Monday, 17 October 2016

"कलावंतीणगड ट्रेक"एक अविस्मरणीय अनुभव..

कलावंतीण दुर्ग ट्रेक
ठिकाण- रायगड जिल्हा
उंची- २३०० फूट
चढाई श्रेणी- कठीण
दिनांक-१६ ऑक्टोबर २०१६.

गडाची माहिती आणि इतिहास-रायगड जिल्ह्यात पनवेल पासून १५ कि. मी.अंतरावर माथेरानच्या डोंगर रांगेत कलावंतीण हा गड आहे  मुंबई पुणे महामार्गावरून जाताना डाव्या बाजूला आपणास एक डोंगररंग दिसते या डोंगर रांगेत अनेक किल्ले आपल्याला खुणावत असतात पण  "प्रबळगड" आणि "कलावंतीण सुळका" हे दोन जोड किल्ले आपले खास लक्ष वेधून घेणारे आहेत. प्रबळगड त्याच्या नावाप्रमाणेच प्रबळ आहे. तसेच गडाचा पसारा देखील विस्तीर्ण आहे. इतिहासात कलावंतीण दुर्ग नावाने नोंद असणारा हा बुरुज समुद्र सपाटीपासून २३०० फुट उंचीवर आहे. शिवरायांनी इ.स १६५७ मध्ये हा किल्ला घेतला होता. पुढे पुरंदरच्या तहामध्ये मोगलांना देण्यात येणाऱ्या २३ किल्ल्या मध्ये याचाही समावेश होता. त्यामुळे याला ऐतिहासिक महत्व देखील आहे. कलावंतीण या नावाचा अर्थ "नर्तिका" होतो. मूळ अर्थ कला सदर करणारी. पण सर्रास पणे नर्तिकेसाठी हा शब्द वापरला जातो. त्यामुळे असे समजले जाते की इथे एका नर्तिकेचे वास्तव्य होते ज्यामुळे यास "कलावंतीण" हे नाव पडले. तर काही ठिकाणी असा उल्लेख आढळतो की  एका राजाचे कलावंती राणीवर खूप प्रेम होते. कलावंती राणी आपल्याला सोडून न जावी म्हणून त्या राजाने कलावंती राणीच्या नावाने हा किल्ला बांधला असावा.
कलावंतीण गडाच्या नावामुळे आणि प्रबळगडावरून घेतलेल्या छायाचित्रांमुळे कलावंतीण गड मला नेहमी आवडत असे. आज प्रत्यक्ष तिथे मी जाणार म्हटल्यावर मनातून मी जास्त खुश होते. 

फ्रेंड्स ऑफ नेचर असोशिएशन(फोना) चा ६८ वा कलावंतीण गड ट्रेक दि.१६ ऑक्टोबर २०१६ या दिवशी आम्ही पूर्ण केला. मागच्या वेळेस "फोना"चा प्रबळगड ट्रेक माझ्याकडून मिस झाला होता त्यामुळे कलावंतीण गड मिस नाही करायचा असे ठरवले होते. परंतु १५ दिवसात ट्रेक करणे म्हणजे माझ्यासाठी जरा अवघड होते कारण मी सुद्धा माणूसच आहे. महिन्यातला एक ट्रेक म्हणजे माझ्यासाठी खूप झाला. परंतु एकदा ट्रेक ला गेले की कितीही असह्य झाले तरी फोनासोबत ट्रेक असला की माघार घेणे नाही मी तो पूर्ण करतेच आणि  "एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ." ह्या म्हणीनुसार गड चढताना कितीही कठीण टप्पा आला तरी एकमेकांच्या मदतीने ट्रेक पूर्ण होतोच होतो. मी ट्रेक करते म्हणजे मी काय फार मोट्ठी ट्रेकर नाही आणि ब्लॉग लिहिते म्हणजे मी काय खूप मोट्ठी लेखिका नाही. एक ट्रेक केला आणि  ट्रेकिंगची आवड निर्माण झाली आणि एक ब्लॉग लिहिला आणि लिहिण्याची आवड निर्माण झाली. त्यामुळे सगळ्यांनी एक ब्रीदवाक्य लक्ष ठेवा "कोणालाही कोणत्याही वयात अशक्य अशी कोणतीही गोष्ट नाहीये." आवड असली की सवड आपोआप मिळते. 
सकाळी ६:३० ला निघालेली आमची बस "हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट सांगो चेडवा दिसतो कसो खंडाळ्याचो घाट" आणि अजून अश्या कितीतरी गाण्याच्या सुरात, नादात १० वाजता गडाच्या पायथ्याशी केव्हा पोहोचली तेदेखील समजले नाही. गडाच्या पायथ्याशी बस लावून ट्रेक ला सुरुवात केली. इथे जाण्याआधी कलावंतीण गडाचे फोटोज पाहिले होते ते दृश्य तिथून तरी दिसत नव्हते.


सुरुवातीला थोडेसे चालल्यावर आम्ही काहींनी शॉर्ट कट चा रास्ता निवडला सॉलिड दमछाक झाली. मला तर असे वाटले की मी आजचा ट्रेक पूर्ण करूच शकणार नाही. खरे कारण होते दमट वातावरण आणि गडाचा चढ जास्त होता. सुरुवातीपासूनच ढगाळ वातावरण असल्याने आम्हाला वाटले की गडाच्या शेंड्यावर एवढे ऊन नसेल परंतु तसे काही घडले नाही. जाईसतोवर ज्याला चरबी नाही त्याची सुद्धा चरबी वितळली असेल. 


परंतु सोबत्यांच्या सहकार्याने आणि प्रोत्साहनाने पुन्हा चढाई सुरु ठेवली  दीड तासांनंतर पहिली १० मिनिटांची विश्रांती झाली आणि खडकावर उंच हवेत फोटो काढल्याने आणि लिंबू सरबत प्यायल्याने पुन्हा उत्साह आला. थोड्या वेळाने मात्र कलावंतीण आणि प्रबळगड दिसू लागले. परंतु दोन्ही गड आपल्या अंगावर येत आहेत की काय असे भासत होते.



इथे दगडात कोरलेली गणपतीची आणि हनुमानाची मूर्ती रेखीव दिसत होती. 


आधी असे ठरले की या ठिकाणी जेवण करून थोडी विश्रांती घ्यावी आणि मग चढाई सुरु करावी परंतु जेवल्यावर गड चढणे जाम जीवावर येते आणि एकदाचा कलावंतीण गड फत्ते करावा आणि मगच काळजाला ठंडक मिळेल असे वाटले. माची प्रबळ या तिथल्या आदिवासी लोकांच्या वस्तीतील गावातून अर्ध्या-पाऊण तासात प्रबळगड आणि कलावंतीण गड च्या खिंडीत आम्ही पोहोचलो. तिथून खाली पाहिले की विश्वास बसत नव्हता की आम्ही त्या व्ही आकाराच्या खिंडीमध्ये आलोय. तिथून मात्र कलावंतीण चा शेवटचा टप्पा अतिशय कठीण दिसत होता.




संपूर्ण दुर्ग चढण्याकरिता खडक कापून पायऱ्या बनवल्या आहेत. या दुर्गाशी माचीप्रबळ गावामधील आदिवासी लोकाचे खूप जिव्हाळयाचे नाते आहे. ते प्रत्येक वर्षी शिमग्याच्या (होळीच्या)सणाला या दुर्गावर आदिवासी नृत्ये करतात. गडाच्या माचीवर आदिवासी लोकांची वस्ती आहे. कलावंतीण गडाच्या पायऱ्या पाषाणात कोरलेल्या दिसत होत्या आणि धरायला आधाराला काहीही  नव्हते. दुपारचे ऊन म्हणते मी. तरीही पुन्हा चढाई सुरु केली. भर उन्हात सपसप सपसप एखाद्या सापासारखे चढत राहिलो. कलावंतीण च्या वरच्या टोकाला रोप लावून चढावे लागले. यावेळी तो थरार देखील अनुभवला. आम्ही दुपारी १:३० वाजता गडावर पोहोचलो.तिथे पोहोचल्यावर आजूबाजूचा नजारा पाहून सगळा शीण निघून गेला. कलावंतीण गडाचा आकार किंचित त्रिकोणी आहे. गडावरून सभोवताली माथेरान,चांदेरी,इर्शाळगड,कर्नाळा गड दिसतात. मग काय विचारू नकात. गडाच्या सगळ्या बाजूने फोटोग्राफी केली. गृप फोटोज काढले एकमेकांचे फोटोज काढले. एक हात से फोटो दे एक हात से फोटो ले. अश्या गमती-जमती सुद्धा झाल्या.


गडाच्या शेंड्यावर शिवाजी राजेंच्या घोषणा केल्या तेव्हा समोरच्या खिंडीमध्ये त्या घोषणांची गुंज कानाला अतिशय सुमधुर वाटत होती. वरून उन्हाचे चटके मात्र असे लागत होते की ही टॅन झालेली स्किन आता २-३ महिन्यांनीच पुनःपदावर येईल असे वाटते. आता मात्र पोटामध्ये कावळे ओरडण्यास सुरुवात झाली. परंतु गडावर ३२ लोकांना बसायला एकही झाड नव्हते त्यामुळे पुन्हा ३ वाजता कलावंतीण गड उतराई सुरु केली. गडाच्या मध्याशी माची प्रबळ ह्या छोट्या गावाजवळ एका ठिकाणी ट्रेकर्स साठी बसण्यासाठी जागा होती तिथेच आम्ही जेवण केले. थोडी विश्रांती करून सूर्यास्त मिळाला तर बरे होईल असा विचार करून तिथल्या पठारावरच "फोना"सोबत आलेल्या सगळ्या मेम्बर्स ची ओळख करून घेतली तिथेच सूर्यास्तासोबत चहा घेतला आणि फोनाच्या इतर कार्याची सुद्धा माहिती दिली आणि गड उतरण्यास सुरु केले.शेवटी इतका अंधार झाला की पायाखालची जमीन काही दिसेना झाले होते. रात्री ७-३० पर्यंत सगळे मेम्बर्स बसच्या ठिकाणी जमा झाले आमची बस पुण्याकडे रवाना झाली.  सुमारे १३ कि.मी.चा कठीण चढाईचा कलावंतीण ट्रेक चा थरार अनुभवला. ट्रेक लीडर मंदार सर, मनोज सर, विवेक सर, आणि निकाळजे सर यांनी गडावर लई थंडगार हवा आहे याचे जणू आमिष दाखवून आम्हा सर्व मेंबर्सना ट्रेक पूर्ण करण्यास मदत केली. ट्रेक पूर्ण केल्याच्या समाधानाने रात्री १०:३० वाजता घर गाठले.




Tuesday, 4 October 2016

"भरारी"

सैराट



सैराटहा मराठी चित्रपटावर जेव्हा प्रदर्शित झाला मला तो चित्रपट मनापासून आवडला. त्यामागची कारणे अनेक आहेत. त्यावेळीच मला त्या चित्रपटाविषयी थोडंसं काहीतरी चांगले लिहावे असे वाटले होते परंतु माझ्याकडून राहून गेले. अजूनही या चित्रपटाची जादू कायम आहे त्यामुळे मी एक प्रेक्षक म्हणून आज जरी मी लिहिले तरी वावगे ठरणार नाही असे मला वाटते.


सैराटहा मराठी चित्रपट दिनांक २९ एप्रिल २०१६ या दिवशी प्रदर्शित झाला. सैराट च्या गाण्यांची जाहिरात दूरदर्शन वर मी पहात असे त्यावेळी मला वाटायचे की हा सिनेमा सुपरडुपर हिट होईल आणि सुपरडुपर हिट झालाच. मला अश्या चांगल्या वाटणाऱ्या चित्रपटासाठी पहिल्या दिवशी सिनेमागृहात जावे असे नेहमीच वाटते परंतु सैराट ज्या दिवशी प्रदर्शित होणार होता त्यादिवशीचे सिनेमागृहाचे तिकीट मला मिळेल की नाही यात शंकाच होती. सिनेमागृहाचे सैराटचे शो हाऊस फुल्ल होते. तरीही माझं नशीब कधीकधी साथ देते म्हणा. अगदीच पहिला दिवस आणि पहिल्या शो ची तिकिटे नाही मिळाली परंतु पहिल्या दिवशीच्या शो ची तिकिटे मिळाली ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट होती.सिनेमागृह कुठले ते मात्र विचारू नका. सिनेमा ला गेले सिनेमा खूप आवडला सिनेमाने सिनेमागृह दणाणून सोडले होते. सगळे झिंगूनच बाहेर पडले. 

सिनेमाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे हे आहेत. संगीत दिग्दर्शक माझे आवडते अजय-अतुल ह्यांची गाणी अफलातून, मन मोहवून टाकणारी, याड लावणारी आणि ठेका धरून नाचायला लावणारीच आहेत.नागराज मंजुळे, नितिन केणी आणि निखिल साने यांनी आटपाट प्रोडक्शन, एस्सेल व्हिजन प्रोडक्शन्स आणि झी स्टुडिओ या बॅनर अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती केली.चित्रपटातील बहुतेक सर्व गाणी अजय-अतुल यांनीच लिहिली असून पार्श्वसंगीतही त्यांनीच दिले आहे.  सैराट हा मराठी चित्रपट सृष्टीत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने आजपर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले. चित्रीकरणासाठी मंजुळे सरांनी सोलापूर जिल्ह्यातील जेऊर ह्या त्यांच्या स्वतःच्या मूळ गावाची निवड केली. हा चित्रपट महाराष्ट्र, गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, कलकत्ता, भिलाई, रायपूर, कर्नाटक, तेलंगण या ठिकाणी इंग्रजी उपशीर्षकांसहित प्रदर्शित करण्यात आला .यातले कलाकार म्हणजे आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू ह्या नव्या जोडीने आणि तानाजी गालगुंडे,अरबाज शेख पहिल्याच सिनेमात उत्तम अभिनय केला आहे. आहेच शिवाय नागराज मंजुळेदेखील कलाकार म्हणून दिसतात. अजून  इतर कलाकारांसोबत माझे ट्रेकचे फ्रेंड्स देखील आहेत. पूजा डोळस, मिथुनचंद्र चौधरी हे कलाकार आहेत. ते दोघे ह्या चित्रपटाचे सहायक दिग्दर्शक देखील आहेत. आम्ही वासोटा किल्ला ट्रेक, कातळधारा ट्रेक, आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई चा ट्रेक असे २-३ ट्रेक सोबत केले आहेत आणि मला याचा प्रचंड अभिमान आहे. ही दिग्दर्शक, कलाकार मंडळी अतिशय टॅलेंटेड आहे पण तरीही माणूस म्हणून खूप साधी आणि प्रेमळ आहेत. पुन्हा कधी सोबत ट्रेक होईल तेव्हा मी त्यांच्यासोबत नक्की सेल्फी फोटो काढणार.मंजुळे सर सुद्धा खूप अगोदर फोना च्या ट्रेक ला येत असत परंतु तेव्हा मी ट्रेक नव्हते करत. शिवाय पूजा डोळस यांचा भाऊ अभिषेक डोळस आणि श्वेता अभिषेक ही जोडी सिंगापुर ला राहतात. हे देखील २ ट्रेकला सोबत होते. सिंगापूर ला राहतात पण पुण्यात आले की नक्की सह्याद्रीच्या रांगेत ट्रेक ला येतात. एकदा ट्रेकला सिंगापूर च्या खूप छान छान गोष्टी सांगत होते. मी ऐकलंय श्वेता आणि अभिषेक डोळस ही सिंगापूरची जोडी पुण्यात आलीये. त्यामुळे एखादा ट्रेक सोबत झाला तरी आम्हाला आवडेल.  मी कधी जाईन तेव्हा जाईन परदेशात. आमच्या वतीने आमचे मित्रमंडळीच परदेशी वाऱ्या करून येतात आणि तिथले अनुभव, गंमती-जमती सांगतात. परंतु आपल्या भारतापेक्षा इतर काही देशात स्वच्छता विषयक नियम आणि इतर नियम अतिशय काटेकोरपणे पाळले जाते. आपणदेखील ही अशी शिस्त बाळगली तर वाह क्या बात है.. पण तरीही माझा भारतच सुजलाम सुफलाम आहे आणि मला प्यारा आहे. अनेक जाती-धर्म, अनेक भाषा, अनेक वेशभूषा तरीही अजून टिकून आहे. आणि त्यात सह्याद्री सारखा निसर्ग आहे की ज्यामध्ये आम्ही सध्या ट्रेकिंगचा आनंद घेतोय. हिमालयात जाईन तेव्हा जाईन पण अजून माझ्या महाराष्ट्रातले किल्ले तरी पूर्ण होऊ देत.  ट्रेक म्हंटले की मला दुसऱ्या सगळ्या गोष्टीचा विसर पडतो.   


तर मी सैराट विषयी बोलत होते. सगळ्याच कलाकारांचा अभिनय खूप छान झाला आहे. आता गं बया बावरलं”, “सैराट झालं जी’, “याड लागलं”, “झिंगाट”, ही गाणी अप्रतिम आणि तालसुरातील आहेत. मी तर जेव्हा ही गाणी आली असतील तेव्हापासून फोन मध्ये डाऊन लोड करून घेतली आहेत.  परवा  दांडियाच्या ठिकाणी प्रभाचा ग्रुप डान्स होता तिथेही  सैराट च्या गाण्यावर दीड वर्षाच्या मुलासहित ६-७ जणांनी नाच केला. लग्नाची मिरवणूक असो,गणपती बाप्पाची मिरवणूक असो की देवीची मिरवणूक असो सैराट च्या गाण्याची जादू कायम आहे. या सिनेमातील नवख्या कलाकारांचे आयुष्यच बदलून गेले आहे. जगाच्या इतिहासात सिनेमाच्याजगात सैराट चे नाव कायमचे कोरले गेले आहे. आजही सैराट सिनेमाची नशा तशीच आहे. सैराट मधले बरेच कलाकार सोलापूरचे असल्याने माझ्या आजूबाजूचे सोलापूरकर तर हवेत होते आणि अजूनही आहेत. आणि शिवाय चित्रीकरणदेखील सोलापूर मधेच झाल्याने सॉलिड भाव खातात सोलापूरकर. अर्थात ज्याला त्याला आपल्या मायभूमीच्या मित्रांचा अभिमान असतोच तसेच मलाही आहे. मी पण वेळोवेळी जाम भाव खाल्ला.  सैराट चे कलाकार पूजा डोळस आणि मिथुनचंद्र चौधरी हे माझे ट्रेक मधले अतिशय जवळचे फ्रेंड्स आहेत. नागराज सरांना मी प्रत्यक्ष कधी भेटले नाही परंतु जेव्हा त्यांना वेळ असायचा तेव्हा ते फोना सोबत ट्रेकिंग ला येत होते.खरोखर मला माझ्या सर्व मित्रमंडळींचा खूप जास्त आदर आणि अभिमान आहेच.
माझ्या वॉट्स अँप प्रोफाइल चे नाव सुद्धा मी सैराट ठेवले आहे.
"सैराट" ही निरागस प्रेमाची कथा आहे. सैराट म्हणजे कोणतेही बंधन न मानता मनमोकळे जगणे, वावरणे. सैराट ची  कथा, गीते, संगीत, कलाकारांचा अभिनयसगळॆच उत्तम आहे. सैराट चे डायलॉग तर सतत वॉट्स अँप वॉर चालू होते. "मराठीत सांगितलेले कळत नाही का इंग्लिशमध्ये सांगू का?"आजही लहान- थोरांच्या तोंडून सैराटचे डायलॉग ऐकतो आपण. सैराट चा शेवट मन हेलावणारा आहे. त्यावर अनेकांनी विचार मांडले. परंतु हा सिनेमा आहे. एखाद्या दिग्दर्शकाला त्यावेळी जे सुचले ते त्याने केले. अहो असं काय करता सिनेमा जगप्रसिद्ध झाला. आता  सिनेमाचा शेवट काय घेऊन बसलाय? काहींनी दिग्दर्शकाच्या खाजगी आयुष्यात डोकावून त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार केला बातमीपत्रात अनेक बातम्या वाचायला मिळत होत्या. परंतु कोणाचे खाजगी आयुष्य आणि सिनेमा याचा एकमेकांशी संबंध जोडू नये असे मला वाटते. एखाद्या हिंदी सिनेमाच्या दिग्दर्शकाला असे प्रश्न सहसा केले जात नाहीत. पण  साधा माणूस दिसला प्रसिद्धीच्या झोतात येताना दिसला की त्याला खाली कसा आणण्याचा हे लगेच लोकांना समजते. नागराज मंजुळे यांच्या फॅन्ड्री नंतर सैराट च्या यशामागे सिनेमाच्या दिग्दर्शकांची कलाकारांची आणि सगळ्यांचीच काय मेहनत असते ते त्यांचे त्यांनाच माहिती. या विषयात आपण प्रेक्षकांनी न पडलेले बरे असे माझे मत आहे. शाळेत एखादा नाच किंवा छोटे नाटक बसवायचे असेल तरी काय ढोर मेहेनत घ्यावी लागते ते मला स्वतःला माहित आहे. सिनेमा बनवणे आणि तो जगप्रसिद्ध होणे ही खूप मोठी कौतुकाची आणि अभिमानाची गोष्ट आहे.

"सैराट" चित्रपटाच्या गाण्यांमधून 'झिंगाट' नृत्य करणाऱ्या आणि 'सैराट झालं जी' म्हणत प्रेमाची वेगळी परिभाषा सांगू पाहणाऱ्या या सिनेमातील नायक नायिकेने प्रेक्षकांना याड लावलंयच शिवाय या चित्रपटात आणखी काही जमेच्या बाजू आहेत. जगभर गाजलेला फॅन्ड्री हा चित्रपट बनवणारा दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे यांचा हा दुसरा चित्रपट आहे. अजय-अतुल या प्रतिभावंतांनी या सिनेमाला दिलेलं संगीत ही जमेची बाजू आहे.  बर्लिन अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०१६ मध्ये सहभागी झालेला एकमेव मराठी चित्रपट आहे. बर्लिन अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आजवर निवड झालेला केवळ चौथा मराठी चित्रपट आहे. हॉलीवूडमध्ये संगीत रेकॉर्डिंग झालेला 'सैराट' हा केवळ मराठीच नव्हे तर भारतातील पहिला चित्रपट ठरलाय.रिंकू राजगुरु या इयत्ता नववीत शिकणाऱ्या अकलूजच्या (सोलापूर) मुलीने  पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावलाआहे. हा सिनेमा जगप्रसिद्ध होण्यास अशी एक ना अनेक कारणे आहेत.

पिस्तुल्या”, “फँड्रीआणि आता सैराट'’या तीनही चित्रपटासाठी अनुक्रमे सुरज पवार, सोमनाथ अवघडे आणि रिंकू राजगुरु यांना सलगपणे राष्ट्रीय पुरस्कार मिळवून देऊन हॅट्रिक साधणारे कदाचित एकमेव भारतीय चित्रपट दिग्दर्शक - नागराज पोपटराव मंजुळे हे आहेत. नवख्या गावच्या पोरांना(की ज्यांना अभिनयाचे काहीही ज्ञान नव्हते ) घेऊन अफलातून अविश्वसनीय काम करून घेणारा दिग्दर्शक अशी आपली ओळख मंजुळे यांनी बनवली आहे.  खऱ्या अर्थाने सिनेमॅटिक भाषेचा वापर करणारे ,सामाजिक भान असणारे,जातीपातीच्या विषमतेला मुठमाती देण्यासाठी झटणारे  दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे आहेत. या सिनेमाची प्रदर्शित झालेली गाणी दर्जेदार व प्रेक्षकांची मनं जिंकणारी आहेत.  आकाश ठोसर हा मराठी चित्रपट सृष्टीला मिळालेला अगदी साजेसा असा देखणा नायक आहे. एकाच त्याच त्याच अपेक्षांच्या  साच्यात बसवलेल्या आपल्या प्रेक्षकांना  नव्यानं चित्रपटाची भाषा समजून सांगणारा चित्रपट ठरला आहे. 
सिनेमा गृहात सिनेमा पाहताना पूजा मॅडम, मिथुन सर, आणि मंजुळे सर पडद्यावर दिसले की मी हाताचा शंख करून ओरडून दाद देत असे. आपली माणसे प्रत्यक्ष पडद्यावर पहाताना अभिमानाने उर भरून येतो. सैराट सिनेमा पाहणारी प्रत्येक व्यक्ती गाण्यावर नाच करायला जागेवरून उठून त्या स्क्रिन जवळ जाऊन नाचत होती. सैराटमय झाले होते सगळे. झी मराठीच्या हवा येऊ द्या या कार्यक्रमात सैराट ची टीम आल्यावर आम्ही टीव्ही समोर बसून सगळे संवाद ऐकून सैराट ची जादू अनुभवत असायचो. सैराट सिनेमा टीव्ही वर आला तरी सैराट ची जादू यत्किंचितही कमी झालेली नाही.  सैराट विषयी जेवढे चांगले बोलावे तेवढे कमीच आहे.
मला मराठी मातीचा, मराठी माणसाचा, मराठी भाषेचा, मराठी सिनेमाचा गर्व नाही तर माज आहे. प्रत्येक मराठी माणसाला मराठी मातीचा, मराठी माणसाचा, मराठी भाषेचा, मराठी सिनेमाचा अभिमान असलाच पाहिजे. सैराट सारखे असे अनेक उत्तमोत्तम मराठी सिनेमे तुमच्याकडून बनू देत आणि जगप्रसिद्ध होऊ देत. "सैराट"च्या सर्व टीम ला पुढील  वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

Thursday, 29 September 2016

"नजर भेट"

"नजर भेट' 
दिनांक-२७ सप्टेंबर २०१६
डहाणू गड (मुसळ्या डोंगर)
ठिकाण- ठाणे जिल्हा.   


गेला सप्टेंबर महिना काहींना काही कारणाने खूप धावपळ चालू आहे. जाम दमछाक झालीये माझी. पण मन मात्र आनंदी आणि उत्साही आहे. हाताला खाज आल्यासारखं झालंय सध्या. म्हणजे मला काहींना काही ना काही चांगलं लिहावसं वाटतं. २५ सप्टेंबर चा भोरगिरी भीमाशंकर चा ट्रेक केला. दुसऱ्या दिवशी वाढदिवस असल्याने त्याच दिवशी ट्रेक चा  चा लेख पूर्ण करायचे ठरवले आणि लेख पूर्ण केला सुद्धा.अर्थात इतर सगळी कामे करूनच. दुसऱ्या दिवशी गुजरात च्या दिशेने रवाना व्हायचे होते. माझ्या वाहिनीची आई अचानक ४-५ दिवस आजारी पडून देवाघरी गेली. वहिनीला भेटायला जायला जमले नाही. त्यामुळे २७ तारखेला वहिनीच्या आईच्या तेराव्या दिवशीच्याउत्तर कार्यास जायचे ठरवले आणि पहाटे उठून मुलांच्या शाळेची तयारी करून आणि अजून थोडी कामे आटोपून घेऊन पुणे-लोणावळा-मुंबई पुणे हायवे -ठाणे - घोडबंदर रोड- वसई- मनोर - चारोटी -उर्से अशा प्रवासाच्या दिशेने निघालो.
नेहमीप्रमाणे घोडबंदर रोड ला ट्राफिक जाम होताच एक ते दीड तास आमचा ट्राफिक मधेच गेला.कधी कधी हा  ट्राफिक मात्र उगाच असतो. कोणीतरी वाहन चालक उगाच मध्ये घुसून स्वतःची लेन सोडून समोरची लेन देखील ब्लॉक करतात. आम्हाला वाटले रस्त्याचे काम चालू असेल परंतु नंतर ट्राफिक पोलिसांनी दंडुके दाखवल्यावर रस्ता चुटकीसरशी मोकळा झाल्यावर समजले की जाण्याच्या घाईमुळे वाहन चालकांनी उगाचच समोरचा आमचा रास्ता अडवून धरला होता. 

एक ते दीड तासांनी रास्ता मोकळा झाल्यावर आम्ही गुजरात कडे निघालो.  तेव्हा पावसाने चांगलीच हजेरी लावली. खरे तर आम्हाला मुंबई-अहमदाबाद हायवे वर डहाणूजवळ चारोटी नाक्यापासून आत १०-१२ कि. मी. जायचे होते. आणि वाहिनीच्या आईचे उत्तर कार्य आटोपून आणि तिथल्या सर्व मंडळींना भेटून  आम्हाला लवकरात लवकर निघून अंधार व्हायच्या आत पुणे गाठायचे होते. चारोटी नाक्यापासून आत जायचा रास्ता खूप छोटा आहे. परंतु सध्या पावसामुळे सगळे नदी-ओढे भरून वाहत होते. सर्वत्र हिरवे गवत आणि हिरवी भातशेती छान दिसत होती. त्यामुळे प्रवासाचा थकवा जात होता. उर्से या गावी वाहिनीचा भाऊ श्री संतोष पाटील (ज्यांनी माझा "के-टू-एस ट्रेक' चा लेख आवडल्यावर "दैनिक महासागर' या बातमी पत्रामध्ये छापून आणला होता.) यांच्या घरी आम्ही पोहोचलो. कार्य पार पडले. त्या कार्याच्या वेळी मी त्या ठिकाणी काही गोष्टी ऐकल्या त्या मला मनोमन पटल्या त्या इथे नमूद करते. उत्तर कार्याला खूप गर्दी होती.  नातेवाईक आणि मित्र परिवार हजर होता. संतोष पाटील हे गरजू लोकांसाठी लगेच धावून जाणारे आहेत धडपडणारे आहेत. स्वतःचे कुटुंब सांभाळून त्यांना जे जे चांगले कार्य करता येईल ते ते त्या ठिकाणी ते करतात. त्यांच्या उर्से या गावात जेवणासाठी गावातल्याच सर्व महिला कार्यरत होत्या. गावात एक समाजगृह आहे. संतोष पाटील यांनीसमाजगृहाच्या च त्या समाजगृहासाठी त्यांची स्वतःची जागा गावाला दिली होती.  त्या समाजगृहाच्या ठिकाणी गावातले सगळे कार्यक्रम होतात. आजकाल कोणत्याही गावात एकी नसते. परंतु या गावात एक गाव -एक गणपती,तसेच नवरात्र मध्ये गावमिळून एकाच देवीची स्थापना केली जाते. आपण हे जे सण साजरे करतो ते एकत्र येण्यासाठीच. त्यामुळे संतोष पाटील यांनी पुढाकार घेऊन ही संकल्पना राबविली आहे आणि आजपर्यंत जपली आहे याचे मला कौतुक वाटले. माणसाकडे पैसे असला तरी दानत नसते किंवा माणुसकी विसरतो माणूस. परंतु खूप श्रीमंत नसून देखील श्री संतोष पाटील हे वेळोवेळी गरजूंना मदत करतातच. त्यांच्या आईच्या कार्याच्या वेळी आलेल्या पाहुण्यांना त्यांनी साधे परंतु उत्तम जेवण दिले शिवाय गावात आठवीपर्यंत शाळा आहे त्या सर्व 150 विद्यार्थ्यांना देखील त्यांनी जेवण दिले. ऐकून समाधान वाटले. समाजाची सेवा सेवा म्हणजे नेमके काय असते ? तर आपला एक माणूस म्हणून समाजातील सर्व थरातील गरजूंना उपयोग झाला पाहिजे असे माझे मत आहे.

तिथल्या सर्व मंडळींना भेटून संध्याकाळी ४ वाजता आम्ही पुण्याच्या दिशेने निघालो सोबत माझे आई-बाबा, काका, एक आतेबहीण असे आम्ही ५-६ जण निघालो. तिथून निघाल्यावर जाताना मला एक गड दिसला होता परंतु कार्यस्थळी वेळेत पोहोचायची घाई असल्याने मी फोटोग्राफी करणे टाळले. येताना मात्र गाडीतूनच का होईना काही फोटो काढले. तो गड अतिशय देखणा दिसत होता त्यामुळे मला मोह आवरला नाही. तो गड म्हणजे ठाणे जिल्यातील पालघर तालुक्यातील  डहाणू च्या महालक्ष्मी देवीचा डोंगर आहे. दिसायला अगदी मुसळासारखं दिसतो त्यामुळे त्याला मुसळ्या डोंगर असेही म्हणतात. आजकाल ट्रेकिंगसाठी सुद्धा हा गड प्रसिद्ध आहे. त्या भागात असे खूप गड आहेत  की जे ट्रेकिंगसाठी प्रसिद्द आहेत परंतु आपण "फोना" ट्रेकर्स ना थोडे दूर आहे इतकेच. तरीही एकदा तरी त्या भागात म्हणजे पश्चिम कोकणात जाणे होईल अशी आशा करते.


आदिवासींची आदिमाता असलेली डहाणूची महालक्ष्मी महाराष्ट्र आणि गुजरातमधील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे. इथल्या देवळातील पुजारी आदिवासी असून सोवळं न नेसताच देवीची पूजा करतात. बऱ्याच वर्षांपासूनच परंपरा आजही चालू आहे.बखरकार फेरिस्ता यांनी हे दैवत एकेकाळी अतिशय श्रीमंत होतं असं म्हटलं आहे. १००८ मध्ये सुलतान महम्मदाने हल्ला करून देवस्थान लुटलं होतं.त्या वेळी त्याने सात लाख सुवर्ण दिनार , सातशे मणांचे सोन्या-चांदीचे पत्रे दोनशे मण शुद्ध सोन्याच्या लगडी , दोन हजार मण अशुद्ध चांदीचे पट, वीस मण रत्नं , हिरे , मोती , पाचू , माणिक असा किमती ऐवजी लुटून नेला होता. तर गझनीच्या महम्मदाने हे देऊळ लुटून तिथे मशीद बांधली. मुस्लीम राज्य खालसा झाल्यानंतर, इथे पुन्हा मंदिर बांधलं गेलं. त्या वेळी राजा तोरडमल यांच्यासोबत अकबर बादशहाने देवीचं दर्शन घेतलं होतं. पंजाब प्रांत स्वतंत्र केल्यानंतर राजा रणजितसिंहाने मंदिरावर सोन्याचा कळस चढवला. अशा ऐतिहासिक नोंदी नोंदवण्यात आल्या आहेत.पुराणातच अनेक अख्यायिका आहेत.कोल्हापूरची महालक्ष्मी गुजरातकडे जात असताना तिला हा परिसर खूपच आवडला. म्हणून देवीने गडाच्या टोकावर मुक्काम केला. पांडव अज्ञातवासात असताना या ठिकाणी त्यांनी मुक्काम केला होता.देवीचं मुख्य मंदिर डहाणूपासून अठरा किलोमीटर आणि मुंबई-अहमदाबाद हायवेवरील चारोटी नाक्यापासून आठ किलोमीटर असलेल्या वधवा गावाजवळील गडावर आहे. मंदिरपायथ्यापासून चारशे फूट उंचावर असून तिथे जाण्यासाठी नऊशे पायऱ्या आहेत. एक हजार फूट उंच शिखरामुळे देवीचा डोंगर सहज दिसतो. या मंदिरात जाण्यासाठी खूप परिश्रम पडत असल्याने डोंगराच्या पायथ्याशीही मंदिर बांधण्यात आलं आहे.हे मंदिर हायवेवर चारोटी नाक्यापासून अवघ्या तीन किलोमीटरवर आहे. इथे नेहमी गर्दी  असते. मात्र यात्रेच्या वेळी भाविक वरच्या मंदिरात जातात. पौणिर्मेच्या मध्यरात्री १२ वाजता सातवी कुटुंबातील प्रमुख पुजारी ध्वज, पूजेचं साहित्य , देवीची ओटी भरण्याचं साहित्य घेऊन पायथ्याशी असलेल्या मंदिरातून एकटाच निघतो. ध्वजलावण्याचं ठिकाण पायथ्यापासून १४०० फूट उंच शिखरावर आहे. तिथे पोहोचल्यावर तो तुपाचा दिवा लावून ध्वज फडकवतो. मग यात्रा सुरू होते.

डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी आईची प्रसिध्द याञा साधारण  एप्रिल मध्ये  असते. ही याञा १५ दिवस चालते. मंदिरातील पूजेचा आणि गडावर ध्वज लावण्याचा मान वर्षानुवर्षे आदिवासी बांधवाचा आहे . जव्हार च्या संस्थाना कडून ध्वज वाघाडी मार्गे विवळवेढे गावात आणला जातो. आणि चैञशुध्द पौर्णिमेला रात्री मुसळ सारख्या दिसणाऱ्या डोंगरावर (मुसल्या डोंगर-महालक्ष्मी गड) ध्वजारोहण होते आणि याञेला सुरूवात होते. जिल्हयातील आदिवासींची आदिमाता म्हणून ओळखली जाते. माझा भाऊ रुपेश आणि माझ्या माहेरच्या गावातील लोक आणि आसपासच्या गावातील लोक या देवीच्या यात्रेच्या दरम्यान पदयात्रा करतात.


त्या गडाचे फोटोकाढून मुंबई-अहमदाबाद हायवे वर  शिरसाट या ठिकाणी माझ्या बाबांनी दिलेला स्पेशल चहा प्यायलो आणि पुण्याकडे निघालो. नेहमीप्रमाणे घोडबंदर रोड ला खाडीपुलाजवळ ट्राफिक जाम होताच. पण गाडीत बसल्या बसल्या तिथेही  सुंदर संध्याकाळचे फोटो काढायचा मोह मला आवरला नाही. एका बाजूला सोनाच्या गोळा अस्ताला चालला होता तर दुसऱ्या बाजूला खाडीमध्ये डोगर उभा होता असे भासत होते. ट्राफिक मधून पादचारी रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांनाही मी कॅमेऱ्यात कैद केले आहे. एक ते दीड तासाने तिथला रास्ता थोड़ा मोकळा झाल्याने आम्ही पुन्हा न थांबता रात्री १० वाजता पुण्यात घरी पोहोचलो. जे मनाला पटले ते लिहिले, जे खटकले ते ही लिहिण्याचा प्रयत्न केला आहे बघा तुम्हाला आवडतंय का ते....





Monday, 26 September 2016

"भोरगिरी-भिमा" तुफानी ट्रेक

भोरगिरी ते भिमाशंकर ट्रेक
चढाई श्रेणी-मध्यम
ठिकाण- पुणे जिल्हा
दिनांक - २५ सप्टेंबर २०१६


पुणे जिल्ह्यामध्ये असलेल्या खेड तालुक्याचे मुख्य गाव म्हणजे राजगुरुनगर. क्रांतिकारक राजगुरू यांचा जन्म येथे झाल्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ खेड गावाचे नाव बदलून राजगुरुनगर असे ठेवण्यात आले. राजगुरुनगर हे तालुक्याचे गाव असून ते पुणे-नाशिक या महामार्गावर,भीमा नदीच्या तीरावर वसलेले आहे.भीमा नदीचा उगम सह्याद्रीच्या मुख्य रांगेतील भीमाशंकरजवळ होतो तेथून ती राजगुरुनगर येथे येते. या भीमा नदीच्या किल्ले भोरगिरी विसावला आहे. भोरगिरीचा किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून साधारण ७००मीटर आहे.भोरगिरी किल्ला छोटेखानी असून,पावसाळ्यात येथे हिरवागार निसर्ग आणि प्रदूषणविरहित वातावरण अनुभवता येते. भोरगिरी ते भीमाशंकर हे अंतर ८ कि.मी. आहे परंतु भोरगिरी गड जाऊन-येऊन आणि भीमाशंकर असे एकूण अंतर आम्ही १० ते ११ कि. मी. चाललो असेल.

घनदाट जंगल आणि ओढे,धबधबे,नदी यातून जाताना रमतगमत करता येणारा छान,सुंदर असा ट्रेक  होणार यात शंका नव्हती. या संपूर्ण ट्रेक मार्गावर असंख्य धबधबे आणि अनेक रानफुले पाहायला मिळतात.  भोरगिरी नावानेच परिचित असलेल्या या किल्ल्याच्या पायथ्याला भोरगिरी नावाचे लहानसे गाव आहे. राजगुरुनगरपासून साधारण ५० कि.मी. अंतरावर भोरगिरी आहे.राजगुरुनगर हे पुणे नाशिक रस्त्यावर पुण्यापासून ४० किलोमीटरवर आहे. तेथून डावीकडे वळून चासकमान, वाडा या गावांवरून टोकावडेमार्गे जाणारा रस्ता भोरगिरी गावाशी संपतो. जाताना वाटेत भीमा नदीवरील धरण पहाता येते. भोरगिरी गाव हे पुण्यापासून किमान ९० कि.मी.अंतरावर येते.इथे भीमेच्या काठावर कोटेश्वर मंदिर आहे. या कोटेश्वर मंदिराबद्दल अशी आख्यायिका सांगतात की देवांनी इथे असलेल्या पाण्याच्या डोहामध्ये स्नान केले होते. त्यामुळे तो डोह पवित्र झाला आहे. म्हणून आजही इथले स्थानिक उत्सवाच्या काळात इथे असलेल्या डोहात अंघोळ करतात. झंझराजाने जी बारा शिवालये बांधली त्यात या कोटेश्वरचाही समावेश आहे, असे मानले जाते.किल्ल्यावर खोदलेल्या गुहा आहेत. तेथे एक शंकराचे आणि महालक्ष्मीचे देऊळ आहे. किल्ल्यावर जाताना पावसाळ्यात अनेक नैसर्गिक धबधबे दिसतात. नैसर्गिक पाण्याची कुंडे दुथडी भरून वहात असतात.


'भोरगिरी-भीमाशंकर' जरी हा ट्रेक असला तरीही भारतातील बारा जोतिर्लिंगांपैकी भीमाशंकर हे महाराष्ट्रातील एक जोतिर्लिंग आहे त्यामुळे बारा जोतिर्लिंगाची माहिती द्यावी असे मला वाटते त्यामुळे या बारा जोतिर्लिंगाची माहिती मी इथे देत आहे.ही माहिती मी नेटवरूनच शोधल्याने यामध्ये किलोमीटरचा थोडाफार फरक असू शकतो.
बारा जोतिर्लिंगे-
सोमनाथ- हे बारा ज्योर्तिर्लिंगांपैकी पहिले जोतिर्लिंग देशातील प्राचीन तीर्थस्थळांत सोमनाथ मंदिराचा समावेश होतो. त्याचा उल्लेख स्कंदपुराण, श्रीमदभागवत गीता, शिव पुराणात आढळतो. वेद, ऋग्वेदातही सोमेश्वर महादेवाचा महिमा वर्णिला आहे. काठेवाडचे दक्षिणेस असलेल्या वेरावळ बंदराला समुद्रमार्गाने आणि रेल्वेने जाता येते. वेरावळहून प्रभासपट्टण तीन मैल लांब आहे.
मल्लिकार्जुन- गुंटकल बेसवाडा - या छोट्या लाइनवर नंद्याळ स्टेशन आहे. तेथून 28 मैलांवर असलेल्या आत्माकुमार गांवाला मोटारीने जावें लागतें. आत्माकुरहून मल्लिकार्जुन 43 मलै श्रीशैल्यपर्वतावर आहे. रागावून गेलेल्या कुमार कार्तिकेयाला भेटण्याकिरतां (मल्लिका) पार्वती व अर्जुन (शंकर) येथें आले म्हणून मल्लिकार्जुन या नावाने प्रसिद्ध झाले. मल्लिकार्जुनाच्या पलीकडे पांच मैलांवर पाताळगंगा (कृष्णा) आहे.
महाकालेश्वर- उज्जैनचे महाकाल मंदिर हे शंकराच्या बारा ज्योर्तिर्लिंगांपैकी एक आहे. हे एकमेव दक्षिणमु्खी शिवलिंग आहे. तांत्रिक-मांत्रिकांसाठीही हे मंदिर खूप महत्त्वाचे मानले जाते. श्री महाकाल मंदिराची प्रशंसा महाभारतकालीन वेद व्यासांपासून कालिदास, बाणभट्ट आणि राजा भोज यांनीही केली आहे. येथील मंदिराची निर्मिती अकराव्या शतकात झाली. त्यानंतर जवळपास 140 वर्षानंतर दिल्लीचा सुलतान इल्तुतमिशाने उज्जैनवर आक्रमण करून हे मंदिर उध्वस्त केले. सध्याचे मंदिर मराठाकालीन आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार अडीचशे वर्षांपूर्वी शिंदे घराण्याचे दिवाण बाबा रामचंद्र शेणवी यांनी केला होता. ओंकारमांधाता उज्जयिनी-खंडवा रस्त्यावर मोरटक्का स्टेशनापासून दहा मैलांवर नर्मदेच्या-काठी आहे. हे नर्मदेच्या दुभंग झालेल्या बेटांत डोंगरावर आहे.
अमलेश्वर- ओंकारमांधाता. उज्जयिनी-खंडवा रस्त्यावर मोरटक्का स्टेशनापासून दहा मैलांवर नर्मदेच्या-कांठीं आहे. हें नर्मदेच्या दुभंग झालेल्या बेटांत डोंगरावर आहे. तेथेच गौरी सोमनाथ व भैरवशीला ही स्थानें आहेत. दुसरें ॐकार या नांवाचें लिंग नर्मदेच्या दक्षिण तीरावर आहे. हा सर्व भाग ॐकारच्या आकाराचा आहे, म्हणून यास ओंकार अमलेश्वर असें म्हणतात.
वैद्यनाथ- शिवपुराणांतील श्लोकाप्रमाणें 'वैद्यनाथं चिता भूमौ' असा पाठ आहे. संथाल परगण्यांत पूर्व रेल्वेवरील जसीडोह स्टेशनापासून तीन मैल दूर ब्रँच लाइनवर वैद्यनाथ आहे. तेथील शिवालय प्रशस्त आहे. या स्थानीं कुष्ठरोगापासून मुक्त होण्याकरितां पुष्कळ रोगी येतात. बहुतेक विद्वानांच्या मतें हें ज्योतिर्लिगाचें स्थान आहे. दक्षिणेंत बारा ज्योतिर्लिगाच्या श्लोकांत 'वैद्यनाथ चिता भूमौ' याऐवजी 'परल्यां वैजनाथं' असा पाठ आहे. परळीवैजनाथयाचें स्थान मराठवाड्यांत परभणी स्टेशनापासून चोवीस मैल दक्षिणेस आहे.
रामेश्वर- दक्षिण भारतांत प्रसिद्धच आहे. रामचंद्राने याची स्थापना केल्यामुळें याला असें नांव पडलें.
नागेश्वर- श्लोकांतील पाठ, 'नागेश दारुकावने' असा आहे आणि त्याप्रमाणें द्वारकेजवळचें लिंग तें हेंच ज्योतिर्लिग होय, असें बर्याच लोकांचे म्हणणें आहे. गोमती द्वारकेपासून थेट द्वारकेला जाणार्या रस्त्यावर बारा-तेरा मैलांवर पूर्वोत्तर रस्त्यावर हें स्थान आहे. औंढ्या नागनाथ हेंच नागेश ज्योतिर्लिंग होय, असें दक्षिणेतील लोकांचे म्हणणें आहे. मराठवाड्यांत पूर्णा-हिंगोली ब्रँचवर चौडी स्टेशन लागतें. तेथून पश्चिमेस चौदा मैलांवर हें स्थान आहे. आल्मोडापासून सतरा मैलांवर उत्तर-पूर्वेस योगेश (जागेश्वर) शिवलिंग आहे. त्यालाच कांहीं लोक नागेश ज्योतिर्लिंग म्हणतात.
काशीविश्वेश्वर- जगाच्या प्रलयकालांत शंकर ही नगरी त्रिशूलावर धारण करतो. गंगा नदीच्या पश्चिम किनार्यावर वसलेले वाराणसी जगातील प्राचीन शहरांपैकी एक मानले जाते. ही नगरी भारताची सांस्कृतिक राजधानी म्हणूनही विख्यात आहे. याच नगरीत काशी विश्वनाथाचे वास्तव्य आहे. हे मंदिर शंकराच्या प्रमुख ज्योतिर्लिंगामधील एक मानले जाते. लोक येथे केवळ दर्शनासाठीच येतात, असे नाही तर आयुष्यात मोक्ष प्राप्ती व्हावी ती इथेच असे त्यांना वाटते. परदेशातूनही लोक येथे येतात आणि गंगेच्या घाटाच्या सानिध्यात वसलेल्या मठ-मंदिरात जाऊन मनाला शांती देऊ शकणार्या साधूंच्या चरणी नतमस्तक होतात.
त्र्यंबकेश्वर- शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांमध्ये त्र्यंबकेश्वरचा समावेश होतो. दक्षिणेची काशी मानले जाणार्या नाशिकपासून हे ज्योतिर्लिंग 35 किलोमीटरवर आहे. ज्योतिर्लिंग स्तोत्रातही त्र्यंबकम गौतमी तटे असे म्हणून त्र्यंबकेश्वराचा उल्लेख केला आहे.त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी या पर्वताच्या पायथ्याशी वसले आहे. हा पर्वत म्हणजे शिवाचे एक रूप मानले जाते. याच पर्वतावर पवित्र गोदावरी नदी उगम पावते.
केदारेश्वर-हिमालयावर हरिद्वारहून केदार 150 मैल आहे. केदारनाथाचें देऊळ वैशाख ते आश्विन उघडें असतें. नंतर कार्तिकापासून चैत्रापर्यंत तें बर्फांत बुडालेलें असल्यामुळे बंद असतें.
घृष्णेश्वर- (घृष्णेश्वर) दौलताबाद स्टेशनापासून दहा मैलांवर घृष्णेश्वर आहे. शेजारी शिवकुंड (शिवालय) नांवाचें सरोवर आहे. घृष्णेच्या (घृश्मेच्या) प्रार्थनेवरून शंकर येथें स्थिर झाले म्हणून घृणेश्वर म्हणतात.
भीमाशंकर-शंकराच्या बारा ज्योर्तिर्लिंगांपैकी भीमाशंकर आहे. पुण्यापासून ९० किलोमीटरवर असलेले हे तीर्थस्थान पश्चिम घाटात वसले आहे. भीमा नदीही याच परिसरात उगम पावते. शंकराने या ठिकाणी त्रिपुरासुराचा वध केला. त्यानंतर आलेल्या घामातून भीमा नदीचा उगम झाल्याची पौराणिक कथा आहे. हे देऊळ तुलनेने अलीकडच्या काळात बांधले आहे. याचा कळस नाना फडणवीस यांनी अठराव्या शतकाच्या सुमारास बांधला. शिवाजी महाराजही या देवळात येऊन गेल्याचे सांगितले जाते. महाशिवरात्रीला येथे मोठी जत्रा भरते. मंदिराच्या मागे मोक्षकुंड आहे. तसेच घनदाट जंगल आहे. शेकरू हा खारीसारखा दिसणारा दुर्मिळ प्राणी येथे आढळतो. 



२५ सप्टेंबर २०१६ या दिवशी 'फोना' चा ६७ वा भोरगिरी ते भोरगिरी ते भिमाशंकर हा ट्रेक आयोजित करण्यात आला या गोष्टीचा आनंद होताच परंतु २६ सप्टेंबर माझा वाढदिवस असल्याने जर त्या दिवशी ट्रेक असता तर अजून जास्त मज्जा करता येईल असे वाटले. पण मजाच करायची म्हटली दिवस आनंदातच घालवायचा म्हंटलं तर इन ऍडव्हान्स मध्ये पण आपण ते करू शकतो. किंबहुना २५ तारखेला ट्रेकिंग च्या फ्रेंड्स सोबत वाढदिवस साजरा करणे आणि २६ तारखेला घरच्यांसोबत वाढदिवस साजरा करणे अशी दुहेरी पर्वणी मला मिळाली होती. परंतु हा आठवडा जरा धावपळीचा गेल्याने मला केक वैगेरे बनवून नेता आला नाही. पण ट्रेक चुकवायचा नाही असे मी मनोमन ठरवले होते. त्यात अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे माझी शाळेची मैत्रीण ममता ही देखील माझ्यासोबत ट्रेक ला येणार होती. आम्ही १० वि नंतर पुन्हा असे भेटलोच नव्हतो.त्यामुळे मी जास्त खुश होते. ती पुण्यातच राहत असून आम्ही फक्त वॉट्सऍप वर आणि फोन वर बोलत असायचो. मला कुठल्याही संधी चे सोने कसे करायचे हे चांगले माहित आहे.



२५ सप्टेंबर ला सकाळी आमची बस तळेगाव, निगडी, चाकण मार्गे भोरगिरी ला निघाली. पुणे ते भोरगिरी हे अंतर सुमारे ९० कि.मी. आहे. राजगुरूनगर मार्गे जाताना चासकमान धरण अतिशय सुंदर दिसत होते . असे वाटत होते की बस थांबवून मनसोक्त फोटोग्राफी करावी. परंतु वेळेचे बंधन असते त्यामुळे ते निसरसौंदर्य फक्त डोळ्यात साठवले, बसमध्येच पोह्याचा नास्ता करून १० वाजता भोरगिरीला पोहोचलो. ग्रुप लीडर नी  ट्रेक ची माहिती देऊन आम्ही आधी भोरगिरी हा छोटा गड एका तासात पूर्ण केला. या गडावर ५-६ पाण्याचे टाके आहेत, एक शंकराचे मंदिर आहे. अप्रतिम निसर्गसौंदर्य डोळ्यात आणि कॅमेऱ्यात साठवून घेतले. हिरवे हिरवेगार गालिचे पसरले होते जणू. सहज ओठावर 'हिरहिरवे गार गालिचे हरित तृणांच्या मखमालीचे' या ओळी येतात। या गावात आम्हाला भातशेती पाहायला मिळाली. आम्ही पुन्हा भोरगिरीच्या पायथ्याशी येऊन त्या गावातील एक शेतकरी गाईड म्हणून घेतला आणि भीमाशंकरच्या ट्रेक ला सुरुवात केली.

ट्रेक सुरु झाला त्यावेळी भिमानदीने आमचे स्वागत केले. भिमानदीचा उगम भीमाशंकर च्या मंदिराजवळून होतो. पिवळी फुले आणि त्या पाण्याचा खळखळ आवाज वाह खरंच मन मोहून टाकणारे वातावरण होते ते.. सर्वच डोंगरांनी धुक्याची  शाल पांघरली होती. आम्ही ओढे, जंगल पार करत चालत होतो. जंगल पार करत असतांना भिजण्याचा आनंद आम्ही घेतला. भीमाशंकरचे जंगल अतिशय घनदाट आहे. या जंगलामध्ये चित्ता आढळतो तसेच हरीण आढळते असे म्हणतात. तसेच अनेक प्रकारचे पक्षीही पाहायला मिळतात. जंगल पार करताना अंधारबन ची खूप आठवण झाली. धुक्यामुळे फार दूरचे काही दिसत नसायचे. तरीही फोटोग्राफीचा मोह आवरत नव्हता आणि त्यामुळे थकवा जाणवत नव्हता. दुपारचे २:३० वाजता आम्ही गुप्त शिवलिंग आहे त्याठिकाणी आम्ही ग्रुप फोटो काढून जेवण केले आणि लगेच भीमाशंकर चढायला सुरुवात केली.भीमाशंकर च्या वाटेमध्ये कारवींचे जंगल आहे.  शिवाय कारवीच्या झाडांना ५-७ वर्षातून फुले येतात. ती या वर्षी आम्हाला पाहायला मिळाली. निळ्या आणि सफेद रंगाची फुले दिसत होती सर्वत्र. 


एक तासात भीमाशंकर गाठले. तिथे  मस्त गरम गरम चहा घेतला आणि नागफणी पॉईंट ला जायचे ठरवले कारण त्या पॉईंट वरून खाली गोरखगड, कोथळीगड हे अतिशय सुंदर दिसतात. परंतु धुक्यामुळे आम्हाला ते दृश्य दिसू शकले नाही. भीमाशंकर च्या जंगल चा ट्रेक केला तो छान झाला. परंतु भीमाशंकर च्या मंदिरातील जे निर्माल्य मंदिराजवळ कुठेही टाकले जाते ते निर्माल्य आणि तिथला प्लास्टिक पिशव्यांचा आणि इतरही कचरा याचे व्यवस्थापन याची सोय केलेली नाही. ते थेट नदीतून आणि जंगलाच्या ओढ्यामधून जसे ओढे वाहतात तसे जंगल भर पसरले आहे.मोट्या प्रमाणावर  हा कचरा सगळीकडे पसरतो आणि मग प्रदूषण होण्यास कारणीभूत ठरतो. प्रसिद्ध तीर्थस्थळी स्वच्छता ही आढळून आली नाही ही एक गोष्ट खटकली. बाकी मंदिराजवळ जंगलात अनेक औषधी वनस्पती विकावयास होत्या. मंदिराचे आवार मोट्ठे आहे आणि बांधणी देखील उत्तम आहे. ट्रेक संपल्यानंतर आम्ही वेळेअभावी मंदिराचे दुरूनच दर्शन घेतले आणि आम्ही ५:३० ला पुण्याकडे निघालो. थकलो होतो तरीही जाता-येता  अंताक्षरी जोशात सुरु होती.
त्यात भर म्हणजे माझ्या वाढदिवसाची ट्रीट मला द्यायचीच होती. त्यामुळे मुख्य रस्ता येईस्तोवर आम्ही मराठी, हिंदी, तामिळ, पंजाबी, ऐराणी, जर्मन गाण्याचा आस्वाद घेतला. आणि एका हॉटेलमध्ये थांबून माझ्या वाढदिवसाची ट्रीट म्हणून मी सगळ्यांना अनलिमिटेड वडापाव आणि चहा दिला.(खाणाऱ्यांनी१किंवा२ च खाल्ला ती गोष्ट वेगळी) दुसऱ्या दिवशीच्या माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव सगळ्यांनी गाण्यातून, कवितेतून केला. मंदार सर,राणे सर, निकाळजे, महेश पाठक, रूपा, तनया, रोहिणी, स्नेहल, अबोली, सोरभ, प्रतीक, आनंद, निखिल, मी आणि माझी मैत्रीण ममता आम्ही सगळ्यांनी धमाल केलीच परंतु अंताक्षरी च्या वेळी विवेक,रोहित,शालाभ,स्नेहल खोल्लम, रश्मी, शुभांगी  आणि शैलजा ला खूप मिस केले. सगळ्यांची नावे नाही आठवत सॉरी फ्रेंड्स परंतु नव्या जुन्या सगळ्याच मेम्बर्सने तुफानी मजा आणली. माझी मैत्रीण ममता आणि आम्ही २५ वर्षांनंतर भेटल्यामुळे मनसोक्त गप्पा मारल्या आणि ट्रेक चा आणि फोटोग्राफीचा देखील मनमूराद आनंद लुटला. आम्ही रात्री १०:३० घरी पोहोचलो ट्रेक अतिशय सुरेख अप्रतिम आणि अविस्मरणीय झाला. धन्यवाद सगळ्यांना.