण "के टू एस" असा ट्रेक आहे ज्यात एखादा घाबरला किंवा मधेच मागे फिरायचं म्हंटल तरी शक्य नाही. एकतर जायचेच नाही या ट्रेक ला नाही तर आर या पार. म्हणून खूप मोठ्ठी जोखीम असते म्हणून आमचे मंदारसर, महेश पाठक, रोहित, राणे सर, विवेक  आणि इतर सगळेच सारासार विचार करूनच हा निर्णय घेतात. पण पण मला काही करून जायचे होते त्यामुळे मी मेल आल्याआल्या पहिले तनयाला सांगितले आपल्याला जायचे आहे. आणि मग मंदार सर ना फोन केला, आणि मंदार सरांनी  काचकूच करत आम्हाला सोबत नेणे फ़िक्स करून घेतले.आणि मी तर घरात उडीच मारली. आणि माझ्यामुळे अजून ही काही मुलींना यायला मिळाले याचा मला मनोमन आनंद झाला.
पहिले घरातून परवानगी घेतली आणि माझा वर्गमित्र तुषार की जो अनुभवी ट्रेकर आहे, आणि आमचे फोनाचालक मंदार सर,रोहित, यांना  विचारले मी के टू एस करू शकते ना?? कारण या लोकांना माहित आहे माझी क्षमता आणि के टू एस ची कठीणता. सगळ्यांनी हो म्हंटले मग माझी तयारी झाली. पण मधेच कोणी कोणी भीती पोटी विचारायचे अरे करू शकाल न हा ट्रेक नक्की?? मग काय नेहमीचच उत्तर जयू ने एक बार ठाण ली के ठाण ली उसे कोई नही रोक सकता

११ मार्च च्या शनिवारी रात्रीचा ट्रेक होता हा. नेहमीप्रमाणे माझी तब्बेत नरमच होती आणि मनातून मला भीती होती की मी जर ट्रेक पूर्ण नाही करू शकले तर माझ्यामुळे ग्रुप मधल्यांना त्रास नको तरीही माझी हौस म्हणा किंवा माज म्हणा लवकर जाणार नाही हे मात्र खरे.घरातली बरीचशी कामे आटोपून संध्याकाळी ७:०० वाजता घर सोडले ७:३० च्या निगडी ते कात्रज डेपो च्या बस ने राहुल दर्गुडे, गणेश गोसावी, आणि मुनोत यांच्यासोबत मी कात्रज पोलिस चौकी जवळ च्या थांब्यावर उतरलो तिथेच आम्ही रोहिणी, राधिका, खोल्लम, शिरीष सर यांनाही भेटलो आणि एका भारी मिनी बस ने(२०- २० रुपये देवून) कात्रज बोगद्या जवळ पोहोचलो. आम्ही जुन्या पुणे-सातारा रस्त्याने कात्रजचा जुना बोगदा जिथे संपतो तिथे उतरलो. बाकीचे लोक पण आम्हाला तिथेच येवून भेटले.
आम्ही १०:३० ला कात्रज बोगद्याजवळ वरती वाघजाई देवीचे मंदिर आहे तिथे एकत्र जमलो. इथूनच या ट्रेकला सुरुवात होते. डोंगरधारेवरची ही वाट, झाडीतली. यामध्ये एकंदर तेरा टेकडय़ा आम्हाला चढायच्या-उतरावयाच्या होत्या.  तिथे मात्र सगळ्यात शेवटी आढाव सर आणि त्यांच्या पत्नी आलेल्या पाहिल्यावर आम्हाला वाटले की या अशाच आल्यात इथे आढाव सरांना, आम्हाला टाटा करायला. पण आम्हाला धक्का बसला एक क्षण. कारण त्यांनी साडी घातली होती आणि  साडीमध्ये ट्रेक करणे किती अवघड आहे हे काय नव्याने सांगायला नको. परंतु त्या आढाव madam ने भारीतला भारी ट्रेक केला. सलाम त्यांना.

ट्रेकिंगच्या विश्वात काही स्थळांभोवतीच्या वाटा या दिवसापेक्षा रात्रीच  जास्त शोभून दिसतात. आमच्या पुण्यातील कात्रज ते सिंहगड ही वाट अशीच आम्हा ट्रेकर्स च्या  पावलांना जागवणारी. मी आतापर्यंत बरेच ट्रेक केलेत परंतु मित्र हो,पूर्ण रात्र आम्ही ट्रेकर्स वेड्यासारखे चालत राहिलोय असा हा आमचा एकमेव "के टू एस"असणार होता. मी दुपारी थोडे जेवण केले होते तेव्हढेच. त्यामुळे रात्रीच्या जेवणाचा डब्बा घेवून निघालो होतो. काही जण जेवण करून आले होते. रात्रीचे चालणे आणि रस्त्यात एकही गाव नसल्यामुळे भरपूर पाणी, टॉर्च, हेड टॉर्च, नीकॅप, जेवणाचा डब्बा, फ्रुट्स, सरबते, अशी जय्यत तयारी करून आम्ही या डोंगरवाटेवर निघालो.

मंदार सरांनी आम्हा ट्रेकर्सना जागरूकतेसाठी  माहिती दिली कारण आम्ही एकूण ३१ ट्रेकर्स होतो. आणि रात्रभर आम्हाला चालायचे होते. छत्रपतीं श्री शिवाजी राजेंची घोषणा केल्याशिवाय ट्रेक ची सुरुवात कशी होणार? घोषणा केली आणि  निघालो आम्ही रात्र असून काय  जोश आणि उत्साह होता प्रत्येकात वाह.  पहिली टेकडी चढतानाचेच पहिले वळण चुकले कारण वाटा सगळ्या सारख्याच दिसत होत्या. आणि आम्ही पुढे असलेले लोक आता मागे पडलो कारण जशी रांग  चालली होती तशीच्या तशी उलट्या वाटेने वळली म्हणजे डावीकडच्या ऐवजी उजव्या बाजूने. टेकडी म्हणजे डोंगरच समजा रे. सध्या सुध्या टेकड्या नाहीत त्या.
दोन टेकड्या पार केल्यावर सिंहगडावरच्या tower चा लाल लाईट दिसला आणि हायसे वाटले. हायसे कसले धूर निघणार याची कल्पना आली पण सांगणार कोणाला तिथे. सांगितले तर परत जायची सोय नाही. आणि पुन्हा पावले चालू लागली सिंहगडची वाट. आता मात्र खरच भीती वाटली आम्हाला समोर काय दिसले तर मोट्ठे वणवे पेटलेले दिसले ते ही आमच्या वाटेलाच होते. तरीही जवळ गेल्यावर पाहू काय व्हायचे ते होईल. आगीच्या ज्वाळा पाहिल्यावर सगळ्याच्या तोंडातून "पिंजरा" चे गाणे आलेच. निघालो पुन्हा. त्या दोन डोंगरातच माझी ताकद संपली होती यावेळी. समोर वणवे आणि घसरड्या डोंगरांना सुरुवात झाली आता. तिसरी टेकडी पार केली आणि वणव्याच्या जवळून जाताना चटके लागत होते. परंतु एका बाजूने थंडगार वारेही अंगाला लागत होते. छान आल्हाददायक वाटत होते ते वातावरण. परंतु बाहेरून वणवा आणि आतून पोटात आग पडली होती. भुकेने जीव व्याकूळ झाला होता पण आता जेवत बसलो तर ट्रेक करू शकणार नाही हे मंदार सरांना पक्के माहित असते. बारा वाजता जेवू पुढच्या डोंगरावर. अस गोड बोलत बोलत १२ कधी वाजून गेले कळले नाही. आम्ही आपले एक डोंगर चढलो की सरबत प्यायचो पाणी प्यायचो. असे करत करत त्या जीवघेण्या घसरड्या टेकड्यांचा  थरार अनुभवत हळूहळू सरकत होतो. डोळ्यावर झोप येत होती. पण थांबला तो संपला असे समीकरण लागू होत होते. आम्हाला त्या वणव्यांमध्ये सुद्धा उलटे हृदय  दिसत होते. म्हणजे त्याचा तसा आकार आला होता. एक टेकडी चढलो की असे वाटायचे इथेच झोपून घ्यावे पण कसलीच सोय नव्हती.
आता रात्रीचे १:३० वाजले होते. आणि माझे तर अवसान गळाले होते, शक्तीच संपली. आणि मंदार सरांनी आम्हाला इथे बसुयात रे. आणि जेवून झोपुयात म्हणे थोडावेळ. आणि हो नाही म्हणता आम्ही बसलो आणि लगेच जेवणाचे डब्बे काढले आणि रात्री २ च्या सुमारास आम्ही जेवण केलेयावेळी मला मात्र मंदार सरांच्या डब्यातली मटकी ची भाजी मिळाली आणि फ्राईड राइस सुद्धा. वाह काय बनवला होता. आणि रोहित ने स्वीट डिश दिली आम्हाला चिक्की. छान होती. आणी राहुल दर्गुडे द्राक्षे आणतो हल्ली नेहमीच. भारी काम करतोयस राहुल तू.  धन्यवाद सगळ्यांना. मला दुसर्याच्या हातचे जेवण फार आवडते. जेवलो आणि १५ मिनिटे विश्रांती घेतली. आम्हाला वाटले होते खरच झोप मिळणार आहे पण तसं काहीही नसत रे. झोपले की उठल्यावर खूप थंडी लागते आणि मग ट्रेक कसा करणार उजेडाच्या आधी ?? आणि आम्ही आता फक्त अर्धा ट्रेक पूर्ण केला होता अजून अर्धा ट्रेक बाकी होता विचार करा कुठून आणायची इतकी शक्ती? १५ मिनिटां मधेच पुन्हा युद्धाला तयार झालो. रात्रीचे २ वाजून १५ मिनिटांनी मंदार सरांनी हसी-मजाक करत आम्हाला चला म्हंटले आणि आम्ही निघालो मला मात्र एव्हढी थंडी भरली की विचारू नका मी तनयाचे जाकेट घातले माझी कानटोपी घातली,स्कार्फ ने तोंड बांधले आणि निघालो मग १५ मिनिटांचे चालणे झाल्यावरथंडी गेली. पण थरार अनुभवत होतो रे.

सिंहगडचा tower दिसायचा अधून मधून. जीव भांड्यात पडायच्या ऐवजी घाबरत होता. यावेळी मला सोल्लिड भीती वाटत होती. पण मी कोणाला दाखवत नव्हते. डोंगर इतके घसरडे होते काहीच पर्याय नव्हता. पण बसून चाललो तर ट्रेकर्स कसले आम्ही. पण काही ठिकाणी आम्ही घसरगुंडी केलीच. आणि त्यावेळी माझ्या पुढे असलेल्या राहुल दर्गुडे ला आणि मुनोत ला मी बरेचदा ढकलता ढकलता राहिले.. हात धरायला काही आधार नव्हता जो हात बाजूला असेल कोणाचा तो हात किव्वा पाय धरून त्या माणसाला घेवून मी तर घसारा करत होते.  समोर किर्र -काळोख आणि एका  हातात ती टोर्च पाठीवर वजनदार  bag. असे वाटत होते कोणीतरी bag घ्या रे. पण प्रत्येकाजवळ वजन होते त्यामुळे मी च माझा सांगाती.दरी,काळोख आणि  खडतर वाट असेच होते सगळीकडे. समोर पहिले की गडाचे अंतर आणि अंधाऱ्या भयानक टेकड्या पाहून अजून भीती वाटत होती. फक्त फोना सोबत असल्याने ती भीती पळून जात होती. काहीकाही वेळा तर मागे पुढे कोणीच नसायचे तरी एव्हढ्या रात्री कुठून माझ्यात बळ येत मलाही ठावून नव्हते. प्रत्येक ट्रेकला माझे  काहीतरी रहातेच मागे पुढे. यावेळी तनयाने दिलेले जाकेट मी कमरेला बांधले परंतु ते सुळसुळीत असल्या कारणाने आणि थकल्या कारणाने माझे मलाच भान नसल्या कारणाने कुठे पडले कळालेच नाही. राहुल दर्गुडेने ते नंतर आणून दिले. धन्यवाद राहुल.

अंगाला गार  वारा झोंबू लागला. चालायला सुरुवात केली. आता अजून ३ मोट्ठे डोंगर बाकी होते एखादा डोंगर चढणे सोपे होते परंतु उतरणे खूपच कठीण जात होते. कारण उतारावरील माती सैल  व कोरडी असल्यामुळे पाय रोवून उभे राहणेही शक्य होत नव्हते. काय काय विचार येत होते मनात न सांगितलेले बरे. फोटो काढायची पण ताकद नव्हती. आमच्या सोबत असलेला राहुल दर्गुडे हा एकमेव ट्रेकर फोटो काढताना दिसत होता. आम्ही सुरुवातीला जे फोटोज काढले तेव्हढेच नंतर फोन जो bag मध्ये ठेवला तो सकाळीच बाहेर काढला.
आणि माझ्या पायात मात्र शेवटचे २ डोंगर चढताना कळा (cramps) यायला लागल्या होत्या कारण आज मी जे सरबत बनवून नेले होते ते लिंबू चे नव्हते. लिंबू सरबत असले की ही  अडचण येतच नाही. परंतु ट्रेक देखील तितकाच कठीण होता. आणि शेवटी मी असह्य होवून रडलेच त्यावेळी माझ्यासोबत आढावा सर होते त्यांनी मला मदत केली माझी bag घेतली आणि चालू लागले. त्या आढाव madam घसरत होत्या तरी गप्प डोंगर चढत उतरत होत्या. मला त्यांचे खूप कौतुक वाटत होते. या सगळ्यामध्ये प्रशांत भावसार सोबत आमचे मंदार सर पाठीमागे कुठे घसारा करत राहिले होते ते नंतर कळाले. ट्रेक दरम्यान घसरून घसरून निलेश यादव आणि प्रशांतची अवस्था काय झाली होती ते मंदार सर भारी   गंमतीने सांगत होते. ट्रेकच्या शेवटी शेवटी जशी मी रडकुंडीला आले होते तशीच अवस्था त्यांची देखील झाली होती. माझ्या जोडीला कोणीतरी होते म्हणायचे बरे वाटले. खरे तर थोड्याफार फरकाने सगळेच खूप दमले होते पण आम्ही बोलून दाखवतो काही लोक गप्प राहतात हा फरक आहे. थोडीशी  गम्मत हो. पण ट्रेक ची मजा वेगळीच. पहाटे ५ वाजता आम्ही शेवटच्या डोंगराच्या पायथ्याशी पोहोचलो तेव्हा हायसे वाटले. आता तिथून एक वाट सिंहगडावर जात होती आणि एक वाट कोंढणपूर फाट्याकडे जाते म्हणजेच गडाच्या डांबरी रस्त्याकडे.

आम्ही तिथे जरा विश्रांतीसाठी थांबलो तेव्हा मस्त आमचा नेहमीचा "शाहीर राजू राउत' यांचा  पोवाडा गायलो "अंधार फार झाला एक दिवा पाहिजे, या देशाला जीजाऊचा शिवा पाहिजे." की जो आम्हाला किरण टेकवडे आणि प्रदीप अडागळे यांनी सुधागड ट्रेक दरम्यान शिकवला. यावेळी आम्ही आदित्य, सुमित,प्रभा ,ख़ुशी, रक्षा, जुई , कौस्तुभ  ह्या छोटे मंडळीला तसेच जे येवू शकले नाहीत त्या सगळ्यांनाच खूप मिस केले.  आमच्यात पुन्हा उत्साह आला परंतु सगळ्यांच्यात गडावर जायची ताकद नव्हती मग आम्ही पक्क्या रस्त्याची वाट  धरली आणि सकाळी ६ वाजता कोंढणपूर फाट्यावर पोहोचलो त्यावेळी आम्हाला गडावर एक लाईटने भरलेला रस्ता दिसला. रविवार असल्याने ट्रेकर्स पहाटेचे चढ उतार करत होते. विलोभनीय दृश्य होते ते. आम्ही कात्रज बोग्द्यापासून १४ कि.मि. अंतर कापून आलो होतो. हे १४ कि.मि. आम्हाला ५० कि.मि. चालल्यासारखे भासले रे. आता तिथून सिंहगडावर जायला ३ कि मि. अंतर होते. आणि पायथा ४ कि. मि. वर होता. गडावर जायचे आमच्यात त्राण  नव्हते आम्ही आपले डोणजे गावचा रस्ता धरला आणि हा ४ की.मी. चा रस्ता कसा बसा पार केला त्यावेळी आम्हाला खूप सारे ट्रेकर्स गडाकडे जाताना दिसत होते. काही सायकलिंग करत होते काही चालत होते.

सुर्य उगवायची वेळ झाली होती. राहुल दर्गुडे, रोहिणी आणि राधिका ते सूर्योदयाची वाट पाहत थांबले फोटोग्राफीसाठी.आम्ही सुरुवातीला सोबत असलेले रोहित, आकाश, पियुष, विवेक नंतर कुठे गायब झाले कळलेच नाही. मी तनया आम्ही आपले लिफ्ट मिळते का पाहत होतो पण मंदार सरांनी सांगितले होते की फक्त मुलींनी लिफ्ट मागू नका, सोबत आपल्या ग्रुप चे कोणी असले तरच जा आणि आमच्या सोबत कोणीच नव्हते त्यावेळी,  त्यामुळे आम्ही एव्हढे पाय दुखत असताना गपगुमान दोघीच गप्पा करत चाललो होतो.पण आमची एका पण गाडीवाल्याला दया आली नाही असो. डोणजे गावच्या वेशीपाशी पोहोचणार तोच एक बस भर वेगाने जाताना दिसली ती बस राणेंनी हात करून थांबवली आणि आम्ही एकदाचे बसमध्ये बसलो राणेंना सांगून मी, तनया, पियुष, शिरोळे, आकाश, शिरीष सर, आढाव सर आणि madam आणि अजून काही मुले शनिवार वाड्याच्या बसने आलो आणि  तळेगावकर ट्रेन ने गेले आम्ही  म. न. पा. च्या बसने निगडी गाठली. घरी पोहोचायला सकाळचे ९ वाजले होते. पण तो के टू एस चा थरार अजूनही डोळ्यासमोरून जात नाही आणि "के टू एस ट्रेक" पूर्ण केल्याचा आनंदही कधी विसरणार नाही हे मात्र खरे खरे तर हा ट्रेक इतरांसाठी खूप कठीण नसावा परंतु ठरलेल्या  वेळेच्या आत तो सुखरूपपणे पूर्ण करणे हे जास्त महत्वाचे आहे त्यामुळे ह्या थराराला कोणी घाबरू नका रे. लिंगाणा आणि इतर कठीण चढाई चे गड डोळ्यासमोर आणले तर हाच ks सोप्पा वाटेल. माझा "के टू एस" चा ध्यास पूर्ण झाला. यावेळी नवीन मेम्बर्स जास्त होते तरीही सगळ्यांनी उत्तमरीत्या ट्रेक केला हे कौतुकास्पद आहे.असेही मी ब्लॉग लिहायचा नाही म्हंटले तरी यावेळी महेश पाठक सर नसल्याने ब्लॉग लिहिण्याची जबाबदारी माझ्यावरच आली. त्यामुळे हा ब्लॉग खास तुमच्यासाठी. ट्रेक ची हौस सुद्धा माझी पूर्ण झाली आहे त्यामुळे ट्रेक पण मी करेन की नाही देव जाणो. धन्यवाद फोना टीम ला. फोना रॉक्स.

17 comments:

  1. Mastach....maraychya aadhi jagaaa...

    ReplyDelete
  2. Mastach....maraychya aadhi jagaaa...

    ReplyDelete
  3. हो मित्र हो मला मरायच्या आधी जगायचंय म्हणून हा अट्टाहास😊

    ReplyDelete
  4. Mast ahe sahane madam k2s dhyas

    ReplyDelete
  5. Great writing Jayuu ma'am. Mastach Lihila Blog. Agadi K2S cha trek dolya samor ubha kela tumhi....Excellent keep the good work for us, the trekkers.

    ReplyDelete
  6. wa .. mast lihila aahe ... keep it up .. team FONA rocks ...

    ReplyDelete
  7. Very Nice blog....Team spirit of entire group was very very good

    ReplyDelete
  8. Good going...keep as enjoying & have nice days further also.God Bless!!

    ReplyDelete