Wednesday, 7 September 2016

मी "स्री" "मनाची उकल"

मी "स्त्री" "मनाची उकल"

मी आतापर्यंत माझ्या "भिंगरी" या ब्लॉग मध्ये जास्तीत जास्त "ट्रेकिंग" या विषयावर लिखाण केले आहे. मी म्हणजे काय मोट्ठी लेखिका किंवा कवयत्री नाही किंवा एखाद्या सामाजिक विषयावर मोठमोट्ठे लेख लिहिणारी सामाजिक लेख लिहिणारी समाजसुधारक नाहीये. परंतु जे लिहिते ते मनापासून मनापर्यंत पोहोचते आणि वाचक मनातून सुधारतो असे मला बऱ्याच वाचकांनी सांगितले आहे हेच खूप आहे माझ्यासाठी. मी माझ्या आनंदासाठी तर लिहितेच शिवाय ज्यांना हे लिहिलेले वाचून आनंद मिळतो त्यांच्यासाठी लिहिते. आज मी स्त्री च्या मनाची उकल हा विषय समोर ठेवून जे मनाला पटले ते लिहिणार आणि जे मनाला बोचले ते लिहिणार आहे.  "मी" म्हणजे एक मुलगी आहे एक "स्त्री" आहे हे विसरून चालत नाही कारण आपण मुलगी आहोत स्त्री आहोत हे समाजात आपल्याला सारखं सारखं आठवून दिले जाते. तरी बरे आम्हा स्रियांना स्वतःला या गोष्टीचा अजून तरी विसर पडलेला नाहीये.
आज मी या ठिकाणी प्रत्येक ठिकाणचे आणि प्रत्येक व्यक्तीचे नाव घेऊन उल्लेख करू इच्छित नाही. माझा जन्म एका खेड्यात झाला आहे. माझ्या जन्माआधी माझ्या आईची एकूण सात मुले जन्माला येऊन काही दिवस जगायची आणि मग त्या मुलाचा मृत्यू व्हायचा.  मी जयू जन्माला आले आणि जगले आणि त्यांनतर ची ३ मुले जगली. त्या माऊलीला या मुलांच्या जन्मावेळी काय त्रास झाला असेल हे मी स्वतः आई झाल्यावरच मला समजले आणि आईला मानसिक त्रास झाला असेल ते आणि वेगळेच. घरात मूल जन्माला न येणे म्हणजे त्यात स्त्रीचाच दोष असल्यासारखे तिला नको त्या नावाने संभोधले जाते हे कुणाला सांगायला नको शिवाय आमच्या जन्माच्या वेळी खेड्यात घरोघरी एका नवरा-बायकोला किमान ५-७ मुले तरी असायची. त्यामागे कारणे भरपूर असतील. घरची श्रीमंती असेल, घरात खूप माणसे असली की आनंदी वातावरण असेल, असे असेल, अशिक्षितपणा असेल, कुटुंबनियोजनाचा अभाव असेल. कारणे खूप असतील. परंतु मी जन्माला आले आणि माझ्या नंतर ची ३ मुले जगली आणि माझ्या बाबांनी खूप जमीन वैगेरे घेतली त्यामुळे मी भाग्ग्याची होते. असे घरातले म्हणायचे अजून म्हणतात. "बेटी धनाची पेटी" तसे झाले असावे. आणि हो माझ्या पाठीवर मला ३ भाऊ आहेत. माझे मामा मावशी काका सगळॆ मुंबईत नोकरी करीत होते आणि चांगले सुशिक्षित होते त्यामुळे त्यांनी आधीच सांगितले की बाय ला म्हणजे माझ्या आईला लाडाने अजूनदेखील बाय म्हणतात. ही  मुलगी "मी जयू"जगली, सुखरूप असली तर पुढे एक मूल झाल्यावर तिचे कुटुंबनियोजनाचे ऑपरेशन करून घेऊ.  आधीच तिला इतक्या डिलिव्हरीज करून तिचे शरीर कमजोर झाले आहे. माझ्या पाठीवर माझ्या नंतर  २-२ वर्षाच्या अंतराने मला भाऊ झाले परंतु माझी आई तेव्हाची इयत्ता चौथी शिकलेली असताना सुद्धा तिचे विचार आधुनिक होते. तिला तिच्या शरीराची पर्वा नव्हती. ती म्हणाली  मला अजून एक मुलगी हवी आहे. जर आत्ताही मुलगा झाला तर मी मग कुटुंबनियोजनाचे ऑपरेशन करून घेईन आणि शेवटचा चार नंबर चा ही मुलगाच झाला. म्हंजे घरात मुलगी मी तशी एकटीच. परंतु माझे फक्त खायचे प्यायचे लाड केले जायचे बाकी शिस्त म्हणजे शिस्त. आजीने,आईवडिलांनी, काकाने, मामा मावश्यांनी,आत्यांनी लावलेली शिस्त आजही कामाला येतेच येते. या कडक शिस्तीमुळे मी माझ्या मुलांना आणि घरात जरा कमी लाडकी आहे.परंतु माझ्या दोन्ही मुलांना शिस्त ही आहेच आहे. परंतु माझे माझ्या प्रभाशी आणि ट्रेक मधल्या सगळ्या लहान मुलांशी छान जमते.
घरात वडील अतिशय शिस्तीचे होते आणि त्यांना सगळे गावातले देखील खूप घाबरायचे. माझ्या वडिलांना फकिराच्या झोळीतून काढले असल्याने त्यांचे एक नाव रघुनाथ तर दुसरे नाव फकीर होते. आजीला ३ मुलीनंतर जो मुलगा झाला होता तो म्हणजे माझे वडील. पूर्वी काय नि आता काय वंशाला दिवा हा हवाच. तर माझे वडील माझ्या आजोबांच्या वंशाचा दिवा आहेत. माझ्या वडिलांच्या वडिलांना पाहण्याचे माझे भाग्य नव्हते परंतु सगळे म्हणायचे की आजोबा खूप गोरे होते. वडिलांचा रंग ही गोराच आहे. मला ६ आत्या एक काका आईवडील असे मोट्ठे कुटुंब होते. सगळ्या आत्त्यांचे सासर जवळच होते एखाद किलोमीटर अंतरावर. त्यामुळे येणे जाणे असायचेच. मला लहानपणी वाटायचे थोड्या दिवसांसाठी कुठेतरी जात असाव्यात ह्या आत्या. माझ्या आत्या माझे लाड करायच्या माहेरी आल्यावर मला झोपताना गोष्टी सांगायच्या. माझ्या आईला बिचारीला कामातूनच वेळ मिळत नव्हता.
माझे काका (की ज्यांच्या दोन्ही मुली डॉक्टर आहेत) दुसरीत असताना माझे आजोबा वारले त्यामुळे माझ्या वडिलांचे शिक्षण फक्त इयत्ता सातवीपर्यंतच झाले कारण त्यांच्यावर सगळ्या कुटुंबाची जबाबदारी पडली होती. वडिलोपार्जित शेतीकडे लक्ष देणे खूप गरजेचे होते. कारण आमचा परंपरेने चालत आलेला व्यवसाय फक्त शेती होता. वडिलांनी शाळा सोडली आणि शेतीमध्येच लक्ष घातले. आमचे किराणा मालाचे दुकान ही होते तेदेखील माझे वडील बाहेर गेले की आम्ही मुले चालवायचो. आम्ही भावंडे आज मुंबईत शिकलो असतो इंग्रजी शाळेत तर कदाचित डॉक्टर इंजीनीअर असतो. पण जे शिकलो तेही शिक्षण घेणे काहींच्या नशिबात नसते. जो तो आपापल्या परीने शिकत असतो. आम्ही मुलांनी खूप शिकावे असे त्यांना वाटायचे परंतु माझे भाऊ शेतीच्या कामात बाबांना मदत करायचे आणि शिकायचे. कधी गुरे राखणारा गुराखी नाही आला की भाऊ शाळेला दांडी मारून गुरे राखायला जायचे. कधीकधी मी सुद्धा हे काम केले आहे. पण हे  काम सुद्धा इमानदारीतच केले बरे. कधी गुरे दुसऱ्याच्या शेतात घातली नाहीत. पण ज्या दिवशी माझ्यावर गुरे राखायची वेळ येई त्यादिवशी मात्र मी तापाने फणफणत असायची. वडिलांच्या नकळत विटी दांडू, गोट्या, लगोरी, लपाछुपी,पत्ते, असे खेळ खेळत लहानाचे मोठे झालो. आई बाबा सांगायचे इथे कामं केलीस तरच सासरी कामं करशील हो. त्यामुळे आईला घरकामात मदत करायला शेतात काम करणाऱ्या बायका असायच्या त्या मदत करायच्या. मग माझ्या वाट्याला काय काम असायच तर मोट्ठे घर झाडणे, विहिरीवरून हंडा कळशीने पाणी आणणे, कपडे धुवायला विहिरिवर जाणे. कारण तेव्हा नळयोजना नव्हती किंवा इंधन विहिरी  नव्हत्या. आता घरोघरी इंधन विहिरी आहेत. गावातल्या सुनांची मजा आहे, शहरासारखं घरातच पाणी.  माझे भाऊ १०-१२ ग्रॅज्युएट आणि मी पोस्ट ग्रॅज्युएट असे आम्ही शिकलो. फकीर पाटलाची पोर असे मला सगळे हाक मारत असत.
तसे गावाकडे मुलगी जेमतेम दहावी-बारावी झाली की तिचे लग्न लावून देत असत. कारण मुलगी मोट्ठी दिसायला लागल्यावर तिला आपसूकच लग्नासाठी स्थळे यायला लागतात. आणि वडिलांनाही काळजी लागते. माझेही तसेच झाले होते. मी बारावी झाल्यावर मला स्थळे यायला सुरु झाले होते परंतु मला अजून शिकायचे होते आणि  वडिलांचीही खूप इच्छा होती मुलीने शिक्षिका व्हावे आणि किमान गावाकडच्या हायस्कुल मध्ये मुलीने शिकवावे. मी म्हणता म्हणता मुंबई, नासिक आणि पुणे येथे राहून पोस्ट ग्रॅजुयेशन आणि बीएड पूर्ण केले. त्यात मी टायपिंग च्या परीक्षेतही डिस्टिंक्शन मिळवले आहे. आता नोकरीसाठी काम्पुटर मध्ये एक्सपर्ट असावं लागतं तसं पूर्वी नोकरीसाठी किमान टायपिंग परीक्षा पास असाव्या लागत असत. त्यामुळे माझ्या वडिलांनी मला जे-जे चांगले आणि उपयोगी पडणारे शिक्षण घेता येईल ते घेण्याचा सल्ला दिला होता. आणि मी आपली जमेल तसं जमेल तिकडे राहून शिकत होते. कधी मामा कधी मावशी, कधी मुंबई,कधी नासिक, कधी पुणे. शिक्षणासाठी मी घरापासून दूर राहिले खरी पण आज तिन्ही शहरातली माणसे मी जोडली ती कायमची जोडली.
मी बाहुली किंवा भातुकली हा खेळ कधी खेळायचे नाही. मला नेहमी वेगळे काहीतरी करायला आवडते त्यामुळे सगळे मुलांचे खेळ खेळत असे मी. आणि अश्या आम्ही बऱ्याच मुली होतो.गावातल्या आम्ही २-३ मुली तेव्हा माझ्या बाबांची मोट्ठी उंच सायकल घेऊन गुपचूप चालवायला शिकलो. आज मी टू व्हिलर तर विमानासारखी चालवते. पण फोर व्हिलरचे आर. टी.. चे लायसन असून मला गाडी हातात मिळत नसल्याने तेव्हढी एक हौस बाकी आहेच. पण मला उत्तम गाडी येते. म्हणजे सांगायचं मुद्दा एकच आहे की प्रत्येक मुलींमध्ये काहीतरी वेगळे असतेच असते. ते तिला स्वतःला शोधता आले पाहिजे. तिने स्वतःच स्वतःमधील क्षमता ओळखून अनेक कला अंगी जोपासाव्यात. या सगळ्याला कुटुंबाची थोडी तरी साथ हवीच. मी हे सगळं करते ते सगळॆच काही माझ्या घरच्यांना आवडतेच असे नाही. पण तरीही मला कर म्हंटले जाते हेच खूप आहे माझ्यासाठी.आपल्यावर घरचे विश्वास टाकतात ना तो आपण सार्थ करून दाखवायचा एव्हढेच मला माहित आहे.आपण मुलींनी आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा गैरफायदा नाही घ्याचा म्हणजे झाले तर. मी घरातल्यांना सगळे वेळेवर देते किव्वा कुठे कमी पडत नाही म्हणून मी बिनधास्तपणे हे असं पेटी शिकणे, ट्रेकिंग करू शकते. कोणाला विश्वास बसेल की नाही माहित नाही मी ट्रेक ला जाताना पहाटे ५ वाजता कपडे धुवायची एक मशीन लावून जाते तेव्हढेच घरातल्यांचे एक काम हलके होते. हे मी का सांगते तर कोणाला हर्ट होण्यासाठी नाही तर  मुलींनो मला खूप लोकांनी ऐकवले आहे की तू मज्जा करते, फिरते, त्यांना मला हे सांगावेसे वाटते की हो मी आयुष्य जगते पण मी मला जमेल ती जबाबदारी पार पाडते आणि मग जाते बाहेर.    
मी मला मिळणाऱ्या पॉकेट मनी मधून माझ्या वाढदिवसाला स्वतःसाठी हार्मोनियम विकत घेतले होते २-३ वर्षांपूर्वी पण त्यासाठी चांगल्या संगीत शिक्षाकडून शिकणे गरजेचे होते. त्यासाठीचा क्लास मात्र मी आता लावला आणि मला पेटी वाजवणे जास्त आवडू लागले आहे. कारण मला संगीत आवडते. आणि मैत्रिणींनो तुम्हाला सांगू इच्छिते की  सगळ्या काळज्या,चिंता,दुःख, यांना विसरायचे असेल तर संगीतासारखा दुसरा सोबती नाही.
पदवीने एम.ए. बीएड.झाले खरी परंतु नोकरी करावी अशी घरच्यांची इच्छा नव्हती त्यामुळे प्रत्यक्ष शाळेत किंवा कॉलेजात शिकविले नाही. शिक्षकदिन च्या दिवशी हे देखील विसरून गेले मी मी देखील एक शिक्षिका आहे. हो पण जिथे मिळेल त्या ठिकाणी फुकट सल्ले द्यायला मात्र मी विसरत नाही.
मला लग्नाआधी स्वयंपाक फार काही येत नव्हता सासू आणि ननदांनी मला शिकवले  आणि मी शिकत गेले. मी कुठलेही काम मन लावून शिकते आणि मन लावून करते त्यामुळे कदाचित माझ्या हातचे पदार्थ चांगले होत असावेत. परवाच्या "झी मराठी" चॅनेल वरच्या "हवा येऊ द्या" या कार्यक्रमात "पदमश्री. पद्मजा फेणाणी-जोगळेकर" यांना हवा येऊ द्या मधल्या कलाकारांनी सहज प्रश्न विचारला की तुम्हाला स्वयंपाक येतो किंवा नाही? त्यावर त्यांनी खूप छान उत्तर दिले की"मला स्वयंपाक येतो मी रोज स्वयंपाक करते देखील पण मला ते काम करायला आवडत नाही." मला ते वाक्य अगदी पटले. मी मनोमन हसले कारण माझेही तसेच आहे मला स्वयंपाक करायला आवडत नाही पण मी ते काम रोजच न चुकता करते.  खरे तर  मला हे जेवण बनवणे आणि वाढत राहणे बिलकुल आवडत नाही.पण हे काम प्रत्येक स्त्री ला मरेपर्यंत करावे लागते. नोकरी करणाऱ्या स्त्रियांनाही हे काम करावेच लागते. पण जर या कामाची तिचा पावती मिळाली तर कोणतीही स्त्री तेच काम आनंदाने करते. तसे मात्र होत नाही. बाहेरची दुनिया तारीफ करते. आणि घरातल्यांना काय वाटते की रोजच चांगले बनवते रोजच काय तारीफ करायची?? तारीफ करायला पैसे लागत नाही किंवा फार खूप कष्ट पडत नाहीत. हा फक्त मोट्ठे मन लागते. की जे प्रत्येकाकडे नसते.
लग्न झाल्यावर सगळ्या जबाबदाऱ्या आल्याचं. लग्न होऊन पुण्यात आल्यावर मी आजपर्यंत एकदाही राखी पौर्णिमेला माहेरी गेलेली मला तरी आठवत नाही. कारण माझ्या दोन्ही दिरांना भाऊ मानून राखी बांधते, आणि नणंदेच्या मिस्टरांनाही राखी बांधते त्यामुळे मला माहेरी ३ भाऊ असून मी तिकडे फक्त पोस्टाने राखी पाठवते  आणि भाऊबीजेला भाऊ मला भेटायला येतो किंवा सासरची भाऊबीज झाल्यावर दिवाळीच्या सुटीमध्ये मी गावी गेले तर तिकडे भाऊबीज होते.नाहीतर  इथेच राखी पौर्णिमा,इथेच भाऊबीज इथेच दिवाळी इथेच सगळे सण साजरे करतेय. मला बहीण नाही त्यामुळे मी माझ्या नणंदांना, आणि माझ्या जावांना बहीण समजून प्रेम देत आले. पण सासर ते सासर असते सगळे हेवे दावे गैरसमज आले. चालायचंच पण म्हणून आजपर्यंत कुठल्याही जबाबदारीपासून, कर्तव्यापासून मी दूर नाही गेले. प्रत्येक  स्त्री ला काहींना काही दिव्यातून जावेच लागते. त्यातून देखील मार्ग शोधणे हे महत्वाचे.
लग्नानंतर सगळंच बदलतं म्हणतात तसंच माझ झालं होत माझ्या स्वतःच्या सगळ्या आवडी- निवडी सगळ्या बाजूला ठेवल्या अगदी खाण्यापिण्याच्या आवडी सुद्धा. मुलांना, नवऱ्याला काय आवडेल, पाहुण्यांना काय आवडेल  तेच बनवायचं अर्थात चांगलंच  आणि तेच मी खायचं. इतरांना काय आवडते तेच करायचं असंच सगळं चालायचं. अश्या खूप गोष्टींचा राग, समज-गैरसमज  सगळं मागे ठेवून आता इतरांच्या आवडी जपण्याबरोबरच स्वतःच्याही आवडी जपू लागले आहे. मला आधीपासूनच फोटोग्राफी चे वेड आहेच, त्यात महिन्यातुन एकदा ट्रेकिंग ला जाते. त्यामुळे फोटोग्राफी ची कसर भरून निघते आणि ब्लॉग लिहिला की मग लिखाणालाही आनंद मिळतो. शिवाय वाचकांनाही सफारीचा आनंद देता येतो. ब्लॉग वाचणारे अनेक प्रकारचे वाचक आहेत. काही फक्त चांगला म्हणणारे. काही माझ्या ब्लॉग मधल्या त्रुटी सांगणारे, काही माझा ब्लॉग आवर्जून वाचणारे आहेत, काही ब्लॉग लिहायचा आग्रह करणारे आहेत, काही ब्लॉग ब्लॉग न वाचणारे सुद्धा आहेत, काही ब्लॉग म्हणजे काय माहित नसूनही ब्लॉग आवर्जून वाचणारे आहेत. काहींना विचारावे लागते ब्लॉग पाठवून का ?? त्याचे उत्तर ही न देणारे फ्रेंड्स आहेत. "व्यक्ती तितक्या प्रकृती." काही म्हणतात ब्लॉग मध्ये घरच्यांचा उल्लेख करत जा, काही जण म्हणतात अशी प्रत्येकवेळी उल्लेख करण्याची आवश्यकता नाहीये. असे अनेक हजारो स्वभावाची माणसे मला भेटली. परंतु मी त्यांच्या सल्ल्याचा माझ्या लिखाणात चांगल्यासाठी वापर करते आहे.
आयुष्यात हे करायचं राहून गेले ते करायचे राहून गेले. ह्या सगळ्याला इतरांइतकेच आपण स्वतः देखील तितकेच जबाबदार असतो हे लक्षात असू दे मुलींनो, स्त्रियांनो. सगळ्या गोष्टींचा ताण घेत बसलो तर अनेक आजार मागे लागतात आणि  कशातून  निष्पन्न होत नाही. मी स्वतः या सगळ्याचा अनुभव घेतला आहे. कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी ठराविक वय हवे असे काही नाही. मला एव्हढे आजार असूनदेखील मी ट्रेकिंग करते. ब्लॉग वाचणार काही जण मला विचारतात की घरात कोण करते मग?? काही जण विचारतात अगं आत्ताच तुझ्या घरात पूजा झाली ना मग तू लगेच ट्रेकिंग ला कशी चालली दमली की नाही?? त्यांना मी सांगू इच्छते की माझ्या घरात फक्त भांडी फारशी ला बाई आहे ते देखील मला संधिवात आहे. पाण्यात खूप खूप काम केले की माझी हाडे सुजतात त्यामुळे भांडी घासायला बाई असली तर माझा आजार कवटाळत बसण्यातला वेळ वाचवते. तोच वेळ मी एखादी कला शिकण्यात घालवते. त्यामुळेच मी पेटीचा क्लास लावून सध्या  पेटी सुद्धा शिकते आहे शिकत राहीन. ट्रेकिंग करते, पेटी शिकते म्हणजे घरात लक्ष नसते किंवा घरातली कामे टाकून बोंबलत फिरते असे नाहीये. आणि हो हे पेटी वैगरे शिकते ते काही रोज रोज नसते आठवड्यातून एकदा किव्वा दोनदा असते ते देखील एकच  तास असते. आणि हा एक तास आपण कितीदातरी गप्पा मारण्यात टी व्ही बघण्यात घालवतो.. मी त्याच एक तासाचा असा वापर करते. माझ्या कित्तेक मैत्रिणी आहेत की ज्यांना देखील नोकरी करण्यास परवानगी नाहीये त्या घरच्या घरी शिकवण्या घेऊन आपल्या ज्ञानाचा चांगला वापर करतात. मला घरी असा काही करणे मनापासून आवडत नाही. कधी कधी स्वतःचा राग येतो की मी गृहिणी आहे. परंतु आज मी सकारात्मक विचार करते की  मी आज नोकरी करीत नाही त्यामुळे एका अर्थाने हे खूप चांगले आहे. कारण मी जर नोकरी करून तारेवरची कसरत करत असते तर मी माझ्या कुटुंबाकडे आणि स्वतःकडे तितके उत्तमरित्या लक्ष देऊ शकले नसते आणि माझ्या मुलांचे नवऱ्याचे आरोग्य आता जसे चांगले आहे तसे राहिले नसते. मुलांचे आणि स्वतःचे छंद देखील मला जोपासता आले नसते.
माझ्या घरी आत्ताच ऑगस्ट महिन्यात सत्यनारायणाची पूजा झाली त्यावेळी. माझ्या घराची साफसफाई मी एकटीनेच केली. कारण ह्या कामवाल्या असली कामे आपल्या मनासारखी करत नाहीत त्यांना वेळ नसतो आणि केलंच तर थुका लावल्यासारखे करतात. माझ्या घरात ५-६ वर्षांपूर्वी सफेद रंगाचे फर्निचर जास्त आहे त्यामुळे ते जरा जास्तच स्वच्छ ठेवावे लागते. घराची साफसफाई आपण स्त्रिया रोजच करतो पण. पण तरीही एकूण एक कोपरा पुसायला मला २० दिवस लागतात. मधेच माझी तब्बेत बिघडते आणि रोजचे रुटीन चे काम असतेच मुलांना सोडा आणा माझी बाहेरची कामे सगळं सुरु असते.माझ्या घरी येणारी प्रत्येक व्यक्ती मला सांगते की आत्ताच घराचे रिनूयेशन केलास का ग? म्हणजे याचा अर्थ  असा होतो की माझं घर सुद्धा नेटनेटके आणि स्वच्छ असतेच. मला नावे ठेवणाऱ्यांनी एकदा माझ्या घरी येऊन बघा मी ट्रेकिंगला बोंबलत फिरते की काय करते ते... अश्या कामाच्या वेळी मी वॉट्स अँप बंद ठेवले आणि मिस्टरांना म्हंटलं मी वॉट्स ऍप बंद ठेवलं होते  ५-६ दिवस तर बरीच कामे झाली माझी. तर त्याचा माझ्यावर विश्वास  बसला नाही. घरातली माणसे इतकी नालायक समजतात मला???  माझ्या हातात फोन असतो म्हणजे मी वॉट्स अँप फेसबुक बघत असते हा लोकांचा फार चुकीचा गैरसमज आहे. फोटो एडिटिंग चे मला वेड  आहे. याची त्याची उणीदुणी काढत बसण्यापेक्षा आणि आपले दुःख उगाळत बसण्यापेक्षा स्वतःला आवडत्या कामात गुंतून घेते. 
काही जण टोमणे मारतात की जयू ला ट्रेकिंग म्हंटले की खूप उत्साह येतो. तर असे बिलकुल नाहीये. मला सगळ्या कामात सारखाच उत्साह असतो. मग ती घरची पूजा असो, घरी २५-३० लोक जेवायला येणार असो, कुठला सण असो, कुठे लग्नाला जायचे असो, नटणे सजणे असो, किव्वा अपार्टमेंट चा एखादा प्रोग्रॅम असो, होळी असो, दिवाळी असो, सगळीकडे सारखाच उत्साह असतो. फक्त आपली खोपडी सटकलेली नाही पाहिजे.
मी जे आहे ते समोर बोलते पण सगळ्याच व्यक्ती तश्या नसतात. माझ्या तोंडावर एक आणि पाठीमागे एक बोलत असतात. त्याचा आता माझ्यावर काहीही दुष्परिणाम होऊ देणार नाही मी. कारण अर्धे आयुष्य या असल्या फालतू गोष्टींमध्ये गेले. मला जे शिकता आले नाही ते शिकण्याचा सल्ला मी माझ्या मुलांना देते. मुलांचा अभ्यास मीच तर घेते. त्यांनी अभ्यासाव्यतिरिक्त एखादी तरी कला शिकावी असा माझा आग्रह असतो. गाणे शिकावे किंवा एखादे वाद्य वाजवायला शिकावे. मैदानी खेळ खेळावेत. फक्त बक्षिसे मिळविण्यासाठीच नव्हे तर आपण शारीरिक दृष्ट्या सुधृढ रहातो यासाठी भरपूर खेळा. माझा मुलगा करते ब्लॅक बेल्ट आहे. स्केटिंग केले ५-६ वर्षे. क्रिकेट देखील खेळत होता. आता फुटबॉल खेळतो.नुसता पुस्तकी कीडा  होण्यापेक्षा अभ्यासा व्यतिरिक्त दुसरंही खूप काही शिकण्यासारखे आहे. माझी मुलगी देखील तिच्या शाळेत उत्तम गुणांनी पास होते.बास्केट बॉल खेळते. मी जर फक्त माझ्या स्वतःच्यात च मश्गुल असते तर मला सांगा हे सगळं शक्य असता का??
स्त्री मनाची अवस्था कोणीही कधीही जाणू शकत नाही फक्त स्त्रीच एका स्त्री ची व्यथा समजू शकते. मग ती व्यथा कुठलीही असो.
तेव्हा शिकलेल्या टायपिंग चा मला खूप उपयोग झाला आणि आता ब्लॉग लिहिण्यासाठी देखील उपयोग होत आहे. बाहेर नोकरी करायला नको म्हणत हतोय घरातले त्यामुळे मी घरी काही व्यवसाय करावा या हेतूने डेटा एंट्री चे कामदेखील केले १-२ वर्षे पैसे भरपूर मिळाले आणि मनालाही शांतीही  मिळाली की मी सुद्धा काहीतरी करू शकते याची. परंतु चेतन शाळेत गेला की मी सगळी कामे करून संगणकावर टायपिंग चे काम सुरु करीत असे. माझा टायपिंग चा वेग जास्त असल्याने मला मजा वाटायची आणि जास्तीत जास्त पाने टाईप करून व्हायची आणि माझे काम लवकर व्हायचे.  पण सतत च्या जास्तीच्या कामामुळे मानेचे दुखणे मागे लागले ते लागले. २ वर्षांनी मग काम बंद करावे लागले.  मग ऑनलाईन एम एल एम पण केले. हे करू की ते करू या नादात स्वतःच्या आरोग्याकडे लक्षच दिले नाही आणि अनेक आजार मागे लागले. गृहिणी काय आणि नोकरी करणारी स्त्री काय. तिला दोन्हीकडे कसरत करावीच लागते. या विषयावर बोलावे तेव्हढे कमीच आहे.
आपण स्त्रिया अशाच असतो सगळ्यांकडे लक्ष देतो इतरांची काळजी घेतो. परंतु स्वतःसाठी खूप कमी जगतो. इतरांचेही लाड करा कुटुंबाचे लाड करा सगळ्यांचे करा पपण आधी स्वतःचे लाड करा, छंद जोपासा,आरोग्यासाठी योगा-प्राणायाम करा, दुसऱ्यांना जसे चांगले पदार्थ खायला घालतो तसे स्वतःदेखील खा. डाएट वगैरे मी तरी करीत नाही. जेव्हा हेवी जेवाल तेव्हा जास्तीचे चालणे करा फक्त. आणि माझा म्हणाल तर मी स्वतः २ एक वर्षांपासून ट्रेकिंग करतेय त्यामुळे मला त्याचा फायदा खूप झाला आहे. माझा संधीवात आणि मानेची दुखणी, मणक्यातील ग्याप, अशी बरीच दुखणी गायब झाली आहेत. शिवाय ट्रेकिंग करता करता फोटोग्राफी ची हाऊस देखील पूर्ण होते. आणि ब्लॉग लिहिला की लिखाणाची हाऊस देखील पूर्ण होते. मी म्हणत नाही तुम्ही ट्रेकिंगच करा. पण शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी किमान रोज चालणे तरी असावेच. कोणतीही गोष्ट शिकायला वयाची अट नाही हे मी माझ्यावरून सांगतेय. पण तरीही ज्यांच्या मनात जे प्रश्न पडतात ना कि मी फक्त ट्रेकिंग ला भटकत राहते आणि घरात दुर्लक्ष असते तसे मात्र बिलकुल नाहीये. माझ्या घरातल्यांना विचारू शकता. कारण माझ्या कुटुंबाचे आरोग्य माझ्यापेक्षा चांगले आहे. अजून काय हवे आहे.
माझी मावशी मुंबईमध्ये नोकरी करते परंतु तिचे घर बघाल तर काय म्हणाल.चकाचक असते कायम. तिच्याकडे मी एक-२ वर्षे शिकायला होते त्यामुळे तिचा हा गुण माझ्यात उतरणे सहज शक्य आहे. ती जेवणाचे पदार्थ अतिशय सुंदर चविष्ट आणि नाजूकरित्या करायची तशीच सवय मला लागून गेली.माझ्या आजीच्या आणि आईच्या हातच्या पदार्थांना खूप छान चव होती त्यामुळे ती देखील माझ्यात उतरणे आलेच.. मैत्रिणींनो तुम्हाला एक सांगू इच्छिते की आपल्या सभोवताली जेव्हढी माणसे आहेत त्यांच्यात चांगले वाईट दोन्ही गुण असतात. त्यातला आपण चांगलाच गुण अचूक हेरायचा आणि आपल्यात आणायचा. बघा काय कयामत होते. माझ्या खाण्याच्या पदार्थाची तारीफ करणाऱ्या व्यक्ती भरपूर असतील पण अचूक तारीफ करणारी रूपा पाठक. ती म्हणते जयू तू नुसत वारं जरी फोडणीला घातलस तरी ते चविष्ट बनते. माझा भाऊ त्याला माझ्या हातचे जेवण आवडते. मी कुठलाही ड्रेस सारी परिधान केले तरी त्याला माझ्यात माधुरी दीक्षित दिसते. म्हणतो ताई तू माधुरी दीक्षित दिसते आज. हे जरा जास्तच होते. पण त्याला वाटते ते वाटते. पण आपल्याला कोणाची तारीफ करावीशी वाटली तर मनापासून खरंच करून घ्या. समोरच्याला तुमचे मन किती सुंदर आहे हे समजते. मी राहते त्या अपार्टमेंट मध्ये सगळ्या लोकांना मी केलेल्या पुरणपोळ्या, उकडीचे मोदक, तसेच व्हेज नॉन व्हेज जेवण अतिशय आवडते मी जेवण सुंदर बनवते. तसेच बाकी गूण आहेत. घरातली माणसे कायम घरातल्या स्त्री ला गृहीतच समजतात. तू काय रोजच चांगले बनवतेस त्यात काय कौतुक करायचे?? म्हणजे काय तर घरकी मुर्गी दाल बराबर. असेच झाले की हे..   पण जर मी बेचव जेवण बनवले तर लगेच सांगाल की नाही?? तसे चांगले बनवल्यावर देखील चांगल्याची देखील तारीफ कार्याला शिका.
आजकाल मी जे लेख लिहिते त्या लेखांचे वाचन केलेले जास्त आवडेल. कौतुकच केले पाहिजे असे काही नाही. त्यातल्या त्रुटी सांगा. एक समीक्षक म्हणून वाचा. तुम्हाला त्या लेखातून काहीतरी चांगलेच घ्यावयास मिळेल, काहीतरी प्रेरणा मिळेल, माझा ब्लॉग वाचून सुमित भावसार या छोट्या मुलाला देखील असा ब्लॉग लिहावासा वाटतो माझ्या बऱ्याच मैत्रिणींना देखील काहीतरी लिहावेसे वाटते. म्हणजे नक्कीच त्यात काहीतरी आहे. सहज आठवलं म्हणून सांगतेय एका ग्रुपवर एक वर्षांपूर्वी एकदाच माझा ब्लॉग टाकला होता आणि म्हंटले होते ब्लॉग वाचा परंतु  त्यातल्या एक-दोघांच्या फक्त प्रतिक्रिया आल्या. ब्लॉग वाचल्याच्या... बाकीच्यांना विचारले तर तर म्हणे वेळ नाही मिळाला मोठ्ठा आहे फार लेख.मी ते वाक्य लक्षात ठेवून पुन्हा त्या ग्रुप वर आजतागायत ब्लॉग टाकला नाहीये. मी म्हणते रोजचे वर्तमानपत्र तर आवर्जून वाचता ना वेळ काढून न चुकता?? त्या वर्तमानपत्राएवढा मोठ्ठा तर माझा ब्लॉग नक्कीच नाही. दुसऱ्यांची उणीदुणी काढत बसतात, स्वतःची दुःख उगाळत बसतात. त्यापेक्षा हा ताजा ताजा महिन्याचा महिन्याचा ब्लॉग वाचा. आणि आनंदी व्हा.
माझ्या कित्तेक वाचणाऱ्या मैत्रिणी म्हणतात जयू तुला इतके सुचते कसे आणि एव्हढा सय्यम येतो कुठून तुझ्यात लिखाणाचा. ?? “यही तो बात है..शायद इसे प्याशन बोलते हैस्वतःला चांगल्या कामात गुंतवले की सगळं आपोआप चांगले सुचते आणि चांगलेच लिहिले जाते..... लिहावे तेव्हढे कमीच आहे. वाचकांचा आग्रह झाला तर राहिलेल्या गोष्टी सुद्धा दुसऱ्या ब्लॉग मध्ये लिहिल्या जातील. म्हणजे.. क्रमशः ... 
     



Monday, 29 August 2016

"भिरभिरणारा भिरा"

अंधारबन ते भिराधरण ट्रेक
दि.२८ ऑगस्ट २०१६.

ट्रेक..! ट्रेक...!! ट्रेक...!!! हवा होता सगळ्यांना. घ्या ट्रेक आणि तो ही पावसाळी ट्रेक. "फोना" चा ट्रेक म्हणजे अफलातून मजा असते. जून मध्ये आमचा "ड्युक्स नोज आणि कोराईगड"असा ट्रेक झाल्यानंतर फक्त एकच महिना ट्रेक नाही झाला परंतु असे वाटले कितीक महिने ट्रेकसाठी गड आमची वाट पहात आहेत. आम्हालाही पावसाळी ट्रेक करायचा होताच. बरेचदा "कातळधाराचा"  आमचा ठरलेला पावसाचा ट्रेक असतो. परंतु आमचे मंदार सर आणि मनोज सर आमच्या ट्रेक मेम्बर्स च्या आग्रहाखातर, हौशीखातर वेगवेगळी ट्रेकिंग ची ठिकाणे आमच्या समोर आणून आम्हाला आश्चर्यचकित करीत असतात. असेच यावेळी झाले. मंदार सरांनी भन्नाट ट्रेक ची पंगत आमच्यासमोर आणून ठेवली. पंगत ठेवली खरी पण त्या ट्रेकच्या पंगतीला बसायचे की नाही हा विचार करायला सुद्धा मला वाटते कोणाला वेळ मिळाला नसेल. कारण ट्रेक साठी आधीच भुकेलेल्या ट्रेकर्सनीं क्षणाचाही विचार न करता पटापट आपले ट्रेकिंग साठी बुकिंग करून टाकले. आणि लग्गेच ५० सीट ची बस फुल्ल झाली. आणि लोकांच्या आग्रहाखातर आणि ३२ सीटर बस केली ती देखील फुल्ल झाली. अजून बरेच लोक वेटिंग ला होते. परंतु खूप जास्त ट्रेकर्स ना सांभाळून नेणे आणि आणणे सोप्पे नाही. त्यामुळे फक्त ८०-८२ मेम्बर्स फिक्स केले गेले. 


केव्हा एकदाचा २८ ऑगस्ट येतो असे झाले होते.एकदाचा २८ ऑगस्ट चा रविवार उजाडला आणि आमच्या दोन बस सकाळी ६:३० वाजता वाकड पिरंगुट मार्गे मुळशी धरणाच्या कडेकडेने ताम्हिणी घाटातून अंधारबनकडे निघाल्या. मध्ये एका ठिकाणी चहासाठी थांबून तिथेच नास्ता केला. पुणे जिल्ह्यातील  मुळशी तालुक्यात वांद्रे फाट्यापासून आमची बस ज्या रस्त्याने गेली तो रस्ता पिंपरी, भांबर्डे, तैलबैला फाटा मार्गे लोणावळ्याला जातो. इथून भांबर्डे १८ कि. मी.आहे भांबर्डे गावातून घनगड ला जात येते.आंबवणे ३० कि.मी. आहे आणि लोणावळा ५ कि.मी. आहे. तिथले  पिंपरी गाव ५ कि. मी. वर आहे. सकाळी १० वाजता पिंपरी गावाच्या पाझर तलावापाशी आमची बस थांबली आणि आम्ही त्या पाझर तलावापासून ट्रेक ला सुरुवात केली. परंतु आम्ही ट्रेक ची उतराई अंधारबनातल्या हिरडी गावातून भिरा धरणाच्या बाजूने करणार असल्याने आमची बस भिरा धरणाच्या बाजूने आधीच जाऊन थांबली. पाऊस सुरूच होता आणि प्रत्येक डोंगर कापसासारख्या ढंगाने झाकलेला दिसत होता. जणू  काही डोंगरांना थंडी लागू नये यासाठी ढगांनी डोंगरांना लपेटून घेतले असावे. १०:१५ लगेचच ट्रेक ला सुरुवात झाली ती तिथल्या पिंपरी गावच्या उन्नई बंधाऱ्यापासून. आम्ही ६ महिन्यांपूर्वी घनगड पूर्ण आणि अर्धे अंधारबन चा ट्रेक केला त्यावेळी माझे मुंबईचे फ्रेंड्स प्राजक्ता आणि प्रदीप आले होते.तेव्हा याच बंधाऱयांतून आम्ही गेलो होतो तेव्हा पाणी खूप कमी होते. एक क्षण आपण कुठे आहोत हे समजलेच नाही मला. 


ट्रेक सुरु केल्यावर छोटे छोटे धबधबे आमचं स्वागत  करत होते. जसे  पाहुणे आल्यावर आधी पाणी देतात नंतर जेवण देतात तसंच आधी छोटे धबधबे पाय धुण्याचे कामकाम करत होते. आणि नंतर मग मोठ्या धबधब्यात मनसोक्त भिजणे. ट्रेकच्या सुरुवातीलाच कुंडलिका व्हॅलीतून भिरा धरणाचा नजारा खूप छान दिसतो परंतु ढगांनी सारे डोंगर दऱ्या अच्छादून टाकल्या होत्या त्यामुळे आम्ही तोच निसर्ग डोळ्यात साठवून घेऊन अंधारबन ची वाट चालू लागलो.  म्हणता म्हणता आम्ही न थांबता अर्ध्यात आलो होतो. कुठे आलो ते काहीच कळत नव्हते.अंधारबन चा खरा अनुभव अंधारबनात गेल्यावरच येत होता. घनदाट जंगल. आम्ही काही लोक आणि जंगल ची वाट माहित असलेले विवेक रामायणे आमच्या सोबत होते कारण ट्रेकिंग चा अनुभव असलेली एकतरी व्यक्ती पुढे जाणाऱ्या सोबत असावीच. नाहीतर वाट सगळ्या सारख्या दिसतात परंतु एक वाट चुकली की वेळ वाया जातो आणि ट्रेक वेळेत होत नाही शिवाय शोधाशोध करावी लागते ती वेगळी. असे आम्हाला ग्रुप प्रमुखांनी शिकवलंय.


आम्ही झपझप चालत होतो पण तरीही निसर्गाचा आनन्द घेत, हळूच फोन बाहेर काढून फोटो काढत, गाणे म्हणत जंगल पार करत होतो.मधेच काही लोक दिसायचे आमच्याच गृप चे पण आमचा वेग वाढला की ते लोक अदृश्य व्हायचे. एक ठिकाणी २ प्राणी मरून पडले होते माकडे होती ती.त्याची दुर्गंधी इतकी होती की आम्ही धावतच राहिलो थोड़ा वेळ. दुपारचा १ वाजून गेला होता. मध्ये चॉकलेट्स व स्नीकर्स च खात होतो आणि पाणी पीत होतो. पोटामध्ये कावळे ओरडत होते. आमचे काही मेंबर्स मागे होते वाट चुकू नये यासाठी आम्ही एका ठिकाणी थांबलो मोकळ्या माळरानावर तिथे अजून ग्रुप आधीच पोहोचून जेवण करत होते. त्यातला एक ग्रुप जेवण करून कचऱ्याची पिशवी तिथेच टाकून गेला किंवा विसरून गेला. आणि आम्ही तिथे आत्ताच आलो होतो त्यामुळे तिसरा गृप आमच्यावर भडकला तुमचा कचरा घेऊन जा.. अरे बाबानो आम्ही चॉकोलेट चा कागद पण गडावर टाकत नाही तर अशी कचरा भरलेली पिशवी कशी टाकू.???  त्या गृप चे लोक जरा जवळ येऊन बघतात तर ओळखीचेच निघाले. मग ते ट्रेकर्स ती कचऱ्याची पिशवी स्वतः उचलून घेऊन गेले.

या ठिकाणाहून तैलबैला आणि घनगड चा नजारा खूपच छान दिसतो असे ऐकले होते वाचले होते परंतु पाऊस आणि ढगांमुळे तिथल्या छब्या टिपताच आल्या नाहीत. ८०-८३ लोक पुन्हा एकत्र आल्यावर पुन्हा पावले चालू लागली. दुपारी २:३० वाजता आम्ही हिरडी गावात पोहोचलो आणि त्या छोट्या छोट्या कौलारू घराजवळ जेवणासाठी जागा शोधात होतो. ती कौलारू घरे पहिली की हमखास मला  माझ्या गावाची आठवण येते. आम्ही सगळेच चिंब भिजले असल्याने आम्हाला कोणी घरात बसा म्हणून आग्रह केला नाही आणि आम्ही बसलोही नाही. तिकडे एक मंदिर आहे तिथे एवढ्या लोकांना जागा होईल असे ऐकले पण जायला कोणाच्यात ताकद नव्हती. त्यामुळे तिथेच घराच्या ओट्यावर आपापले डबे काढून जेवण केले. यावेळी थोडा वेळ मिळाला त्यामुळे मी खाऊ बनवून आणला होता. मी आणलेल्या कोथिंबीर वड्या आणि आळू वड्या आणि पुरणपोळी  खूप कमी लोकांना मिळाल्या असे वाटते. ज्यांना नाही मिळाल्या त्यांना सॉरी. पण जेवणाच्या वेळी वरूण राजाने थांबून मेहेरबानीच केली. तिथेच आम्ही ग्रुप फोटो काढले आणि ३:२५ ला आम्ही  हिरडी गावाच्या बाजूने भिरा धरणाकडे उतरायला सुरु केले. ग्रुप प्रमुख म्हणाले किमान २ तास लागतील उतरायला. आणि तसेच झाले आम्ही झपाझप उतरत होतो कोण कुठे आहे याचा पत्ता नव्हता. पुन्हा एक तास गेल्यावर तिथे ५ मिनिटे फोटोग्राफी केली आणि पुन्हा निघालो.

संध्याकाळी ५:१५ वाजता भिरा धरणाच्या दरवाज्यापाशी आलो. खरे तर धरणाच्या भितीवरून चालायला फोटो काढायला परवानगी नाही परंतु ट्रेकर्स दमून आलेले असतात त्यामुळे इथून शांतपणे जाण्यास परवानगी देतात. कारण दुसरा रस्ता  ७-८ किलोमीटर्स चा आहे. त्यांचे आभारच मानले पाहिजेत. त्या धरणाच्या रस्त्यावरून निघावे वाटत नव्हते आणि तिथले रक्षक तिथे थांबूही देत नव्हते त्यामुळे आम्ही निघालो. जे अंधारबन आम्ही चाललो आणि ज्या दऱ्या तुन आम्ही उतरलो ते पाहून आणि आठवून आमचं आम्हालाच आश्चर्य वाटत होते. कारण आम्ही सकाळी १०:१५ ते संध्याकाळी ६ पर्यंत भर पावसात ते जंगल तुडवून आलो होतो. निसर्गाच्या सान्निध्यात फिरण्यासारखा ट्रेक करण्यासारखा दुसरा आनंद नाही. भिरा धरण१०० टक्के भरल्याने पाण्याचा विसर्ग चालू होता. तिथून पुढे कोलाड नदी ओसंडून वाहत  होती. आम्ही आमच्या बस जवळ आलो गप्प बसमध्ये येऊन बसलो आणि सगळे ट्रेकर्स आल्यानंतर बस निघाल्या पुन्हा घराकडे. 
निसर्गासारखा दुसरा सखा सोबती नाही. आणि त्यात फोना सोबतचा ट्रेक म्हणजे दुधात  साखर. ट्रेक ला गम्मत जम्मत असते परंतु गृप प्रमुखाने सांगितलेले कुठले नियम आम्ही तोडत नाही आणि त्यामुळे आमचा ट्रेक अतिशय सुंदर, सुखरूप आणि यशश्वी होतो.









अंधारबन च्या ट्रेक ची उन्हाळ्यातली मजा वेगळी आणि पावसातली मजा वेगळी. उन्हाळ्यात ऊनसावलीचा खेळ तर पावसात पावसाचा आणि कापसाळी ढगांचा खेळ आणि भिजायचा आनंद. "अंधारबन ते भिरा धरण"  13 किलोमीटर चे अंतर एका दिवसात कसे काय पूर्ण करू शकतो आपण यावर माझा विश्वास च बसत नाहीये. फक्त हे "फोना ट्रेकिंग गृप सोबतच शक्य आहे. रात्रीचे १० वाजून गेले होते घरी यायला. एकंदरीत "अंधारबन ते भिरा धरण"ट्रेक यशस्वी सुफळ संपूर्ण झाला. 

Tuesday, 14 June 2016

"पहिल्या पावसातला भन्नाट ट्रेक "


कोरीगड आणि ड्युक्स नोज ट्रेक
दिनांक- १२ जून २०१६
चढाई श्रेणी- मध्यम
ठिकाण- लोणावळा 

११ मार्च पासून ट्रेक नाही झाला त्यामुळे मी ट्रेक ची आणि पावसाची सोबतच वाट  पाहत होते आणि १२ जून ला एकदाचा ट्रेक चा दिवस उजाडला. आंनद तर खूप झाला होता ट्रेक ला जायचा परंतु ट्रेक च्या आधी मला काहीतरी दुखापत झालेली असतेच. हे काही नवीन नाही. यावेळी activa पायावर पाडून घेतली होती. पण मी गुढघ्यासाठी ट्रीटमेंट घेतली आणि ट्रेक ला जायचे ठरवले.पहिल्या पावसाच्या ट्रेक ची ओढ काही वेगळीच असते. पुण्यात पावसाची एक सर येवून गेली होतीच त्यामुळे लोणावळ्यात हलकासा दिलासा देणारा पाउस हा असणारच अशी अशा होती आम्हा सर्वांना. यावेळी पाण्याची उणीव खूपच जाणवते आहे. याविषयावर बोलावे तेव्हढे कमीच आहे. आमच्या ग्रुप ने कोरीगड आणि ड्युक्स नोज असा दोन गडांचा ट्रेक आयोजित केला.मी ऐकले होते की मध्यम चढाई श्रेणीतले हे गड आहेत.  मी स्वतः या गडांवर पहिल्यांदा जाणार होते त्यामुळे मला दोन गड काय नि मध्यम श्रेणीतले काय नि कठीण श्रेणीतले गड काय. "फोना"सोबत ट्रेक ला जाणे आणि "ट्रेक' चा निसर्गाचा फोटोग्राफीचा मनमुराद आनंद घेणे एव्हढेच कळते बरे. मग तिकडे १० ट्रेकर्स असो किंव्वा २० ट्रेकर्स असोत किंव्वा ५० ट्रेकर्स असोत.

आमची बस निगडीहून सकाळी ६:३० ला निगडीहून निघाली. यावेळी नवीन मेंबर दिसत होते. बस ने लोणावळ्याचा रस्ता  धरला. आम्ही तळेगावकरांना घेवून बस मध्ये बसलो आणि मनोज राणे खालीच राहिले होते. चुकून विसरलो होतो त्यांना. आले नंतर एका बाईक वर. उत्साहाच्या भरात होते असे कधी कधी. त्यांना घेवून श्रीफळ फोडून ग्रुप फोटो काढून बस कोरीगड च्या दिशेने निघाली. एक मिनिट वाया न घालवता आम्ही आमचा  गाण्याचा खजाना बाहेर काढला. नवीन लोकांनी सुद्धा आमच्या सुरात सूर मिसळला. आणि  मला जास्त आवडला ते प्रशांत भावसार चा मुलगा सुमित आणि विवेक रामायणे चा मुलगा कौस्तुभ यांनी अप्रतीम गाणी गायली. पटकन लोणावळा आले. काही अंतर गेल्यावर ते पावसाने दाटून आलेले ढग कोसळायला सुरुवात झाली. वाह काय वातावरण होते ते. तिथेच खाली उतरून नाचावेसे वाटत होते. आमची गाण्याची महफ़िल सुरूच होती त्यात.त्यात पावसाची भर पडली. माझं  लक्ष सगळं बाहेर होतं कारण कापसासारखे ढग दिसत होते मधेच पाउस पडत होता. थंडगार हवा सुटली होती. अतिशय रम्य आल्हाददायक  वातावरण झाले होते. मे महिन्याच्या उन्हाने हैराण झालेल्या जीवांना आता थोडावेळ का होईना दिलासा मिळाला होता. आम्ही ९ वाजता आंबवणे गावाच्या जवळ आमची बस लावली आणि पोह्याचा नास्ता करून लगेच चढाई सुरु केली. बारीक पाउस पडून सुखावीत होता.

कोरीगडाविषयी माहिती-मुळशी धरणाच्या पश्चिमेकडे मावळ आहे,त्याचे नावं आहे "कोरबारस मावळ". कोरी हे कोळ्यांच्या एका पोटजातीचे नाव, या कोरी लोकांचा गड तो कोरीगड होय. कोरीगड समुद्र सपाटीपासून ३००० फुट उंचीवर आहे. निगडीपासून साधारण ४३-४५ किलोमीटर अंतरावर  हा गड आहे. या मावळ प्रांतात कोरीगड आणि घनगड हे किल्ले येतात. लोणावळा आणि पाली यांच्यामध्ये असणाऱ्या  सव्वाष्णी घाटाच्या माथ्यावर कोरीगड आहे. हा किल्ला प्रसिद्ध आहे त्याच्या सद्य…स्थितीला असलेल्या अखंड तटबंदीमुळे. या किल्ल्याला 'कोरीगड',"कोराईगड' या नावानेही ओळखतात. तर या गडाच्या पायथ्याशी असलेल्या पेठ शहापूर या गावामुळे या किल्ल्याला "शहागड" या नावानेही ओळखतात.

आम्ही आंबवणे गावाजवळून सकाळी ९ वाजता कोरीगड ची चढाई सुरु केली. गावातून कोराईगड एका भिंतीसारखा भासतो. आम्ही आमची बस ज्या ठिकाणी थांबवली होती त्या ठिकाणाहून गडाला पूर्ण वळसा घालून जावे लागले.किमान २ कि. मि. अंतर चालून गेल्यावर गडाचा पायथा आला. परंतु जास्त पायऱ्या आहेत. ट्रेकर्सना पायऱ्या नको असतात त्याने अजून कंटाळा येतो. परंतु पर्याय नव्हता आम्ही चढाई सुरु केली. वाटेने वर येताना एक पाण्याचे टाके आणि श्री गणेश मंदिर लागते. या टाक्यातले पाणी पिण्यायोग्य आहे परंतु हे पाणी पिताना मात्र त्यावरील वरचा थर बाजूला करावा. माकडे किवा इतर प्राणी सुद्धा हे पाणी पितात त्यांची लाळ त्यावर तरंगत असते त्याने आपल्याला इन्फेक्शन होऊ शकते ही मोलाची माहिती आम्हाला मंदार सरांनी दिली थांकू सर. आम्ही तिथे थांबून थोडी फोटोग्राफी केली. कारण इथून सहारा सिटीचा नजारा खूप छान दिसत होता. तो आम्ही सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष पाहण्यात जास्त मजा येईल.

गणेशदरवाज्याने अर्थात पेठ शहापूरच्या वाटेने वर आल्यावर समोरच वाड्यांचे अवशेष आढळतात. गडावर गेल्या-गेल्या जांभळे खायला मिळाली.

गडाला फेरा मारताना मंदार सरांच्या अंगात थोडावेळ "सैराट" आला होता. याड लागलं या गाण्यावर नाचायचा मनमुराद आनंद त्यांनी आणि प्रशांत भावसारचे कुटुंब यांनी घेतला.
गडाच्या माथ्यावरूनचालत असताना खाली सहारा सिटीचे अप्रतिम दृश्य मनमोहून घेत होते. असे वाटत होते तिथून च उडी मारून खाली लेक वर फिरत असलेल्या बोट चा राईड  घ्यावा. सहारा सिटीच्या वर एक छोटे विमान फिरत होते. खेळण्यातील विमान फिरावे तसा तो खेळत होता जो कोणी होता तो. "सहारा सिटी" हे "लवासा सीटी" सारखे सुंदर भासले परंतु बऱ्याच ठिकाणी झाडे न तोडता, निसर्गाला हानी न पोहोचवता तिथे सहारा सिटी उभे केलेय असे दिसते. वरून गर्द झाडी दिसत होती. मी त्या छबी टिपून घेतल्या आहेत.
 
त्याठिकाणी आम्ही भगव्या सोबत आणि फोना ग्रुप च्या ब्यानर सोबत फोटो काढले आणि मंदार सरांनी आमची वरात काढली. "अरे चला रे दुसरा गड करायचा आहे अजून." गडाचा फेरा पूर्ण झाला त्या ठिकाणी शंकराचे मंदिर आहे तिथे आम्ही थोडावेळ थांबलो.


त्या मंदिरात छोटे कॅन्टीन होते तिथे भजी, म्यागी बनवणारे एक जोडपे होते.आमच्या आधीच आलेल्या ठाणावाला madam नी एक भजी प्लेट घेतली होती ती मस्त होती झणझणीत लगेच फस्त केली. गडावर जेवणाची सोय नाही आपण आपली सोय करावी.पठारावर  कोराईदेवीचे मंदिर आहे. मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. मंदिरासमोरच एक दीपमाळ आहे. गडावर दक्षिणेकडच्या बाजूस अनेक बुरूज आहेत. गडावर आजही सहा तोफा आहेत. त्यापैकी सर्वात मोठी लक्ष्मी तोफ कोराईदेवीच्या मंदिराजवळ आहे.


याचप्रमाणे गडावर आणखी दोन मंदिरे आहेत. गडावर दोन विस्तीर्ण तळी आहेत.परंतु ती फक्त पावसाच्या पाण्यात भरतात आणि काही महिनेच त्यात पाणी असते हे पाणी पिण्यायोग्य नाही.  गडावरून समोरच नागफणीचे टोक, तुंग, तिकोना, माथेरान, प्रबळगड, कर्नाळा आणि माणिकगड असा सर्व परिसर दिसतो.. गडमाथा म्हणजे एक भलेमोठे पठारच आहे. गडाची तटबंदी साधारणत:… दीड किलोमीटर लांबीची आहे. तटबंदीवरून संपूर्ण गडाला फेरा घालता येतो. आम्ही फेरा घातला. आणि ११ वाजता गड उतरायला सुरुवात केली कारण आम्हाला अजून ड्युक्सनोजगड सुद्धा करायचा होता. कोरीगड उतरताना आवाजवाला फोटो काढला आणि निघालो. अर्ध्या तासात गड उतरलो आणि बसमध्ये बसलो.

धुव्वाधार पाउस सुरु झाला होता. आम्ही ड्युक्स नोज कडे निघालो. मधेच वाटेत आम्हाला टायगर point लागला तिथे आम्ही १० मिनिटे थांबलो. पाउस छान चालू होता परंतु गर्दी ही तेव्हढीच आणि पर्यटकांनी त्या ठिकाणी एवढा कचरा घाण करून ठेवली आहे की  विचारू नका. आम्ही गडावर जातो तेव्हा चोकलेटस चे कव्हर सुधा टाकत नाही. उलट तिथे काही कचरा असेल तो आम्ही उचलून आणतो. त्या ठिकाणी एका छोट्या झाडावर हिरव्या रंगाचा विषारी साप होता तो आमच्या ग्रुप चे सर्पमित्र संजय निकाळजे यांनी तिथून पडकून पुन्हा जंगलात सोडून दिला. संजय निकाळजे यांनी २०,००० हून जास्त साप पकडून सुखरूप पणे जंगलात सोडून दिले आहेत. आम्हाला त्यांचा खूप अभिमान आहे.

टायगर पोईंट च्या इथून निघाल्यावर कुरवंडे गावात आलो.कुरवंडे  गावाच्या मध्यभागी श्री कोराई मारुतीदेव प्रसन्न प्रतिष्ठान चे एक मंदिर आहे. तिथे आमची बस थांबली. पोटात कावळे ओरडत होते आणि एक गड देखिल अजून बाकी होता. पावूस पडत असल्याने आम्ही त्या मंदिरात थांबून जेवण केले. जेवण केले आणि आमचा छोटा मित्र सुमित त्याचे बूट हरवले होते. तिथे काम करणारी २ मुले खेळत होती त्यांचा पिच्छा पुरवला आम्ही. त्यांनीच घेतले होते ते बूट. मिळवले एकदाचे बूट बिचाऱ्या सुमित चे. नाहीतर सुमित सोबत आईबाबाचे चेहरे सुद्धा रडवेले झाले होते.जेवण केल्याकेल्या लगेच आम्ही ड्युक्स नोज कडे निघालो.  २ कि.मी अंतर चालून गेल्यावर चढाई सुरु झाली.
ड्युक्स नोज हा समुद्रसपाटीपासून २००० फुट उंचीवर आहे. हा गड नाकाच्या आकाराचा आहे म्हणून त्याला ड्युक्स नोज हे नाव आहे. नागफणी point सुधा म्हणतात याला. हा अतिशय सुंदर असा ट्रेकिंग गड आहे. मी मुंबई ला जाताना कायम याचा दुरून फोटो काढत असे. प्रत्यक्ष इथे कधी येईन असे वाटले नाही मला. परंतु आज मी खराखुरा गड चढत होते यावर माझाच विश्वास बसत नव्हता. इथे जवळच आय. एन. आय. शिवाजी ह्या संस्थेचा.मोठ्ठा आणि सुन्दर परिसर आहे. गड छोटा असला तरी तसा चढ भरपूर आहे. परंतु जर हा चढ चढून स्वर्ग दिसणार असला तर कोणाला नकोय. मी तर या स्वर्गरूपी निसर्गाच्या छब्या टिपण्यासाठीच जात असते. ३ वाजता आम्ही गडावर पोहोचलो. तिथे एक छोटे शंकराचे छान मंदिर दिसले. आणि आजूबाजूला खरोखर स्वर्ग दिसत होता. ते पांढरे शुभ्र कापसासारखे ढग डोळ्यासमोरून धावत होते. कधी आम्हाला स्पर्श करून जात होते. दूरवर माझा तो एक्सप्रेस हायवे दिसत होता.

ट्रेन चा बोगदा दिसत होता. काय आणि कसं, किती वर्णन करू मी. गडाचा पसारा फार मोठ्ठा नाही. लावलेले बार जरा सैल झालेले आहेत. आम्ही त्या बारच्याही पलीकडे बसलो होतो स्नेहल खोल्लम आणि मी. मी  भरपूर फोटोग्राफी केली. थंडगार वारा अंगाला झोंबत होता. दूर एक धबधबा आत्ताच सुरु झालेला उठून दिसत होता. जय थरवळ आमच्या सोबत होता गमतीदार पोर आहे हो. म्हणतो मी पण माणूस आहे माझे पण फोटो आले पाहिजेत की राव.  काही ट्रेकर्स यायचे होते ते आले. सगळे ट्रेकर्स आम्ही एक तासभर ड्युक्स नोज् वर होतो. त्या ठिकाणी मंदार सरांनी गडाचा इतिहास थोडक्यात सांगितला आणि नव्या जुन्या मेम्बर्स ची ओळख करून घेतली. त्यांनतर ४ वाजता ड्युक्स नोज् वरून उतरताना डचेस नोज आहे तिथे ही एक फेरी मारली तिथून दिसणारा ड्युक्स नोज गड काय भयानक दिसत होता आणि या भयानक दिसणाऱ्या भिंतीवरून ट्रेकर्स रयापलिंग करतात. त्यात आमचे मंदार थरवळ, विवेक रामायणे रोहित सर आणि मनोज सर आणि बरेच लोक देखील आहेत बरे.


एकेक ग्रेट माणूस आहे आमच्या फोना ग्रुप मध्ये. आम्ही काही ट्रेकर्स अर्ध्या तासात गडाच्या पायथ्याशी पोहोचलो. सगळे येईस्तोवर पाउस आला. आम्ही आता मात्र खूप थकलो होतो. ५ वाजता ट्रेक संपवून निघालो. एव्हढ्या लवकर निघालो असा हा पहिला ट्रेक असावा. बसमध्ये राहुलने आणलेले खमंग खारे शेंगदाणे आणि बाहेर पाउस पडत होता त्यांने खूप मजा आली. लोणावळ्यात ट्रेन च्या फाटकाजवळ जरा वेळ गेला परंतु आम्ही सुरु केलेल्या अंताक्षरी ने आणि मनोज राणे सरांनी विचारलेल्या कोड्यांनी रमलो आम्ही. मध्ये थांबून एक गरमागरम चहा घेतला आणि घरचा रस्ता धरला बसने परंतु माझे मन अजून गडावरच होते. ट्रेक दरम्यान मंदार सर आणि मनोज राणे सर यांनी त्यांच्या ऑफिस प्रमोशन ची छोटी स्वीट पार्टी दिली. बालुशाही आणि मोतीचूरचे लाडू खूपच चवदार होते तेपाणी आले ना  न आलेल्या लोकांनो ?? धन्यवाद मंदार सर आणि राणे सर. पुन्हा पुन्हा प्रमोशन होवो आणि पुन्हा पुन्हा पार्टी मिळो आम्हा गरीब ट्रेकर्स ना. यावेळी कोणीही धडपडले,पडले नाही हे महत्वाचे. चहा पिताना मात्र छान गाणे गाणाऱ्या कौस्तुभ ला चहाने भाजवले खूप रडला बिचारा. तरीही त्याने खूपच छान गाणे गायले याचे कौतुक वाटते सगळ्यांना. अशाप्रकारे आमचा हा ट्रेक छान, गमतीदार आणि यशस्वी असा ट्रेक झाला. सुफळ संपूर्ण…… सगळ्यांचे आभार.