Monday, 21 August 2017

"कातळधारा ट्रेक"एक अविस्मरणिय,थरारक अनुभवगाठ..


"कातळधारा ट्रेक"
ठिकाण-पुणे जिल्हा (लोणावळा)
चढाई श्रेणी-मध्यम कठीण
दिनांक - २० ऑगस्ट २०१७

जुलै महिन्यातील अंधारबनच्या  अतिशय सुंदर,अप्रतिम, थरारक पावसाळी ट्रेकनंतर मी ट्रेकर् दुसऱ्या थरारक ट्रेकची  वाट पाहत होते ."फोना" फ्रेंड्स ऑफ नेचर असोशिएशन ने ७६ वा कातळधारा हा ट्रेक आयोजित केला आणि आनंदाला पारावार राहिला नाही. कारण कातळधारा ट्रेक हा तसा रिस्की आणि कठीण ट्रेक आहे. परंतु "रिस्क इज माय पॅशन" या नियमानुसार मी मनातून जायचे ठरवले होते खरे परंतु शरीरात जरा तांत्रिक बिघाड झाल्याने डॉक्टरांनी यावेळी ट्रेकला न जाण्याचा चांगला सल्ला दिला होता. तरीही पंधरा दिवस दवाखान्याच्या वाऱ्या पूर्ण करून मनाची तयारी करून ट्रेकच्या वारीसाठी सज्ज झाले. मी या गोष्टीचा उल्लेख अशासाठी करते की आपल्या मनाने आपण एखादी चांगली गोष्ट करण्याचा पक्का निर्धार आणि निश्चय केला सर्व काही साध्य होते. इच्छाशक्ती प्रबळ असली की आपला मार्ग सोप्पा होतो. 
माझ्या महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात लोणावळ्यात "कातळधारा" हे ठिकाण आहे.पुण्यापासून सुमारे ६५ कि.मी. अंतरावर आणि चिंचवड पासून ५२ कि.मी.लोणावळा-खंडाळा हे थंड हवेचे नावाजलेले ठिकाण आणि चिक्कीसाठी प्रसिद्ध असे उत्तम सगळ्यांचे आवडते पर्यटनस्थळ आहे.लोणावळ्यापासून एक ते दीड कि.मी. च्या अंतरावर कातळधारा आहे.  ठरल्याप्रमाणे आमची बस दिनांक २० ऑगस्ट ला सकाळी ७ वाजता निगडी-तळेगाव-लोणावळा मार्गे निघाली. बसमध्येच पोह्याचा नास्ता करत आणि एका ठिकाणी थांबून चहाचा आस्वाद घेत श्री. सचिन दीक्षित यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने छोटा केक कापून त्यांच्याच हस्ते नारळ फोडून पुढच्या प्रवासाला सुरुवात केली.  "हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट सांगो चेडवा दिसतो कसो खंडाळ्याचो घाट.. " अशी अनेक उल्हासित करणारी गाणी गात(तालासुरात गाणे गाणाऱ्या आणि जल्लोषात शिवगर्जना करणाऱ्या मस्तीखोर प्रतिकदादाची आठवण काढत) कातळधारा धबधब्याकडे जाणाऱ्या घनदाट जंगलाच्या वाटेजवळ थांबली.

इथून पुणे जिल्ह्यातील लोणावळा डोंगररांगेतील ट्रेकर्सच्या दृष्टीने मध्यम समजला जाणारा राजमाची हा किल्ला सुमारे १४ कि. मी. वर आहे. हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. खंडाळा घाटातून समोर नजर टाकल्यावर एकाला एक लागून दिसणारी शिखरे म्हणजेच राजमाची किल्ला होय.परंतु आम्हाला आज राजमाचीला न जाता कातळधाराचा ट्रेक करावयाचा असल्याने आम्ही इथेच थांबलो. आधीपासूनच ट्रेक लीडर्स ट्रेकसाठीच्या दिलेल्या सूचना आम्ही पाळल्या होत्याच. म्हणजे एक छोटी कमी वजनाची सॅक त्यात किमान एक लिटर पाण्याची बाटली,चॉकलेट्स गोळ्या(टाईमपास)दुपारच्या जेवणाचा भुकेपुरता टिफिन, प्रॉपर ट्रेकिंगचे शूज,कॅप,जॅकेट, जरुरीप्रमाणे लागणारी स्वतःसाठीची औषधे,पूर्ण हात आणि पाय झाकले जाणारे कपडे घालून तयारीत आलोच होतो. तिथे गेल्यावर घनदाट जंगलात डासांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी ओडोमास लावून घेतले. आम्ही ट्रेकला सुरु करण्यापूर्वी इतर कोणा ग्रुपचे ५ मेंबर्स त्यांचा ग्रुप त्यांना उशीर झाल्याने पुढे गेला असल्याने आम्हाला सामील होऊ पाहत होते. त्यांच्या विनंतीवरून आमच्या लीडर्सनी त्यांना "दिलेल्या सर्व सूचना ऐकणार"या अटीवरच आमच्यात सामील करून घेतले अर्थात जो ट्रेकर सूचनांचे पालन करेल साथ देईल त्यालाच फोना ग्रुप मदतीचा हात पुढे करेल. ही ग्रुपची खासियत आहे.

घनदाट जंगलात जाण्यापूर्वी पुन्हा सूचना दिल्या गेल्या आणि शिवगर्जना करत सकाळी ९:३० ला ट्रेकची सुरुवात झाली. दुसऱ्या वाहनाने आलेले ५ मेंबर्स आम्ही आमच्यात सामील करून घेतले आणि एकूण ५३ ट्रेकर्सने ट्रेकिंग सुरु केले.  पाऊस सतत सुरु असल्याने ओढे,धबधबे भरून वाहत होते. सर्वत्र हिरहिरवे गालिचे होतेच परंतु एखादा ढग वितळला की सुरुवातीला डाव्या बाजूची दरी एखाद्या चित्राप्रमाणे रेखीव आणि अतिशय सुंदर दिसत होती. सुरुवातीलाच छोटासाच परंतु घसरून पाडणारा ओढा ओलांडताना थोडी रांग लावूनच पार केला. त्यांनतर पुन्हा एक छोटा ओढा आला आणि आता पायातले बूट पूर्ण भिजवून पार करण्याशिवाय पर्याय नव्हता. आपण भारतीय आहोत आणि श्रद्धाळू आहोत. कोणतेही कार्य पार पाडताना शुभ सुरुवात व्हावी म्हणून  देवाचा आशीर्वाद घेतो.  तसेच घनदाट जंगलाची सुरुवात करताना एका दगडावर शेंदूर लावला होता शेंदूर लावलेला दगड म्हणजे श्रद्धाळू लोक त्याला देव म्हणतात.आज आपण त्याला दिशादर्शक समजू.  देव दगडात नाही तर आपल्या मनात असतो त्यामुळे त्याला नमस्कार करून आम्ही पुढे निघालो. कातळधारा ट्रेक ला जाताना असे काही मोजमाप केले नाहीकी नेमके किती फूट खोलदरीत उतरलो आहोत.  फक्त हे जंगल खूप रिस्की आहे हे मात्र खरे. माहित नसलेल्या लोकांनी कातळधाराचा नाद करूच नये कारण एक वाट चुकली की माणूस भरकटत जातो आणि घाबरतोच.या जंगलातुन सहीसलामत परत यायचे असेल तर अनुभवी ट्रेकर्स सोबतच अशा कठीण ट्रेकला जाण्याची हिंमत करावी. "उगाच मस्ती नहीं पडती सस्ती" 
कातळधारा ट्रेक कठीण असल्याने कमी लोक इकडे जातात त्यामुळे जंगलात नेमक्या कोणत्या वाटेने कातळधारकडे निघावे हा संभ्रम नव्यांना तसे जुन्यांना देखील पडतो. परंतु अचूक वाट दाखवणारा तोच खरा लीडर असतो. लीडर्स च्या मागोमाग आम्ही निघालो होतो. मधेच कुठेतरी एखाद्या झाडाच्या फांदीला भगव्या रंगाच्या छोट्या पट्ट्या लावल्या होत्या की जेणेकरून वाट सापडावी. आमचे एक लीडर राणे सर पुढे होते मागोमाग आम्ही सगळेच होतो. काही लीडर्स मध्ये तर काही लीडर्स सर्वात शेवटी होते. ग्रुप मध्ये सगळ्यांचा चालण्याचा वेग एकसारखा नसतो त्यामुळे अधून मधून थोडेसे अंतर राहतेच राहते. त्यासाठी मागच्या मेंबर्सना वाट अचूक सापडण्याची आमचे लीडर खूण म्हणून एकावर एक तीन दगड ठेवून पुढे जात होते. तसेच झाडा झुडपांना पटकन न बघता आधार म्हणून हात लावू नका. चापड्या हा हिरव्या रंगाचा विषारी साप असला तरी कळणार नाही आणि चावला तर पळता भुई थोडी होईल. अश्या सूचना वारंवार देत होते. काळजी घेत आम्ही जंगल उतरत होतो. किती अंतर चालतो किती खोल उतरतोय काय थरार असतो हे प्रत्त्यक्ष अनुभवानेच समजते.
सगळ्या वाटा  एकसारख्याच दिसत होत्या. मधेच एका बाजूला राजमाचीची शिखरे डोकावत होती. जणू लटक्या रागाने खुणावत होती, निमंत्रण देत होती की,"अस्सं काय ??कातळधारालाच जात काय?? आमच्याकडे तुमची पावले केव्हा वळतील." अप्रतिम असा नजारा होता तो. मधेच खळखळ असा आवाज येऊ लागला एक मोठ्ठा ओढा होता तो. आम्ही कितिदा वाट चुकता-चुकता रहायचो. त्या खळ्खळ्णाऱ्या ओढ्याजवळ पोहोचलो तिथे मनसोक्त भिजून घेतले आणि मनसोक्त छायाचित्रण केले आणि पुढच्या वाटेला निघालो. एक तास होऊन गेला होता आम्ही जवळ जवळ अर्धे अंतर पार केले होते.एक मोट्ठे झाड नैसर्गिकरित्या आडवे पडले होते ते जणू एखाद्या वाटाड्या प्रमाणे सांगायलाच थांबले होते की  "बाबांनो जरा संभाळून जा रे पुढे धोका आहे." आता पुढे अजून घनदाट जंगल आणि रिस्की पॅच होता. तिथे ५ मिनिटे थांबून लीडर्सने पुन्हा महत्वाच्या सूचना केल्या आणि निघालो.
घनदाट जंगल आणि अंधार ओढा गेल्यावर पुन्हा किर्र... शांतता असायची परंतु बडबडे ट्रेकर्स आणि लिडर्स सोबत असताना भीती कुठच्या कुठे पळून जायची. मुसळधार पाऊस असल्याने दगडावर खूप शेवाळ साठून सगळेच दगड घसरडे झाले होते. मी या मताची आहे की कायम आपल्या पुढे दांडगा आत्मविश्वास असलेला ट्रेकर हवा.त्याचा वेग जास्त आपला वेग जास्त, त्याचा आत्मविश्वास दांडगा तर आपला आत्मविश्वास दांडगा, तोच जिथे त्याची काळजी घेतो आणि मागच्याला म्हणजे आपल्याला काळजी घ्या म्हणतो तिथे आपण आपली काळजी घेतो आणि मागच्याला काळजी घे म्हणतो म्हणजे आपोआप ही चांगुलपणाची आणि टीम वर्कची साखळी तयार होते. आणि टीमवर्क यालाच म्हणतात. जे कार्य आपण एकटे करू शकत नाही ते फक्त ग्रुपनेच साध्य होते. 
एक तास अंतर चालून गेल्यावर आता उतरलेले जंगल चढायचे होते. भूक लागल्यावर कसे आपण पहिले मला-पहिले मला  हावरेपणा करतो तसे झाले. कारण कातळधारा ची ती उंचावरून कोसळणारी धबधब्याची धार भयानक मोट्ठी मोट्ठी परंतु तरीही नयनरम्य, अप्रतिम दिसत होती. तिथे जायला अजून अवकाश होता परंतु या ठिकाणाहून फोटो घेण्याची मजा देखील वेगळीच.

मी तर फोटोसाठी हावरीच आहे हे सगळ्यांना आणि मला स्वतःला माहित आहे. मी आणि सर्वच ट्रेकर्स हावऱ्यासारखी फोटोग्राफी करून ती कोसळणारी कातळधार आपल्या कॅमेऱ्यात कैद करू लागले. परंतु ती जागा फारच निमुळती असल्याने क्रमानुसार आपापल्या जीवाची काळजी घेत संयम ठेवून सगळे फोटोग्राफी करीत होते. तिथे अजून एक गृप आल्याने थोडी जास्त गर्दी झाली होती.लिडर्सच्या सूचनेनुसार आम्ही पुढचा टप्पा पार करण्यास सुरुवात केली.एक कठीण पॅच पार केल्यावर ती  कातळधार आम्हाला समोरून दिसली. अहाहा.... ते वर्णन शब्दात सांगणे कठीण आहे. प्रत्यक्ष अनुभव घ्या.  पावसाचा जोर प्रचंड वाढला होता. आणि त्या कातळधारेजवळील गुहेत जाण्यासाठी खोल दरीत उतरवायचे होते. परंतु प्रचंड घसरडे खडक त्यात त्या कोसळणाऱ्या धबधब्याचा मारा सर्व ट्रेकर्सना सहन होईल किंवा नाही याची खात्री करून घेण्यासाठी स्वतः लीडर्स आणि अजून २-३ ट्रेकर्स पुढे गेले आणि बाकीच्यांना आधीच्या गुहेजवळ थांबवयास सांगितले. तोपर्यंतआम्ही आणलेले जेवणाचे डबे काढून उभ्या उभ्या जेवण उरकून घेतले.कारण गुहेत आम्ही ५३ ट्रेकर्स आणि इतर ग्रुपचे मेंबर्स जास्त असल्याने जागा तशी कमी होती त्यामुळे कोणी गुहेत कोणी पावसाच्या धारेत थांबून जेवण केले पोट भरले परंतु ट्रेक पूर्ण व्हायचा होता त्यामुळे अजून आमचे मन भरायचे बाकी होते.

अर्ध्या तासाने लीडर्स म्हणाले सगळ्यांना शक्य नाही त्यामुळे ज्याला आत्मविश्वास आहे त्यांनीच चला. ५३ मधले आम्ही किमान ३० ट्रेकर्स दरीत उतरू लागलो. एकीकडे त्या कातळधारेचा मारा, वाऱ्याचा मारा आणि घसरडे खडक असल्याने खूप भीती वाटत होती. त्यात छोटे छोटे दगड सैल झाले होते. एखाद दुसरा दगड निसटतदेखील होता.   रोप लावला होता त्याला धरून काही ठीकाणी रॅपलिंग करून उतरलो खरे परंतु उंचावरून ती कातळधार कोसळत असल्याने आणि पाऊस जोरदार असल्याने तोंडावर आणि डोळ्यावर ते पाणी चापट्या मारल्यासारखे लागत होते. खडकाचा आधार घेत आम्ही खाली बसत होतो. त्या कातळधारेकडे पाहिल्यामुळे उत्तम खडपला चक्करच आली. इतके असून एकीकडे आमच्यातले हौशी फोटोग्राफर प्रशांत, विवेक यांनी त्या ठिकाणी त्या थराराचे फोटोज काढले आणि व्हिडीओ शूटिंग केले. तुम्हाला सलाम आणि धन्यवाद.   
समोरचा राजमाची किल्ला जणू ट्रेकर्सचा पाठीराखा असल्यासारखा उभा होता. राजमाचीवरून कातळधारचे दृश्य अतिशय विहंगम दिसते. (खालील फोटो राजमाची गडावरून दुसऱ्याने काढला आहे राजमाचीवरून कातळधार कशी दिसते हे समजण्यासाठी मी इथे दिला आहे.) 

राणे सर आणि ४ मेंबर्स त्या दरीतून त्या भयानक रौद्र रूप असलेल्या धबधब्याखालून गुहेत पोहोचले होते परंतु ते आम्हाला न्यायला येईपर्यंत बराच वेळ झाला होता त्यामुळे आमचे धाबे दणाणले होते आणि मला तर खूप काळजी वाटत होती.आता गुहा फक्त १० मिनिटांच्या अंतरावर होती परंतु सॉल्लिड रिस्क होती शिवाय जायला जाऊ परंतु  सुखरूप परत येणे महत्वाचे होते.अशावेळी हेल्मेट आणि पोहताना वापरतो तो गॉगल हवा होता. पुढच्या कातळधारा ट्रेकला रॅपलिंग चे हेल्मेट आणि पाण्यातला गॉगल नेऊयात.  

"रिस्क इज अवर पॅशन" असले तरी तिथून पुढे जाणे सगळ्यांनाच शक्य नाही असे समजल्यावर त्या दरीतून आम्ही काही जण लिडर्स च्या आदेशावरून पुन्हा रोपच्या सहाय्याने दरी चढू लागलो. त्यावेळी "फोना' गृप सोबत केव्हातरी ट्रेकला येणारे किरण टेकवडे आणि प्रदीप अडागळे, रोहन स्टोरीटेलर, रघुनंदन पाटील असे काही मेंबर वेगळा मोठा गृप घेऊन आले होते ते त्या दरीत उतरत होते आणि आम्ही काही मेंबर्स दरी चढत होतो.असाही मी या आधी मी एकदा त्या रौद्र धारेखालुन गुहेत जाण्याचा थरार अनुभवला होता. तरीही १० मिनिटांच्या अंतरावर जाऊन  माघारी येणे माझ्या पचनी पडत नव्हते. अशी हाव प्रत्येकामध्ये असणे खऱ्या ट्रेकर्सचे लक्षण आहे. मला यावेळी ठीक नसल्याने आणि पाऊस असल्यायाने पाणी प्यायलेच नाही पाणी कमी पडल्याने पायात चांगलीच चमक येत होती माझ्यामुळे इतरांचा ट्रेक का खराब करा. असा विचार करून मी दरी चढू लागले. या अवाढव्य निसर्गापुढे आपण किती क्षुद्र प्राणी आहोत आणि आपल्या अडचणी किती क्षुल्लक आहेत याची प्रचिती येते.कोणी कितीही अनुभवी ट्रेकर असला तरीही त्या भयानक पाण्याच्या प्रवाहात रोप सैल होऊ शकतो आपण घसरू शकतो. दैव बलवत्तर, ट्रेकिंगचे तंत्र आणि जगण्याची प्रबळ इच्छाशक्ती असली तरच आपण मोठ्या संकटाला सामोरे जाऊ शकतो हे ट्रेकमध्ये आलेल्या थरारक अनुभवाने शिकलो.  
सगळेच पाठीमागून येतात असे समजून आम्ही १५ जण वरच्या गुहेजवळ आलो परंतु तरीही आमच्यातील ३० ट्रेकर्सनी त्या कातळधारेचा थरार अनुभवला आणि सुरक्षितरित्या दरीतून आणि त्या कातळधारेतून जणू स्वतःची सुटका करून आले यातच त्या ३० ट्रेकर्सचे खूप कौतुक. (खालील फोटोमध्ये जे झाड दिसते आहे त्याच झाडावर चापड्या बसला होता.)

सगळे ट्रेकर्स आल्यावर "फोना बॅनर गृप फोटो" काढून आम्ही दुपारी २ वाजता परतीच्या वाटेला निघालो. उतरताना २-३ गृप एकत्र निघाल्यामुळे आणि आमचेच ५३ ट्रेकर्स असल्याने एका ठिकाणी ट्राफिक जॅम झाला होता आणि नेमका त्याच ठिकाणी चापड्या (पिट बांबू वायपर)आमच्या वाटेतच एका झाडावरच्या फांदीवर अगदी डोक्यावर वेटोळे करून बसला होता तो एकाने पहिला आणि आम्हाला पण सांगितले. तो जणू सांगत होता की चुपचाप जा नाहीतर मग माझ्याशी गाठ आहे. त्यात आमचे सर्प मित्र निकाळजे सर देखील नव्हते. त्यामुळे जरा घाबरगुंडी उडाली. परंतु दुसरा पर्याय नसल्याने त्या चापड्याच्या भीतीने आमच्यासारखे बडबड करणारे बडबडेवीर थोडा वेळ तरी गप्प बसले. त्याठिकाणी रोप लावल्याने आणि घसरडे असल्याने इतरांना डावलून जाता येत नव्हते. थोड्या वेळाने तो रोप-पॅच मोकळा झाला आणि आम्ही सपासप ते जंगल पार करू लागलो. लिडर्स मागेपुढे झाले होते पण आता आलो तश्या मार्गानेच निघालो होतो परंतु त्या झाडाला लावलेल्या भगव्या रंगाच्या छोट्या रिबिनींमुळे वाट थोडी सोप्पी वाटत होती. अधून मधून दुसरे गृप विचारीत होते फोना गृपची ट्रेकिंग फी काय आहे.त्यांनी त्यांची फी सांगितल्यावर समजले की फोना गृपची ट्रेकिंग फी ट्रेक दरम्यान मिळणार्या आनंदाच्या,समाधानाच्या मानाने खूपच कमी आहे." "फोना रॉक्स"असाही एक अनुभव. 
झाडांच्या फांद्यांच्या भगव्या रिबिनी लावलेल्या दिसल्या नाही की आम्ही नव्हतो चुकत तर वाट चुकत होती.
ट्रेक एकदम  वेळेत होता त्यामुळे जातांना एका मोट्ठ्या ओढ्यात बॅनर फोटो काढायचा राहिला होता तो काढून घेतला आणि चिखलाने भरलेले कपडे त्या ओढ्यात बसल्याने मस्त आयते धुवून निघाले. ह्या कातळधारेचा प्रशस्त प्रवाह आणि इतर मोठमोठ्या ओढ्यांचा प्रवाह सर्व दऱ्यांमधून एकत्र येऊन जी नदी  उगम पावते तिला उल्हास नदी म्हणतात.सह्याद्रीच्या लोणावळा खंडाळा पासून निघणाऱ्या डोंगररांगांमुळे निर्माण झालेला परिसर उल्हास नदीचे खोरेम्हणून ओळखला जातो.
ओढा पार करून निघालो की सकाळी उतरलेलो ते घनदाट जंगल अंधार व्हायच्या आत चढून वर यायचे होते. कातळधारेच्या ओढीने हसत हसत सपसप पार केलेले जंगल आता चढताना मात्र पाय भरून येत होते. एका ठिकाणी आम्ही बडबडे ट्रेकर्स गप्पा टाकत निघालो आणि अनावधानाने एक टर्न चुकलो आणि दुसऱ्या बाजूने  क्षणात उतरायला लागलो. पायांना आराम वाटला परंतु रस्ता चुकलो होतो हे १५ मिनिटांच्या आत लीडर्सच्या लक्षात आले म्हणून बरे आणि त्यात ग्रुप मध्ये जास्त अंतर नव्हते म्हणून बरे नाहीतरी काही ट्रेकर्स तर कुठच्या कुठे भलत्याच दरीत उतरले असते. परंतु अनुभवी आणि चाणाक्ष लिडर्स असलेल्या गृपसोबत जाण्याचा हा मोठ्ठा हितकारक फायदा आहे. म्हणून आम्ही "फोना" सोबतच जातो.  तरीही एक चिंता राहिली होती की मोरे सरांसोबत ४-५ मेंबर्स पुढे गेलेत ते वाट चुकले नसावेत म्हणजे झाले. तिथून फोन लावण्याचा प्रयत्न केला परंतु तो असफल ठरला.
२ वर्षांपूर्वी ४-५ मुले कातळधाराच्या ओढीने कोणतीही माहिती नसताना फक्त थोडेसे पाणी सोबत घेऊन अंदाजाने गेले आणि वाट चुकले, रस्ता भरकटले आणि खोल दरीत उतरले. कोणाशीही संपर्क होत नव्हता. अखेरीस २ दिवसांनंतर पोलिसच अथक प्रयत्नानंतर त्यांना शोधू शकले. परंतु त्यांना मच्छरांनी चावून हैराण केले होते शिवाय २ दिवस अन्न पाण्यावाचून आणि भीतीने भेदरले  होते ते वेगळेच. असे विचित्र प्रसंग येऊ नये यासाठी माहिती असणाऱ्या ग्रुप सोबत सर्व तयारीनिशी ट्रेकला जावे.
शेवटचा टप्पा धापा टाकत पार केला कारण ट्रेक संपताना जर चढाव असेल तर मला तरी जास्तच जीवावर येते. म्हणता-म्हणता जाताना दिसलेला दगडातला देव दिसला आणि ते घनदाट जंगल संपले आणि हायसे वाटले. संध्याकाळी ५ वाजता बसजवळ आलो तेव्हा समजले की पुढे गेलेले मोरे सर आणि इतर काही मेंबर्स सुरक्षित पोहोचले होते. एकट्याने जाऊन सुरक्षित पोहोचणे हा देखील एक मोठा  सपोर्टच असतो धन्यवाद मोरे सर आणि इतर. ट्रेक संपला आणि कपडे बदलून मस्त चहा घेतला तेव्हा हायसे वाटले. सकाळी वेळेवर आम्हाला सामील झालेल्या अनोळखी पाच ट्रेकर्सना सुरक्षित आणल्याबद्दल पूर्ण फोना टीमला त्यांनी चहाची ट्रीट दिली. धन्यवाद अनोळखी ट्रेकर्स. पावसाळी ट्रेकला  खूपदा नवीन मेंबर्सची ओळख करून घेण्याचे राहून जाते. त्यासाठी सगळ्यांनीच पुन्हा पुन्हा ट्रेकला यावे. तसेच अंताक्षरी खेळताना आम्ही आधी नवीन ट्रेकर्सना संधी देतो पण कोणी जागचे हालले नाही की मग आम्हीच सगळॆ बस हालवतो. संधी मिळाली की मग सगळ्या कला आणि भडास बाहेर  काढतो. जुने नवीन असे काही नसते हो. मी तर प्रत्येक ट्रेकला नव्याने जाते.  कारण प्रत्येक ट्रेकच्या वेळी आपली मनस्थिती आणि शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. आपली शारीरिक क्षमता तपासून ती वाढवण्यासाठी आणि मानसिक बळ वाढवण्यासाठी महिन्यातून  किमान एक ट्रेक हे एक उत्तम औषध आहे.  लग्न ठरलेले २ जण फक्त बाहेर बाईकवर न फिरता आपापल्या पार्टनरला घेऊन ट्रेकला आले होते.जसे स्नेहल खोल्लम(इंजिनियर,ट्रेकर,योगा चॅम्पियन,सायकलिस्ट,) आणि ज्ञानराजे (इंजिनियर,ट्रेकर,सायकलिस्ट).आताची पिढी देखील आरोग्यासाठी खूप जागरूक आहे असे दिसते. असाच चालू ठेवा रे ट्रेक.(खालील फोटो हा कातळधारची आतली गुहा आणि त्यात पोहोचलेले आमचे ३० ट्रेकर्स)

सगळ्यात आधी माझ्या फॅमिलीला(श्री.दीपक साने,चेतन,प्रभा) खूप सारे थँक्स ज्यांनी मला बरं नसताना माझ्यावर विश्वास टाकून माझा आत्मविश्वास वाढवून मला ट्रेकची परवानगी दिली. इतका चांगला आणि सुरक्षित ट्रेक घडवून आणलात ट्रेकलिडर राणे सर, मंदार सर, रोहित  सर अनिल जाधव सर  मनापासून धन्यवाद. फोन फुटल्यामुळे मला स्वतःला या ट्रेकला जास्त फोटोग्राफी करता आली नाही त्यामुळे कविता,दिनेश,स्नेहल,सुरेखा,अस्मिता, निकिता,ऋजुता दिनेश, निलेश, रोहित, आनंंद,प्रशांत गुंड, विवेक, दीक्षित सर सुपेकर सर, अभिजित आणि ज्यांनी फोटोग्राफीसाठी आणि इतरही सपोर्ट केला त्यासाठी त्यांंचे  खूप कौतुक आणि सर्वच ट्रेकर्सचे  मनापासून कौतुक आणि अभिनंदन."फोना"सोबत आते रहो और बढीया ट्रेक करते रहो....



x

Monday, 17 July 2017

"अंधारबन धुवाधार ट्रेक"

"अंधारबन पावसाळी ट्रेक"
ठिकाण-पुणे जिल्हा (ताम्हिणी घाट)
दिनांक -१६ जुलै २०१७


पुणे जिल्ह्यामध्ये मुळशी तालुक्यात ताम्हिणी घाटामध्ये "अंधारबन" हे घनदाट जंगल आहे. हे पुण्यापासून सुमारे ६६ कि.मी. अंतरावर आणि तळेगावपासून जवळ जवळ ८० कि. मी. अंतरावर आहे. "अंधारबन ते भिरा डॅम" हा "फ्रेंड्स ऑफ नेचर असोशिएशन" (फोना)चा एका बाजूने सुमारे १३ कि. मी. चा  ७४वा ट्रेक आयोजित केला. यावेळी माझे  ट्रेकला जाणे पक्के नव्हते परंतु माझ्या कुटुंबाने ट्रेकला येणाची मनापासून तयारी दाखवल्याने मलाही ट्रेकला येणे जास्त गरजेचे आणि आनंदाचे वाटले.  
रविवार दिनांक १६ जुलै २०१७ या दिवशी आमच्या दोन बसेस सकाळी ६ वाजता तळेगाव-निगडी-वाकड-चांदणीचौक-पिरंगुट मार्गे मुळशी धरणाच्या कडेकडेने ताम्हिणी घाटातून अंधारबनकडे निघाल्या. पावसाची संततधार आधीपासूनच सुरु होती. यावेळी "फोना' टीम च्या ५०-५० सीट्स च्या २ बसेस होत्या. १ बस पुढे गेली परंतु आम्ही ज्या बसमध्ये होतो त्या बसचा ड्रायवर नेमका गाडीचे परमिट घरी विसरला. तिथे १ तास थांबावे लागले. असे एखाद्या वेळेस फार क्वचित घडते. परंतु त्या वेळात आम्ही बसमध्येच सोबत आणलेला पोह्याचा नास्ता केला आणि तिथे निसर्गात थोडी फोटोग्राफी केली.परमिट आल्यावर पुन्हा पुढचा प्रवास सुरु झाला.
जाताना रस्त्यालागत भातखाचरे पाण्याने आणि भाताच्या रोपाने भरलेली दिसली आणि शेतकरीण कुटुंबासोबत  भाताची रोपे घेऊन भातलावणीच्या लगबगीत दिसली.  ताम्हिणी घाटामधील ट्रेक ला जाताना इथल्या रस्त्यालगत असलेल्या छोट्या साध्या शिवसागर हॉटेल आहे तिथे आम्ही चहा घेतला. त्या परमिट च्या गडबडीमुळे बस थोड्या मागेपुढे झाल्या होत्या आणि नारळ फोडून ट्रेकचा श्रीगणेशा करायचा राहून गेला होता. यावेळी माझे मिस्टर श्री. दीपक सानेंच्या हस्ते नारळ फोडून ट्रेकचा श्रीगणेशा केला आणि प्रतीक पेंढारे याने राजे श्री.छत्रपतीं शिवरायांची आणि संभाजी राजेंची स्फुर्तीपूर्ण गर्जना करून पुढील प्रवास सुरु झाला.
प्रौढप्रताप पुरंदर,क्षत्रियकुलावतंस,राजणिती धुरंधर,शास्त्रास्तशास्त्र पारंगत,महाराज,श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय...धर्मवीर संभाजी महाराज की जय...राजमाता जिजाऊ माँसाहेब की जय...हर हर महादेव...जय भवानी, जय शिवाजी..
१०० ट्रेकर्स मधील ८० टक्के ट्रेकर्स आम्हाला नवीन होते त्यामुळे आत्तापर्यंत बसमध्ये सगळेच शांत होतो.कदाचित पहिल्यांदा ट्रेक करणाऱ्या काहींच्या मनात १३ कि.मी. चा इतका मोठा ट्रेक पूर्ण करू शकू की नाही अशी भीतीही असेल.चहा घेताना लीडर च्या परवानगीने आम्ही काही मेंबर्स अंताक्षरीसाठी दुसऱ्या बस मध्ये गेलो आणि तास भर अंधारबन येईपर्यंत गाण्याने सगळ्यांचे मनोरंजन करून(अंताक्षरीचा कल्ला) करून अंधारबन च्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलो."आपल्याला आनंद हवा असेल तर आपणच आंनदाजवळ गेले पाहिजे,आनंद आपोआप पाय चालत आपल्या पायाशी येणार नाही मी या तत्वाची आहे. इतरांचे माहित नाही परंतु मी हा आनंद मिळवण्यासाठी ट्रेक करीत असते. शारीरिक आरोग्य आणि मनाचे आरोग्य चांगले हवे असेल तर त्यासाठी महिन्यातून किमान एक तरी ट्रेक हवाच हवा.
मुळशी तालुक्यात वांद्रे फाट्यापासून आमची बस ज्या रस्त्याने गेली तो रस्ता पिंपरी, भांबर्डे, तैलबैला फाटा मार्गे लोणावळ्याला जातो. इथून भांबर्डे १८ कि.मी.आहे भांबर्डे गावातून घनगडला जाता येते.इथून आंबवणे ३० कि.मी. आहे आणि लोणावळा ५ कि.मी. आहे. तसेच तिथले  पिंपरी गाव ५ कि. मी.वर आहे. सकाळी ११:३० वाजता पिंपरी गावाच्या पाझर तलावापाशी आमची बस थांबली. मोबाइल पाण्यामुळे खराब होऊ नये आणि इतक्या सुंदर अंधारबन मध्ये फोटोग्राफी सुद्धा झाली पाहिजे त्यासाठी मी खास amazon.in वरून एक मोबाइल कव्हर आणले होते ते मी यावेळी वापरले कारण एका पावसाच्या ट्रेकमध्ये माझा मोबाईल आणि डिजिटल कॅमेरा दोन्ही खराब झाले होते त्यामुळे मी पावसात माझ्या मोबाईलची जरा जास्तच काळजी घेते आणि तुम्ही देखील स्वतःच्या फोन आणि कॅमेऱ्याची काळजी घ्यावी असे मला वाटते.  ताम्हिणी घाट न्याहळत होते,बसमधून सुद्धा फोटोग्राफी सुरूच होती परंतु तिथे उतरल्यावर त्याहून अतिशय सुंदर निसर्गाचा अद्भुत मनमोहक नजारा पहावयास मिळाला. अश्यावेळी ओठांवर अनेक काव्यपंक्ती आणि गाणी सहज येतात,
"हिरवे-हिरवेगार गालिचे हरिततृणांच्या मखमालीचे
"हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट सांगो चेडवा दिसतो कसो  ताम्हिणीचो  घाट.... हिरव्या हिरव्या.."

आठवड्याच्या प्रत्येक रविवारी पावसाच्या ट्रेक आणि सहलीला जाण्याची क्रेझ आणि त्यात भर त्या सेल्फीकाठी घेऊन फोटो काढण्याची क्रेझ खूप जास्त वाढली असल्याने घाटाच्या प्रत्येक वळणावर माणसांची आणि वाहनांची धोकादायक तुफान गर्दी आढळली. जर असेच निसर्गाचा ऱ्हास करणारे लोंढे च्या लोंढे इकडे घाटमाथ्यावर वाहू लागले तर निसर्गाचा ऱ्हास लवकरच होईल याची भीती वाटली.
निसर्गात फिरा परंतु तिथले नुकसान नका करू”  “संवर्धन करायला जमत नाही तर निदान संहार तरी नका करू.”  हा एक नियम पाळला तरी आपणच आपली जैवविविधता सुरक्षित ठेवून आरोग्य सुरक्षित ठेऊ शकू.
सध्या दररोज च्या बातमीपत्रांमध्ये आपण वाचतो आहोतच की बरेच लोक दारू पिऊन सहलीला जातात तर जातात आणि गडकिल्ल्यांवरदेखील जातात कचरा करतात असभ्य वर्तन करताना दिसतात. निसर्गाला  हानी पोहोचवतात शिवाय अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे इतरांच्या चुकीमुळे सगळेच ट्रेकर्स उगाचच बदनाम झाले आहेत.  मागील आठवड्यात कर्जत जवळील पेब किल्ला(विकत गड)आणि ताम्हिणी घाटामधील मधील देवकुंड धबधबा येथील  झालेल्या अपघातामुळे बऱ्याच गडकिल्ल्यावर आणि पर्यटनस्थळी जाण्यास बंदी आणली आहे. पावसाचा जोर घाटामध्ये खूप जास्त आहे आणि या अपघाताची घटना अजून ताजी असल्याने कोणाही पर्यटकांना किंवा ट्रेकर्सना भिराधरणाकडे जाऊ दिले नाही. हे तिथे जवळ गेल्यानंतर समजल्यामुळे अंधारबन ते भिराडॅम च्या ऐवजी "अंधारबन ते हिरडी गाव" जाऊन परत येणे असा हा सुमारे १०ते११ कि.मी. असा ट्रेक करण्याचे ठरले.

अंधारबन ट्रेक च्या सुरुवातीलाच तेथील पिंपरी हे छोटे गाव आहे त्या गावचा हा पाझर तलाव दुथडी भरून वाहत होता आणि मुसळधार पावसामुळे चिखलमय झाला होता.  ट्रेक प्रमुखांनी यात उतरू नये अशी सूचना आधीच दिली असल्यामुळे आम्ही आमच्या ट्रेकला सुरुवात केली.दर वर्षी पावसाळी ट्रेकला जरा जास्त गर्दी असते त्याप्रमाणेच यावेळीदेखील गर्दी होतीच. "फोना"ग्रुपचे जरी १०० ट्रेकर्स होते तरी २५-२५ चे ४ ग्रुप करून एका ग्रुप सोबत किमान ३ लीडर होते. संपूर्ण ट्रेक विषयी आणि घावयाच्या दक्षतेविषयी सूचना दिल्या गेल्या. रघुनंदन पाटील याने त्याच्या ग्रुपकडून खूप सारे सीड बॉल्स बनवून आणले होते त्याचे वाटप करून ते ट्रेक दरम्यान जमिनीत कसे लावता येतील याची माहिती त्याने दिली.  जगामध्ये जैवविविधता असलेले एकूण ७ जैवविविधता हॉट-स्पॉट आहेत त्यातील आपल्या भारतामध्ये  २ आहेत.  त्या २ मधील ताम्हिणी घाट हा एक आहे. आपण खूप नशीबवान आहोत की आपण जैविविधता असलेल्या आणि अप्रतिम असे निसर्गसौंदर्य असलेल्या ताम्हिणी घाटाच्या इतक्या जवळ आहोत आणि बरेचदा इथे आपण ट्रेक करत असतो, इथल्या निसर्गाचा आनंद लुटत असतो. जर आपण निसर्गाकडून इतकं काही घेत असतो तर मग याच निसर्गाचे आपण देणे सुद्धा लागतो. "एक हाथ से ले और एक हाथ से दे" ही म्हण  सार्थ ठरवण्यासाठी असे सीड बॉल्स लावणे किंवा किमान बिया लावणे,अशी निसर्गसंवर्धनाची कार्ये आपण करू शकतो.  या अगोदर ताम्हिणी घाटाचा हा स्पॉट फक्त ट्रेकर्स च्या गर्दीचा असायचा परंतु आता इथे सहलीचा आनंद लुटण्यासाठीसुद्धा लोकांची तुडुंब गर्दी असते. कारण पुण्यातील लोणावळ्यातील भुशी धरण आणि तिथले सगळेच पॉईँट तुफान गर्दीने आणि दुर्दैवाने कचऱ्याच्या साम्राज्याने व्यापले आहेत.आम्ही ट्रेकर्स कोणत्याही गडावर कचरा करीत नाही.थर्माकोलच्या प्लेट चा वापर करीत नाही आणि जंगलात किंवा गडावर त्याचा कचरा टाकून येत नाही.  सहलीला गेलेल्या पर्यटकांनी आणि सर्वच ट्रेकिंग ग्रुपनेसुद्धा हा नियम पाळला तर आपला निसर्ग आपणच आपल्यासाठी स्वच्छ ठेवू शकू.
ट्रेक ला सुरुवात झाली आणि छोटे छोटे धबधबे घरी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करावे तसे आमचे पाय धुवून स्वागत करू लागले.धबधब्यांच्या रूपाने ते प्रेम ओसंडून वाहत होते. आमच्यासोबाबत अजून काही ट्रेकिंग ग्रुपदेखील होते. डाव्या हाताला खोल दरी होती तिला "कुंडलिका व्हॅली" म्हणतात. पावसाचे ढग असले तर ती व्हॅली बिलकुल दिसत नाही. परंतु ढग दाटून आला आणि पाऊस पडल्यावर एक-दोनदा कुंडलिका व्हॅलीने दर्शन दिले. त्या व्हॅलीतून दिसणाऱ्या  भिरा धरणाने आमच्याकडे वाकून पहिले तेव्हाचे दृश्य अप्रतिम होते. एका बाजूला व्हॅली एका बाजूला धुक्याने भरलेले उंच डोंगर आणि  विरघळल्यावर मुसळधार पावसाने धुथडी भरून वाहणारे धबधबे.अश्यावेळी डोळे तृप्त झाले होते प्रश्न पडतो की ट्रेक करू की फोटोग्राफी करू की ते दाटलेले ढग विरघळेपर्यंत पाहत राहू. छोटे छोटे धबधबे ओलांडल्यावर एक मोठा ओढा-धबधबा पार करण्यासाठी ग्रुप लीडर्सने साखळी करून एकेकाला सुरक्षितरित्या दुसऱ्या बाजूला पाठवले. त्यानंतर पुढचे २ धबधबे असेच हाताची साखळी करून आणि काही ठिकाणी दोर बांधून ट्रेकर्सना पुढे पाठवून त्यांच्या मागून लीडर्स येत असत.  ढगांचा धुके-पावसाचा खेळ सतत सुरु होता.  अंधारबनचे घनदाट जंगल आम्ही चालत होतो. दिवसा चालत असून रात्रीचे जंगल पार करीत आहोत की काय असा भास होत होता इतका अंधार होता. एक तास जंगल पार करून गेल्यावर एक मोठा धबधबा पार करताना पाण्याच्या प्रवाहाचा वेग जास्त असल्याने जरा अवघड वाटत होते  परंतु रोप लावून हाताची साखळी केल्याने कठीण गोष्ट थोडी सोप्पी जात होती.   ट्रेकलीडर्स आणि सगळेच मेंबर्स तुम्ही उत्तम कामगिरी केलीत. अंधारबनची वाट चालताना मधेच धबधबे, मधेच चिखलमय वाट, मधेच जोरदार पाऊस मधेच लक्ख उजेड आणि उंच हिरव्या डोंगरांवरून फेसाळणारे दिसणारे पांढरे स्वच्छ धबधबे. अवर्णनीय असे ते रम्य देखावे डोळ्यात आणि मनात कॅमेऱ्यात साठवून घेतले.

उन्हाळी ट्रेक असल्यावर पाणी खूप जास्त प्यावे लागते आणि सोबत न्यावे लागते. पावसाच्या ट्रेकचा हा एक फायदा आहे की पाणी कमी असले तरी चालते. हिरडी गावाच्या जवळपास गेल्यावर दुपारी २:३० च्या सुमारास अंधारबन मधेच थांबून आम्ही जेवण केले. "फोना" बॅनर फोटो घेतला आणि अंधारबन मध्ये थांबलो असल्याने १०० ट्रेकर्स च्या समूहाने एका ट्रेकला प्रदीप अडागळे यांनी गायलेला शाहीर राजू राऊत यांचा  एक पोवाडा सादर केला, "अंधार फार झाला,एक दिवा पाहिजे.. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे."  त्यावेळी त्या अंधारबनात त्या पोवाड्याचा सूर खूप छान लागला होता.



पावसाचा जोर वाढल्याने तिथून परतीची वाट धरली कारण अंधार व्हायच्या आत १०० ट्रेकर्स ना इतके सारे धबधबे सुरक्षितरित्या पार करून सुरक्षितरित्या घेऊन जाणे काही खाऊ नाहीये.  परत येताना पावसाचा जोर प्रचंड वाढल्याने जंगलाची वाट पाण्याने भरून वाहत होती आणि जास्त चिखलमय झाली होती. ट्रेकर्स देखील एक माणूसच आहे तो  देखील थकतो. पाण्यात चालल्याने माझे तर पाय दुखतातच. पण तरीही ट्रेक पूर्ण झाल्याशिवाय थांबणे नाही. जाताना वाटेत लागली धबधबे आता प्रचंड वेगाने वाहू लागले होते. चॉकलेटच्या नद्या वाहताना दिसत होत्या. अचानक वाहत्या पाण्याचा रंग बदलला की समजावे पाण्याचा वेग वाढला आहे. एका ओढ्याजवळ पाणी इतके वाढले होते की जाताना सहज पार केलेला तोच ओढा पार करणे सहज शक्य नव्हते. थोडा वेळ रांगेत थांबून पाण्याचा वेग थोडा कमी झाल्यावर पुन्हा रोप लावून हाताची मजबूत साखळी करून हळूहळू एकेक, दोनदोन मेम्बर्सना ओढ्यातून बाहेर काढणे शक्य झाले. असे ३ मोठे ओढे पार केल्यावर जरा हायसे वाटले. आता ५ वाजून गेले होते अंधारबन अंधार पडायच्या आत पार करणे गरजेचे होते. त्यात पुन्हा पाऊस सुरुच होता आणि इतका उशीर होत असताना आम्ही अंधारबनातून बाहेर येऊ पाहत होतो आणि इतर लोक फक्त धबधब्याखाली भिजणारे लोक दारूच्या बाटल्या, कोल्ड्रिंकच्या बाटल्या, चखणा घेऊन जाताना दिसली, पिताना दिसली ट्रेक च्या वाटेत पाण्यात शुद्ध हरपून लोळताना दिसली. अशीच मग तोल जाऊन पाण्यात पडतात आणि दुसऱ्या दिवशी बुडून मेला म्हणून बातमीपत्रात झळकतात. अश्या लोकांना तिथेच तुडवावे वाटत होते आणि पोलिसांकडे द्यावे वाटत होते. अशा लोकांमुळेच ट्रेकर्स बदनाम झाले आहेत.
"जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची" हे ज्याला समजले तो जिंकला. 

अंधारबन ट्रेक दरम्यान रघुनंदन याने आणलेले जवळवळ १५० सीड-बॉल्स सगळ्यांनी मिळून अख्या अंधारबनात ट्रेकच्या वाटेजवळ थांबून छोटे छोटे खडे करून लावले. आणि येताना अंधारबन मधला प्लास्टिक कचरा,प्लास्टिक बाटल्या आम्ही उचलून आणल्या. मागच्या वर्षी अंधारबन ते भिरा डॅम हा एका बाजूने १३.की. मी. चा ट्रेक पूर्ण करता आला होता तो आनंद काही वेगळाच आणि आत्ताच्या ट्रेकचा अनुभव त्याहून वेगळा आणि आनंद देखील वेगळाच होता. मुसळधार पावसामुळे यावेळी सुमारे १०-११ की. मी. चा ट्रेक करता आला. हाताची पाची बोटे सारखी नसतात, नाटकातील सगळीच पात्रे सारखी नसतात त्याचप्रमाणे आलेले  ट्रेकर्स हे सगळे काही एकसारखे वागतील याची गॅरेंटी देता येत नाही. एखादा न ऐकणारा असतो, एखादा जास्त मस्ती करणारा असतो, काही एकदम शिस्तीत चालणारे असतात. अश्या वेगवेगळ्या तऱ्हेच्या १०० लोकांचा ट्रेकिंगचा ग्रुप घेऊन जाणे, उत्तम ट्रेक घडवणे आणि कोणताही अपघात न होता त्या सर्व ट्रेकर्सना सुरक्षितरित्या बसजवळ परत आणणे हे खूप जिगरीचे कार्य आहे आणि ते लीडर्सच्या युक्ती-क्लुप्ती आणि कौशल्याचे, संयमाचे काम आहे.  तसेच महत्वाचे म्हणजे आलेल्या सर्व ट्रेकर्सच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले आहे. 
इतका अप्रतिम,मनोरंजक आणि आठवणीत राहणारा असा ट्रेक घडवून आणल्याबद्दल सर्व प्रथम माझे मिस्टर श्री. दीपक साने यांचे आणि माझ्या दोन्ही मुलांचे (चेतन,प्रभा)मनापासून आभार कारण या ट्रेकसाठी माझी सिस्टीम ठीक नसल्याने मला हे तिघे मला घेऊन आले होते. त्यांनतर ट्रेक प्रमुख श्री. मंदार सर श्री. राणे सर, श्री. निकाळजे सर, रोहित सर आणि विशेष आभार श्री माजगावकर काका, गोलांडे सर, सोनार सर, मंगेश, विनोद मुळे आणि खास आभार सीड बॉल्स आणणारा रघुनंदन पाटील (तू माझा बाप निघालास सोलापूरची सोलापुरी आणि तुमची कोल्हापुरी भाषा मला नेहमीच आवडते) गंमतीचा भाग सोडला तर सारखे रघु पाटील रघु पाटील असे ऐकायला मिळाल्याने मला माझ्या वडिलांची खूप आठवण झाली कारण माझ्या वडिलांचे नाव श्री.रघुनाथ पाटील असे आहे) त्यांनतर आलेले सर्व नवीन ट्रेक मेंबर तुमच्या सहकार्यामुळे ट्रेक यशस्वी होणे अशक्य होते. वेळेअभावी आणि जोरदार पावसामुळे यावेळी ट्रेक मेंबर्सची ओळख करून घेणे शक्य झाले नाही त्यासाठी सगळ्यांनी प्रत्येक ट्रेकला यावे. तसेच माझे ट्रेकफ्रेंड्स,हिरल राणे,ऋतुजा,सुरेखा,अबोली,कविता,पूर्णिमा,तनया,प्रतीक पेंढारे,विवेकानंद,आनंद,प्रशांत भावसार, उमाकांत पोतदार, मंदार चिंचलीकर, नितीन वाकुलकर,संदीप गोरे, गायक शेवकर सर,मिताली, प्रज्ञा, ज्वाला, स्नेहा, स्नेहल,डॉ गिरीश, डॉ.आकाश, यशल आणि जय तसेच सगळे जुने नवे ट्रेक फ्रेंड्स तुम्हा सगळ्यांना धन्यवाद.. संध्याकाळी ५:३० वाजता ट्रेक संपवून ६:३० अंधारबनमधील  त्या फेसाळलेल्या धबधब्यांचा, त्या हिरव्या गालिच्यांचा, धुक्याच्या शालीचा जड अंतःकरणाने निरोप  घेऊन आम्ही पुन्हा त्याच रस्त्याने पुण्याची वाट धरली.  रविवार असल्याने वर्षासहलीला जाणारे पर्यटक, तसेच ट्रेकर्स अश्या सगळ्यांच्या गाड्यांच्या  ताम्हिणी घाटामध्ये ट्रॅफिकमुळे रांगाच रांगा लागल्या होत्या तरीही एका बाजूला मावळत्या दिवसाचा हलकासा संधिप्रकाश आणि एकीकडे मुळशी धरणाचे दुरून शांत दिसणारे पाणी  एकीकडे वाहनांचा प्रकाश असे सुंदर दृश्य होते.  आमच्या बसच्या मागेपुढे प्रकाशाच्या रांगाच रांगा लागल्या आहेत असे भासत होते. मुसळधार पावसात येताना चांदणी चौकातून ट्रेकमेम्बर्सना सोडत सोडत आम्ही घरी रात्री ११:३० वाजता पोहोचलो. असा हा पावसाळी अंधारबन चा ट्रेक सगळ्यांच्या सहकार्यामुळे उत्तमोत्तमरित्या पूर्ण झाला. खरे तर नेहमीप्रमाणे मला अजून ब्लॉगला अनुसरून काही स्नॅप्स या ब्लॉगमध्ये टाकायचे होते परंतु ब्लॉग मोठा झाल्याने जागा उरली नाहीये त्यामुळे बाकीचे स्नॅप्स आपल्या सगळ्यांकडे आहेतच शिवाय फेसबुकवर सापडतील. तसेच ब्लॉग लगेच पूर्ण झाल्यामुळे आश्चर्यचकित होऊ नये. माझे असे मत आहे की कोणतीही गोष्ट करावी तर पॅशनने करावी नाही तर केव्हाही करूच नये. मग तो ट्रेक असो अथवा ब्लॉग असो. हे पॅशन सगळ्यांकडे आहे आणि असावे. मित्र हो.. धन्यवाद.! 



Thursday, 22 June 2017

ट्रेकर

खरंच 'ट्रेकर्स' म्हणजे जगाहून वेगळी पण त्याच जगाशी आपला मेळ राखीत आपल्याच विश्वात रमणारी जमात. हाताची नखे वाढवायची हौस असली तरी त्यातली एक दोन नखे ट्रेकमध्ये कायम तुटलेली असणारी.
मान आणि कानाच्या पाळ्याच काय तर चेहरा कायम टॅन झालेला असणारी मी  कारण ट्रेक कारण गडावरचं कडक ऊन खाल्ल्याशिवाय ट्रेक केल्याचा आंनद कसा मिळणार या मताची असणारी मी.
आम्ही मुली असल्याने पावडर फेसक्रिम याचा संबंध थोडाफार आलाच पण भपका नसणारी.
मला तर अर्थ्ररायटिस, मणक्यात ग्याप, मस्क्युलर पेन असे अनेक आजार आहेत त्यामुळे सुरुवातीला ट्रेक ला जाताना डॉक्टर अडवायचे. आता डॉक्टर स्वतःच म्हणतात ट्रेकला गेलात की तुम्ही तुमची सगळी दुखणी विसरता जावा जावा. म्हणजे डॉक्टर चा सल्ला थोडक्यात धुडकावणारीच.
समारंभामध्ये सोबर साडी,सोबर दागिने घालून जाणारी आणि बेंजो च्या तालावर दोन पावले थिरकवणारी मी आणि सॅक पाठीवर टाकून ट्रॅकपॅन्ट, टोपी घालून  डोंगर चढणारी मी घरातल्यांना आणि सगळ्यांनाच आवडते तरीही ट्रेकर म्हणून मिळालेली पाठीवरची थाप मला मोलाची वाटणारी मी. 
खरेदी करताना कायम एखादा ती शर्ट/टॉप,एखादी मळखाऊ पॅंट ट्रेकसाठी  जास्त उपयुक्त कशी पडेल या निकषावरच खरेदी करते. दुकानदार एकतर वैतागतो किंवा मनातल्या मनात हसतो. ट्रेकर्स ऐसे ही होते है.
ट्रेकसाठी वेगळे तीन बुटाचे जोड बाळगणारी मी, किंबहुना खाण्यापिण्यावर पैसे घालवण्याऐवजी त्याच पैशात ट्रेकसाठी चांगला लाईटवेट बुटाचा जोड, एखादी टोपी किंवा जॅकेट घेता येईल का हे पाहणारी मी.
वुडलँड चे ४ हजाराचे बूट ग्रीप गेल्यावर गडावर आपट्या खाल्ल्यावर ऍक्शन आणि ट्रेकर शूज चांगले आहेत  हे मानणारी मी.
घेतानाच शर्ट फुल बाह्यांचे पाहून घेणारी आणि टॉप शिवतानाच फुल बाहीचा शिवणारी मी. किंवा एखादे लाईट वेट जॅकेट कायम कमरेला अडकवणारी मी. ढगळ ट्रॅक पॅन्ट घालून मग गड उतरताना मस्त गुढग्यापर्यंत घेणारी मी. "अरे बस झाले आता झाली त्या ट्रॅक पॅन्टची थ्री फ़ोर्थ' अशी मंदार सरांची बोलणी खाणारी मी.
२-३ चष्म्याच्या फ्रेम्स फायबरच्याच बाळगणारी मी. फोटो च्या नादात कुठे चष्मा विसरले तर कायम गाडीमध्ये स्पेयर चष्मा ठेवणारी मी,
प्रवासात मात्र बॅगा माझ्या कायम दोन असतात सगळ्यांसाठी भरपूर खाऊंनी भरलेल्या आणि स्पेअर कपडे कायम बाळगणारी मी मग तो वन डे ट्रेक का असेना. परंतु गडावर मात्र छोटी आणि कमी वजनाची सॅक नेणारी मी.
बाटलीबंद पाणी म्हणजे निव्वळ चैन असे जरी मानत नसले तरी स्वतःजवळ शहरी सरबत (tang) असताना गडावरच्या लहान सरबत वाल्या मुलांना मदत म्हणून सरबत विकत घेणारी मी.
मिळेल ते जेवण आणि जागा किती सही आहे हे मानणारी एकदा घराबाहेर पडले की काहीही साधे चालवून घेणारी मी.
कुणीही सोबत असले तरी कितीही वेळा गड  पहिला तरी पुन्हा पुन्हा फिरणारी मी.
ट्रेकर्स चा थकवा घालवण्यासाठी नवीन ट्रेकर्स ना उत्साहित करण्यासाठी कितीही ठाकले तरी बसमध्ये जाता येता न झोपता अन्ताक्षरीचा धिंगाणा घालणारी मी.
गडकिल्ल्यांचे माहितीचे व्हिडीओज दाखवीत असलेले चॅनेल चालू कर असे मैत्रिणीने भावाने सुचवल्यावर रिमोटवरून भांडणारी मी,
शाळेच्या मित्रमैत्रिणींच्या गेट-टू-गेदर साठी पुण्याहून मुंबईला मुलीला भावाला घेऊन ट्रेक ला जाणारी आणि आईवडिलांचा ओरडा खात वज्रेश्वरीजवळच्या घोटगावचा गुमतारा सर करणारी मी.
मैत्रिणींकडे आणि नातेवाईकांकडे जायला वेळ नाही आणि ट्रेक ला कशी जाते या कारणावरून सगळ्यांचाच ओरडा खाणारी मी.
गडावरचे आणि ४-५ शहरातले सुद्धा रस्ते बऱ्यापैकी माहित असलेली आणि कालवणापासून मालवण घरात बनवता येणारी आणि पालथं घालणारी मी.
शहरात activa वर हेल्मेट कमी वापरणारी आणि कधीतरी सिग्नल तोडणारी, खूप गडबडीत असताना नेमकी ट्राफिक पोलिसाकडून पकडली जाणारी मी परंतु पळून न जाता चूक झाली म्हणून पावती फाडून दंड भरणारी मी.
गाडीच्या अनेक प्रकारच्या किचेन बाळगणारी मी संगीताची आवड म्हणून तबला असलेली किचेन अडकवणारी मी.
चॉकलेट खाल्ले तरी त्याचे रॅपर खिशातच ठेवणारी आणि दुसर्यालाही रॅपर खिशातच ठेवून घरातल्या डस्टबिन मधेच टाकणारी आणि टाकायला लावणारी मी.
हो उघडे नळ स्वतःच बंद करणारी मी,
मोबाइल घेतानाच जिपीएस वालाच घेणारी मी आणि रेंज असणारेच सिमकार्ड बाळगणारी मी आणि खास उत्तम फोटोग्राफीसाठी चांगला कॅमेरा असलेला मोबाईल घेणारी मी.
रोज नवनवीन ठिकाणे शोधणारी मी. ट्रेकिंग चा ब्लॉग लिहून त्याच्या पोस्ट फेसबुकला टाकून त्याचा स्वतः  आंनद घेणारी आणि दुसऱ्याला आंनद देणारी मी आणि दुसरा ट्रेक येईस्तोवर त्याचे फोटोज अपलोड करून मानसोक्त आनंद घेणारी-देणारी मी.
दिवसातून कितीदा ट्रेकचाच विषय बोलणारी. फोनवर कोणी ट्रेकविषयी विचारल्यावर भरभरून बोलणारी,माहिती देणारी मी.
आपल्यासोबत ट्रेकसाठी चांगले ट्रेकर्स जमा करणारी मी.
रविवारच्या ट्रेकनंतर सोमवारी भयानक पाय दुखत असताना एका दिवसात फोटोज अपलोड करून अर्ध्या दिवसात ब्लॉग लिहून शेअर करणारी मी.
परदेशातील मैत्रिणींना ट्रेकचा ब्लॉग पाठवून त्यांच्यातही ट्रेकची आवड निर्माण करणारी मी. अनोळखी व्यक्तीला दादा, काका, मित्र म्हणायला न लाजणारी मी.
देवाला कमी जाणारी परंतु ट्रेक कधीही न चुकवणारी मी.
रायगडावर जाण्याचा योग अजून आला नाही अशी अभागी मी.
सह्याद्रीवर मनापासून प्रेम करणारी मी.
गडकिल्ला बस मधून पहिला तरी लागेचच फोटो क्लिक करून माहिती विचारणारी आणि अभिमान बाळगणारी मी.
गडावर गेल्यावर  तिथून दिसणाऱ्या गडाविषयी चौकशी करून तिथे जाण्याची इच्छा बाळगणारी मी.
ट्रेकिंग च्या प्रत्येक वळणावर फोटो काढणारी तरीही आघाडीवर असणारी मी.
ट्रेक ला जाताना बजेट चा विचार न करणारी मी.
ब्लॉग मधून ट्रेकिंग चा प्रसार करणारी आणि ट्रेकिंग बद्दल आवड निर्माण करणारी मी.
काय माहिती आम्ही खरे ट्रेकर आहोत की नाही ते. किती गुण जुळतील आणि किती गुण  मिळतील यासाठी आम्हा ट्रेकरला..?

Monday, 19 June 2017

"रानपाखरं"


"कोथळीगड” ट्रेक
जिल्हा - रायगड,
श्रेणी - मध्यम,
उंची - ३१०० फूट, 
दि. - १८ जून २०१७

माझ्या महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यात कर्जत तालुक्यात आंबिवली गावापासून ३ कि. मी. अंतरावर कोथळीगड आहे. कोथळीगडाची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे ३१०० फूट इतकी आहे. 
कोथळीगडचा इतिहास थोडक्यात-शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा उपयोग शस्त्रास्त्रांचा साठा ठेवण्यास करत असत. संभाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याला फार महत्व होते. नारोजी त्रिंबक हा गडाचा किल्लेदार दारुगोळा जवळील गावातून मिळविण्याकरीत गेला होता. गडावरील त्याचा माणूस माणकोजी पांढरे ह्याच्या ताब्यात त्याने गड दिला. शिवकालात स्वराज्याचा मुन्शी असणारा काझी हैदर संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत औरंगजेबाला फितूर झाला होता त्याने माणकोजी मांढरे यांना फितूर केले आणि रात्रीच्या काळोखात माणकोजी पांढरे यांनी अब्दुल कादर व त्याच्या सैन्याला हे आपलेच लोक दारुगोळा घेऊन आले आहेत असे सांगून गडात प्रवेश दिला व त्यांनी गडावरचे सैन्य कापून काढले. नारोजी त्रिंबक या शूर वीराने हा किल्ला जिंकून घेण्याचा अयशस्वी प्रयास केला ज्यात तो व त्याचे सैन्य मारले गेले. कर्जतहून खेड-कडूस कडे जाणाऱ्या कोलिंबा व सावट घाटावर लक्ष ठेवण्यासाठी ह्या किल्ल्याचा उपयोग होत असे.
दिनांक १८ जून २०१७ चा 'फोना' चा ७३ वा आणि पावसातील पहिला ट्रेक आयोजित केला. पुण्यापासून कोथळीगड सुमारे ११७ कि. मी . अंतरावर आहे. इथे बसने पोहोचण्यास किमान अडीच ते तीन तास लागतात. १८ जून ला सकाळी ६:१५ वाजता आमची बस निगडीहून तळेगाव, लोणावळा, खोपोली मार्गे ३ तासात म्हणजे ९:१५ आंबिवली गावाजवळ पोहोचली. अर्थात बसमध्येच इडली चा नास्ता करून आणि मध्ये एका ठिकाणी थांबून चहा घेतच. खोपोली सोडल्यावर कर्जत फाट्यापासून उजव्या हाताला वळून ७-८ कि. मी. अंतरावर आंबिवली हे गाव आहे. तिथून ३ कि.मी. अंतरावर कोथळीगडाच्या पायथ्याशी पेठ हे गाव आहे. बस आंबिवली गावच्या स्टॉप वर लावून लीडर ने ट्रेक विषयी सूचना देऊन लगेच९:३० ला  ट्रेक ला सुरुवात केली. दीड कि. मी. अंतर चालून गेल्यावर कोथळीगडचा नजारा डोळ्यांना सुखावणारा होता. कारण बस मधून जाताना फक्त एका वळणावर च कोथळीगड क्षणभर दिसला त्यानंतर त्याच्या जवळ गेल्यावरच त्याने खरे दर्शन दिले. एकीकडे प्रचंड खोल दरी तर एकीकडे आभाळाला भिडणारा कोथळीगड असे ते सुंदर दृश्य होते.फोटो काढताना खूप सांभाळून काढावे लागतात कारण जरा पाय घसरला तर थेट दरी तुम्हाला कवेत घ्यायला तयारच असते. लिंबू सरबत पिऊन पुन्हा गडाची वाट धरली पुढे दीड कि. मी. चा चढाच्या कच्या रस्त्याने आम्ही पेठ गावात पोहोचलो. जाताना सगळ्यांसोबत माझी देखील दमछाक झालीच होती. कारण एप्रिल च्या संधन व्हॅलीच्या ट्रेक नंतर १ महिन्याच्या गॅप नंतर चा हा माझा ट्रेक होता. पहिल्यांदा ट्रेक ला येणारे मेम्बर्स केव्हा एकदाचा गड येतो याचीच वाट पाहत होते. गडाच्या पायथ्याशी पेठ गावात सामानाची ने-आण  करण्यासाठी दोन चाकी गाडी आणि बैलगाडीचा वापर होताना दिसला.पेठ गावाजवळ गेल्यावर कोथळीगड आणि पायथ्याशी पेठ गाव अतिशय सुंदर दिसत होते.
पेठ हे गाव २०-२५ कौलारू घरांचेच आहे. मुख्य व्यवसाय भातशेती,विजेची, पाण्याची सोय असलेले. ५वी-६ वी पर्यंत शाळा आहे. ऊन म्हणते मी. त्यामुळे  घामाने जणू आम्ही न्हाऊनच निघालो होतो.  पावसाचे दिवस असून वरून राजाने अजून तरी आम्हाला सुखावले नव्हते. काहीजणांचे पाणी संपत आले होते. आम्ही गावातून घरामधून पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या आणि पुन्हा गड चढाईस सुरुवात केली. काही ठिकाणी भात पेरणी केलेली दिसली.१२ चे ऊन होते आणि गड चढण्याची मजा आत्ता तर खरी होती. मधेच गावातील लहान मुले पिकलेले गावरान आंबे घेऊन विकताना  दिसली तसेच गावातील स्त्रिया आणि पुरुष लिंबू -सरबत विकताना दिसली. तेवढाच ट्रेकर्सना थंडाई आणि तिथल्या शेती करणारी लोकांना पोटापाण्याची सोय. आपण २०० रुपयाची कोक ची बाटली घेताना जराही विचार करीत नाही तर  मग १०-१५ रुपयांच्या नैसर्गिक लिंबू-सरबताला का विचार करावा. मी गड चढताना माझ्याकडे आपले शहरी सरबत (tang)असताना देखील २वेळा तरी लिंबू सरबत घेतले. आमच्या सोबत अजून २-४ ट्रेकिंग ग्रुप गड चढताना दिसले. चढाईची वाट खूप छोटी असल्याने अधून मधून दाटी होत होती. परंतु जस जसे उंचीवर जात होतो तसतसा जमिनीवरचा आणि आजूबाजूच्या डोंगररांगांचा,गावाचा नजारा अप्रतिम दिसत होता. आम्ही ६-७ ट्रेकर सगळ्यात पुढे पोहोचलो.
त्यात सगळ्यांच्या आधी पोहोचले ते श्री. संजय मोरे वय वर्षे ५५. त्यांचे सगळ्यांनी खूप कौतुक केले. गडावर पोहोचताच भैरोबाचे मंदिर आणि मोट्ठी गुहा दिसली. जर रात्रीचा ट्रेक असेल तर त्या गुहेत १०० पेक्षा अधिक लोकांची राहण्याची सोय होऊ शकते. शिवाय अजून २-३ खोल्या वेगळ्या आहेत. गुहेचे खांब मूळ पाषाणातून कोरले आहेत. अतिशय सुंदर नक्षीकाम केलेले दिसले. बाकीचे ट्रेकर्स येईस्तोवर क्षणभर विश्रान्ती घेऊन आम्ही कोथळीगडाच्या माथ्यावर जावयास निघालो. कोथळीगडाचे वैशिष्टय हेच आहे की एका भव्य पाषाणाच्या आतून त्या पाषाणाचा कोथळा पाडून सुंदर पायऱ्या कोरल्या आहेत.म्हणूनच या गडाला कोथळीगड हे नाव असावे.  ते कोरीव काम पाहावे की पायऱ्या चढाव्यात की फोटोग्राफी करावी असा आपल्याला संभ्रम पडतो. कोरीव काम करणाऱ्याचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. अप्रतिम असा तो रस्ता बनवला आहे. शिवाय त्या दगडी जिन्यामध्ये व्हेंटिलेशन साठी मोठ मोठे होल देखील ठेवले आहेत शिवाय एकीकडे एक मोट्ठेच्या मोठे दार ही आहे.एखाद्याच्या काळजातून सपासप अनेक बाण जावेत  तसे आम्ही त्या पाषाणाच्या कोथळ्यातून एकाच वेळी अनेक ट्रेकर्स गडाच्या माथ्यावर जात होतो.  तो मोठ्ठा आणि सुंदर जिना पार केल्यावर जरा अवघड पॅच येतो तिथे थोडे सांभाळून गेलेलेच बरे. कारण कोथळीगडावर आधारासाठी कुठेही लोखंडी पट्ट्या,खांब लोखंडी रेलिंग असे लावलेले आढळले नाही. फक्त दगड आणि पाषाण हाच एकमेव तिथे आपला आधार आहे हे ट्रेकर्सच्या लक्षात असू द्यावे.



इतके शारीरिक श्रम घेऊन गडाच्या माथ्यावर पोहोचल्यावर मनातील आंनद अवर्णनीय होता. परंतु आम्ही नुसती एक छोटी बॅग त्यात एक जेवणाचा डब्बा आणि प्यायचे पाणी घेऊन गड चढतो तर इतके दमतो. शिवकाळातील लोक त्यावेळी वजन सामान कसे चढत असावेत आणि कसे लढत असावेत हा विचार माझ्या मनात कायम येतो. गडावर पोहोचल्यावर लक्षात आले की वर एक पाण्याचे टाके आहे. २-३ झाडे आणि निवडुंग आणि छोटी झुडपे आहेत. एका बाजूला भीमाशंकर चे पठार, सिद्धगड, पदरगड, एका बाजूला दूर माणिकगड चंदेरी, प्रबळगड दिसतात. बाकी सगळे गड एकमेकाला जोडलेले सक्ख्या-चुलत भावांसारखे एका डोंगर रांगेत दिसतात. कोथळीगड मात्र मूळ डोंगररांगेतून तुटून बाजूला एकटा सावत्र भावासारखा बाजूला आढळतो.भीमाशंकरच्या पठारावर खूप साऱ्या पवनचक्क्या एका रांगेत सवाष्णी उभ्या असल्यासारख्या भासत होत्या. गडाच्या माथ्यावरच आम्ही दीड च्या सुमारास आपापले जेवणाचे डब्बे काढून छोटे छोटे ग्रुप करून ऊन सावलीच्या खेळात जेवण करून घेतले. कारण खूप गृप एकावेळी माथ्यावर पोहोचल्याने प्रत्येकासाठी तशी सावलीची जागा नव्हतीच शिवाय गडाच्या माथ्यावर जेवण करण्याचा आनंद काही आगळाच. 
गडावर दुपारी पाऊस नसला तरी थंडगार वारा अंगाला सुखवीत होता त्यावेळी या ओळी ओठांवर नक्की येत होत्या,
”भन्नाट रानवारा मस्तीत शीळ घाली.. रानच्या पाखरांची रानात भेट झाली.” 
जेवण आटोपून भगव्यासहित एक गृप फोटो काढून परतीच्या उतराईच्या वाटेला निघालो. उतराई करतानाच अनुभव अजूनच वेगळा होता. कारण तोच आतून कोरलेला जिना आता पाण्यातील भोवऱ्यासारखा भासत होता. आम्ही एका भोवर्यातून सुरक्षित खाली उतरलो. गडमाथ्यावरून आम्हाला एक तोफ दिसली होती त्या तोफेजवळ गेल्याशिवाय आम्हाला राहवले नाही. त्या ठिकाणी अजून २ पाण्याची टाकी आहेत. तिथल्या एका पाण्याच्या टाकीत स्वच्छ पाणी होते तेच पाणी उन्हाळ्याच्या दिवसात जेव्हा पेठ गावच्या विहिरी आटतात तेव्हा त्या विहीरीमध्ये पाईपने हे पाणी सोडले जाते आणि पिण्यासाठी वापरले जाते.  

आता या ठिकाणाहून कोथळीगड एका नरसाळ्याच्या आकाराचा भासत होता. इथे जरा वेगळ्याप्रकारची(innovative)फोटोग्राफी केली आणि ३च्या सुमारास गड उतरायला सुरुवात केली. कितीही ट्रेक केले तरी उतरताना माझे पाय भरून येतात. तरीही पावले सपासप आणि आपोआप वेगाने पडून आपण पळू लागतो. आणि आम्ही अक्षरशः पळत च होतो. अर्ध्या पाऊण तासात आम्ही पेठ गावात आलो आणि बाकीच्या मेम्बर्सची वाट पाहत थोडी विश्रांती घेतली.आमच्या सोबत आमच्यातले काही मेंबर्स लग्न करून त्यांच्या पार्टनर ला सुद्धा ट्रेकिंग ला घेऊन आले होते. त्यांचे कौतुकच.




४:१५ च्या सुमारास आम्ही पेठ गाव सोडले आम्हाला ३ कि. मी. अंतर पार करायचे होते. आणि उन्हाने आणि दमट वातावरणाने हैराण झालो होतो. तितक्यात आजूबाजूच्या डोगर रांगा धूसर दिसू लागल्या. डावीकडे ऊन तर उजवीकडे पाऊस भरला होता. आम्ही सकाळपासून पावसाची अतिशय आतुरतेने वाट पाहत होतो. वरून राजाला आमची कीव आली आणि त्याने आमच्यावर पावसाच्या सरींची हलकी बरसात सुरु केली. हवेत अचानक खूप गारवा आला आणि "दिल खुश हो गया." हलकी हलकी बारिश म्हणता म्हणता चांगला जोरदार पाऊस सुरु झाला हे चॉकलेटचे दुधाचे धबधबे सुरु झाले कारण कंसाच्या रस्त्यावर माती टाकली होती ती वाहून जात होती आणि चॉकलेटच्या नद्या वाहताहेत असे भासत होते. पाऊस पडल्याने एकीकडे पक्षांचा मंजुळ आवाज येत होता.
 आम्ही ७-८ बडबडे ट्रेकर्सनी ३ की. मी. चे अंतर केव्हा कापले आमचे आम्हालाच समजले नाही. आंबिवली गावाजवळ बस लावली होती त्या ठिकाणी येऊन एका ठिकाणी पोहा नास्ता आणि चहा ची सोय केली होती. ते खाऊन सूर्यास्ताच्या वेळी आम्ही परतीची वाट धरली आणि अन्ताक्षरीच्या तालावर रात्री ९:३० वाजता पुणे गाठले. अंताक्षरी किंग राणे सर यांच्या सोबत अविनाश याने देखील अंताक्षरी मध्ये खूप छान रंग भरले. काय गातोस अविनाश तू. "तुसी ग्रेट हो अविनाश." तू गाणे एकदम सुरात गायलेस.  गाण्याचा लईच खजिना आहे तुझ्याकडे.पाठीमागच्या सीट वरची मंडळी अन्ताक्षरीमध्ये "फाडलं हो तुम्ही".   
ट्रेक लिडर राणेसर, मंदारसर, सर्पमित्र निकाळजे सर, राहुल-आदित्य, विनोद-दीपिका, डॉ.श्रीकांत, अविनाश, सुरेखा, मृणालिनी-तिचे बाबा,भावना,हिरल,ऋतुजा, चेतन, प्रीतम,हर्षनी,संजय मोरे, निलेश,उत्तम खडप-फ्रेंड (उत्तम छायाचित्रण कौशल्य) मला नावे माहित नसलेल्या सर्व जुन्या-नवीन ट्रेकर्स चे अभिनंदन. बॅनर नसल्याने रोहित सर तुमची रागाने आठवण काढली. तसेच भाऊबली,(प्रतीक दादा)स्नेहल खोल्लम आणि "संधान व्हॅली ची न आलेली टीम" लोकहो खूप मिस केलात तुम्ही कोथळीगडचा पावसाळी-भन्नाट-तुफानी ट्रेक.  एकंदरीत सर्वांच्या सहकार्याने आपला ट्रेक यशस्वी झाला. अश्या प्रकारे "फोना" ग्रुप चा १८ जून चा कोथळीगड ट्रेक यशस्वीरीत्या पार पडला.