Monday, 17 July 2017

"अंधारबन धुवाधार ट्रेक"

"अंधारबन पावसाळी ट्रेक"
ठिकाण-पुणे जिल्हा (ताम्हिणी घाट)
दिनांक -१६ जुलै २०१७


पुणे जिल्ह्यामध्ये मुळशी तालुक्यात ताम्हिणी घाटामध्ये "अंधारबन" हे घनदाट जंगल आहे. हे पुण्यापासून सुमारे ६६ कि.मी. अंतरावर आणि तळेगावपासून जवळ जवळ ८० कि. मी. अंतरावर आहे. "अंधारबन ते भिरा डॅम" हा "फ्रेंड्स ऑफ नेचर असोशिएशन" (फोना)चा एका बाजूने सुमारे १३ कि. मी. चा  ७४वा ट्रेक आयोजित केला. यावेळी माझे  ट्रेकला जाणे पक्के नव्हते परंतु माझ्या कुटुंबाने ट्रेकला येणाची मनापासून तयारी दाखवल्याने मलाही ट्रेकला येणे जास्त गरजेचे आणि आनंदाचे वाटले.  
रविवार दिनांक १६ जुलै २०१७ या दिवशी आमच्या दोन बसेस सकाळी ६ वाजता तळेगाव-निगडी-वाकड-चांदणीचौक-पिरंगुट मार्गे मुळशी धरणाच्या कडेकडेने ताम्हिणी घाटातून अंधारबनकडे निघाल्या. पावसाची संततधार आधीपासूनच सुरु होती. यावेळी "फोना' टीम च्या ५०-५० सीट्स च्या २ बसेस होत्या. १ बस पुढे गेली परंतु आम्ही ज्या बसमध्ये होतो त्या बसचा ड्रायवर नेमका गाडीचे परमिट घरी विसरला. तिथे १ तास थांबावे लागले. असे एखाद्या वेळेस फार क्वचित घडते. परंतु त्या वेळात आम्ही बसमध्येच सोबत आणलेला पोह्याचा नास्ता केला आणि तिथे निसर्गात थोडी फोटोग्राफी केली.परमिट आल्यावर पुन्हा पुढचा प्रवास सुरु झाला.
जाताना रस्त्यालागत भातखाचरे पाण्याने आणि भाताच्या रोपाने भरलेली दिसली आणि शेतकरीण कुटुंबासोबत  भाताची रोपे घेऊन भातलावणीच्या लगबगीत दिसली.  ताम्हिणी घाटामधील ट्रेक ला जाताना इथल्या रस्त्यालगत असलेल्या छोट्या साध्या शिवसागर हॉटेल आहे तिथे आम्ही चहा घेतला. त्या परमिट च्या गडबडीमुळे बस थोड्या मागेपुढे झाल्या होत्या आणि नारळ फोडून ट्रेकचा श्रीगणेशा करायचा राहून गेला होता. यावेळी माझे मिस्टर श्री. दीपक सानेंच्या हस्ते नारळ फोडून ट्रेकचा श्रीगणेशा केला आणि प्रतीक पेंढारे याने राजे श्री.छत्रपतीं शिवरायांची आणि संभाजी राजेंची स्फुर्तीपूर्ण गर्जना करून पुढील प्रवास सुरु झाला.
प्रौढप्रताप पुरंदर,क्षत्रियकुलावतंस,राजणिती धुरंधर,शास्त्रास्तशास्त्र पारंगत,महाराज,श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय...धर्मवीर संभाजी महाराज की जय...राजमाता जिजाऊ माँसाहेब की जय...हर हर महादेव...जय भवानी, जय शिवाजी..
१०० ट्रेकर्स मधील ८० टक्के ट्रेकर्स आम्हाला नवीन होते त्यामुळे आत्तापर्यंत बसमध्ये सगळेच शांत होतो.कदाचित पहिल्यांदा ट्रेक करणाऱ्या काहींच्या मनात १३ कि.मी. चा इतका मोठा ट्रेक पूर्ण करू शकू की नाही अशी भीतीही असेल.चहा घेताना लीडर च्या परवानगीने आम्ही काही मेंबर्स अंताक्षरीसाठी दुसऱ्या बस मध्ये गेलो आणि तास भर अंधारबन येईपर्यंत गाण्याने सगळ्यांचे मनोरंजन करून(अंताक्षरीचा कल्ला) करून अंधारबन च्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलो."आपल्याला आनंद हवा असेल तर आपणच आंनदाजवळ गेले पाहिजे,आनंद आपोआप पाय चालत आपल्या पायाशी येणार नाही मी या तत्वाची आहे. इतरांचे माहित नाही परंतु मी हा आनंद मिळवण्यासाठी ट्रेक करीत असते. शारीरिक आरोग्य आणि मनाचे आरोग्य चांगले हवे असेल तर त्यासाठी महिन्यातून किमान एक तरी ट्रेक हवाच हवा.
मुळशी तालुक्यात वांद्रे फाट्यापासून आमची बस ज्या रस्त्याने गेली तो रस्ता पिंपरी, भांबर्डे, तैलबैला फाटा मार्गे लोणावळ्याला जातो. इथून भांबर्डे १८ कि.मी.आहे भांबर्डे गावातून घनगडला जाता येते.इथून आंबवणे ३० कि.मी. आहे आणि लोणावळा ५ कि.मी. आहे. तसेच तिथले  पिंपरी गाव ५ कि. मी.वर आहे. सकाळी ११:३० वाजता पिंपरी गावाच्या पाझर तलावापाशी आमची बस थांबली. मोबाइल पाण्यामुळे खराब होऊ नये आणि इतक्या सुंदर अंधारबन मध्ये फोटोग्राफी सुद्धा झाली पाहिजे त्यासाठी मी खास amazon.in वरून एक मोबाइल कव्हर आणले होते ते मी यावेळी वापरले कारण एका पावसाच्या ट्रेकमध्ये माझा मोबाईल आणि डिजिटल कॅमेरा दोन्ही खराब झाले होते त्यामुळे मी पावसात माझ्या मोबाईलची जरा जास्तच काळजी घेते आणि तुम्ही देखील स्वतःच्या फोन आणि कॅमेऱ्याची काळजी घ्यावी असे मला वाटते.  ताम्हिणी घाट न्याहळत होते,बसमधून सुद्धा फोटोग्राफी सुरूच होती परंतु तिथे उतरल्यावर त्याहून अतिशय सुंदर निसर्गाचा अद्भुत मनमोहक नजारा पहावयास मिळाला. अश्यावेळी ओठांवर अनेक काव्यपंक्ती आणि गाणी सहज येतात,
"हिरवे-हिरवेगार गालिचे हरिततृणांच्या मखमालीचे
"हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट सांगो चेडवा दिसतो कसो  ताम्हिणीचो  घाट.... हिरव्या हिरव्या.."

आठवड्याच्या प्रत्येक रविवारी पावसाच्या ट्रेक आणि सहलीला जाण्याची क्रेझ आणि त्यात भर त्या सेल्फीकाठी घेऊन फोटो काढण्याची क्रेझ खूप जास्त वाढली असल्याने घाटाच्या प्रत्येक वळणावर माणसांची आणि वाहनांची धोकादायक तुफान गर्दी आढळली. जर असेच निसर्गाचा ऱ्हास करणारे लोंढे च्या लोंढे इकडे घाटमाथ्यावर वाहू लागले तर निसर्गाचा ऱ्हास लवकरच होईल याची भीती वाटली.
निसर्गात फिरा परंतु तिथले नुकसान नका करू”  “संवर्धन करायला जमत नाही तर निदान संहार तरी नका करू.”  हा एक नियम पाळला तरी आपणच आपली जैवविविधता सुरक्षित ठेवून आरोग्य सुरक्षित ठेऊ शकू.
सध्या दररोज च्या बातमीपत्रांमध्ये आपण वाचतो आहोतच की बरेच लोक दारू पिऊन सहलीला जातात तर जातात आणि गडकिल्ल्यांवरदेखील जातात कचरा करतात असभ्य वर्तन करताना दिसतात. निसर्गाला  हानी पोहोचवतात शिवाय अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे इतरांच्या चुकीमुळे सगळेच ट्रेकर्स उगाचच बदनाम झाले आहेत.  मागील आठवड्यात कर्जत जवळील पेब किल्ला(विकत गड)आणि ताम्हिणी घाटामधील मधील देवकुंड धबधबा येथील  झालेल्या अपघातामुळे बऱ्याच गडकिल्ल्यावर आणि पर्यटनस्थळी जाण्यास बंदी आणली आहे. पावसाचा जोर घाटामध्ये खूप जास्त आहे आणि या अपघाताची घटना अजून ताजी असल्याने कोणाही पर्यटकांना किंवा ट्रेकर्सना भिराधरणाकडे जाऊ दिले नाही. हे तिथे जवळ गेल्यानंतर समजल्यामुळे अंधारबन ते भिराडॅम च्या ऐवजी "अंधारबन ते हिरडी गाव" जाऊन परत येणे असा हा सुमारे १०ते११ कि.मी. असा ट्रेक करण्याचे ठरले.

अंधारबन ट्रेक च्या सुरुवातीलाच तेथील पिंपरी हे छोटे गाव आहे त्या गावचा हा पाझर तलाव दुथडी भरून वाहत होता आणि मुसळधार पावसामुळे चिखलमय झाला होता.  ट्रेक प्रमुखांनी यात उतरू नये अशी सूचना आधीच दिली असल्यामुळे आम्ही आमच्या ट्रेकला सुरुवात केली.दर वर्षी पावसाळी ट्रेकला जरा जास्त गर्दी असते त्याप्रमाणेच यावेळीदेखील गर्दी होतीच. "फोना"ग्रुपचे जरी १०० ट्रेकर्स होते तरी २५-२५ चे ४ ग्रुप करून एका ग्रुप सोबत किमान ३ लीडर होते. संपूर्ण ट्रेक विषयी आणि घावयाच्या दक्षतेविषयी सूचना दिल्या गेल्या. रघुनंदन पाटील याने त्याच्या ग्रुपकडून खूप सारे सीड बॉल्स बनवून आणले होते त्याचे वाटप करून ते ट्रेक दरम्यान जमिनीत कसे लावता येतील याची माहिती त्याने दिली.  जगामध्ये जैवविविधता असलेले एकूण ७ जैवविविधता हॉट-स्पॉट आहेत त्यातील आपल्या भारतामध्ये  २ आहेत.  त्या २ मधील ताम्हिणी घाट हा एक आहे. आपण खूप नशीबवान आहोत की आपण जैविविधता असलेल्या आणि अप्रतिम असे निसर्गसौंदर्य असलेल्या ताम्हिणी घाटाच्या इतक्या जवळ आहोत आणि बरेचदा इथे आपण ट्रेक करत असतो, इथल्या निसर्गाचा आनंद लुटत असतो. जर आपण निसर्गाकडून इतकं काही घेत असतो तर मग याच निसर्गाचे आपण देणे सुद्धा लागतो. "एक हाथ से ले और एक हाथ से दे" ही म्हण  सार्थ ठरवण्यासाठी असे सीड बॉल्स लावणे किंवा किमान बिया लावणे,अशी निसर्गसंवर्धनाची कार्ये आपण करू शकतो.  या अगोदर ताम्हिणी घाटाचा हा स्पॉट फक्त ट्रेकर्स च्या गर्दीचा असायचा परंतु आता इथे सहलीचा आनंद लुटण्यासाठीसुद्धा लोकांची तुडुंब गर्दी असते. कारण पुण्यातील लोणावळ्यातील भुशी धरण आणि तिथले सगळेच पॉईँट तुफान गर्दीने आणि दुर्दैवाने कचऱ्याच्या साम्राज्याने व्यापले आहेत.आम्ही ट्रेकर्स कोणत्याही गडावर कचरा करीत नाही.थर्माकोलच्या प्लेट चा वापर करीत नाही आणि जंगलात किंवा गडावर त्याचा कचरा टाकून येत नाही.  सहलीला गेलेल्या पर्यटकांनी आणि सर्वच ट्रेकिंग ग्रुपनेसुद्धा हा नियम पाळला तर आपला निसर्ग आपणच आपल्यासाठी स्वच्छ ठेवू शकू.
ट्रेक ला सुरुवात झाली आणि छोटे छोटे धबधबे घरी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करावे तसे आमचे पाय धुवून स्वागत करू लागले.धबधब्यांच्या रूपाने ते प्रेम ओसंडून वाहत होते. आमच्यासोबाबत अजून काही ट्रेकिंग ग्रुपदेखील होते. डाव्या हाताला खोल दरी होती तिला "कुंडलिका व्हॅली" म्हणतात. पावसाचे ढग असले तर ती व्हॅली बिलकुल दिसत नाही. परंतु ढग दाटून आला आणि पाऊस पडल्यावर एक-दोनदा कुंडलिका व्हॅलीने दर्शन दिले. त्या व्हॅलीतून दिसणाऱ्या  भिरा धरणाने आमच्याकडे वाकून पहिले तेव्हाचे दृश्य अप्रतिम होते. एका बाजूला व्हॅली एका बाजूला धुक्याने भरलेले उंच डोंगर आणि  विरघळल्यावर मुसळधार पावसाने धुथडी भरून वाहणारे धबधबे.अश्यावेळी डोळे तृप्त झाले होते प्रश्न पडतो की ट्रेक करू की फोटोग्राफी करू की ते दाटलेले ढग विरघळेपर्यंत पाहत राहू. छोटे छोटे धबधबे ओलांडल्यावर एक मोठा ओढा-धबधबा पार करण्यासाठी ग्रुप लीडर्सने साखळी करून एकेकाला सुरक्षितरित्या दुसऱ्या बाजूला पाठवले. त्यानंतर पुढचे २ धबधबे असेच हाताची साखळी करून आणि काही ठिकाणी दोर बांधून ट्रेकर्सना पुढे पाठवून त्यांच्या मागून लीडर्स येत असत.  ढगांचा धुके-पावसाचा खेळ सतत सुरु होता.  अंधारबनचे घनदाट जंगल आम्ही चालत होतो. दिवसा चालत असून रात्रीचे जंगल पार करीत आहोत की काय असा भास होत होता इतका अंधार होता. एक तास जंगल पार करून गेल्यावर एक मोठा धबधबा पार करताना पाण्याच्या प्रवाहाचा वेग जास्त असल्याने जरा अवघड वाटत होते  परंतु रोप लावून हाताची साखळी केल्याने कठीण गोष्ट थोडी सोप्पी जात होती.   ट्रेकलीडर्स आणि सगळेच मेंबर्स तुम्ही उत्तम कामगिरी केलीत. अंधारबनची वाट चालताना मधेच धबधबे, मधेच चिखलमय वाट, मधेच जोरदार पाऊस मधेच लक्ख उजेड आणि उंच हिरव्या डोंगरांवरून फेसाळणारे दिसणारे पांढरे स्वच्छ धबधबे. अवर्णनीय असे ते रम्य देखावे डोळ्यात आणि मनात कॅमेऱ्यात साठवून घेतले.

उन्हाळी ट्रेक असल्यावर पाणी खूप जास्त प्यावे लागते आणि सोबत न्यावे लागते. पावसाच्या ट्रेकचा हा एक फायदा आहे की पाणी कमी असले तरी चालते. हिरडी गावाच्या जवळपास गेल्यावर दुपारी २:३० च्या सुमारास अंधारबन मधेच थांबून आम्ही जेवण केले. "फोना" बॅनर फोटो घेतला आणि अंधारबन मध्ये थांबलो असल्याने १०० ट्रेकर्स च्या समूहाने एका ट्रेकला प्रदीप अडागळे यांनी गायलेला शाहीर राजू राऊत यांचा  एक पोवाडा सादर केला, "अंधार फार झाला,एक दिवा पाहिजे.. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे."  त्यावेळी त्या अंधारबनात त्या पोवाड्याचा सूर खूप छान लागला होता.



पावसाचा जोर वाढल्याने तिथून परतीची वाट धरली कारण अंधार व्हायच्या आत १०० ट्रेकर्स ना इतके सारे धबधबे सुरक्षितरित्या पार करून सुरक्षितरित्या घेऊन जाणे काही खाऊ नाहीये.  परत येताना पावसाचा जोर प्रचंड वाढल्याने जंगलाची वाट पाण्याने भरून वाहत होती आणि जास्त चिखलमय झाली होती. ट्रेकर्स देखील एक माणूसच आहे तो  देखील थकतो. पाण्यात चालल्याने माझे तर पाय दुखतातच. पण तरीही ट्रेक पूर्ण झाल्याशिवाय थांबणे नाही. जाताना वाटेत लागली धबधबे आता प्रचंड वेगाने वाहू लागले होते. चॉकलेटच्या नद्या वाहताना दिसत होत्या. अचानक वाहत्या पाण्याचा रंग बदलला की समजावे पाण्याचा वेग वाढला आहे. एका ओढ्याजवळ पाणी इतके वाढले होते की जाताना सहज पार केलेला तोच ओढा पार करणे सहज शक्य नव्हते. थोडा वेळ रांगेत थांबून पाण्याचा वेग थोडा कमी झाल्यावर पुन्हा रोप लावून हाताची मजबूत साखळी करून हळूहळू एकेक, दोनदोन मेम्बर्सना ओढ्यातून बाहेर काढणे शक्य झाले. असे ३ मोठे ओढे पार केल्यावर जरा हायसे वाटले. आता ५ वाजून गेले होते अंधारबन अंधार पडायच्या आत पार करणे गरजेचे होते. त्यात पुन्हा पाऊस सुरुच होता आणि इतका उशीर होत असताना आम्ही अंधारबनातून बाहेर येऊ पाहत होतो आणि इतर लोक फक्त धबधब्याखाली भिजणारे लोक दारूच्या बाटल्या, कोल्ड्रिंकच्या बाटल्या, चखणा घेऊन जाताना दिसली, पिताना दिसली ट्रेक च्या वाटेत पाण्यात शुद्ध हरपून लोळताना दिसली. अशीच मग तोल जाऊन पाण्यात पडतात आणि दुसऱ्या दिवशी बुडून मेला म्हणून बातमीपत्रात झळकतात. अश्या लोकांना तिथेच तुडवावे वाटत होते आणि पोलिसांकडे द्यावे वाटत होते. अशा लोकांमुळेच ट्रेकर्स बदनाम झाले आहेत.
"जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची" हे ज्याला समजले तो जिंकला. 

अंधारबन ट्रेक दरम्यान रघुनंदन याने आणलेले जवळवळ १५० सीड-बॉल्स सगळ्यांनी मिळून अख्या अंधारबनात ट्रेकच्या वाटेजवळ थांबून छोटे छोटे खडे करून लावले. आणि येताना अंधारबन मधला प्लास्टिक कचरा,प्लास्टिक बाटल्या आम्ही उचलून आणल्या. मागच्या वर्षी अंधारबन ते भिरा डॅम हा एका बाजूने १३.की. मी. चा ट्रेक पूर्ण करता आला होता तो आनंद काही वेगळाच आणि आत्ताच्या ट्रेकचा अनुभव त्याहून वेगळा आणि आनंद देखील वेगळाच होता. मुसळधार पावसामुळे यावेळी सुमारे १०-११ की. मी. चा ट्रेक करता आला. हाताची पाची बोटे सारखी नसतात, नाटकातील सगळीच पात्रे सारखी नसतात त्याचप्रमाणे आलेले  ट्रेकर्स हे सगळे काही एकसारखे वागतील याची गॅरेंटी देता येत नाही. एखादा न ऐकणारा असतो, एखादा जास्त मस्ती करणारा असतो, काही एकदम शिस्तीत चालणारे असतात. अश्या वेगवेगळ्या तऱ्हेच्या १०० लोकांचा ट्रेकिंगचा ग्रुप घेऊन जाणे, उत्तम ट्रेक घडवणे आणि कोणताही अपघात न होता त्या सर्व ट्रेकर्सना सुरक्षितरित्या बसजवळ परत आणणे हे खूप जिगरीचे कार्य आहे आणि ते लीडर्सच्या युक्ती-क्लुप्ती आणि कौशल्याचे, संयमाचे काम आहे.  तसेच महत्वाचे म्हणजे आलेल्या सर्व ट्रेकर्सच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले आहे. 
इतका अप्रतिम,मनोरंजक आणि आठवणीत राहणारा असा ट्रेक घडवून आणल्याबद्दल सर्व प्रथम माझे मिस्टर श्री. दीपक साने यांचे आणि माझ्या दोन्ही मुलांचे (चेतन,प्रभा)मनापासून आभार कारण या ट्रेकसाठी माझी सिस्टीम ठीक नसल्याने मला हे तिघे मला घेऊन आले होते. त्यांनतर ट्रेक प्रमुख श्री. मंदार सर श्री. राणे सर, श्री. निकाळजे सर, रोहित सर आणि विशेष आभार श्री माजगावकर काका, गोलांडे सर, सोनार सर, मंगेश, विनोद मुळे आणि खास आभार सीड बॉल्स आणणारा रघुनंदन पाटील (तू माझा बाप निघालास सोलापूरची सोलापुरी आणि तुमची कोल्हापुरी भाषा मला नेहमीच आवडते) गंमतीचा भाग सोडला तर सारखे रघु पाटील रघु पाटील असे ऐकायला मिळाल्याने मला माझ्या वडिलांची खूप आठवण झाली कारण माझ्या वडिलांचे नाव श्री.रघुनाथ पाटील असे आहे) त्यांनतर आलेले सर्व नवीन ट्रेक मेंबर तुमच्या सहकार्यामुळे ट्रेक यशस्वी होणे अशक्य होते. वेळेअभावी आणि जोरदार पावसामुळे यावेळी ट्रेक मेंबर्सची ओळख करून घेणे शक्य झाले नाही त्यासाठी सगळ्यांनी प्रत्येक ट्रेकला यावे. तसेच माझे ट्रेकफ्रेंड्स,हिरल राणे,ऋतुजा,सुरेखा,अबोली,कविता,पूर्णिमा,तनया,प्रतीक पेंढारे,विवेकानंद,आनंद,प्रशांत भावसार, उमाकांत पोतदार, मंदार चिंचलीकर, नितीन वाकुलकर,संदीप गोरे, गायक शेवकर सर,मिताली, प्रज्ञा, ज्वाला, स्नेहा, स्नेहल,डॉ गिरीश, डॉ.आकाश, यशल आणि जय तसेच सगळे जुने नवे ट्रेक फ्रेंड्स तुम्हा सगळ्यांना धन्यवाद.. संध्याकाळी ५:३० वाजता ट्रेक संपवून ६:३० अंधारबनमधील  त्या फेसाळलेल्या धबधब्यांचा, त्या हिरव्या गालिच्यांचा, धुक्याच्या शालीचा जड अंतःकरणाने निरोप  घेऊन आम्ही पुन्हा त्याच रस्त्याने पुण्याची वाट धरली.  रविवार असल्याने वर्षासहलीला जाणारे पर्यटक, तसेच ट्रेकर्स अश्या सगळ्यांच्या गाड्यांच्या  ताम्हिणी घाटामध्ये ट्रॅफिकमुळे रांगाच रांगा लागल्या होत्या तरीही एका बाजूला मावळत्या दिवसाचा हलकासा संधिप्रकाश आणि एकीकडे मुळशी धरणाचे दुरून शांत दिसणारे पाणी  एकीकडे वाहनांचा प्रकाश असे सुंदर दृश्य होते.  आमच्या बसच्या मागेपुढे प्रकाशाच्या रांगाच रांगा लागल्या आहेत असे भासत होते. मुसळधार पावसात येताना चांदणी चौकातून ट्रेकमेम्बर्सना सोडत सोडत आम्ही घरी रात्री ११:३० वाजता पोहोचलो. असा हा पावसाळी अंधारबन चा ट्रेक सगळ्यांच्या सहकार्यामुळे उत्तमोत्तमरित्या पूर्ण झाला. खरे तर नेहमीप्रमाणे मला अजून ब्लॉगला अनुसरून काही स्नॅप्स या ब्लॉगमध्ये टाकायचे होते परंतु ब्लॉग मोठा झाल्याने जागा उरली नाहीये त्यामुळे बाकीचे स्नॅप्स आपल्या सगळ्यांकडे आहेतच शिवाय फेसबुकवर सापडतील. तसेच ब्लॉग लगेच पूर्ण झाल्यामुळे आश्चर्यचकित होऊ नये. माझे असे मत आहे की कोणतीही गोष्ट करावी तर पॅशनने करावी नाही तर केव्हाही करूच नये. मग तो ट्रेक असो अथवा ब्लॉग असो. हे पॅशन सगळ्यांकडे आहे आणि असावे. मित्र हो.. धन्यवाद.! 



Thursday, 22 June 2017

ट्रेकर

खरंच 'ट्रेकर्स' म्हणजे जगाहून वेगळी पण त्याच जगाशी आपला मेळ राखीत आपल्याच विश्वात रमणारी जमात. हाताची नखे वाढवायची हौस असली तरी त्यातली एक दोन नखे ट्रेकमध्ये कायम तुटलेली असणारी.
मान आणि कानाच्या पाळ्याच काय तर चेहरा कायम टॅन झालेला असणारी मी  कारण ट्रेक कारण गडावरचं कडक ऊन खाल्ल्याशिवाय ट्रेक केल्याचा आंनद कसा मिळणार या मताची असणारी मी.
आम्ही मुली असल्याने पावडर फेसक्रिम याचा संबंध थोडाफार आलाच पण भपका नसणारी.
मला तर अर्थ्ररायटिस, मणक्यात ग्याप, मस्क्युलर पेन असे अनेक आजार आहेत त्यामुळे सुरुवातीला ट्रेक ला जाताना डॉक्टर अडवायचे. आता डॉक्टर स्वतःच म्हणतात ट्रेकला गेलात की तुम्ही तुमची सगळी दुखणी विसरता जावा जावा. म्हणजे डॉक्टर चा सल्ला थोडक्यात धुडकावणारीच.
समारंभामध्ये सोबर साडी,सोबर दागिने घालून जाणारी आणि बेंजो च्या तालावर दोन पावले थिरकवणारी मी आणि सॅक पाठीवर टाकून ट्रॅकपॅन्ट, टोपी घालून  डोंगर चढणारी मी घरातल्यांना आणि सगळ्यांनाच आवडते तरीही ट्रेकर म्हणून मिळालेली पाठीवरची थाप मला मोलाची वाटणारी मी. 
खरेदी करताना कायम एखादा ती शर्ट/टॉप,एखादी मळखाऊ पॅंट ट्रेकसाठी  जास्त उपयुक्त कशी पडेल या निकषावरच खरेदी करते. दुकानदार एकतर वैतागतो किंवा मनातल्या मनात हसतो. ट्रेकर्स ऐसे ही होते है.
ट्रेकसाठी वेगळे तीन बुटाचे जोड बाळगणारी मी, किंबहुना खाण्यापिण्यावर पैसे घालवण्याऐवजी त्याच पैशात ट्रेकसाठी चांगला लाईटवेट बुटाचा जोड, एखादी टोपी किंवा जॅकेट घेता येईल का हे पाहणारी मी.
वुडलँड चे ४ हजाराचे बूट ग्रीप गेल्यावर गडावर आपट्या खाल्ल्यावर ऍक्शन आणि ट्रेकर शूज चांगले आहेत  हे मानणारी मी.
घेतानाच शर्ट फुल बाह्यांचे पाहून घेणारी आणि टॉप शिवतानाच फुल बाहीचा शिवणारी मी. किंवा एखादे लाईट वेट जॅकेट कायम कमरेला अडकवणारी मी. ढगळ ट्रॅक पॅन्ट घालून मग गड उतरताना मस्त गुढग्यापर्यंत घेणारी मी. "अरे बस झाले आता झाली त्या ट्रॅक पॅन्टची थ्री फ़ोर्थ' अशी मंदार सरांची बोलणी खाणारी मी.
२-३ चष्म्याच्या फ्रेम्स फायबरच्याच बाळगणारी मी. फोटो च्या नादात कुठे चष्मा विसरले तर कायम गाडीमध्ये स्पेयर चष्मा ठेवणारी मी,
प्रवासात मात्र बॅगा माझ्या कायम दोन असतात सगळ्यांसाठी भरपूर खाऊंनी भरलेल्या आणि स्पेअर कपडे कायम बाळगणारी मी मग तो वन डे ट्रेक का असेना. परंतु गडावर मात्र छोटी आणि कमी वजनाची सॅक नेणारी मी.
बाटलीबंद पाणी म्हणजे निव्वळ चैन असे जरी मानत नसले तरी स्वतःजवळ शहरी सरबत (tang) असताना गडावरच्या लहान सरबत वाल्या मुलांना मदत म्हणून सरबत विकत घेणारी मी.
मिळेल ते जेवण आणि जागा किती सही आहे हे मानणारी एकदा घराबाहेर पडले की काहीही साधे चालवून घेणारी मी.
कुणीही सोबत असले तरी कितीही वेळा गड  पहिला तरी पुन्हा पुन्हा फिरणारी मी.
ट्रेकर्स चा थकवा घालवण्यासाठी नवीन ट्रेकर्स ना उत्साहित करण्यासाठी कितीही ठाकले तरी बसमध्ये जाता येता न झोपता अन्ताक्षरीचा धिंगाणा घालणारी मी.
गडकिल्ल्यांचे माहितीचे व्हिडीओज दाखवीत असलेले चॅनेल चालू कर असे मैत्रिणीने भावाने सुचवल्यावर रिमोटवरून भांडणारी मी,
शाळेच्या मित्रमैत्रिणींच्या गेट-टू-गेदर साठी पुण्याहून मुंबईला मुलीला भावाला घेऊन ट्रेक ला जाणारी आणि आईवडिलांचा ओरडा खात वज्रेश्वरीजवळच्या घोटगावचा गुमतारा सर करणारी मी.
मैत्रिणींकडे आणि नातेवाईकांकडे जायला वेळ नाही आणि ट्रेक ला कशी जाते या कारणावरून सगळ्यांचाच ओरडा खाणारी मी.
गडावरचे आणि ४-५ शहरातले सुद्धा रस्ते बऱ्यापैकी माहित असलेली आणि कालवणापासून मालवण घरात बनवता येणारी आणि पालथं घालणारी मी.
शहरात activa वर हेल्मेट कमी वापरणारी आणि कधीतरी सिग्नल तोडणारी, खूप गडबडीत असताना नेमकी ट्राफिक पोलिसाकडून पकडली जाणारी मी परंतु पळून न जाता चूक झाली म्हणून पावती फाडून दंड भरणारी मी.
गाडीच्या अनेक प्रकारच्या किचेन बाळगणारी मी संगीताची आवड म्हणून तबला असलेली किचेन अडकवणारी मी.
चॉकलेट खाल्ले तरी त्याचे रॅपर खिशातच ठेवणारी आणि दुसर्यालाही रॅपर खिशातच ठेवून घरातल्या डस्टबिन मधेच टाकणारी आणि टाकायला लावणारी मी.
हो उघडे नळ स्वतःच बंद करणारी मी,
मोबाइल घेतानाच जिपीएस वालाच घेणारी मी आणि रेंज असणारेच सिमकार्ड बाळगणारी मी आणि खास उत्तम फोटोग्राफीसाठी चांगला कॅमेरा असलेला मोबाईल घेणारी मी.
रोज नवनवीन ठिकाणे शोधणारी मी. ट्रेकिंग चा ब्लॉग लिहून त्याच्या पोस्ट फेसबुकला टाकून त्याचा स्वतः  आंनद घेणारी आणि दुसऱ्याला आंनद देणारी मी आणि दुसरा ट्रेक येईस्तोवर त्याचे फोटोज अपलोड करून मानसोक्त आनंद घेणारी-देणारी मी.
दिवसातून कितीदा ट्रेकचाच विषय बोलणारी. फोनवर कोणी ट्रेकविषयी विचारल्यावर भरभरून बोलणारी,माहिती देणारी मी.
आपल्यासोबत ट्रेकसाठी चांगले ट्रेकर्स जमा करणारी मी.
रविवारच्या ट्रेकनंतर सोमवारी भयानक पाय दुखत असताना एका दिवसात फोटोज अपलोड करून अर्ध्या दिवसात ब्लॉग लिहून शेअर करणारी मी.
परदेशातील मैत्रिणींना ट्रेकचा ब्लॉग पाठवून त्यांच्यातही ट्रेकची आवड निर्माण करणारी मी. अनोळखी व्यक्तीला दादा, काका, मित्र म्हणायला न लाजणारी मी.
देवाला कमी जाणारी परंतु ट्रेक कधीही न चुकवणारी मी.
रायगडावर जाण्याचा योग अजून आला नाही अशी अभागी मी.
सह्याद्रीवर मनापासून प्रेम करणारी मी.
गडकिल्ला बस मधून पहिला तरी लागेचच फोटो क्लिक करून माहिती विचारणारी आणि अभिमान बाळगणारी मी.
गडावर गेल्यावर  तिथून दिसणाऱ्या गडाविषयी चौकशी करून तिथे जाण्याची इच्छा बाळगणारी मी.
ट्रेकिंग च्या प्रत्येक वळणावर फोटो काढणारी तरीही आघाडीवर असणारी मी.
ट्रेक ला जाताना बजेट चा विचार न करणारी मी.
ब्लॉग मधून ट्रेकिंग चा प्रसार करणारी आणि ट्रेकिंग बद्दल आवड निर्माण करणारी मी.
काय माहिती आम्ही खरे ट्रेकर आहोत की नाही ते. किती गुण जुळतील आणि किती गुण  मिळतील यासाठी आम्हा ट्रेकरला..?

Monday, 19 June 2017

"रानपाखरं"


"कोथळीगड” ट्रेक
जिल्हा - रायगड,
श्रेणी - मध्यम,
उंची - ३१०० फूट, 
दि. - १८ जून २०१७

माझ्या महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यात कर्जत तालुक्यात आंबिवली गावापासून ३ कि. मी. अंतरावर कोथळीगड आहे. कोथळीगडाची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे ३१०० फूट इतकी आहे. 
कोथळीगडचा इतिहास थोडक्यात-शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा उपयोग शस्त्रास्त्रांचा साठा ठेवण्यास करत असत. संभाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याला फार महत्व होते. नारोजी त्रिंबक हा गडाचा किल्लेदार दारुगोळा जवळील गावातून मिळविण्याकरीत गेला होता. गडावरील त्याचा माणूस माणकोजी पांढरे ह्याच्या ताब्यात त्याने गड दिला. शिवकालात स्वराज्याचा मुन्शी असणारा काझी हैदर संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत औरंगजेबाला फितूर झाला होता त्याने माणकोजी मांढरे यांना फितूर केले आणि रात्रीच्या काळोखात माणकोजी पांढरे यांनी अब्दुल कादर व त्याच्या सैन्याला हे आपलेच लोक दारुगोळा घेऊन आले आहेत असे सांगून गडात प्रवेश दिला व त्यांनी गडावरचे सैन्य कापून काढले. नारोजी त्रिंबक या शूर वीराने हा किल्ला जिंकून घेण्याचा अयशस्वी प्रयास केला ज्यात तो व त्याचे सैन्य मारले गेले. कर्जतहून खेड-कडूस कडे जाणाऱ्या कोलिंबा व सावट घाटावर लक्ष ठेवण्यासाठी ह्या किल्ल्याचा उपयोग होत असे.
दिनांक १८ जून २०१७ चा 'फोना' चा ७३ वा आणि पावसातील पहिला ट्रेक आयोजित केला. पुण्यापासून कोथळीगड सुमारे ११७ कि. मी . अंतरावर आहे. इथे बसने पोहोचण्यास किमान अडीच ते तीन तास लागतात. १८ जून ला सकाळी ६:१५ वाजता आमची बस निगडीहून तळेगाव, लोणावळा, खोपोली मार्गे ३ तासात म्हणजे ९:१५ आंबिवली गावाजवळ पोहोचली. अर्थात बसमध्येच इडली चा नास्ता करून आणि मध्ये एका ठिकाणी थांबून चहा घेतच. खोपोली सोडल्यावर कर्जत फाट्यापासून उजव्या हाताला वळून ७-८ कि. मी. अंतरावर आंबिवली हे गाव आहे. तिथून ३ कि.मी. अंतरावर कोथळीगडाच्या पायथ्याशी पेठ हे गाव आहे. बस आंबिवली गावच्या स्टॉप वर लावून लीडर ने ट्रेक विषयी सूचना देऊन लगेच९:३० ला  ट्रेक ला सुरुवात केली. दीड कि. मी. अंतर चालून गेल्यावर कोथळीगडचा नजारा डोळ्यांना सुखावणारा होता. कारण बस मधून जाताना फक्त एका वळणावर च कोथळीगड क्षणभर दिसला त्यानंतर त्याच्या जवळ गेल्यावरच त्याने खरे दर्शन दिले. एकीकडे प्रचंड खोल दरी तर एकीकडे आभाळाला भिडणारा कोथळीगड असे ते सुंदर दृश्य होते.फोटो काढताना खूप सांभाळून काढावे लागतात कारण जरा पाय घसरला तर थेट दरी तुम्हाला कवेत घ्यायला तयारच असते. लिंबू सरबत पिऊन पुन्हा गडाची वाट धरली पुढे दीड कि. मी. चा चढाच्या कच्या रस्त्याने आम्ही पेठ गावात पोहोचलो. जाताना सगळ्यांसोबत माझी देखील दमछाक झालीच होती. कारण एप्रिल च्या संधन व्हॅलीच्या ट्रेक नंतर १ महिन्याच्या गॅप नंतर चा हा माझा ट्रेक होता. पहिल्यांदा ट्रेक ला येणारे मेम्बर्स केव्हा एकदाचा गड येतो याचीच वाट पाहत होते. गडाच्या पायथ्याशी पेठ गावात सामानाची ने-आण  करण्यासाठी दोन चाकी गाडी आणि बैलगाडीचा वापर होताना दिसला.पेठ गावाजवळ गेल्यावर कोथळीगड आणि पायथ्याशी पेठ गाव अतिशय सुंदर दिसत होते.
पेठ हे गाव २०-२५ कौलारू घरांचेच आहे. मुख्य व्यवसाय भातशेती,विजेची, पाण्याची सोय असलेले. ५वी-६ वी पर्यंत शाळा आहे. ऊन म्हणते मी. त्यामुळे  घामाने जणू आम्ही न्हाऊनच निघालो होतो.  पावसाचे दिवस असून वरून राजाने अजून तरी आम्हाला सुखावले नव्हते. काहीजणांचे पाणी संपत आले होते. आम्ही गावातून घरामधून पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या आणि पुन्हा गड चढाईस सुरुवात केली. काही ठिकाणी भात पेरणी केलेली दिसली.१२ चे ऊन होते आणि गड चढण्याची मजा आत्ता तर खरी होती. मधेच गावातील लहान मुले पिकलेले गावरान आंबे घेऊन विकताना  दिसली तसेच गावातील स्त्रिया आणि पुरुष लिंबू -सरबत विकताना दिसली. तेवढाच ट्रेकर्सना थंडाई आणि तिथल्या शेती करणारी लोकांना पोटापाण्याची सोय. आपण २०० रुपयाची कोक ची बाटली घेताना जराही विचार करीत नाही तर  मग १०-१५ रुपयांच्या नैसर्गिक लिंबू-सरबताला का विचार करावा. मी गड चढताना माझ्याकडे आपले शहरी सरबत (tang)असताना देखील २वेळा तरी लिंबू सरबत घेतले. आमच्या सोबत अजून २-४ ट्रेकिंग ग्रुप गड चढताना दिसले. चढाईची वाट खूप छोटी असल्याने अधून मधून दाटी होत होती. परंतु जस जसे उंचीवर जात होतो तसतसा जमिनीवरचा आणि आजूबाजूच्या डोंगररांगांचा,गावाचा नजारा अप्रतिम दिसत होता. आम्ही ६-७ ट्रेकर सगळ्यात पुढे पोहोचलो.
त्यात सगळ्यांच्या आधी पोहोचले ते श्री. संजय मोरे वय वर्षे ५५. त्यांचे सगळ्यांनी खूप कौतुक केले. गडावर पोहोचताच भैरोबाचे मंदिर आणि मोट्ठी गुहा दिसली. जर रात्रीचा ट्रेक असेल तर त्या गुहेत १०० पेक्षा अधिक लोकांची राहण्याची सोय होऊ शकते. शिवाय अजून २-३ खोल्या वेगळ्या आहेत. गुहेचे खांब मूळ पाषाणातून कोरले आहेत. अतिशय सुंदर नक्षीकाम केलेले दिसले. बाकीचे ट्रेकर्स येईस्तोवर क्षणभर विश्रान्ती घेऊन आम्ही कोथळीगडाच्या माथ्यावर जावयास निघालो. कोथळीगडाचे वैशिष्टय हेच आहे की एका भव्य पाषाणाच्या आतून त्या पाषाणाचा कोथळा पाडून सुंदर पायऱ्या कोरल्या आहेत.म्हणूनच या गडाला कोथळीगड हे नाव असावे.  ते कोरीव काम पाहावे की पायऱ्या चढाव्यात की फोटोग्राफी करावी असा आपल्याला संभ्रम पडतो. कोरीव काम करणाऱ्याचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. अप्रतिम असा तो रस्ता बनवला आहे. शिवाय त्या दगडी जिन्यामध्ये व्हेंटिलेशन साठी मोठ मोठे होल देखील ठेवले आहेत शिवाय एकीकडे एक मोट्ठेच्या मोठे दार ही आहे.एखाद्याच्या काळजातून सपासप अनेक बाण जावेत  तसे आम्ही त्या पाषाणाच्या कोथळ्यातून एकाच वेळी अनेक ट्रेकर्स गडाच्या माथ्यावर जात होतो.  तो मोठ्ठा आणि सुंदर जिना पार केल्यावर जरा अवघड पॅच येतो तिथे थोडे सांभाळून गेलेलेच बरे. कारण कोथळीगडावर आधारासाठी कुठेही लोखंडी पट्ट्या,खांब लोखंडी रेलिंग असे लावलेले आढळले नाही. फक्त दगड आणि पाषाण हाच एकमेव तिथे आपला आधार आहे हे ट्रेकर्सच्या लक्षात असू द्यावे.



इतके शारीरिक श्रम घेऊन गडाच्या माथ्यावर पोहोचल्यावर मनातील आंनद अवर्णनीय होता. परंतु आम्ही नुसती एक छोटी बॅग त्यात एक जेवणाचा डब्बा आणि प्यायचे पाणी घेऊन गड चढतो तर इतके दमतो. शिवकाळातील लोक त्यावेळी वजन सामान कसे चढत असावेत आणि कसे लढत असावेत हा विचार माझ्या मनात कायम येतो. गडावर पोहोचल्यावर लक्षात आले की वर एक पाण्याचे टाके आहे. २-३ झाडे आणि निवडुंग आणि छोटी झुडपे आहेत. एका बाजूला भीमाशंकर चे पठार, सिद्धगड, पदरगड, एका बाजूला दूर माणिकगड चंदेरी, प्रबळगड दिसतात. बाकी सगळे गड एकमेकाला जोडलेले सक्ख्या-चुलत भावांसारखे एका डोंगर रांगेत दिसतात. कोथळीगड मात्र मूळ डोंगररांगेतून तुटून बाजूला एकटा सावत्र भावासारखा बाजूला आढळतो.भीमाशंकरच्या पठारावर खूप साऱ्या पवनचक्क्या एका रांगेत सवाष्णी उभ्या असल्यासारख्या भासत होत्या. गडाच्या माथ्यावरच आम्ही दीड च्या सुमारास आपापले जेवणाचे डब्बे काढून छोटे छोटे ग्रुप करून ऊन सावलीच्या खेळात जेवण करून घेतले. कारण खूप गृप एकावेळी माथ्यावर पोहोचल्याने प्रत्येकासाठी तशी सावलीची जागा नव्हतीच शिवाय गडाच्या माथ्यावर जेवण करण्याचा आनंद काही आगळाच. 
गडावर दुपारी पाऊस नसला तरी थंडगार वारा अंगाला सुखवीत होता त्यावेळी या ओळी ओठांवर नक्की येत होत्या,
”भन्नाट रानवारा मस्तीत शीळ घाली.. रानच्या पाखरांची रानात भेट झाली.” 
जेवण आटोपून भगव्यासहित एक गृप फोटो काढून परतीच्या उतराईच्या वाटेला निघालो. उतराई करतानाच अनुभव अजूनच वेगळा होता. कारण तोच आतून कोरलेला जिना आता पाण्यातील भोवऱ्यासारखा भासत होता. आम्ही एका भोवर्यातून सुरक्षित खाली उतरलो. गडमाथ्यावरून आम्हाला एक तोफ दिसली होती त्या तोफेजवळ गेल्याशिवाय आम्हाला राहवले नाही. त्या ठिकाणी अजून २ पाण्याची टाकी आहेत. तिथल्या एका पाण्याच्या टाकीत स्वच्छ पाणी होते तेच पाणी उन्हाळ्याच्या दिवसात जेव्हा पेठ गावच्या विहिरी आटतात तेव्हा त्या विहीरीमध्ये पाईपने हे पाणी सोडले जाते आणि पिण्यासाठी वापरले जाते.  

आता या ठिकाणाहून कोथळीगड एका नरसाळ्याच्या आकाराचा भासत होता. इथे जरा वेगळ्याप्रकारची(innovative)फोटोग्राफी केली आणि ३च्या सुमारास गड उतरायला सुरुवात केली. कितीही ट्रेक केले तरी उतरताना माझे पाय भरून येतात. तरीही पावले सपासप आणि आपोआप वेगाने पडून आपण पळू लागतो. आणि आम्ही अक्षरशः पळत च होतो. अर्ध्या पाऊण तासात आम्ही पेठ गावात आलो आणि बाकीच्या मेम्बर्सची वाट पाहत थोडी विश्रांती घेतली.आमच्या सोबत आमच्यातले काही मेंबर्स लग्न करून त्यांच्या पार्टनर ला सुद्धा ट्रेकिंग ला घेऊन आले होते. त्यांचे कौतुकच.




४:१५ च्या सुमारास आम्ही पेठ गाव सोडले आम्हाला ३ कि. मी. अंतर पार करायचे होते. आणि उन्हाने आणि दमट वातावरणाने हैराण झालो होतो. तितक्यात आजूबाजूच्या डोगर रांगा धूसर दिसू लागल्या. डावीकडे ऊन तर उजवीकडे पाऊस भरला होता. आम्ही सकाळपासून पावसाची अतिशय आतुरतेने वाट पाहत होतो. वरून राजाला आमची कीव आली आणि त्याने आमच्यावर पावसाच्या सरींची हलकी बरसात सुरु केली. हवेत अचानक खूप गारवा आला आणि "दिल खुश हो गया." हलकी हलकी बारिश म्हणता म्हणता चांगला जोरदार पाऊस सुरु झाला हे चॉकलेटचे दुधाचे धबधबे सुरु झाले कारण कंसाच्या रस्त्यावर माती टाकली होती ती वाहून जात होती आणि चॉकलेटच्या नद्या वाहताहेत असे भासत होते. पाऊस पडल्याने एकीकडे पक्षांचा मंजुळ आवाज येत होता.
 आम्ही ७-८ बडबडे ट्रेकर्सनी ३ की. मी. चे अंतर केव्हा कापले आमचे आम्हालाच समजले नाही. आंबिवली गावाजवळ बस लावली होती त्या ठिकाणी येऊन एका ठिकाणी पोहा नास्ता आणि चहा ची सोय केली होती. ते खाऊन सूर्यास्ताच्या वेळी आम्ही परतीची वाट धरली आणि अन्ताक्षरीच्या तालावर रात्री ९:३० वाजता पुणे गाठले. अंताक्षरी किंग राणे सर यांच्या सोबत अविनाश याने देखील अंताक्षरी मध्ये खूप छान रंग भरले. काय गातोस अविनाश तू. "तुसी ग्रेट हो अविनाश." तू गाणे एकदम सुरात गायलेस.  गाण्याचा लईच खजिना आहे तुझ्याकडे.पाठीमागच्या सीट वरची मंडळी अन्ताक्षरीमध्ये "फाडलं हो तुम्ही".   
ट्रेक लिडर राणेसर, मंदारसर, सर्पमित्र निकाळजे सर, राहुल-आदित्य, विनोद-दीपिका, डॉ.श्रीकांत, अविनाश, सुरेखा, मृणालिनी-तिचे बाबा,भावना,हिरल,ऋतुजा, चेतन, प्रीतम,हर्षनी,संजय मोरे, निलेश,उत्तम खडप-फ्रेंड (उत्तम छायाचित्रण कौशल्य) मला नावे माहित नसलेल्या सर्व जुन्या-नवीन ट्रेकर्स चे अभिनंदन. बॅनर नसल्याने रोहित सर तुमची रागाने आठवण काढली. तसेच भाऊबली,(प्रतीक दादा)स्नेहल खोल्लम आणि "संधान व्हॅली ची न आलेली टीम" लोकहो खूप मिस केलात तुम्ही कोथळीगडचा पावसाळी-भन्नाट-तुफानी ट्रेक.  एकंदरीत सर्वांच्या सहकार्याने आपला ट्रेक यशस्वी झाला. अश्या प्रकारे "फोना" ग्रुप चा १८ जून चा कोथळीगड ट्रेक यशस्वीरीत्या पार पडला.

Tuesday, 11 April 2017

आशिया खंडातील दोन नंबर वर असलेल्या अद्भुत व्ह्यालीचा थरार

ट्रेक- सांधण व्हॅली (रॅपलिंग)
ठिकाण- अहमदनगर जिल्हा
दिनांक- ८-९ एप्रिल २०१७
चढाई श्रेणी- मध्यम-कठीण




सांधण व्हॅली हे ठिकाण महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यात साम्रद या गावाजवळ आहे. सांधण व्हॅली ही निसर्गतः जमिनीला पडलेली एक भेग आहे.  ही भेग जवळपास ४५०-५०० फूट खोल आणि २५ फूट रुंद काही ठिकाणी १० फूट रुंद आणि एक किलोमीटर लांब आहे.  सांधण व्हॅली हा एक निसर्गाचा एक रौद्र तरीही अतिशय मोहक अवतार आपल्याला पाहायला आणि अनुभवायला मिळतो.   "सांधण व्हॅली" ला  "द व्हॅली ऑफ शॅडोम्हणून देखील संबोधतात. एक अद्भुत व्हॅली म्हणून आशिया खंडामध्ये दोन नंबरवर ह्या व्हॅलीची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात सह्याद्रीमधील एक नंबरची मोठी अशी ही सांधण व्हॅलीच आहे.
कोणत्याही गोष्टीमध्ये सातत्य नसले  तर त्याचा आपल्याला विसर पडतो आपण कंटाळतो किंवा सोडून देतो किंवा त्यात गोष्टींमध्ये सातत्य आणण्याचा प्रयत्न करतो. माझ्यासाठी मग ती गोष्ट म्हणजे ट्रेक असो ब्लॉग असो अथवा अजून कोणतीही गोष्ट शिकणे असो. मागच्या महिन्याचा फोना ग्रुपचा एक ट्रेक झाला नाही आणि परीक्षांचे वातावरण चालू असल्याने मलादेखील बाहेर जाता आले नाही त्याचा माझ्या आरोग्यावर किती परिणाम झाला ते मी स्वतः अनुभवले आहे. 
ट्रेक चा वेडापिसा छंद असा लागला जीव हा ट्रेक मध्ये गुंतला.. ह्या ओळी मला स्वतःसाठी मी लावून घेतल्या आहेत.मी १-२ वर्षांपासून ट्रेकिंग करते आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर मी दोनदा सर केले परंतु क्लाइंबिंग आणि रॅपलिंग मी केले नव्हते त्याचे मला काही महिने वेध लागले होते. पुण्यातल्या इतर कोणत्या ट्रेकिंग ग्रुप मध्ये रॅपलिंग आणि क्लाइंबिंग च्या ऍक्टिव्हिटीचा ट्रेक असला की मी मैत्रिणी गोळा करून आणि आमच्या फोना च्या ग्रुप लीडर ना विचारून जायची तयारी करत असे. परंतु योग काही आला नव्हता.  ८-९ एप्रिल २०१७ चा "फोना" ग्रुप चाच ७२ वा ट्रेक आयोजित करण्यात आला आणि त्यात रॅपलिंग ऍक्टिव्हिटी होती. माझ्या मनातला आनंद गगनात मावत नव्हता. १ सीट बुक करून ठेवली होती. मला काही करून किमान एकदा तरी रॅपलिंग करावयाचे असल्याने ७  एप्रिल ला माझे जाण्याचे पक्के झाले.
दिनांक ८ एप्रिल २०१७ शनिवारी आम्ही दुपारी ११-०० वाजता तळेगाव- निगडी-नाशिकफाटा -मंचर-खेड बोटा-ब्राह्मणवाडा-कोतुळ- राजूर-रतनवाडी-साम्रद अशा मार्गाने ट्रेक मेम्बर्स घेत  निघालो. पुण्यापासून साम्रद हे गाव जवळपास १९६ कि. मी. अंतरावर आहे. तिथे पोहोचण्यास जवळपास ५ तास लागतात. खेडपासून एक तास पुढे गेल्यावर नेहमीच्या प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी नारळ फोडण्याचा कार्यक्रम करून एक ग्रुप फोटो काढून पुढच्या प्रवासाला निघालो.

भुकेची वेळ झालीच होती बस थांबून जास्त वेळ वाया न घालवता सोबत आणलेले आमचे जेवणाचे डब्बे काढून आम्ही बस मधेच खाऊन घेतले अंताक्षरी सुरु केली आणि वातावरण उत्साही झाले. बरेचसे नवीन मेम्बर असल्याने अजूनच मजा आली. दिनेश आणि प्रतीक यांनी सुपरमॅन चा रोल अर्धा अर्धा केला(एकाने सुपरमॅन ची टोपी घातली तर एकाने सुपरमॅन चे शर्ट घातले होते) ऐकावे आणि पाहावे ते अद्भुतच. (हाहाहा)


बस २० मिनिटे थांबवून ड्राइवर काकांना जेवणाचा डबा देऊन जेवण करावयास सांगून आम्ही जरा तिथल्या आंब्याच्या सावलीत थांबलो तिथल्या दत्तमंदिरात श्री. दत्ताचे दर्शन घेतले आणि तिथल्या शेतात पाय मोकळे केले.  इलाईत चिंचा,कैऱ्या आणि चिंचा खाल्ल्या.  मग पुन्हा अन्ताक्षरीच्या तालावर प्रवास सुरु झाला. ५:३० ला आम्ही अकोले तालुक्यातील रतनवाडी गावात उतरलो.

रतनवाडी गावातून रतनगडला जाता येते. रतनगडचा ट्रेक करताना या ठिकाणी थांबलो होतो. रतनवाडी ला उतरल्यावर आम्ही सगळ्यात आधी श्री. अमृतेश्वर मंदीराचे दर्शन घेतले. १२०० वर्षांपूर्वीचे हे अतीशय देखणे हेमाड्पंथी कोरीव मंदीर आहे. मंदीराला पुर्वाभिमुख मुख्य द्वार व पश्चिमाभिमुख दुसरे द्वार अशी २ द्वारे आहेत. विविध शिल्पाकृतींचा खजिनाच इथे भरला आहे.मंदिरात एका बाजूंला खलबत्याच्या आकाराचे काही होते. तिथले स्थानिक लोक म्हणत होते की मनात एक इच्छा धरून  कानाला हात पकडून हाताच्या कोपराने तोच दगड एका दमात उचलून अलगद ठेवेल त्याच्या मनातील इच्छा पूर्ण होते. आमच्यातील बऱ्याच हौशी कलाकारांनी  तो दगड उचलून त्यातील गंमत अनुभवली आणि मंदिराच्या सुंदर नक्षीकामाचे फोटोग्राफी केली.

जवळ विहीर होती त्या विहिरीवर पाणी पिण्याचा आणि विहिरीतून पोहऱ्याने पाणी काढण्याचा आंनद घेतला आणि बाजूला गावातील मुले क्रिकेट खेळत होती तिथे काही लोक चेंडूफळी खेळून आले. मग चहा घेऊन साम्रद गावाकडे निघालो.

रतनवाडीपासून साम्रद हे गाव जवळपास ८ कि. मी. आहे.संध्याकाळी  ६-३० च्या सुमारास आम्ही साम्रद गावात पोहोचलो. अशी आशा होती की लवकर पोहोचलो तर तिथल्या मिनी कोकणकडयावरचा सूर्यास्त अनुभवता येईल परंतु तिथे पोहोचेपर्यंत सूर्य दिसेनासा झाला होता.




परंतु इथे सह्याद्री आपले राकट सौंदर्य दाखवत उभा होता. रतनगड खुट्टा यांचे एका वेगळ्याच बाजूने अतीशय प्रेक्षणीय दर्शन होत होते. बाजूलाच आजोबाचा महाकाय पर्वत आपल्याला आजोबा का म्हणतात ते दाखवून देत होता. कळसुबाई, अलंग, कुलंग व मदनगड आणि कळसुबाई यांचे पाठीमागच्या बाजूने रौद्र दर्शन होत होते. अतिशय रम्य संध्याकाळ तोच लालसर संधिप्रकाश मन मोहून घेत होता. सूर्यास्त नाही मिळाला तरी रतनवाडीहून जाताना बसमधून दिसणारा भंडारदरा धरणाचा अथांग जलाशय मनाची तहान शमवून गेला.
आम्ही त्या सह्याद्रीच्या डोंगररांगांच्या संध्याकाळचे सौंदर्य डोळ्यात साठवून घेतले आणि लगेच आमचे टेन्ट जागेला लावून घेतले.

साम्रद हे गाव छोटेखानी आदिवासी गाव आहे. इथे चहा, नास्ता, जेवणाची उत्तम सोय होते. वेळ पडली तर दत्ता भांगरे याच्या घरात एक पडवीत २०-२५ लोकांची झोपण्याची सोया सुद्धा होईल इतकी जागा आहे. आम्ही चहा घेतला काहींनी मॅगी सूप चा आनंद लुटला.
आम्ही ३२ लोकांचे जेवण तयारच होते. मस्त पिठले भाकरी वरण-भात  पापड लोणचे याचे जेवण आटोपून घेतले.आमच्यातली काही कलाकार मंडळी सांधण व्हॅली च्या नावाशी कॅमेऱ्याने खेळत होती. शेवटी मोबाईलचा लाईट आणि मोठा कॅमेरा यामुळे एक उत्तम फोटो जमवलाच.  

गावात हनुमान मंदिरात काही कलाकार मंडळी आली होती त्यांची कला बघण्यासाठी आम्ही लोक साम्रद गावातील मंदिरात गेलो आणि आम्ही देखील त्या घुंगराच्या नाचत सहभागी झालो. तिथे एक राक्षसरूपी ड्रेपरी करून आलेल्या कलाकार माणसाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. जाऊ तिथे थोडा भाव खाऊ आणि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद लुटू इतकेच आम्हा ट्रेकर्सना समजते.

रात्री ११:०० च्या सुमारास तंबू मध्ये आलो आणि किमान १२ वाजता तरी झोपायचे ठरवले होते दुसऱ्या दिवशी उन्हाच्या आता रॅपलिंग करावयाचे होते त्यासाठी  ५ वाजता ट्रेक सुरू करायचा  होता परंतु आमच्या ग्रुप सोबत अजून बरेच ग्रुप ने तिथे तंबू ठोकले होते त्यातील काही ग्रुपचे रात्रीचे २:३० वाजेपर्यंत जरा जास्तच मोठमोठ्याने ओरडणे असा गोंधळ चालू असल्याने मला तरी लवकर झोप लागली नाही. सुरक्षिततेसाठी मुलींचे टेन्ट गृप लीडरने काळजीने मध्यभागी घेतले होते. आणि सगळेच जण बराच वेळ जागे होतो. पहाटे ३ नंतर हवेतला गारवा वाढल्याने झोप लागते ना लागते तोवर ४:३० चा गाजर वाजला आम्ही उठलो आणि भराभर आवरून सकाळी ६:३० वाजता आम्ही ट्रेक ला सुरुवात केली.


१०/१५ मिनिटातच वाट दाट झाडीत शिरली. व थोड्याच वेळात आम्ही एका घळीच्या मुखाशी आलो. सांधण व्हॅलीचे वैशिट्य म्हणजे ही जमिनीच्या पातळीखाली आहे. इथे खाली थोडेसे उतरावे लागते. अतिशय अरूंद अशी ही लांबच लांब जमिनीला पडलेली भेग आहे.व्हॅलीच्या  सुरुवातीलाचा एक जिवंत झरा आहे जो कधीही आटत नाही. आत व्हॅलीचे सापासारखे लांबच लांब वळण दिसत होते. काही ठिकाणी १५/२० फूट तर काही ठिकाणी जेमतेम २/३ फूट अशी ती अतिशय निरुंद व्हॅली होती. दोन्ही बाजूला काळ्याकभिन्न कातळकड्यांनी ती बंदिस्त केली होती.पहिला कातळ्टप्पा उतरताच एका पाणसाठ्याने आमचा मार्ग अडवला. साधारण १.५ फूट खोल १२/१३ फूट लांब अश्या त्या पाण्यातून शेवाळलेल्या दगडांवरून आम्ही कौशल्याने मार्ग काडून पलीकडे गेलो. मोबाइल बॅगेत टाकला परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने एक-दोघांचा मोबाईल भिजला. त्यामुळे हा पाण्याचा टप्पा पार करण्याआधी मोबाईल प्लास्टिक बॅगमध्ये पूर्ण पॅक करून बॅगेत टाकून बूट काढून घ्यावेत आणि त्याच्या लेस बांधून खांद्याला लटकवावेत आणि हळूहळू साखळी करून पाण्याचा टप्पा पार करावा म्हणजे पुढचा प्रवास नीट होतो.  आता तीव्र उतार सुरु झाला होता. व्हॅली अधिकाधिक अरूंद होत होती. कुठेही सपाट मार्ग नव्हता. दरडी, लहानमोठे दगडगोटे यांचा अक्षरश: तिथे खच पडला होता. कुठेही पाय ठेवावा तर पायात ताकद आणि ग्रीप हवी नाहीतर सारखा पाय घसरतो. 

अप्रतीम अश्या ह्या निसर्गनवलाने आम्ही अवाक झालो होतो. ही अरूंद व्हॅली पाणी व ज्वालामुखी यांच्या एकत्रीत परीणामामुळे बनली असावी. पूर्ण सांधण व्हॅलीत कधीही उन पोहोचत नाही त्यामुळे कायमच सुखद गारवा असतो.पण फक्त सांधण व्हॅली पर्यंतच हा गारवा असतो. साधारण  एक की. मी. ची ही व्हॅली आहे. त्यांनतर पुढे अजून २ की.मी. खोल व्हॅलीमध्ये  उतरून आम्ही रॅपलिंग च्या प्रतीक्षेत होतो. खरं तर आम्ही ५-७ जरा जास्तच पुढे गेलो होतो त्यात मी(जयू) आणि खोल्लम स्नेहल, दीपक गवळी, महेश अवटे, अनिल जाधव, राजेश जठार,संदीप गोरे, तुषार इतके लोक होतो. "पर वो कुछ लोग इस जयू को छोड के चले गये. पर "ऐ ५ लोगो अगले  ट्रेक को मै तुम्हे देख लुंगी" हर एक ट्रेक का नशा वेगळा होता है."
रॅपलिंग ची उत्सुकता शिगेला पोहोचली होती तिथेही नंबर होते अर्थात आम्ही पुढे असलेले मेम्बरच घाईवर होतो पण मनात भीती सुद्धा होतीच. काही चुकलं आणि पडलो धडपडलो तर?? पण खरे तर असे काही होणार नाही अशी खात्री होती कारण "फोना"ग्रुपने तसे तज्ञ सोबत आणले होते तसेच ट्रेकिंग करणारे अनुभवी लोकदेखील आमच्यासोबत होते. ४-५ ट्रेकर नंतर माझा नंबर होता. रॅपलिंग साठी तिथल्या गावातील दत्ता भांगरे आणि त्याचे सहकारी यांनी मिळून आम्हाला एकामागून एक असे करून ३२ लोकांना सुरक्षितरित्या आणि शांतपणे ५०-६० खोल दरीत रॅपलिंग करीत उतरवले. 








दत्ता भांगरे याने त्याच्या १८-१९ वयापासून हे रॅपलिंग चे तंत्र आत्मसात केले. तसे ट्रेंनिंग घेतले आहे आणि तोच त्याचे सहकारी खंडू मामा यांच्या सोबत येणाऱ्या ट्रेकर्स ना रॅपलिंग देखील शिकवतो आणि सुरक्षित रित्या उतरवतो. आधी स्वतः रॅपलिंगचे रोप स्वतःला बांधून तयारीत असतो. ही व्यक्ती साम्रद गावातीलच असल्याने ट्रेकर्स ना सोपे जाते. रॅपलिंग सुरु झाले,सगळे सगळ्यांना चियर अप करत होते. फोटो काढत होते. मला स्वतःला विश्वास नव्हता की मी रॅपलिंग करीत आहे. आणि सुरक्षित रित्या सगळ्या मेम्बर्स चे रॅपलिंग झाले. दत्ता भांगरे ला आणि जुने मेम्बर्स राणे सर, मंदार सर, रोहित, विवेकानंद,दिनेश,अविनाश,स्नेहल खोल्लम, आनंद, दिग्विजय, प्रकाश,  प्रतीक, गीता, रश्मी, मुक्ता, ऋजुता, हिरल, सेजल, हेरंब, गणेश गोसावी, राजेश जठार, तुषार, महेश, संदीप गोरे, अंबादास कदम, प्रदीप मिश्रा, शेवकर सर, अभिनव, सगळ्यांना सलाम. सगळ्याच्यां सहकार्याने रॅपलिंग चे सगळे पॅच चांगल्यारितीने पार पडले. 
आम्ही पुढे असलेलो ५-७ जण पुढे जात राहिलो पुढे ४ टप्पे पुन्हा रॅपलिंग चे पॅच आले होते तिथे रोप ची अतिशय गरज होती तरीही आमच्यातल्या एक्सपर्ट लोकांनी आम्हाला बिना रोपचे दोन टप्पे पार करवले.मी तर खडकाला लटकून,हात सोल्वटून घेतले. इतने बडे (सेमी हार्ड) ट्रेक में ऐसी छोटी-छोटी बातें तो होती रहती है. वेळ आली तशी एकाच्या डोक्यावर बसून उतरले. लहानपणी मामाच्या खांद्यावर बसलो होतो त्याची खूप आठवण झाली. अनिल जाधव सॉरी आणि धन्यवाद. वेळप्रसंगी लाल टी-शर्ट दीपक चा अनिल जाधव यांचा जाम ओरडा खाल्ला. काय झालं होतं मला काय माहिती रॅपलिंग चा ६० फुटाचा पॅच पार पडल्यावर जरा समजेना झालं होतं. मला बिना रोपचे कठीण पॅच उतरायला जास्त भीती वाटत होती. मी जर पडले आणि माझे एखादे हाड मोडले तर याच लोकांना उचलून न्यावे लागणार याची मला चिंता वाटत होती म्हणून मी जरा जीवाला जपत होते इतकेच. नाहीतर हम भी किसीसे कमी नहीं है.  (हाहाहा). 


पुढे दरी उतरत राहिलो. पण तिसऱ्या एक कठीण पॅच ला संदीप गोरे सोडले तर मात्र आम्ही सगळेच थांबलो.संदीप गोरे यांनी रॅपलिंग च्या पुढचे दोन्ही कठीण पॅच एकट्याने बिना रोप चे पार केले परंतु ते पुढे थांबले होते. नंतर मात्र आमची "फोना"ची गॅंग रॅपलिंग करून उतरत होती तसतसा आवाज घुमू लागला. कितीही  ठरवले की दरीमध्ये आरडाओरडा करायचा नाही तरी इतक्या लोकांचा आवाज एकत्र आला की तोच आवाज घुमतो आणि मोठ्याने बोलतो असा भास होतो. आम्ही ५-७ जण आपले पुढे आलो खरे पण माकडांची कॉलनी दिसली आणि जरा भीती वाटली कारण आवाज व्हायला लागला की ती माकडे सैरभैर पाळायला लागतात आणि मग  दगड पडायला सुरुवात होते. असेही अधून मधून दगड पडतच होते.  त्यामुळे आम्ही कपारीच्या अगदी कडेला बसून राहिलो आणि खंडू मामांनी इतक्या दुरून,वरून आमच्यासाठी आणलेला पोह्याचा नास्ता केला. खंडू मामा सुद्धा चकित झाले की अरे एवढा कठीण रॉक पॅच बिना रोप चा कसा पार केला म्हणून. शेवटच्या कठीण पॅच ला रोप लावून आम्हाला सुद्धा कमरेला दोर बांधून आम्ही उतरलो.


जसे आम्ही सगळ्यांच्या पुढे जात होतो तसे दरी उतरत राहिलो. आता मात्र उन्हाचा तडाखा वाढला होता. एप्रिलचे ऊन त्यात मध्ये कुठेही प्यायचे पाणी, सरबत असे काहीही नाही. किमान ४ लिटर पाणी जवळ हवेच हवे तरच आपण ट्रेक पूर्ण करू शकतो. पुढे गेल्यानंतर मात्र दरी उतरताना तापलेले खडक हाताला चटके देत होते. हातात ग्लोज घातले तरी काही उपयोग होत नव्हता. सांधण दरी उतरून झाली परंतु आता पुन्हा २-३ तासाची दुसरी दरी चढायची होती. भुकेची वेळ झाली होतीच. काही लोक गावातील लोकांना दरीतच जेवण बनवण्याची ऑर्डर करतात आणि तिथे जेवून ऊन कमी झाले की मग डोंगर चढाई सुरु करतात. परंतु आमच्यातले काही ट्रेकर्स आघाडीवर होतो(मी सुद्धा होते बरे त्यात) त्यातले ५-६ जण लीडर च्या सांगण्यावरून आधीच पुढे गेले होते. त्यामुळे सगळ्यांनीच आता चढाईला सुरुवात केली. दुपारचे १२:३० ऊन मी म्हणत होते. टोपी,सफेद पंचा असून माझ्या पायातले तर त्राणच गेले होते.
मागची मंडळी  हळूहळू येत होती. पण मला काही केल्या ऊन सहन होईना. छोटेसे झुडूप जरी आले तरी बसू वाटू लागले. ग्रुप लीडर राणे सर आणि रोहित सर मागे राहिलेल्या मंडळीला हळूहळू घेऊन डोंगर चढाई करत होते तर ग्रुप लीडर "मंदार सर द ग्रेट" थकलेल्यामध्ये कसा हुरूप आणायचा हे त्यांना पक्के माहिती आहे. "थोडेच राहिले थोडेच राहिले"असे करत करत थोडी सावली आली की गंमत जम्मत करीत बराच मोठा टप्पा भर उन्हात पार करवला. मागून सगळी टीम आली. सगळेच पार दमले होते.
मी तर म्हणत होते की ४ वाजता येईन आता नाही येऊ शकत. रडून पण घेतलं थोडं.  एक तास राहिला असताना एका झाडाखाली थांबून मग आमच्यात उत्साह आणण्यासाठी लीडर राणे आणि मंदार सर, प्रतीक आणि सगळ्यांनीच गाणी,पोवाडे,शिव गर्जना आणि शूर मराठे यांच्या गोष्टी सांगायला कमी नाही केले. एखाद्या लहान मुलाला झोपवण्यासाठी जसे अंगाई गीत गातात  तसेच आमच्यात पुन्हा बळ येण्यासाठी गाणी आणि पोवाड्यांचा आधार घेतला (अंधार फार झाला एक दिवा पाहिजे-या देशाला जिजाऊचा शिव पाहिजे)आणि त्याचा उपयोग सुद्धा झाला. मी पुन्हा हळूहळू चढाई करायला सुरु केली. आणि थांबत थांबत का होईना २:४५ ला आम्ही तिथल्या कोकणकड्याच्या टोकावर पोहोचलो. हळूहळू सगळेच येत होते. आता सपाट रस्त्यावर कोणीच कोणाची वाट पाहत नव्हते. जो-तो बसजवळ कधी पोहोचतो हेच बघत होता. आम्ही काही मंडळी ३:१५ ला आमच्या बसजवळ पोहोचलो. पुढे असणारे स्नेहल खोल्लम आणि इतर ५ लोक २ तास आधी पोहोचून जेवून आराम करून निवांत बसले होते. आम्ही देखील पोहोचल्यावर तोंडावर पाणी मारून आधी जेवण केले आणि मग दत्ता ट्रेकर्स मार्गदर्शकच्या घराच्या  मांडवात येऊन बसलो. सर्व मंडळी आल्यावर जेवण आटोपून ट्रेक कश्याप्रकारे  सुखरूप पार पडला यावर चर्चा करून संध्याकाळी ६ वाजता ट्रेक संपवून आम्ही पुण्याकडे रवाना झालो आणि रात्री ११:३० घरी पोहोचलो. काहींना उन्हाचा त्रास झाला पण अशा छोट्या छोट्या गोष्टी होऊ शकतात. अश्या प्रकारे अद्भुत सांधण व्हॅलीचा ट्रेक आणि रॅपलिंग चा भन्नाट अनुभव घेऊन नेहमीप्रमाणे सर्व ट्रेकर्स च्या सहकार्याने जवळपास ८ कि.मी चा ट्रेक यशस्वी  (सकाळी ६:३० ते दुपारी ४) झाला. 


सांधणव्हॅली चा ट्रेक करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी हमखास घ्यावी ती म्हणजे अनुभवी ग्रुपसोबतच इथे जावे.गरज असल्यास एखाद्या गावकऱ्याला  सोबत घ्यावे. खडक व जंगलातून वाट काढावी लागत असल्यामुळे, अनेकदा सरपटणाऱ्या  प्राण्यांशी गाठभेट होते, मग पायाच्या संरक्षासाठी म्हणून चांगले बुट घालणे व कपड्याची एखादी जोडी सोबत असणे अत्यावश्यकच आहे. धाडस म्हणून चुकून देखील एकट्याने जाणे टाळावे. तसंच दरी पार करताना रात्र झाल्यास रहाण्याची सोय तिथेच होऊ शकते, म्हणून त्यासाठी तंबूंची व्यवस्था आपल्यासोबत असलेली बरी.  ऊन असल्याने टोपी आणि सफेद रुमाल असावा की ज्याने कान आणि मान झाकली जाते आणि उन्हाचा त्रास कमी होतो.  गावकऱ्यांना आगाऊ सूचना दिल्यास खाण्याची व्यवस्था होते. पण तयार जेवण, थोडा खाऊ, भरपूर पाणी, लिंबू पाणी, सोबत न्यायलाच हवे. कृपा करून ट्रेकिंग जाताना आपण तिथला गडांवरचा कचरा साफ करू शकत नाही तर निदान आपण तिथे पाण्याच्या बाटल्या,थर्माकोलची  ताटे, प्लास्टीक चा कचरा टाकून येऊ नये. आपला सह्याद्री स्वच्छ आणि सुंदर ठेवूयात. धन्यवाद....